Thursday 18 April 2024

हिमाचल डायरी ३- स्थलांतर.. लादलेले/सक्तीचे..

 १ 

आमची धरमशालाला जाण्यासाठीची जी प्रमुख आकर्षणं होती त्यापैकी एक म्हणजे मॅक्लिओडगंज येथील दलाई लामा मंदिर (नामग्याल मॉनेस्ट्री) बघणे ! याआधी २०१० साली कूर्गजवळील बायलाकुप्पा येथील तिबेटी गोल्डन टेम्पल बघितलं होतं आणि मला ते खूपच आवडलं होतं. तिथे अनुभवलेली शांतता वेगळीच होती. म्हणूनच कधीतरी तिबेटी बौद्ध लोकांचे मुख्य देऊळही मला बघायचं होतं. याच देऊळ परिसरात तिबेटी बौद्धांचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा राहतात. चीनने तिबेटवर १९५९ साली ताबा मिळवल्यावर दलाई लामा परागंदा होऊन भारतात आश्रयासाठी आले.  या परागंदा अवस्थेत काय काय होत असेल? self preservation चा विचार न करता देशाच्या नागरिकांचा विचार करून एवढा लढा देणं ही खूपच अवघड गोष्ट आहे. भारताने त्यांना आधी मसुरी आणि नंतर धरमशाला येथे कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासून ते भारतातच निर्वासित म्हणून राहत आहेत. चीनने तिबेटवरील ताबा सोडण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने ते इतका प्रदीर्घ काळ आंदोलन करत आहेत. त्यांचा  दुर्दम्य आशावाद, चिकाटी आणि चीन सारख्या महाकाय राक्षसासमोर न झुकण्याची दृढता मला अचंबित करते. या अहिंसात्मक मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या लढ्यात मला महात्मा गांधी दिसतात (साध्याइतकंच साधनशुचितेला महत्त्व !) आणि म्हणूनही दलाई लामा यांच्या बद्दलचा आदर दुणावतो. खरं तर त्यांना प्रत्यक्ष भेटायलाही आवडलं असतं पण त्याबाबतची प्रक्रिया काय असते हे माहित नसल्याने ते शक्य झालं नाही. परंतु त्यांचं निवासस्थान बाहेरून बघितलं आणि मॉनेस्ट्रीमधील कालचक्र मंदिर आणि बुद्धाच्या देखण्या मूर्ती बघितल्या. 

 


दलाई लामा मंदिरात प्रवेश करण्याआधी एक म्युरल आहे. यात तिबेटी लढा दर्शवण्यात आला  आहे. 

 

मॉनेस्ट्री मध्ये वेगवेगळ्या वयातले बौद्ध भिख्खू दिसले. अगदी लहान मुलांपासून ते ६० च्या पुढच्या वयापर्यंत! एक भिख्खू हातात अँपल वॉच घालून शांतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. आजूबाजूला खूप आवाज नसला तरीही लोकांची गर्दी होती, लगबग होती. या सगळ्यांत त्यांचं शांत चालणं सुद्धा मेडिटेटिव्ह वाटलं! मॅक्लिओडगंजमध्येच आणखी एक मॉनेस्ट्री पाहिली जिचं नाव कर्मापा मॉनेस्ट्री होतं. 

तिथे तर मोठी सभा भरल्यासारखे भिख्खू जमले होते आणि एक ज्येष्ठ गुरु त्या सभेत हळू आवाजात काहीतरी सांगत होता. सर्व भिख्खूंपुढे एक धार्मिक पुस्तकासारखं काहीतरी होतं ज्यात ते सगळे बघत होते. दलाई लामा मंदिरात लहान मुलांचं काहीतरी पाठांतर चालू होतं. त्यांची ते करायची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण होती. एक मुलगा खाली बसून तर त्याच्यासमोर एक मुलगा उभा राहून काहीतरी म्हणायचा आणि मध्येच टाळ्या वाजवायचा. 
 
हे सगळं कर्मकांड काय असतं हे माहित नाही आणि त्याबद्दल जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. पण ही बौद्ध भिख्खूंची दृश्यं आधी कुठेतरी पाहिल्यासारखं मला वाटत होतं. मग आठवलं - Phörpa (The Cup ) या भूतानची  निर्मिती असलेला  याच पार्श्वभूमीवरचा  एक नितांतसुंदर सिनेमा होता. अगदी कोणीही चुकवू नये असा. सिनेमा आता कुठे उपलब्ध आहे माहित नाही. पण त्याच्या ट्रेलरची लिंक देत आहे -https://youtu.be/o6qDpRbIM7o?si=rlf_EiV68cSOQRPH 

२ 

हा किस्सा आमच्या सहलीच्या शेवटच्या दोन तासांत घडलेला- आमच्या दिल्ली -पुणे विमान प्रवासातला. पण स्थलांतराचा धागा इथेही आहे म्हणून त्यावर लिहीत आहे. 
तर विमानप्रवासात माझ्याशेजारी एक २६-२७ वर्षांचा तरुण टेक ऑफ च्या वेळी व्हिडिओ काढत होता आणि तोंडाने सतत काहीतरी पुटपुटत होता. मला नंतर ऐकू आलं - तो बिस्मिल्ला उर रहमान उर रहीम असं सारखं म्हणत होता. मला वाटलं की  विमान निर्विघ्नपणे उडावं यासाठी असेल त्यांच्यात असं म्हणायची पद्धत! नंतर लगेच खराब हवेमुळे थोडा turbulence जाणवून विमान हलू लागलं. तर हा घाबरला आणि मला विचारलं - "Is this normal? क्या हवाइजहाज ऐसे हिलता है?"  माझ्यासारख्या माणसाला त्याने विचारावं याची मलाच गंमत वाटली. तरीही मी उसनं अवसान आणून त्याला शांत केलं. थोड्या वेळाने तो परत माझ्याशी बोलू लागला - "this is my first air travel. That is why I am a bit worried. I hope you won't mind if I keep talking to you. I just want to distract myself and divert my attention" असं म्हणून त्याने माझा ताबाच घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याचं पुण्यात एका नवीन नोकरीत जॉइनिंग होतं. चांगली मोठी MNC बँकेची नोकरी होती. पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे युट्यूबवर विमान कसं चालवतात याचा सगळा अभ्यास करून आला होता. विमान वळताना कुठलं बटन वापरतात हेही त्याला माहित होतं. जणू काही त्याच्यावर ती वेळ आज येणारच होती! शादीशुदा होता. अचानक त्याने मला विचारलं - शादी का motto क्या होता है? शादी successful कैसे करने चाहिये?" ४०००० फूट उंचावर आम्ही असताना त्याने मला असा हा प्रश्न विचारून प्रवचन करा असंच जणू सुचवलं! आता काय उत्तर देणार याचं ? मी म्हटलं की तुम्ही खूप विचार करता आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावून बसता. एवढा विचार करत जाऊ नका तुमचं ते वय पण नाही." पण माणूस well read होता. कुराणातले प्रसंग तर त्याने सांगितलेच शिवाय रामायणातील उदाहरणं पण त्याने दिली. तो काळ किती चांगला होता- "लक्ष्मणजी  तर  सीताभाभीच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नव्हते आणि आता देवर आणि भाभी एकाच मोटोरसायकलवर बसून फिरत असतात !" मला हसावं की रडावं कळेना! विषय बदलायला मीच विचारलं -तुम्ही दिल्लीचेच का.. आणि इथून आमच्या चर्चेला एक नवं वळण मिळालं. तो म्हणाला - अगदी दिल्लीचा नाही पण मुझफ्फरनगरचा ! सधन कुटुंबातला. बरीच शेतजमीन बाळगून असलेला. वडिल कडक शिस्तीचे. बाहेरचं काही खायचं नाही. जे काही करायचं ते घरीच. असा त्यांचा आग्रह . 
मला म्हणाला -"आपको मुझफ्फरनगर मालूम होगा ना ? वहां २०१३ में दंगे हुए थे." मी या प्रश्नावर क्लीन बोल्ड! मला दंगे झाल्याचे आठवत होते पण त्यापलीकडे काहीही आठवत नव्हतं. एवढ्या लांब उत्तर प्रदेशमधल्या एका ठिकाणी काही घडलं तर त्याचा माझा काय संबंध? मी कशाला त्याचा विचार करू? अशीच माझी स्वार्थी मनोवृत्ती! ' "जब दंगे  हुए तो मैं १४-१५ साल का था. ज्यादा कुछ समझता नहीं था. लेकिन एक महिने के लिये कर्फ्यू लगाया गया था और हम सबको एक स्कूल में रेफ्युजी कॅम्प में रखा गया था. हमारी इतनी जमीन थी लेकिन वो सब छोडके हमें स्कूल में रहना पडा. बाहर का खाना हम कम दर्जे का समझते थे लेकिन वोही खाना पडा. एक तरह से डर का माहोल था. हमने तो कुछ किया भी नही था . जब कर्फ्यू उठाया गया तब मुझे याद है मैं यूही जाकर धूप में खडा रहा." मी अक्षरश: निःशब्द झालो होतो. निवडणुकीच्या राजकारणात ध्रुवीकरणासाठी दोन समूहात तेढ उत्पन्न करणाऱ्या राजकीय पक्षांना यात सर्वसामान्य माणूस किती भरडला जाऊ शकतो याचं काही भान नसतं याची त्याच्या बोलण्यावरून पुन्हा प्रचिती आली. दंगलीत सापडलेल्या माणसाची परिस्थिती कशी असते याची थोडीशी कल्पना त्याने त्याच्या बोलण्यातून दिली. एक महिन्यासाठी का असेना पण सगळं काही सोडून त्यांना दुसरीकडे जाऊन राहावं लागलं. ते निर्वासित म्हणून शाळेत राहत असताना त्यांच्या घरात लुटालूट कशावरून नसेल झाली? मुख्य म्हणजे आपली काही चूक नसताना हे असं सक्तीचं स्थलांतर करताना त्यांना कोण यातना झाल्या असतील! त्याच्या बोलण्यात चीड वगैरे नव्हती पण तरीही त्या अनुभवांचे कायमस्वरूपी ओरखडे नक्कीच जाणवत होते. मला क्षणभर वाटलं - त्याचा विमानात घाबरण्याच्या , पॅनिक होण्याच्या स्वभावाची मुळं त्याच्या या लहानपणीच्या असुरक्षित वातावरणाच्या अनुभवात तर नसतील? दुर्दैवाने हे कळणं अवघड होतं आणि आमचा विमान प्रवास संपतही आला. विमान सुरक्षितपणे लँड झाल्यावर त्याने लगेच त्याच्या बायकोला तसं कळवलं आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या दिशांना पांगलो. 
(मुझफ्फरनगर दंगलीविषयी सविस्तर माहिती -
                         )                                                                                                                           (क्रमश:)


