Thursday 18 April 2024

हिमाचल डायरी ३- स्थलांतर.. लादलेले/सक्तीचे..

 १ 

आमची धरमशालाला जाण्यासाठीची जी प्रमुख आकर्षणं होती त्यापैकी एक म्हणजे मॅक्लिओडगंज येथील दलाई लामा मंदिर (नामग्याल मॉनेस्ट्री) बघणे ! याआधी २०१० साली कूर्गजवळील बायलाकुप्पा येथील तिबेटी गोल्डन टेम्पल बघितलं होतं आणि मला ते खूपच आवडलं होतं. तिथे अनुभवलेली शांतता वेगळीच होती. म्हणूनच कधीतरी तिबेटी बौद्ध लोकांचे मुख्य देऊळही मला बघायचं होतं. याच देऊळ परिसरात तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा राहतात. चीनने तिबेटवर १९५९ साली ताबा मिळवल्यावर दलाई लामा परागंदा होऊन भारतात आश्रयासाठी आले.  या परागंदा अवस्थेत काय काय होत असेल? self preservation चा विचार न करता देशाच्या नागरिकांचा विचार करून एवढा लढा देणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. भारताने त्यांना आधी मसुरी आणि नंतर धरमशाला येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासून ते भारतातच निर्वासित म्हणून राहत आहेत. चीनने तिबेटवरील ताबा सोडण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने ते इतका प्रदीर्घ काळ आंदोलन करत आहेत. त्यांचा  दुर्दम्य आशावाद, चिकाटी आणि चीन सारख्या महाकाय राक्षसासमोर न झुकण्याची दृढता मला अचंबित करते. या अहिंसात्मक मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या लढ्यात मला महात्मा गांधी दिसतात (साध्याइतकंच साधनशुचितेला महत्त्व !) आणि म्हणूनही दलाई लामा यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. खरं तर त्यांना प्रत्यक्ष भेटायलाही आवडलं असतं पण त्याबाबतची प्रक्रिया काय असते हे माहित नसल्याने ते शक्य झालं नाही. परंतु त्यांचं निवासस्थान बाहेरून बघितलं आणि मॉनेस्ट्रीमधील कालचक्र मंदिर आणि बुद्धाच्या देखण्या मूर्ती बघितल्या. 

 


दलाई लामा मंदिरात प्रवेश करण्याआधी एक म्युरल आहे. यात तिबेटी लढा दर्शवण्यात आला  आहे. 

 

मॉनेस्ट्री मध्ये वेगवेगळ्या वयातले बौद्ध भिख्खू दिसले. अगदी लहान मुलांपासून ते ६० च्या पुढच्या वयापर्यंत! एक भिख्खू हातात अँपल वॉच घालून शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. आजूबाजूला खूप आवाज नसला तरीही लोकांची गर्दी होती, लगबग होती. या सगळ्यांत त्यांचं शांत चालणं सुद्धा मेडिटेटिव्ह वाटलं! मॅक्लिओडगंजमध्येच आणखी एक मॉनेस्ट्री पाहिली जिचं नाव कर्मापा मॉनेस्ट्री होतं. 

तिथे तर मोठी सभा भरल्यासारखे भिख्खू जमले होते आणि एक ज्येष्ठ गुरु त्या सभेत हळू आवाजात काहीतरी सांगत होता. सर्व भिख्खूंपुढे एक धार्मिक पुस्तकासारखं काहीतरी होतं ज्यात ते सगळे बघत होते. दलाई लामा मंदिरात लहान मुलांचं काहीतरी पाठांतर चालू होतं. त्यांची ते करायची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती. एक मुलगा खाली बसून तर त्याच्यासमोर एक मुलगा उभा राहून काहीतरी म्हणायचा आणि मध्येच टाळ्या वाजवायचा. 
 
हे सगळं कर्मकांड काय असतं हे माहित नाही आणि त्याबद्दल जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. पण ही बौद्ध भिख्खूंची दृश्यं आधी कुठेतरी पाहिल्यासारखं मला वाटत होतं. मग आठवलं - Phörpa (The Cup ) या भूतानची  निर्मिती असलेला  याच पार्श्वभूमीवरचा  एक नितांतसुंदर सिनेमा होता. अगदी कोणीही चुकवू नये असा. सिनेमा आता कुठे उपलब्ध आहे माहित नाही. पण त्याच्या ट्रेलरची लिंक देत आहे -https://youtu.be/o6qDpRbIM7o?si=rlf_EiV68cSOQRPH 

