Wednesday 31 October 2018

'चि. सौ. कां रंगभूमी: एक अविस्मरणीय नाट्यानुभव !



(माझे मामा श्री यशवंत देवस्थळी हे लार्सन अँड ट्युबरो या नामांकित कंपनीचे माजी प्रमुख वित्तीय अधिकारी तसेच कॉर्पोरेट जगतातले एक सन्माननीय नाव ! त्यांना गाण्याची अतिशय आवड आणि कला क्षेत्रांत विशेष रस!  २०१५ साली ते सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'राजवाडे अँड सन्स' या एका  मोठी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटाचे निर्माते होते. आणि आता १९ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईत झालेल्या ''चि. सौ. कां रंगभूमी' या नाटकाद्वारे त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं आहे. पुण्यात या नाटकाचा १० ऑक्टोबर ला प्रयोग झाला. त्याचाच हा अनुभव!).... 

दिनांक १० ऑक्टोबर रोजी मराठी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या 'चि. सौ. कां रंगभूमी' या नाटयरूपी 'लग्नाला' हजर राहण्याचा योग आला. लेखिका- दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी यांची शालीन, मार्दव असलेली शब्द 'संपदा', तिला लाभलेली श्री. अनंत पणशीकरांची नाट्य 'संपदा' आणि चोखंदळ श्री. यशवंत देवस्थळी यांची अर्थ 'संपदा' असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला! मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा धावता आढावा घेणारं हे नाटक उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेलं आहे. ही परंपरा सादर करण्यासाठी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या लग्नाच्या गोष्टीची सुंदर गुंफण लेखिका-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी केली आहे . अनुभवी आणि कसलेले राहुल मेहेंदळे आणि स्वतः संपदा जोगळेकर कुळकर्णी सोडल्यास यात तसे नवोदित कलाकार आहेत. पण प्रत्येकानेच आपआपला ठसा सुंदररीत्या उमटवला. 
विशेष उल्लेख करावासा वाटतो सर्व गायक कलाकारांचा ! नचिकेत लेले, अवधूत गांधी, शमिका भिडे आणि केतकी चैतन्य या सगळ्यांनीच गाणी छान म्हटली. बालगंधर्व रंगमंदिरात 'प्रत्यक्ष' बालगंधर्व अवतरले आणि त्यांनी अप्रतिम नाट्यगीते गायली हे फार भारी वाटलं. 

अवधूत गांधी यांच्या आवाजाची फेक जबरदस्त आहे. जरी माईक नसता तरीही त्यांचा आवाज शेवटच्या रांगेत सहज पोचला असता! त्यांचा मुद्राभिनय ही मस्त! या गायकांचं वैशिष्ट्य म्हणजे गाणी सादर करतानाचा अभिनय आणि त्याच वेळी गाण्यांतून व्यक्त होणारे भाव या दोन्ही बाबतीत ते सरस ठरले. याची दोन उदाहरणे देता येतील. संगीत स्वरसम्राज्ञी मधील 'कशी केलीस माझी दैना' हे गाणं सादर करतानाचा शमिका भिडे यांचा अभिनय आणि त्या गाण्यातून व्यक्त होणारी expressions छानच होती. तसंच संगीत शारदा मधलं 'मूर्तिमंत भीती उभी' हे गाणं आर्ततेने सादर करणाऱ्या केतकी चैतन्य यांनी नंतर लगेचच 'म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान' हे एकदम वेगळ्याच मूडचं गाणं सादर केलं. केतकी चैतन्य यांनी ज्योत्स्ना भोळे यांचं 'बोला अमृत बोला' हे गाणं सुंदर म्हटलं . खरं तर ते गाणं खूप अवघड आहे. त्यात खूप हरकती, मुरकी, ताना आहेत. पण ज्योत्स्ना भोळे यांची आठवण येईल एवढ्या सहजतेने त्यांनी ती म्हटली. सुहास चितळे (तबला) आणि केदार भागवत (ऑर्गन) यांची साथसंगतही गाण्यांमध्ये रंग भरणारी होती. 
अमोल कुलकर्णी यांचा तळीरामाचा प्रवेश, तसेच मोरूची मावशीही उत्तम! शर्वरी कुळकर्णी यांची ही पदार्पणाची भूमिका आहे असं अजिबात वाटत नाही इतका त्यांचा अभिनय सहज आणि आत्मविश्वासपूर्वक होता . तसंच अनिरुद्ध देवधर यांचा लोकनाट्याला साजेसा अभिनय होता. 