Wednesday 17 April 2024

हिमाचल डायरी २ - स्थलांतर.. माणसांचं !

१ 

आमच्या या आधीच्या बऱ्याच सहली कुठल्यातरी ट्रॅव्हल एजंट अथवा जंगल सफारी आयोजित करणाऱ्या व्यक्ती/कंपनी या मार्फत झाल्या आहेत. ही हिमाचलची सहल मात्र अथ पासून इतिपर्यंत आमची आम्हीच प्लॅन केली. यात विशेष असं काही नाही कारण आजकाल बरेच जण असंच करतात. आमचा हा पहिलाच अनुभव! आम्हांला हे करणं सोपं गेलं कारण माझ्या एक पेशंट हिमाचल प्रदेश मध्येच राहतात. म्हणजे त्या मराठीच आहेत. मूळच्या पुण्याच्याच... अविवाहित..त्यांनी निर्मलादेवींच्या सहजयोग कार्याला वाहून घेतलं आहे. धरमशाला जवळील नद्दी या ठिकाणी (इथे सनसेट पॉईंट आहे ) सहजयोग केंद्र आहे. तिथे त्या राहतात. तिथली हवा खूपच थंड झाली, बर्फ पडू लागला की त्या पुण्याला येतात. इथे काही महिने राहून मग परत तिथे जातात. त्यांच्या इथल्या वास्तव्यात त्या माझ्याकडे औषध घेऊ लागल्या. माझी मुलगी या आधी मनाली आणि कसोलला जाऊन आली आहे आणि तिचा  आग्रह होता की आम्ही सुद्धा कसोल बघावं. या माझ्या पेशंटशी मी सहज बोललो की आम्ही हिमाचलला जायचा विचार करत आहोत तर त्यांना इतका आनंद झाला की काही विचारायची सोय नाही ! त्यांनी मग तिथली बघायची ठिकाणं, तिथले काही फोटो/व्हिडिओ , इतकंच काय धरमशाला ते कसोलला जाण्यासाठी बसचे पर्याय, त्यांच्या तिकीट बुकिंगच्या वेबसाईटच्या लिंक्स हे आपणहून  शेअर केलं ! एवढं कोण करतं आजकाल ! तेही एका परक्या माणसासाठी ! मी हे असं कोणासाठी केलं असतं का असा विचार माझ्या मनात येऊन गेला आणि खोटं कशाला बोला- त्याचं उत्तर नाही हेच आलं  ! या पेशंटच्या निर्मलादेवींच्या परिवारातील एक सदस्य श्री अमितकुमार यांचा नंबरही पेशंटने दिला. त्यांचं धरमशाला जवळ दल लेक (हो...इथेही दल लेक नावाचा...पण अतिशय छोटा आणि हिरवं पाणी असलेला तलाव आहे) येथे एक हॉटेल आहे. तिथे तुम्ही राहू शकता असं त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही अमितकुमारांशी बोलून, हॉटेलचे फोटो वगैरे पाहून ८ आणि ९ एप्रिल ला तिथे राहायचं ठरवलं. माझ्या पेशंटने मनापासून आणि निरपेक्ष मदत केली म्हणून आमच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात त्यांना भेटायला त्या सहजयोग केंद्रात गेलो. एकंदरीत आमचा कोणाचाच निर्मलादेवी/सहजयोग/कुंडलिनी या गोष्टींवर विश्वास नाही. तरीही तिथे गेलो.. पेशंटला आम्ही गेल्याचा खूप आनंद झाला. तिथलं निर्मलादेवींचं फोटो प्रदर्शन पेशंटच्या आग्रहाखातर (पण खरं  तर उडत उडत ) बघितलं. तिथल्या आणखी काही स्वयंसेवक आम्हांला तिथेच ध्यान धारणेला बसा असा आग्रह करत होत्या.. बोलण्याच्या शैलीवरून त्या दाक्षिणात्य वाटल्या. माझ्या मुलीशी बोलताना त्या अक्षरश: गळेपडूपणा करत होत्या. पण आम्ही  काही बधलो  नाही आणि तिथून काढता पाय घेतला ! 

२ 

  


तर माझ्याबरोबर उभे असलेले हे अमितकुमार ! फोनवरच्या आवाजावरून त्या माणसाच्या दिसण्याचा वा त्याच्या प्रकृतीचा अंदाज बांधू नये हे अमितकुमारांच्या बाबतीत तरी खरं आहे. फोन वर अतिशय मृदू, विनम्र आवाजात, सर्व कॉर्पोरेट शिष्टाचार पाळून बोलणारे अमितकुमार, प्रत्यक्षात दिसायला अगदी बॉडी बिल्डर सारखे वाटले. फोटोत दिसत नाही पण त्यांच्या केसांना त्यांनी एक छोटी पोनी टेलही ठेवली होती. बोलणं मात्र तसंच नम्र- "येस सर...राईट सर... मैं कर दूंगा सर.." वगैरे. यांनीच आमच्यासाठी अमृतसर ते धरमशाला तसंच धरमशाला मधील ठिकाणं बघण्यासाठी आणि एक दिवस डलहौसी-खज्जियार साठी गाड्या बुक करून दिल्या. आमच्या सहलीसंबंधी सर्व शंका-कुशंकांना त्यांनी अतिशय नेमक्या शब्दांत आणि शांतपणे उत्तरे दिली. ते आमचे तिथले bankable resource person होते. पण आधी आम्हांला वाटलं होतं की ते आम्ही जिथे राहणार होतो त्या हॉटेलचे मॅनेजर वगैरे असतील. आम्ही पोचलो तेव्हा ते आमची वाट बघत खालीच उभे होते. हॉटेल रस्त्यालगत असलं तरी डोंगरावर असल्यामुळे २५-३० खड्या पायऱ्या चढून तिथपर्यंत पोचता येत होतं. आमच्याकडच्या २ मोठ्या बॅगा घेऊन ते झपझप वरती गेलेसुद्धा ! हॉटेलमध्ये आमच्याखेरीज कोणीच नव्हतं आणि कोणी कामगारही दिसले नाहीत. तेव्हा अमितकुमारांच्या  बोलण्यातून समजलं की तेच या हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांनी अगदी नुकतंच हे हॉटेल विकत घेतलं आहे. सध्या हॉटेलचं पुनर्बांधणीचं काम चालू होतं. हॉटेलमध्ये कामावर असलेल्या दोन कामगारांपैकी एक आजारी होता आणि दुसरा गावी गेला होता. त्यामुळे स्वयंपाकापासून ते आमची रूम साफ करण्यापर्यंत सर्व कामं म्हणजे अमितकुमारांचा वन मॅन शो होता. पण त्यात कुठल्याही प्रकारची तक्रार/ कुरकुर/ गाऱ्हाणी मांडणे असा प्रकार नव्हता. सर्व काही सहजतेने आणि हसतमुखाने चालू होतं. 
अमितकुमार  dynamic वाटले. फक्त त्यांची वाटचाल एकरेषीय पद्धतीने न होता त्यात चढ-उतार/ स्थित्यंतरं झाल्याचे दिसत होते. हॉटेल व्यावसायिक असलेले अमितकुमार यांनी मुंबईतील ताज हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम केलं होतं. नंतर एमबीए करून काही काळ पुणे आणि नंतर स्वित्झरलँड, अमेरिका येथे नोकरी आणि मग आता पुन्हा हॉटेल व्यवसाय.. आत्ता हे हॉटेल आहेच शिवाय  खाली कांगडा विमानतळाजवळ १०५ खोल्यांचं मोठं हॉटेल देखील लवकरच सुरु  होणार आहे. पुण्यात ते काही काळ राहिले असल्याने त्यांना चांदणी चौक, बाणेर परिसर, चितळ्यांची बाकरवडी माहित होती. शिवाय आपल्याकडच्या हाय वे वर जागोजागी 'जेवण तयार आहे' चे फलक त्यांना गंमतशीर वाटले होते. योगायोगाने त्यांच्यासाठी मी चितळ्यांचीच बाकरवडी नेली होती. काही तासांनी जेवायच्या वेळी बाकरवडीचं पाकीट त्यांच्या बायकोच्या हातात दिसलं. तेव्हा त्यांनी आमची तिच्याशी ओळख करून दिली- "ये मेरी wife है. She is from China." याविषयी माझ्या पेशंटने मला सांगितलं होतं - त्या दोघांचा  सहजयोगामुळे परिचय झाला आणि त्याचे प्रेमात रूपांतर होऊन लग्नही झाले. निर्मलादेवींच्या अनुयायींनमध्ये अशा प्रकारचे विवाह होत असतात आणि त्यांना एक कायदेशीर स्वरूपही देण्याची पद्धत आहे. ही चिनी बायको अमेरिकेतल्या एका कंपनीत बॅक ऑफिस मध्ये कामाला असून वर्क फ्रॉम होम करते. दोघांना एक ६ वर्षांचा  मुलगा आहे आणि त्याला तालवारबाजीच्या प्रशिक्षणासाठी काही काळ त्यांनी चीनला पाठवलं होतं. त्यांच्या बायकोला बाकरवडी  आवडली - मोडक्या तोडक्या  इंग्रजीत, बाकरवडीला खुणेने  दाखवत आणि अकारण मोठ्या आवाजात हसत - तिने its good असं सांगितलं. 
अमितकुमारांशी झालेल्या बोलण्यातील एक गोष्ट जात जात का असेना पण मला सांगाविशी  वाटते.. ती म्हणजे कलम ३७० हे अजूनही हिमाचल प्रदेश मध्ये लागू आहे. म्हणजेच हिमाचल बाहेरील लोकांना येथे जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही. काश्मीर मधील हे कलम काढलं पण इथलं नाही आणि यात काही गैर आहे असंही कोणाला वाटत नाही असे दिवस सध्या आहेत. त्यामुळे फक्त आमचं असं बोलणं झालं एवढंच  नमूद करतो.. 
अमितकुमारांच्या बोलण्यात हेही आलं की ते वर्षातले १० महिने खूप काम करतात आणि थंडीच्या दिवसांत २-२ महिन्यांसाठी दक्षिणेकडे जातात. कधी पुणे, मुंबई वा गोवा इथे राहतात. थंडी ओसरली की हिमाचलला परततात. 