२ 

हा किस्सा आमच्या सहलीच्या शेवटच्या दोन तासांत घडलेला- आमच्या दिल्ली -पुणे विमान प्रवासातला. पण स्थलांतराचा धागा इथेही आहे म्हणून त्यावर लिहीत आहे. 
तर विमानप्रवासात माझ्याशेजारी एक २६-२७ वर्षांचा तरुण टेक ऑफ च्या वेळी व्हिडिओ काढत होता आणि तोंडाने सतत काहीतरी पुटपुटत होता. मला नंतर ऐकू आलं - तो बिस्मिल्ला उर रहमान उर रहीम असं सारखं म्हणत होता. मला वाटलं की  विमान निर्विघ्नपणे उडावं यासाठी असेल त्यांच्यात असं म्हणायची पद्धत! नंतर लगेच खराब हवेमुळे थोडा turbulence जाणवून विमान हलू लागलं. तर हा घाबरला आणि मला विचारलं - "Is this normal? क्या हवाइजहाज ऐसे हिलता है?"  माझ्यासारख्या माणसाला त्याने विचारावं याची मलाच गंमत वाटली. तरीही मी उसनं अवसान आणून त्याला शांत केलं. थोड्या वेळाने तो परत माझ्याशी बोलू लागला - "this is my first air travel. That is why I am a bit worried. I hope you won't mind if I keep talking to you. I just want to distract myself and divert my attention" असं म्हणून त्याने माझा ताबाच घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याचं पुण्यात एका नवीन नोकरीत जॉइनिंग होतं. चांगली मोठी MNC बँकेची नोकरी होती. पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे युट्यूबवर विमान कसं चालवतात याचा सगळा अभ्यास करून आला होता. विमान वळताना कुठलं बटन वापरतात हेही त्याला माहित होतं. जणू काही त्याच्यावर ती वेळ आज येणारच होती! शादीशुदा होता. अचानक त्याने मला विचारलं - शादी का motto क्या होता है? शादी successful कैसे करने चाहिये?" ४०००० फूट उंचावर आम्ही असताना त्याने मला असा हा प्रश्न विचारून प्रवचन करा असंच जणू सुचवलं! आता काय उत्तर देणार याचं ? मी म्हटलं की तुम्ही खूप विचार करता आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावून बसता. एवढा विचार करत जाऊ नका तुमचं ते वय पण नाही." पण माणूस well read होता. कुराणातले प्रसंग तर त्याने सांगितलेच शिवाय रामायणातील उदाहरणं पण त्याने दिली. तो काळ किती चांगला होता- "लक्ष्मणजी  तर  सीताभाभीच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नव्हते आणि आता देवर आणि भाभी एकाच मोटोरसायकलवर बसून फिरत असतात !" मला हसावं की रडावं कळेना! विषय बदलायला मीच विचारलं -तुम्ही दिल्लीचेच का.. आणि इथून आमच्या चर्चेला एक नवं वळण मिळालं. तो म्हणाला - अगदी दिल्लीचा नाही पण मुझफ्फरनगरचा ! सधन कुटुंबातला. बरीच शेतजमीन बाळगून असलेला. वडिल कडक शिस्तीचे. बाहेरचं काही खायचं नाही. जे काही करायचं ते घरीच. असा त्यांचा आग्रह . 
मला म्हणाला -"आपको मुझफ्फरनगर मालूम होगा ना ? वहां २०१३ में दंगे हुए थे." मी या प्रश्नावर क्लीन बोल्ड! मला दंगे झाल्याचे आठवत होते पण त्यापलीकडे काहीही आठवत नव्हतं. एवढ्या लांब उत्तर प्रदेशमधल्या एका ठिकाणी काही घडलं तर त्याचा माझा काय संबंध? मी कशाला त्याचा विचार करू? अशीच माझी स्वार्थी मनोवृत्ती! ' "जब दंगे  हुए तो मैं १४-१५ साल का था. ज्यादा कुछ समझता नहीं था. लेकिन एक महिने के लिये कर्फ्यू लगाया गया था और हम सबको एक स्कूल में रेफ्युजी कॅम्प में रखा गया था. हमारी इतनी जमीन थी लेकिन वो सब छोडके हमें स्कूल में रहना पडा. बाहर का खाना हम कम दर्जे का समझते थे लेकिन वोही खाना पडा. एक तरह से डर का माहोल था. हमने तो कुछ किया भी नही था . जब कर्फ्यू उठाया गया तब मुझे याद है मैं यूही जाकर धूप में खडा रहा." मी अक्षरश: निःशब्द झालो होतो. निवडणुकीच्या राजकारणात ध्रुवीकरणासाठी दोन समूहात तेढ उत्पन्न करणाऱ्या राजकीय पक्षांना यात सर्वसामान्य माणूस किती भरडला जाऊ शकतो याचं काही भान नसतं याची त्याच्या बोलण्यावरून पुन्हा प्रचिती आली. दंगलीत सापडलेल्या माणसाची परिस्थिती कशी असते याची थोडीशी कल्पना त्याने त्याच्या बोलण्यातून दिली. एक महिन्यासाठी का असेना पण सगळं काही सोडून त्यांना दुसरीकडे जाऊन राहावं लागलं. ते निर्वासित म्हणून शाळेत राहत असताना त्यांच्या घरात लुटालूट कशावरून नसेल झाली? मुख्य म्हणजे आपली काही चूक नसताना हे असं सक्तीचं स्थलांतर करताना त्यांना कोण यातना झाल्या असतील! त्याच्या बोलण्यात चीड वगैरे नव्हती पण तरीही त्या अनुभवांचे कायमस्वरूपी ओरखडे नक्कीच जाणवत होते. मला क्षणभर वाटलं - त्याचा विमानात घाबरण्याच्या , पॅनिक होण्याच्या स्वभावाची मुळं त्याच्या या लहानपणीच्या असुरक्षित वातावरणाच्या अनुभवात तर नसतील? दुर्दैवाने हे कळणं अवघड होतं आणि आमचा विमान प्रवास संपतही आला. विमान सुरक्षितपणे लँड झाल्यावर त्याने लगेच त्याच्या बायकोला तसं कळवलं आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या दिशांना पांगलो. 
(मुझफ्फरनगर दंगलीविषयी सविस्तर माहिती -
                         )                                                                                                                           (क्रमश:)


2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. परतीच्या प्रवासातील अनुभव वाचताना सहानुभूती तर वाटलीच, तसेच स्वार्थी राज्यव्यवस्थेची चीड पण वाटली. त्या थोडक्या संभाषणामधील अनेक विषय वाचले आणि माणसाची भीती त्याला कुठे नेऊ शकते असा विचार मनात आला. शादी का motto हा विषय खूप मस्त लिहिला आहे. ते वाचताना तुमच्या आवडत्या लेखकाची - पु.लं.ची आठवण आली. तिन्हीं blogs मधील photos आणि videos छान काढले आहेत.

    ReplyDelete