या नाटकाचा मला आणखी आवडलेला एक भाग म्हणजे ज्या नाटकांमधली गाणी अथवा प्रवेश सादर करण्यात आले आहेत त्या सर्व नाटककार आणि दिग्दर्शक, गीतकार संगीतकार यांना श्रेय देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कोणाला ती नावं माहीत नसतील त्यांना ती समजू शकतात. नाटकासारख्या माध्यमात इतर कुठल्याही डिजिटल दृश्य माध्यमाचा उपयोग करू नये असं मला वाटतं.(उदा. चित्रफीत, LCD प्रोजेक्टर वगैरे) या नाटकातदेखील या माध्यमाचा वापर टाळून ही श्रेयनामावली आपल्यासमोर अनोख्या पद्धतीने सादर होते. या श्रेयनामावलीमुळे हे नाटक फक्त स्मरणरंजन न राहता रंगभूमीचा इतिहास आपल्यापर्यंत पोचवतं. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने हे नाटक आवर्जून बघावं असं वाटतं. 
सध्याच्या एकूणच मराठी रंगभूमीची स्थिती कशी आहे याचा माझा अभ्यास नाही. पण मला वाटतं मुंबई-पुण्याबाहेरचं चित्र फारसं आशादायक नसावं. आणि पुण्या-मुंबईतही सगळं काही आलबेल असावं असं वाटत नाही. त्याला कारणं वेगवेगळी असतील. अर्थात ही काही आजचीच परिस्थिती आहे असंही नाही. 'चि. सौ. कां. रंगभूमी' या नाटकातदेखील रंगभूमी आणि रसिक यांच्यातील बेबनावावर सविस्तर भाष्य आहे. ग्रामोफोन, रेडिओ, चित्रपट यासारखी अनेक प्रलोभनं( किंवा पर्याय म्हणू या) उपलब्ध झाल्यामुळे प्रेक्षकांचा ओढा रंगभूमीकडे कमी होऊ लागला असं नाटकात सूचित करण्यात आलंय .त्यात आता भरीला टीव्ही मालिका, क्रिकेटच्या सामान्यांचं टीव्हीवर प्रक्षेपण हेही आहेच! खरं तर नाटक हे एक अतिशय सशक्त माध्यम आहे. रंगभूमीच्या मर्यादित अवकाशात देखील अनेक शक्यता दडलेल्या असतात आणि लेखक त्या अवकाशाचा उपयोग वैविध्यपूर्णरीत्या करू शकतो. कालानुरूप मराठी रंगभूमीने देखील बाह्य स्वरूपापासून ते कथा-संकल्पनेपर्यंत बदल करून अक्षरश: कात टाकलेली आहे. मराठी रंगभूमीची गौरवशाली वाटचाल पुढेही चालू राहण्यासाठी लोकाश्रयाची गरज कधी नव्हे इतकी आता आहे आणि 'चि. सौ. कां. रंगभूमी' या नाटकातून मिळालेला हा संदेश मला खूप महत्त्वपूर्ण वाटतो .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॉ कौस्तुभ दिंडोरकर !




( १) खालील वर्णनातल्या व्यक्ती खऱ्या आहेत परंतु हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे. 
  २) पण एक आहे- असा प्रसंग पूर्वी कधी झालाच नसेल असं नाही. कदाचित झालाही असेल पण कौस्तुभने आपल्याला कधी तो सांगितला नसेल. आणि जर झाला  नसेल तर पुढे कधीही तो घडणारच नाही असं नाही !
३) या लिखाणात कोणालाही दुखवायचा हेतू अजिबात नाही. अजाणतेपणी कोणी दुखावले गेल्यास मी आधीच माफी मागतो )

स्थळ: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय. असं म्हणतात की इथल्या जुन्या बिल्डिंगमध्ये  आठव्या मजल्यावर काही सुइट्स कायम मंगेशकर परिवारासाठी राखीव ठेवण्यात येतात. तर तिथल्या अशाच एका सुइटमध्ये.. 