३ 
आम्ही कसोलला असताना आम्हांला  २५-३० च्या दरम्यान वय असलेली रेश्मा नावाची एक सोलो ट्रॅव्हलर भेटली. मूळची केरळची, मुंबईत वाढलेली आणि आता नोकरीनिमित्त बंगलोरला राहणारी. यावर्षी बंगलोरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने तिच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या २ महिन्यांकरता आपापल्या घरी जायला सांगितलं. हिने घरी जाण्याऐवजी हिमाचलला येण्याचा पर्याय स्वीकारला. सोम-शुक्रवार काम आणि वीकेंडला फिरणे असा तिचा सध्याचा कार्यक्रम आहे. मग आमचं थोडं MAC (Mutual Admiration Club) झालं. म्हणजे मी तिच्या सोलो प्रवासाबद्दल तिचं कौतुक केलं तर तिने आम्ही तिघे एकत्र प्रवास करतोय, पक्ष्यांचे फोटो काढतोय या बद्दल आमचं कौतुक केलं! (कारण तिच्या आई-वडिलांना प्रवासाची अजिबात आवड नाही) 
हवामान/वातावरण प्रतिकूल झाल्यावर पक्षी स्थलांतर करतात तशी माझ्या पेशंट, अमितकुमार आणि रेश्मा देखील करतात. पण ही एलिट उदाहरणं झाली. त्या सगळ्यांकडेच आर्थिक सुबत्ता आहे म्हणून ते हवा थंड झाली की दुसरीकडे जाऊ शकतात व बंगलोरला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला म्हणून दुसरीकडे जाण्याची व्यवस्था कंपनीच करून देते. पण काही स्थलांतरं ही दुसरा पर्याय नसल्यामुळे किंवा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे देखील करायची वेळ येऊ शकते. 

४ 
 कसोल ते मनीकरण गुरुद्वारापर्यंत आम्हांला टॅक्सीने सोडणारा अशोककुमार हा मूळचा चंबा जिल्ह्यातला. म्हणजे कसोलपासून कमीतकमी २०० किमी दूरवर असलेलं ठिकाण! इथे पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवणारा. त्यादिवशी तिथे दिवसा  ७-८ डिग्री तपमान होतं तरी आमचा थंडीने कुडकुडून जीव चालला होता. याला विचारलं की इथे कुठे राहतोस. तर म्हणाला- गाडीतच झोपतो. मला कल्पनाही करवेना. मग थंडी नाही का वाजत? अब क्या करे साहब ... अब इसकी भी आदत सी हो गयी है ! 

५ 
आम्ही मॅक्लिओडगंज जवळील भागसुनाग मंदिर आणि तिथल्या धबधब्यला भेट दिली. तिथल्या पायऱ्या उतरत असताना अचानक समोर हे राजस्थानी जोडपं दिसलं. 

या व्हिडिओ मध्ये नीट दिसतंय की नाही माहित नाही पण यातील बाई आपल्या तान्ह्या बाळाला अंगावर पाजत होती. चेहऱ्यावर मात्र हसू होते. म्हटलं तर हे भीक मागणारेच पण अंगी थोडीफार कलागुण बाळगून असलेले. पोटापाण्यासाठीच एवढ्या लांब आलेले असणार! त्याठिकाणी अवचित हे दृश्य बघून मला भरूनच आलं. शिवाय काय गंमत होती पहा- हिमाचल प्रदेश मध्ये एका ठिकाणी, मी म्हणजेच  एका  मराठी माणसाने, एका राजस्थानी माणसाला गाण्याची फर्माईश केली आणि त्याने पारंपरिक राजस्थानी मांड मधील सुप्रसिद्ध गाणं म्हणून दाखवलं. आपली सांस्कृतिक विविधता समृद्ध आहे यात शंकाच नाही. 

यापेक्षाही आणखी काही स्थलांतराचे प्रकार असू शकतात का? या विषयी पुढच्या ब्लॉग मध्ये... 
                                                
( फोटो आणि व्हिडिओ - स्मृती पुसाळकर ) 
                                                                                            क्रमश:)


Monday 15 April 2024

हिमाचल डायरी १ - अमृतसर येथील सुवर्ण मंदिर...

कुठल्याही पर्यटन सहलीला गेल्यानंतर त्यावर लिहिताना  फक्त त्या त्या ठिकाणाचं वर्णन करणं एवढंच अपेक्षित असू नये...अर्थात हे माझं वैयक्तिक मत ! आपण काही फक्त भौगोलिक जागांना बघायला जात नसतो. तिथे गेल्यावर आलेले अनुभव, आपल्या मनात आलेल्या भावना, तिथे दिसलेली/भेटलेली माणसं, त्यांचे विचार, त्यांचे तिथल्या परिस्थितीतले  जगणे यावर  व्यक्त होणं ही तेवढंच आवश्यक आहे असं मला वाटतं. माझा अनुभव असा आहे की अशा गोष्टी मांडत गेल्यामुळे आपली सहल अधिक संस्मरणीय होते कारण यात आपण छोटे छोटे प्रसंग, बारकावे यांचा विचार करून त्यावर लिहीत असतो. काश्मीर मध्ये आम्ही २०१४ साली गेलो होतो. परंतु तिथे आमच्याबरोबर असलेला आणि ज्याच्याबरोबर आमचा आझाद काश्मीर या विषयावर वाद झालेला आमचा शब्बीर ड्रायव्हर, उडी येथील सैनिकी पोस्ट वर आम्हांला त्यांच्या मृदू आवाजात माहिती देणारे सुभेदार महेंद्रसिंह, श्रीनगरला भेटलेले नगर जिल्हयातले सैनिक संदीप शिंदे किंवा श्रीनगर मधल्या हॉटेलमधील कडक शिस्तीचा वेटर नझीर..हे सगळेच आज इतक्या वर्षांनंतरही स्पष्ट आठवतात! या सगळ्यावर मी काश्मीर डायरी ही मालिका १० भागांत लिहिली आणि मला आजही ती वाचताना त्या आमच्या सहलीला परत घेऊन जाते.. असो. 