तारीख : २६ ऑक्टोबर वेळ : दुपार 

सुइट प्रशस्त आहे. एका भिंतीवर मा. दीनानाथ यांची मोठी तसबीर फर कॅप घातलेली... तर दुसरीकडे संगीत मानापमान नाटकातल्या त्यांचा धैर्यधराच्या पोशाखातला मोठा फेटा बांधलेला फोटो. दोन्ही फोटोंना मोठाले हार! भिंतींवर एके ठिकाणी विठ्ठलाचं पेंटिंग( बहुदा उषा मंगेशकरांनी काढलेलं ) तर काही ठिकाणी पक्षी -प्राणी यांचे सुंदर फोटो. त्यात एक फोटो 'मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता' असा ... (हे सर्व फोटो बहुदा लता मंगेशकरांनी काढलेले !) अतिशय रसिकतेने सजवलेलं सुइट ! नवरात्रीचा पांढरा रंग नसताना देखील सगळीकडे पांढऱ्या रंगाची रेलचेल! एका मोठ्या पांढऱ्या सोफ्यावर पांढऱ्या रंगाची, नाजूक गुलाबी काठाची साडी नेसलेल्या साक्षात लतादीदी बसल्या आहेत ! प्रसन्न मुद्रा ! चेहऱ्यावर छान हसू! त्यांच्या उजव्या बाजूला थोडंसं मागे अदबीनं त्यांची धाकटी बहीण-उषा मंगेशकर- बसल्या आहेत.त्यांचीही पांढरीच साडी ! तर दीदींच्या डाव्या बाजूला सोफ्याच्या वेगळ्या खुर्चीवर पंडित हृदयनाथ मंगेशकर( उर्फ बाळ किंवा बाळासाहेब)  बसले आहेत. त्यांचाही पांढरा  झब्बा, त्यावर काळं जॅकेट,  पांढरा शुभ्र पायजमा आणि मोठा जाड भिंगाचा काळा चष्मा! बाळासाहेबांच्या डाव्या बाजूला कौस्तुभ आणि त्याच्या परिवारातली जवळची माणसं बसली आहेत. इतरही काही निमंत्रित आहेत. यांच्या मध्ये एक नटून थटून आलेली निवेदिका खेटून उभी आहे. तिच्या हातात कॉर्डलेस माईक आहे. पण ती अजून तरी काही बोलत नाही. फोटोंसमोर लावलेल्या उदबत्त्यांचा सुगंध, अत्तराचा परिमळ आणि त्यात पार्श्वभूमीवर दीदींच्या आवाजतल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या रेकॉर्डचा मंद दरवळ ! एकंदरीत माहोल अगदी संमोहक आहे! 

सगळेच कोणाचीतरी वाट बघताहेत. हळू आवाजात एकमेकांशी बोलतायत. कोणी दीदींना येऊन नमस्कार करतायत. त्याही त्यांचा स्वीकार करता करता नमस्कार करताहेत. 

अचानक निवेदिका गडबडून जाते... हातातला माईक सावरते.. म्हणते " डॉक्टर धनंजय केळकर आले आहेत. तेव्हा आता आजचा कार्यक्रम सुरु करूया.." सगळ्यांचं लक्ष आपोआप दरवाज्याकडे जातं. दीनानाथ रुग्णालयाचे सर्वेसर्वा, सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ धनंजय केळकर झपझप चालत सुइट मध्ये प्रवेश करतात. बहुदा नुकतेच एक ऑपरेशन करून ते आले असावेत. त्यांचा पेहराव ओ.टी. मधल्या डॉक्टरचा असतो तसाच! निळ्या रंगाचा ड्रेस आणि पायात काळ्या सॅंडल वजा सपाता ! ऑपरेशन करून आले असले तरीही डॉ केळकर अजिबात दमलेले दिसत नाहीत. निवेदिका पुढे काही बोलायच्या आत डॉ केळकर तिला खुणेने माईक त्यांच्याकडे द्यायला सांगतात आणि बोलायला सुरुवात करतात. 

डॉ. केळकर :
 कार्यक्रमाला थोडा उशीर झाला ... पण काय करणार?एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती... असो ! (लता दीदींकडे बघून) .. तर दीदी... आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय... दीदी... आज आपल्याला दोन पुरस्कारांचं वितरण करायचं आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळणार आहेत. ती व्यक्ती म्हणजे आपल्या हॉस्पिटल मधले ब्रेन आणि न्यूरोसर्जन डॉ कौस्तुभ दिंडोरकर ! (सगळे टाळ्या वाजवतात)

डॉ केळकर :(कौस्तुभ कडे बघत... अगदी बारीकसं हास्य करून )- ए अरे कौस्तुभ... मला आता तुला अहो- जाहो म्हणायची सवय करून घेतली पाहिजे! दीदी हा कौस्तुभ आपल्याकडे २० वर्षांपेक्षा जास्त काळ आहे. त्याच्यात आणि तुमच्यात एक साम्य आहे ... 