नमनाला घडाभर तेल खर्च केलं ! आम्ही ८ एप्रिल २०२४ ते १४ एप्रिल २०२४ या काळात हिमाचल प्रदेश मधील धरमशाला आणि कसोल (कसौली नव्हे!) या ठिकाणी गेलो होतो. तिथल्या अनुभवांवर आधारित लिहिण्याचा हा ब्लॉगरूपी  प्रयत्न आहे. अर्थात हे लिहिताना मला सांगावंसं वाटतंय की हे माझे अनुभव आहेत. सरसकट सगळ्यांना असेच अनुभव आले असतील असं नाही. माझे अनुभव मांडताना माझी विचारसरणी, माझे पूर्वग्रह इ त्यातून डोकावणार याचीही मला कल्पना आहे. पण लिहिताना माझा हेतू प्रामाणिक आहे...कुठलाही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नाही. तरीही माझ्या कडून नकळतपाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व ! 

८ एप्रिल २०२४- हिमाचल प्रदेशला जाण्याआधी पंजाबमधील सुवर्णमंदिरला भेट.. 

आम्ही पुण्याहून सकाळी १० च्या सुमारास अमृतसरला पोचलो. त्यादिवशी फाल्गुन अमावस्या होती. आम्हांला त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत धरमशालाला पोचायचं होतं. अंतर २०० किमी असलं तरी ४-५ सहज लागणार असा अंदाज होता. आम्हांला तिथपर्यंत सोडणाऱ्या ड्रायव्हरने सांगितलं की आज सुवर्णमंदिरात गर्दी असणार...अमावस्या...सुट्ट्या, बैसाखी... इ मुळे तुमचे  सहज ५-६ तास मोडतील म्हणाला! मला हे पटलं नाही. इतका कसा वेळ लागेल?! की आम्ही जाऊच नये म्हणून तो हे म्हणत होता का? आता इथवर आलोच होतो तर मंदिरात जाऊन बघणार होतोच. सुवर्णमंदिर परिसरातल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून, तिथल्या बाजारातून वाट काढत मंदिरात पोचलो तर विश्वासच बसेना ! जिथपर्यंत नजर पोचेल तिथवर माणसंच माणसं ! अक्षरश: जन सैलाब ! मला धार्मिक ठिकाणी जाण्याची सवय नसल्याने हे सगळं दृश्य नवीनच होतं. लाखो भाविक आले होते असं म्हणणं  अतिशयोक्ती वाटलं तरी ते हजारोंच्या संख्येने नक्कीच होते. लोक प्रवेशद्वारापासून आत कुठेही जागा मिळेल तिथे मथा टेकत होते. सुवर्णमंदिर नेत्रसुखद आहे  यात काही शंकाच नाही


पण या अलोट गर्दीमुळे  माझा खरं तर हिरमोडच झाला. दरबार साहिबच्या दर्शनाच्या रांगेत आम्ही बराच वेळ थांबलो पण रांग काही पुढे सरकतच नव्हती. वर ऊन मी म्हणत होतं पण आश्चर्य म्हणजे पायाला चटके बसत नव्हते. सुवर्णमंदिराच्या सर्व बाजूंनी आच्छादित भाग होता. तो सर्व भागही माणसांनी फुलून गेला होता. लोक तिथे बसून प्रार्थना म्हणत होते. काही वृद्ध लोक तर दमून भागून आडवे पडले होते. पिण्याचे पाणी देण्यासाठी तसेच कडा प्रसाद देण्यासाठी बरेच कारसेवक दिसत होते. आजकाल सगळीकडे जे दृश्य बघायला मिळतं ते इथेही बघितलं - अति उत्साही सेल्फी फोटो काढणारे लोक आपल्या पाठीमागे सुवर्णमंदिर दिसेल अशा प्रकारे उभे राहून फोटो काढत होते. या नादात काही लोक अक्षरश: सरोवराच्या जवळ उभे राहिले होते आणि अर्थातच त्यांचं लक्ष केवळ फोटो काढण्याकडे होतं. अशा उत्साही मंडळींना आवरण्याचं काम काही स्वयंसेवक करत होते. कदाचित मी काही वेगळ्या कल्पना मनात ठेऊन इथे आलो होतो पण माझ्यासमोर जे काही दिसत होतं त्याच्याशी दुर्दैवाने मी फारसा relate होऊ शकलो नाही. कदाचित माझ्यात तेवढा भक्तिभाव, ईश्वरशक्ती पुढे नतमस्तक होण्याचा समर्पण भाव नसल्यामुळे असेल...मला या एवढ्या गर्दीत अलिप्तपणा जाणवत होता आणि त्यातून एक अस्वस्थता वाटत होती. इथे कायमच एवढी गर्दी असते की आमचा आजचा दिवस, आजची सकाळची वेळ असल्यामुळे एवढी गर्दी होती हे माहीत नाही. आम्ही भल्या पहाटे यायला होतं की काय माहित नाही. 

मात्र एकच गोष्ट तिथे होती जिच्याशी मी कनेक्ट होऊ शकलो ती म्हणजे तिथे सगळीकडे ऐकू येणारे शबद कीर्तन! स्वच्छ, भारदस्त आवाजात गाणारे कीर्तनकार अशा दमदार पद्धतीने गात होते की वाटावं एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत हे गायले तर  मैफिली जिंकतील! त्यांच्या गाण्यात केवळ गायकी नव्हती तर त्या गायनात भक्ती रस ओथंबून वाहत होता. अशा कीर्तनकारांना रागी म्हणतात असं नुकत्याच वाचलेल्या 'गान गुणगान' या पं सत्यशील देशपांडे यांच्या पुस्तकातून समजलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी सुवर्णमंदिराला भेट देण्याचं हे एक आकर्षण होतं आणि माझे कान ते गायन ऐकून तृप्त झाले. 

दोन अडीच तास रांगेत थांबून देखील आम्ही फारसे पुढे सरकलो नव्हतो. त्यामुळे नाईलाजाने आम्ही दर्शन न घेताच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कारण आम्हांला सहज आणखी चार पाच तास लागले असते आणि आम्हांला त्याच दिवशी धरमशालाला पोचण्याचे वेध लागले होते.  सुवर्णमंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊनच आम्ही निघालो. परतताना सरोवरात अनेक पुरुष स्नान करताना दिसले.




 त्यापैकी  काही पुरुषांचे कपडे घेऊन, डोक्यावर ओढनी घेतलेल्या, अदबीने उभ्या असलेल्या त्यांच्या बायकाही दिसल्या. त्यापैकी काही पुरुष ज्या हक्काने आणि जवळजवळ सरंजामशाही वृत्तीने त्यांच्या बायकांकडून कामं करून घेत होते ते मात्र बघवत नव्हतं. बाहेर पडून अमृतसरची सुप्रसिद्ध लस्सी पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो..      

(सर्व फोटो - स्मृती पुसाळकर)                                                                                                                        (क्रमश:) 

Tuesday 23 January 2024

२२ जानेवारी २०२४ च्या निमित्ताने..

 



२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या दिवसानिमित्त पुण्यात काय वातावरण होतं याची निरीक्षणं या ब्लॉग मधून नोंदवली आहेत...

(डिस्क्लेमर : शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे ही निरीक्षणे नोंदवण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. अनावधानाने कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व ! हा केवळ एक फेसबुकीय दस्तावेजीकरणाचा प्रयत्न आहे)


१) २१ जानेवारीच्या रात्री १२ वाजता मला फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. सुमारे १५-२० मिनिटं फटाक्यांचे आवाज येत होते. यावरून मला वाटलं की २२ जानेवारी जोरात साजरी होणार आणि जागोजागी ट्रॅफिक जॅम होणार, आपण त्यात अडकून पडणार वगैरे... 


२) २२ जानेवारीची सकाळ नेहमीप्रमाणेच होती. फक्त  सगळीकडे उत्साह होता,  लगबग जाणवली. व्हाट्सअँप ग्रुप वर  या दिवसाचं औचित्य साधून कोणी कविता  केली होती तर कोणी रामाचं गाणं म्हणून ते पोस्ट केलं होतं , कोणी रांगोळी काढली त्याचा फोटो पाठवला होता. रामाच्या प्रति असलेला त्यांचा भक्तिभाव त्यातून उत्सफूर्तपणे प्रकट होत होता. 


३) माझं हातावर पोट (!) असल्यामुळे सुट्टी नव्हतीच. ती घ्यायची इच्छाही नव्हती पण वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तर आपण दवाखान्यात पोचूच शकणार नाही असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. सकाळ- संध्याकाळ माझ्या आणि दुपारी गावातील (पेठेतील) दवाखान्यांत मी व्यवस्थित जाऊ शकलो. नाही म्हणायला वाटेत सकाळी एक शोभायात्रा लागली. पण ती रस्त्याच्या एका बाजूने जात होती. त्यात बँड होता.. पण स्पीकरच्या मोठाल्या भिंती नव्हत्या. बरेच लोक त्यात सहभागी झाले होते. कोणीही नाचत नव्हते. फक्त एकाच माणूस गणपतीत नाचतात तसं (पण माफक) नाचत होता. 


४) दवाखान्यात एका माहेश्वरी समाजाच्या पेशंटने मला (मी सांगितले नसताना देखील ) अयोध्या मंदिराचा फोटो व्हॉट्स ॲप वर पाठवला आणि ते म्हणाले - "कोण म्हणतं की मंदिर अपूर्ण आहे? ते पूर्ण झालं आहे. पहा तुम्हांला फोटोही पाठवला आहे" (खरं तर मी असं काहीच बोललो नव्हतो)पुढे ते म्हणाले - "आज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे - साठ देशांमध्ये लाईव्ह रिले होणार आहे. टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडले जाणार आहेत" 

तर एका पेशंटने सांगितले की त्यांना आदल्या रात्री अयोध्येत बॉम्ब स्फोट झाल्याचे स्वप्न पडले आणि त्यामुळे त्या  दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी घरातल्या लोकांना टीव्ही लावून तिथे कुठे घातपात तर नाही ना झाला याची खात्री करून घ्यायला सांगितलं ! 


५) प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावेळी (मी त्याचं प्रसारण पाहिलं नाही) वेगळं असं काहीच जाणवलं नाही.( म्हणजे फटाके वगैरे) (हे मी माझ्या भागापुरतं सांगू शकतो) 


६) येता जाता रस्त्यावर सगळीकडे भगवा माहोल होता- भगव्या पताका, भगवे झेंडे(सायकल, रिक्षा, दुचाकी, अपवादात्मक चारचाकी गाड्यांवर झेंडे लावले होते) घराघरांवर झेंडे दिसत होते. भगवे आकाशकंदील होते. काही घरांवर विद्युत रोषणाई केली होती. सोसायट्यांमध्येच  हे जास्त  होतं  असं नाही तर झोपडपट्ट्यांमध्येही भगव्या पताका, आकाशकंदील दिसत होते. आम्ही जैन नसलो तरी जैन समाज बहुल सोसायटीत राहतो. आमच्या सोसायटीत देखील (२० बिल्डिंगची सोसायटी ) सगळीकडे भगव्या पताका लावल्या होत्या. दिवाळीत केली होती तशीच विद्युत रोषणाई केली होती. मुख्य म्हणजे जैन मंदिराबाहेर मोठी रांगोळी काढली होती. सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी महाआरती होती आणि व्हाट्सअँप ग्रुप सांगण्यात आलं होतं की स्त्रियांनी भगव्या साड्या नेसून यावं तर पुरुषांनी पांढरे कपडे घालावेत. त्याप्रमाणे लोकांनी तसं केलं. 


७) एखादा गुढी पाडव्याचा सण असावा तसा उत्साह लोकांमध्ये होता आणि तसा भारतीय पारंपरिक पेहराव घातलेले  लोक रस्त्यात दिसत होते. भगवे झब्बे, भगव्या टोप्या, काहींचे भगवे स्वेटर, एका चारचाकीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर जय श्रीराम असं लिहिलं होतं आणि श्रीरामाचा मोठा फोटो होता. तो गाडी कशी चालवू शकत होता कोणास ठाऊक! 


८) जागोजागी भगव्या  रंगाचे स्टेज उभारण्यात आले होते आणि त्यावर धनुर्धारी श्रीरामाच्या मूर्ती होत्या आणि तो एक प्रकारचा सेल्फी पॉईंट होता. इथे तरुणांची बऱ्यापैकी गर्दी होती. हा सगळा खर्च कोणी केला असा प्रश्न पडला पण अशा ठिकाणी आजी-माजी नगरसेवक, भावी नगरसेवक-आमदार यांचे फोटो दिसले आणि लगेच त्याचे उत्तरही मिळाले. अशा आजी माजी आणि भावी राजकारण्यांकडून प्रसाद वाटप,कार सेवकांचा सत्कार, डीजे, भावगीत गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. 


९) कुटुंबवत्सल श्रीरामाऐवजी सगळीकडे धनुर्धारी श्रीराम दिसत होता- जागोजागच्या फ्लेक्स वर देखील! 

फ्लेक्स वरचे मजकूर वाचण्यासारखे होते-

 ' ५०० वर्षांचा वनवास संपला'

' राजतिलक की करो तैयारी 

आ रहे हैं भगवाधारी'

एका फ्लेक्सवर लिहिलेल्या मजकुराचा मला अर्थ कळला नाही -

' अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार ' 


१०) दिवसभर सगळीकडे रामाची गाणी लावली होती. एखाद्याच ठिकाणी सुधीर फडके-ग दि मा यांच्या गीत रामायणातील गाणी होती. बाकी साकळीकडे तीच तीच गाणी होती. मुख्यतः 'रामजीकी निकाली सवारी' हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'सरगम'  मधील गाणी होतं. एकूण श्रीरामावरील catchy गाण्यांची कमतरता जाणवली. एक गाणं मी काल पहिल्यांदाच ऐकलं - 

'श्रीराम...जानकी बैठे है मेरे सीने में' हे गाणं १९६८ सालच्या 'मेरे हमदम  मेरे दोस्त'  सिनेमातील (पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल !) 'अल्लाह ये अदा कैसी है इन हसीनो में' च्या चालीवर होतं. 

(मूळ गाणं कोणाला ऐकायचं असल्यास-https://youtu.be/Dlaiz7Zp5cQ?si=89C5VU9ixcVPj8y- )


११) सोशल मीडिया वर खूप जणांनी  व्हाट्सअँप स्टेटस वर श्रीराम आणि अयोध्या मंदिर हा विषय ठेवला होता. कदाचित सेल्फी वाले फोटो ही टाकले असतील. (एरवी मी स्टेटस ठेवतो आणि बघतो. पण २२ जानेवारीला मी फारसे कोणाचे स्टेटस बघितले नाही . माझ्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे मी पक्ष्यांचे फोटो स्टेटस वर ठेवले होते) कोणीतरी ट्विटर (आताचं एक्स ) वर लिहिलं होतं - 

२२ तारखेच्या 'द इंडियन एक्सप्रेस' च्या २० पैकी १४ पानांवर श्रीराम हाच विषय होता- त्यात काही संपूर्ण पानं जाहिरातींची, तर काही लेख (ज्यात सरसंघचालक मोहन भागवतांचा लेखही होता) बाकीच्या वर्तमानपत्रांविषयी काय बोलणार !


१२) राममंदिरच्या निमित्ताने सोशल मीडियावरील अनेक मुखवटे गळाले त्यात प्रामुख्याने मला 'एक्स' वरील अमित शांडिल्य यांचा उल्लेख करावासा वाटतो. ते खरं तर चांगलं लिहायचे. पण.. 


१३) तरुणांचा सहभाग याविषयी लिहिलं आहेच. पण विशेष म्हणजे बऱ्याच तरुणांनी भगव्या रंगाच्या 'जय श्रीराम' च्या टोप्या घातल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात टोप्या या आधी मी 'मैं भी अन्ना' च्या बघितल्या होत्या.  त्या  पांढऱ्या रंगाच्या गांधी टोप्या होत्या. तेव्हा अशा टोप्या घालून फिरणे आणि मोर्चात सहभागी होणे यातून आपण भ्रष्टाचाराविरोधात काहीतरी करत आहोत अशी भावना लोकांमध्ये झाली होती. आता गांधी टोप्याही भगव्या झाल्या ! त्या घालून आता लोकांना वाटतंय की राम मंदिराच्या पवित्र कार्यात आपणही सहभागी झालो आहोत. तेव्हाच्या आंदोलनाने एक सरकार उलथवून टाकले. ..आताचे  वातावरण/ मूड  बघून हेच  सरकार पुनः स्थापित होईल असं निदान २२ तारखेला तरी दिसतंय. 


१४) संध्याकाळी लोक फटाके वाजवून आजचा दिवस साजरा करत होते. यात लहान मुलांपासून ते वयस्कर स्त्री- पुरूष उत्साहाने सहभागी झाले होते. व्हाटस् ॲपवर सांगितले होते म्हणून काही घरांबाहेर पणत्या लावलेल्या दिसल्या. उच्चभ्रू लोकांमध्ये उत्साह तर होताच पण आमच्या झाडूवालीचं बोलणं ऐकलं .ती म्हणाली-"आज जादाचं दूध आणलंय. खीर करून खाणार"


१५) २२ तारखेला  प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर मी २३ जानेवारीला हे सगळं लिहीत आहे. काल  मायापुरीतल्या सदराच्या शीर्षकासारखं - 'मगर हम चूप रहेंगे' हे धोरण ठेवलं होतं. सोशल मीडियावर मी कुठंही प्रतिक्रिया दिली नाही.अगदी राहुल सोलापूरकरांची धादांत खोटी पोस्ट फिरत असून देखील त्यावर मी काहीच भाष्य केलं नाही.  लोकांच्या आनंदावर आपण विरजण का घाला ! कारण हा असा मूडच  होता की इथे कुठलाही प्रतिवाद करणं/ विरोधी मुद्दा मांडणं अवघडच नाही, अशक्य होतं. अगदी प्रतिवाद केलाही असता तर माझ्या सारख्याची मतं अल्पमतातच राहिली असती आणि कालचा दिवस असा होता की माझी मतं wouldn't have mattered at all!यावर कोणाला मी पुचाट/पळपुटा / आपल्या मतांवर ठाम न राहणारा वाटू शकतो. पण आता खरं सांगायचं तर एक प्रकारची दमछाक जाणवत आहे. आपण एकटे विरुद्ध सगळे हे आता झेपत नाही.  असा एक बहुसंख्यवाद रुजला आहे की ज्यात अल्पमताची किंमत नगण्य अथवा शून्यच आहे असं दिसतंय . आपण वा आपली मतं irrelevant आहोत असं लक्षात आल्यावर  आपण बोलूच नये आणि जे जे होत आहे ते मूकपणे पाहत राहावे या निष्कर्षावर मी आलो.