लतादीदी: (प्रश्नार्थक चेहरा).. 

डॉ केळकर : तुमच्याप्रमाणेच यालाही फोटोग्राफीची खूप आवड आहे. उत्तम फोटो काढतो. इथल्या कामातून सवड  मिळाली की तो फोटो काढायला फिरत असतो देशोदेशी! आजचा दुसरा योगायोग म्हणजे  ज्याला पुरस्कार मिळणार आहे तो... म्हणजे कौस्तुभ... आणि पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळणार आहे.. ते म्हणजे बाळासाहेब... या दोघांचाही आज, २६ ऑक्टोबरला वाढदिवस आहे! 

लतादीदी (कौतुकाने आधी बाळासाहेबांकडे आणि नंतर कौस्तुभकडे बघतात): अरे वा ! 
आणि त्यांच्या या मंजुळ स्वरातील साध्या बोलण्याचंसुद्धा गाणं होतं ! 

डॉ केळकर : तर आता पहिल्या पुरस्काराबद्दल बोललं पाहिजे... दीनानाथ हॉस्पिटलमधल्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांसाठी हा पुरस्कार आहे... म्हणजे आम्ही एक निष्पक्ष परीक्षक मंडळ नेमलं होतं- ज्यात इथले काही डॉक्टर, डॉ व्ही जी कुलकर्णी,  इथल्या सोशल वर्कर शिल्पा बर्वे यासारखे परीक्षक होते. त्यांनी काही निकष ठरवले होते. त्यात मागच्या वर्षात केवळ पेशंटची संख्या हा एकाच निकष नव्हता. तर किती वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या, त्यात कॉम्प्लिकेटेड केसेस किती होत्या, त्या शस्त्रक्रियांनंतर आता पेशंट किती आणि कितपत बरे आहेत, एकंदरीत डॉक्टरांचा पेशंटबरोबरचा conduct, एथिकल प्रॅक्टिस इ सगळे निकष होते. आणि मला सांगायला आनंद होतो की सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार कौस्तुभने मिळवला आहे( टाळ्यांचा गजर ) तर हा पुरस्कार दीदींनी कौस्तुभला द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. 

(लतादीदी कौस्तुभला एक मोठा चांदीचा गणपती, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि उषा मंगेशकरांनी काढलेलं मा. दीनानाथ यांचं पोर्ट्रेट प्रदान करतात. त्यावेळी त्या म्हणतात - तुम्हांला यापुढेही असेच मान सन्मान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळोत, तुमच्या कामाची कीर्ती देशोदेशी पोहचो यासाठी माझ्याकडून शुभेच्छा! पुरस्कार स्वीकारताना कौस्तुभ दीदींना अगदी खाली वाकून नमस्कार करतो. डॉ केळकरांनाही तो नमस्कार करण्यासाठी वाकतो पण ते त्याला नमस्कार पूर्ण होण्याआधीच पाठीवर मैत्रीची थाप मारतात!) 
आता निवेदिका पुढे सरसावते.. 