Saturday 20 January 2024

आर डी बर्मन, लता आणि गाण्यातले भाव...

१ 

 




  (४ जानेवारी २०२४,संगीतकार आर डी बर्मन यांचा तिसावा स्मृतीदिन ! त्यानिमित्त लिहिलेला हा ब्लॉग !)

 आर डी यांच्यावर ४ जानेवारी २०१९ ला शेवटचं लिहिलं होतं. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी पुन्हा लिहित आहे!  म्हणजे त्यानंतर ब्लॉग लिहिले पण इतर विषयांवर( सायकलिंग, फोटोग्राफी, पुस्तक परीक्षण, वाढदिवस विषयक इ ) पण का कोण जाणे गाणी/संगीत या विषयी लिहिलं गेलं नाही. या मधल्या चार-पाच वर्षांच्या काळात पुलाखालून अर्थातच बरंच पाणी वाहून गेलं आहे.मुख्य म्हणजे आज लता मंगेशकर हयात नाहीत. परंतु त्यांनी करून ठेवलेल्या अफाट सांगीतिक कामाचं थोडंफार अवलोकन करायला देखील, माझ्यासारख्या सर्वसामान्य संगीतप्रेमीला हा जन्म पुरायचा नाही ! हा ब्लॉग म्हणजे त्याच प्रयत्नांचा एक छोटा भाग ! (आर डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्या विषयीचा माझा आधीचा ब्लॉग वाचायचा असल्यास त्याची लिंक इथे देत आहे-  https://rajeshpusalkar.blogspot.com/2019/01/blog-post.html ) 

मागच्या ब्लॉगमध्ये आर डी आणि लता यांच्या गाण्यातील मेलडी हा विषय घेऊन त्यावरील गाण्यांविषयी लिहिलं होतं. यावेळीही मेलडीवर लिहीनच परंतु पुढील गाण्यांतील  मला उमजलेल्या भाव-भावनांविषयी देखील लिहिणार आहे. आर डी बर्मन यांच्या संगीतावर अनेक आक्षेप घेतले जातात. वेगवेगळे रिदम पॅटर्न, वेगवेगळे साउंड्स यांच्या प्रायोगिक वापराच्या नादात त्यांच्या  गाण्यांतील भाव मागे पडतात हा त्या आक्षेपांपैकी एक असावा ! कदाचित या ब्लॉगमधून  त्यावर देखील लिहायचा प्रयत्न करणार आहे. मागील ब्लॉग प्रमाणेच या ब्लॉग मध्ये देखील केवळ सोलो गाण्यांचाच विचार केला आहे . (कदाचित डुएटस साठी एक वेगळा ब्लॉग लिहीन याची ही प्रस्तावना आहे असं वाचकांना वाटू शकेल !  आत्ताच्या घडीला त्याबद्दल सांगता येणार नाही पण आर- डी -लता मंगेशकर डुएटस हा  खरोखरच एका वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे हे नक्की . )

२ 

१) आजा पिया तोहे प्यार दू - बहारों के सपने (१९६७) - 

https://youtu.be/T1FcSe-J2HQ?si=I39eBq6gIHNFgH3B 

या गाण्याच्या सुरुवातीच्या चार ओळी लता मंगेशकरांच्या  मृदू आवाजात, कोणत्याही वाद्यांशिवाय आहेत. गाणं तसं नायकाला address करणारं आहे. म्हणून कदाचित त्यात छोटे छोटे फ्रेजेस आहेत - आजा पिया / तोहे प्यार दू/ गोरी बैय्या/ तोपे वार दू ... यात 'गोरी बैय्या' नंतर किंवा 'किस लिये  तू' नंतरचा सूक्ष्म ठहराव लक्षवेधी आहे. कथानकात नायक राम (राजेश खन्ना ) परिस्थितीशी झुंज देता देता  एका क्षणी पराभूत मनोवस्थेत असताना नायिका /त्याची प्रेमिका गीता (आशा पारेख ) त्याच्यासाठी हे गाणं गात आहे असा प्रसंग असावा. तिला तिच्या प्रेमाविषयी एवढा विश्वास आहे की तिला वाटतंय की  त्या जोरावर रामला त्या परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळेल. संपूर्ण गाण्याच्या शब्दांत  एक सकारात्मकता आहे, आशा आहे आणि एक भावनिक आवाहन आहे. गाण्याचा हा मूड लता मंगेशकर यांनी सुरवातीपासूनच सुरेख पकडला आहे. 'गोरी बैय्या तोपे वार दू' 'थके हुए इन हाथों को दे दे मेरे हाथ में ' यातून शरीर स्पर्शाचेही आवाहन आहे(healing touch या अर्थाने )  पण ते आर्जव आहे आणि त्यात कुठेही आव्हान नाही. हा प्रसंग आणि त्यासाठीचे मजरुहसाहेबांचे शब्द योग्यरीत्या समजून उमजून ही चाल हा समतोल साधते. स्पर्शातून इथे प्रोत्साहन अभिप्रेत आहे - 'अवघड कठीण काळ असला तरीही यावर तू मात करू शकशील' 'तुझा मार्ग खडतर आहे हे मलाही कळतंय पण या मार्गावर तुझ्याबरोबर मीही तुझी साथ सदैव करत आहे..' ही  उमेद जागवणारं प्रोत्साहन ! म्हणूनच  या गाण्यासाठी लता मंगेशकरांची निवड योग्य ठरते. या संपूर्ण गाण्यात गिटार आणि बासरी लता मंगेशकर यांच्या जवळपास बरोबरीने साथ करतात - जणू काही त्या शाश्वत प्रेम आणि विश्वासाचंच प्रतीक असाव्यात ! जोडीला संतूर आणि सॅक्सोफोन देखील समर्थ आणि समर्पक आहेत. पण कुठलेही वाद्य लता मंगेशकर यांच्यावर कुरघोडी करत नाही. म्हणूनच हे  सॉफ्ट आणि रोमँटिक गाणं श्रवणीय वाटतं .  

२) क्या जानू सजन होती है क्या गम की शाम -  बहारों के सपने (१९६७) - 

https://youtu.be/Sd0sHdeVkMA?si=_rzR92Rh4QxZbPti 

'बहारों के सपने' हा एक कृष्ण धवल सिनेमा आहे परंतु या सिनेमातील हे एकमेव गाणं रंगीत आहे कारण हे एक स्वप्नगीत आहे आणि आपली स्वप्नं रंगीबेरंगीच असतात ! पण या गाण्यात आर डी ने एक अभिनव प्रयोग केला आहे. यात मी फार काही नवीन सांगतोय अशातला भाग नाही - यात भारतातला कदाचित पहिला व्हॉइस-ओव्हर- व्हॉइस हा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग तेव्हा नवीन असल्यामुळे लोकांना या गाण्यातला दुसरा आवाजही लता मंगेशकरांचा आहे यावर विश्वास बसायचा नाही. काहींना तर हा आवाज उषा मंगेशकरांचा वाटला होता ! पण हा असा प्रयोग का केला असावा ? खरं तर हिंदी सिनेमांत स्वप्नगीतांची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. (आठवा- 'आवारा' मधील 'घर आया मेरा परदेसी', 'प्यासा' मधील 'हम आपकी आँखों में' 'गुमनाम' मधील 'हम  काले है तो क्या हुआ दिलवाले है' इ) या गाण्यांत नेत्रदीपक आणि भव्यदिव्य सेटस, तो टिपिकल पांढरा धूर वगैरे बघायला मिळतो. आर डी च्या 'क्या जानू सजन' ने  हा ठराविक साचा न स्वीकारता त्यात बदल केला. स्वप्नं म्हणजे कल्पनांची भरारीच असते. जर ती रंगीबेरंगी असू शकतात तर त्यात हे असे overlapping आवाज का असू नयेत? ध्वनी-प्रतिध्वनीचा हा खेळ स्वप्नात जास्त उठून दिसेल या विचाराने हा वेगळा परिणाम गाण्यात वापरण्यात आला असावा. स्वप्नगीत असल्यामुळे गाण्याच्या सुरुवातीला एक गूढरम्य वातावरणनिर्मिती आहे- लता मंगेशकरांचा आलाप आणि त्या जोडीला गिटार आणि व्हायोलिनचा वापर यातून ते साधलं आहे. वरील गाण्याप्रमाणे याही गाण्यात गिटार आणि बासरी यांची सातत्याने साथ आहे शिवाय जोडीला स्ट्रिंग सेक्शन (व्हायोलिन) जबरदस्त आहे. कडव्यातील  पहिली ओळ दोनदा आहे. ती ओळ दुसऱ्यांदा सुरु होण्याअगोदर गिटारचा छोटा तुकडा केवळ अप्रतिम! पहिली ओळ दुसऱ्यांदा म्हणताना   व्हॉइस -ओव्हर- व्हॉइसचा वापर आहे आणि हे दोन्ही कडव्यांच्या वेळी आहे. गाण्याचा मूड जेवढा आर डी -लता यांना  पकडता आला आहे,  तेवढा तो चित्रीकरणात (सुप्रसिद्ध जाल मिस्त्री असूनही !) आणि दिग्दर्शनात(नासीर हुसैन)  यांना  जमला  नाही असं मला वाटतं. 

३) ना कोई उमंग है ना कोई तरंग है - कटी  पतंग (१९७१)-

https://youtu.be/HlB9ogpEk8w?si=vKQem7KEz9EF7aZ1

गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित 'कटी पतंग' या सिनेमात योगायोग आणि चमत्कारिक परिस्थिती यांची अगदी रेलचेल होती. नायिका पूनम/मधू हिला ती विधवा नसताना विचित्र परिस्थितीमुळे विधवा वेशात राहावं लागतं आणि त्यातच नायक कमल (राजेश खन्ना ) तिच्याकडे आकर्षित होतो ('मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिये जाये'... ) तिची सत्य परिस्थिती तिला सांगता येत नाही परंतु नायकाचं तिच्याकडे आकर्षित होणं तिच्या लक्षात आलं आहे (कदाचित तिला ते आवडूही लागलं आहे?) अशा कात्रीत सापडलेल्या प्रसंगी सिनेमात हे गाणं आहे. आनंद बक्षी यांनी तिच्या व्यथेचं वर्णन करणारे यथोचित शब्द लिहिले आहेत. एरवी आपण जे गाणं ऐकतो त्यावरून गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अर्धवट वाटतं. मात्र वर लिंक आहे त्यात सुरवातीचं संपूर्ण संगीत आहे. त्यातील स्ट्रिंग सेक्शन च्या प्रभावी वादनातून जणू पतंग कापला गेल्याचा आणि तो भरकटत गेल्याचा भास होतो. पहिल्या कडव्यातील पहिली ओळ लता मंगेशकरांनी सलग म्हटली आहे- 'आकाश से गिरी मैं एक बार कटके ऐसे'. यातूनही हाच परिस्थितीपुढे आयुष्याचा पतंग भरकटत गेल्याचाच भाव प्रकट होतो. संपूर्ण गाण्यात पॅथॉस भरून राहिला आहे. (म्हणूनच कदाचित नटभैरव या गंभीर प्रकृतीच्या रागाची छाया  या गाण्यावर आहे ) हा पॅथॉस रिदम मधूनही जाणवतो. आपल्याला रेसो रेसो आणि तबल्याबरोबरच बॉन्गो सारख्या वाद्याचा आघातही सतत ऐकू येतो. तबला आणि हा बॉन्गो मिळून तालाचं आवर्तन पूर्ण होतं आणि यातही ठेहराव सातत्याने  असल्यामुळे दुःखाची किनार गहिरी होते. सुरुवातीलाच व्हायोलिनचा तुकडा संपल्यानंतर पियानो आणि गिटारचा एक छोटासाच तुकडा लाजवाब आहे. 'लगके गलेसे अपने बाबूलके मैं ना रोई' या नंतरचा लता मंगेशकरांचा आलाप अंगावर अक्षरश: काटा आणतो. तसंच यानंतरच्या कडव्याआधी व्हायोलिनचा एक सोलो तुकडा आहे तोही वातावरणनिर्मितीसाठी पूरकच आहे. गाण्यातील इंटरल्यूड संगीत खूप मोठं नाही कारण नायिकेला मनात साचलेल्या भावनांचा कल्लोळ व्यक्त करायचा आहे. संपूर्ण गाण्यात बासरी पुन्हा एकदा खूपच परिणामकारक आहे. विशेषतः 'पतझड की मैं हू छाया' किंवा' डोली उठी यु जैसे' या ओळींनंतर अक्षरश: काही सेकंदच बासरी वाजते पण ती खूप काही सांगून जाते. 'कटी पतंग' सिनेमात लता मंगेशकर यांचं हे एकच सोलो गीत आहे. किशोरकुमारच्या या सिनेमातल्या झंझावातापुढे देखील हे गाणं त्याच्या या वैशिष्टयांमुळे झाकोळलं जात नाही. उलट आपलं अढळ स्थान राखून एक संस्मरणीय गाणं ठरतं. 


४) जाने क्या बात है -सनी (१९८४) -

https://www.youtube.com/watch?v=iOkUl3x5ApQ (या लिंक मध्ये पूर्ण गाणं आहे ,तीन कडव्यांसह )

https://www.youtube.com/watch?v=FQYcjNxfsoc (हा या गाण्याचा व्हिडिओ आहे. पण यात दोनच कडवी आहेत ) 

या गाण्याविषयी लिहिण्यापूर्वी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात-

अ) 'सनी' हा १९८४ सालचा सिनेमा आहे. हिंदी सिनेमांत सत्तरच्या दशकात (विशेषतः उत्तरार्धात) कथानकांत खूप बदल झाले आणि त्यामुळे देमार पट/ मारधाड असलेले सिनेमे येऊ लागले आणि त्यांची चलती होऊ लागली. अशा सिनेमांच्या भाऊगर्दीत सिनेमांतील गाणी/ त्यांची सुमधुरता लोप पावू लागली. या पार्श्वभूमीवर 'सनी' या चित्रपटातील गाण्यांकडे बघितलं पाहिजे. मग लक्षात येतं  की यातली गाणी त्यावेळच्या लाऊडनेसच्या तुलनेत एक ठळक अपवाद होती आणि याला कारण म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक राज खोसला होते (ज्यांनी गुरुदत्त/ देव आनंद सारख्यांबरोबर काम केलं होतं) 

आ) या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता मंगेशकरांचं वय ५४-५५ वर्षं असावं! 

कुठल्याही तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलीमधील सहज स्वाभाविक भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. त्यात प्रियकराची असोशी आहे, त्याची वाट बघणं आहे...झोप न येणं आहे आणि प्रेमाच्या नात्याचं लग्नात रूपांतर करायची ओढही! याही गाण्यात एक ठेहराव आहे आणि 'जाने क्या बात है' नंतर एक लक्षात येण्याजोगा पॉज आहे. त्यानंतर थोडं off beat गाणं पुढे जातं. लता मंगेशकरांनी गाण्यात मींडकाम काय सुरेख केलं आहे. असं वाटावं की स्वरांच्या हिंदोळ्यावर एक नवथर तरूणी मस्तपैकी झुलतेय! मला यातच एक अल्लड निरागसताही दिसते. प्रत्यक्ष गाण्यातला ताल आणि इंटरल्यूड मधील ताल यात लयीत फरक आहे जो अर्थातच गाण्याच्या प्रसंगानुरूप आहे. गाण्यात इलेक्ट्रिक गिटारचा वापर छान आहे त्याचबरोबर सतार- सरोद आणि तिसऱ्या कडव्या आधी (पुढे गाण्यात शहनाईचा उल्लेख आहे म्हणून) तार शहनाईचा वापरही आहे.  (या गाण्यातील गिटार संबंधी मला माझा शालेय मित्र आणि संगीत/आर डी प्रेमी श्रीपाद गांधी याची मदत झाली)

या गाण्यांशिवाय आर डी- लता मंगेशकर यांची आणखीही काही सोलो गाणी आहेत (शिवाय डुएटस् आहेतच!) त्यावर पुन्हा कधीतरी लिहीनच!!




Thursday 28 September 2023

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुलभाताई तेरणीकर !


सुलभाताई तेरणीकर

हिंदी सिनेमा आणि विशेषतः सिनेसंगीताची आवड असणाऱ्या मराठी वाचकांना सुलभाताई तेरणीकर हे नाव निश्चितच माहीत असतं. विशेषतः पुण्यात या विषयावर झालेल्या कार्यक्रमांत त्यांचे रोचक भाषण झालेले असते, त्यांनी अशा कितीतरी  कार्यक्रमांसाठी संहिता लिहिलेली असते. अशा कार्यक्रमांचे वृत्तांत वर्तमानपत्रांत येत असतात. त्यातूनही आपल्याला त्यांचा परिचय झालेला असतो. 'दैनिक सकाळ' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' मधली त्यांची सदरं वाचून आपल्याला त्यांच्या चौफेर वाचनाचं ,गाढ्या अभ्यासाचं ,सकारात्मक जीवनदृष्टीचं ,रसिकतेचं ,सौंदर्यपूर्ण, सुसंस्कृत लेखनशैलीचं आणि उच्च अभिरुचीचं दर्शन घडलेलं असतं. त्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष न भेटता देखील आपल्याला त्या सुपरिचित असतात आणि आपले त्यांच्याशी एक आदराचे नाते नकळत तयार झालेले असते. आपण जर त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली असतील तर आपण आणखी स्तिमित होतो. मी सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे त्यांच्या सांगीतिक वाटचालीवर आधारित 'शुक्रतारा' हे पुस्तक वाचले. 