निवेदिका : यानंतरचा पुरस्कार आहे मित्र फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा मैत्री पुरस्कार ! डॉक्टरांना हा पुरस्कार आम्ही का देतोय याची कारणं  मी थोडक्यात सांगते... 
१) मित्रांबरोबर असताना डॉ कौस्तुभ हे नेहमीच फक्त कौस्तुभ असतात. त्यांच्या डॉक्टरकीला बाजूला ठेऊन ते मित्रांमध्ये मनमोकळेपणाने मिसळतात. 
२) मित्रांच्या छोट्यात छोट्या वैद्यकीय शंकांचं निरसन ते तत्परतेने करतात. 
३) त्यांच्या सर्व मित्रांना डॉक्टर म्हणून ते एक आधार वाटतात. म्हणूनच मित्रांचे आई-वडील, इतर नातेवाईक यांच्या ब्रेन-न्यूरोसर्जरी संबंधी कुठल्याही आजारासाठी डॉक्टरांना कन्सल्ट केलं जातं. 
४) हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्या वावरण्यात एक सहजता आहे. कुठलाही बडेजाव नाही. मागे एका गाण्याच्या कार्यक्रमात डॉक्टरांच्या एका मित्राला निवेदक अंबरीश मिश्र यांची  सही हवी होती( तो मित्र मिश्रांचा खूप मोठा फॅन आहे म्हणे!) तर डॉक्टर कौस्तुभ यांनी कार्यक्रम संपल्यावर त्या मित्राला बॅकस्टेजला नेले आणि अगदी सहजरीत्या अंबरीश मिश्रांची सही मिळवून दिली! 
५) मित्रांनी मिळवलेल्या यशाचं, त्यांच्या सफलतेचं ते मनापासून भरभरून कौतुक करतात.हे करत असताना त्यांच्या मनात कुठेही असुरक्षितता किंवा हेवा अशा कुठल्याच नकारात्मक भावना नसतात. असतो फक्त जिव्हाळा आणि आपुलकी ! 

निवेदिका: तर आता 'मित्र फाऊंडेशन'चा मैत्री पुरस्कार डॉ कौस्तुभ दिंडोरकर यांना प्रदान करावा अशी विनंती मी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना करते. 

(पंडितजी सन्मानचिन्ह आणि सूर्याचं एम्बॉसिंग केलेलं एक मोठं चित्र कौस्तुभला प्रदान करतात. त्यावेळी ते कौस्तुभला म्हणतात: मित्र हे सूर्याचं दुसरं नाव आहे. डॉक्टरसाहेब आपण इतरांच्या आयुष्यात कायम असे सूर्यासारखे प्रकाशमान राहा... त्यांच्या आयुष्यातल्या आजाररूपी अंधाराला दूर  करा हीच शुभेच्छा ! धन्यवाद!) 

निवेदिका: धन्यवाद पंडितजी! आता मी डॉ कौस्तुभ यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं... 

कौस्तुभ: (पूर्णपणे भारावलेला)... (मोठा श्वास घेतो...) काय बोलू? M.S. किंवा M. Ch. च्यावेळी आलं नसेल इतकं टेन्शन मला आत्ता आलंय! माझी दैवतं असलेल्या प्रत्यक्ष लतादीदी आणि पंडितजींच्या हस्ते पुरस्कार... आमच्या केळकर सरांची कौतुकाची थाप... मला तर आपण एखादं स्वप्न बघतोय असंच वाटतंय! पण खरंच विचार केला तर मला असं वाटतं की हे दोन्ही पुरस्कार हे माझ्या एकट्याचे नाहीत. वैद्यकीय क्षेत्राविषयी म्हटलं तर ऑपरेशन करणारा मी सर्जन असलो तरी माझ्या मागे आणि माझ्या बरोबर अक्षरश: एक मोठी टीम काम करत असते. त्यात ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ओ.टी. मधला सगळा स्टाफ हे सगळे आलेच. शिवाय या श्रेयाचा वाटा माझ्या पेशंटचाही नक्कीच आहे आणि माझ्यामागे उभी राहणारी दीनानाथ हॉस्पिटल ही संस्था देखील आहेच! 
तसंच मैत्री पुरस्काराबद्दल म्हणता येईल... मी माणूस म्हणून कसा घडलो यामध्ये माझ्यावर घरच्यांचे संस्कार यांचा खूप मोठा वाटा आहे. तसंच माझी दगडूराम कटारिया ही शाळा, तिथले शिक्षक यांनीदेखील मला घडवलंय. माझी बायको डॉ गौरी, माझ्या मुली यांचं देखील मोठं श्रेय माझ्या या वाटचालीत आहे. मित्रांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे. माझ्या शाळेतल्या मित्रांशी माझं छान नातं आहे. त्यांच्यामुळेच मी जमिनीवर असतो. अशा पुरस्कारांमुळे हुरळून जात नाही. तेव्हा हे दोन्ही पुरस्कार सर्वांच्या वतीने मी नम्रपणे स्वीकारतो! 

इतका वेळ कौस्तुभचं सगळं मनोगत मन लावून ऐकणाऱ्या लतादीदी उत्स्फूर्तपणे म्हणून जातात: अरे वा !
आणि त्यांच्या या मंजुळ स्वरातील साध्या बोलण्याचंसुद्धा गाणं होतं !