ते इतक्या वैशिष्ट्यपूर्ण  ओघवत्या शैलीत आहे की जणू वाटावे अरुण दाते आपल्याशी अनौपचारिक गप्पाच मारत आहेत. खरं सांगतो - माझ्या खूप उशिरा लक्षात आलं की या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं शब्दांकन सुलभाताई तेरणीकर यांचं आहे ! यानंतर पुस्तकाचा परत विचार केला असता मला वाटलं की सुलभाताईंसाठी स्वतःचं लेखक असणं विसरून अरुण दाते यांच्या व्यक्तिमत्वाचा पारदर्शक चेहरा वाचकांसमोर ठेवणं हे किती अवघड काम असेल ! शिवाय अरुण दाते यांच्या इंदुरी बोली भाषेचा लहजा लेखनातूनही मांडणे हेही  तितके सोपे नाही. एखादा कसलेला कलाकार जसा कोणतीही भूमिका करताना परकाया प्रवेश करतो त्यासारखंच मला हे वाटलं. 

सुलभाताई तेरणीकरांना भेटावे, निदान त्यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधावा असे मला 'म टा' मधील त्यांचे रागदारीवरील सदर वाचून खूपदा वाटले होते. याचं कारण म्हणजे या सदरातून त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे तर त्यावर आधारित हिंदी-मराठी गाण्यांचा सुंदर मागोवा घेतला होता. त्यातलंच एक उदाहरण दिल्याशिवाय मला राहवत नाही -

' चित्रपटसंगीतातला खमाज पैंजणपावलांनी येणारा, मुग्ध प्रणयानं भारलेला आहे. संगीतकार मदन-

मोहननी दोन सुंदर गाणी लतादीदींकडून गाऊन घेतली. पूजा के फूलमधलं मेरी ऑँखोंसे कोई नींद लिये

जाता  है आणि रिश्ते नातेमधलं खनक गयो हाय बैरी कंगना. खमाजची प्रकृती चंचल आहे असं

जाणकार सांगतात. पण संगीतकार या चंचल रागाला प्रणयिनीच्या अधीर हृदयाशी सुरांनी बांधतो आणि

मग खमाज रागाची रूपमोहिनी या गाण्यातून मनात पसरते. 

मदन-मोहननी राग खमाजचं एक सुंदर रूप इक हसीन शाम को दिल मेरा खो गयाला बहाल केलं आहे.

एका सुंदर संध्याकाळी आपण हृदय हरवून बसलो हा भाव खमाज रागाच्या कोणत्या स्वररचनात

गुंफलेला हे सांगता येणार नाही, पण उदास, हुरहूर लावणाऱ्या संध्याकालाच्या प्रतिमेला त्यानं हलकेच दूर

सारलं आहे.'

या एका परिच्छेदातून लेखिकेच्या अफाट सौंदर्यदृष्टीचा अंदाज आपल्याला येतो. 

मला जरी त्यांना भेटावंसं वाटत होतं तरी ते कसं करता येईल याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. किंवा कोणीही परिचित नव्हते जे मला आणि त्यांना ओळखत होते. नंतर मात्र एका अतिशय अपूर्व योगायोगामुळे माझा आणि सुलभाताईंचा परिचय झाला. हे घडलं सध्याच्या व्हर्चुअल जगामुळे ! म्हणजेच व्हाट्सअँप मुळे !आणि याचे संपूर्ण श्रेय जातं आमच्या या संगीत विषयक ग्रुप्सचे ऍडमिन श्री. विवेक पाध्ये यांना! मी ज्या संगीत विषयक समूहांमध्ये होतो तिथे सुलभाताई तेरणीकर याही जोडल्या गेल्या आणि व्हाट्सअँप just came alive! 

३ 

सुलभाताईंना सिनेसंगीताचा विश्वकोश का म्हणतात हे त्यांच्या समूहावरील अभ्यासपूर्ण पोस्टवरून लगेचच लक्षात आलं. पण यात वेगळेपण हे जाणवलं की त्यांच्याकडे केवळ माहितीचा खजिना नाही तर त्यामागे विचारांचं एक अधिष्ठान आहे. त्या कलाकाराची कलाकृती बघतात आणि त्यावर रसग्रहण करतात. त्या कलाकाराच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल कधीही बोलत नाहीत. दुसरं म्हणजे त्यांना  कोणत्याही कलाकृतीमधील (मग ते एखादं गाणं असो वा सिनेमा ) सौंदर्यस्थळं कोणती हे बरोबर माहीत असतं. आणि तिसरा तेवढाच महत्त्वाचा भाग म्हणजे अतिशय मोजक्या आणि अचूक शब्दांत त्या याविषयी मांडणी करतात. त्यांच्या लिखाणात कुठेही फाफटपसारा नसतो.  त्यांचं भाषिक सौंदर्य सहजसुंदर आणि अफाट आहे. त्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही.  आम्हांला शाळेत असताना इंग्रजी विषयात precis writing हा एक भाग होता. दिलेल्या परिच्छेदाचे सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे थोडक्यात मांडणे त्यात अपेक्षित होते. ते मला कधी जमलं नाही. पण सुलभाताईंच्या पोस्ट वाचल्यावर नेमकं लिखाण म्हणजे काय असतं याचा वस्तुपाठच मिळाला ! सुलभाताईंबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या कायमच accessible /approachable आहेत. आपण सेलिब्रिटी आहोत, सुप्रसिद्ध लेखिका आहोत याचा कोणताही बडेजाव/तोरा त्या मिरवत नाहीत. त्यांना इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची आणि गती आहे की याची तुलना फक्त दुर्गाबाई भागवत यांच्या अफाट व्यासंगाशी करता येईल! एकूणच संगीत क्षेत्र सोडल्यास फुलं/झाडं/निसर्गसौंदर्य इथपासून ते कविता/साहित्यापासून  ते अगदी पाककला अशा सर्व विषयांवर त्यांचे मार्मिक विचार असतात. आणि या चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होतात. सुलभाताईंना विनोदाचे अजिबात वावडे नाही उलट त्या कित्येकांची छान फिरकीही घेत असतात.  

४ 

यथावकाश सुलभाताई आणि त्यांच्या 'Beyond Entertainment' या संस्थेच्या  वंदना कुलकर्णी, उस्मान शेख आणि अनघा कोऱ्हाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विवेक पाध्ये व्यवस्थापक असलेल्या राजलक्ष्मी सभागृह (कोथरूड ) येथे हिंदी सिनेसंगीतावर आधारित दृक श्राव्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग आला आणि या निमित्ताने  सुलभाताईंना प्रत्यक्षही अनेक वेळा भेटता आले. हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्ण काळाविषयी वेगवेगळ्या थीम्स घेऊन केलेले हे सर्व कार्यक्रम अविस्मरणीय होते. सुलभाताई यात त्या त्या थीमप्रमाणे त्या त्या गाण्यांवर/ संगीतकारावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत बोलतात आणि ही मूळ  गाणी आपल्याला ऐकवली/दाखवली जातात. असं या कार्यक्रमांचं सर्वसाधारण स्वरूप आहे. अशा कार्यक्रमांमधून सुलभाताईंचे या सुवर्णकाळाविषयीचे विचार सविस्तरपणे ऐकायला मिळतात आणि त्यांचा प्रेक्षकांशी अनौपचारिक संवाद हा एक वेगळाच आनंद देऊन जातो. या कार्यक्रमांतून जाणवलं की त्यांना संगीतकार जयदेव, अनिल विश्वास, सी रामचंद्र यांच्या सांगीतिक समज आणि कारकिर्दीविषयी विशेष ममत्व आहे आणि त्यावर विचार करता खरोखरच लक्षात आलं की या तिघांचंही संगीत माधुर्यपूर्ण आणि पथदर्शी होतं. लता मंगेशकर हा सुलभाताईंचा हळवा कोपरा! केवळ एक गायिका म्हणूनच नव्हे तर त्यांना लता मंगेशकर यांचा ३० वर्षांहून अधिक काळ प्रत्यक्ष सहवासही  लाभला आहे. आमच्या दैवत असलेल्या लता मंगेशकरांना प्रत्यक्ष भेटलेल्या सुलभाताई म्हणजे आमच्यासाठी पंढरीची वारी अनेक वेळा केलेल्या वारकरीच जणू! म्हणूनच लता मंगेशकर यांच्यावर सध्याच्या काळात पुस्तक लिहिण्याचा जर कोणाला अधिकार असेल तर माझ्यामते तो केवळ सुलभाताईंना आहे आणि त्या लता मंगेशकरांच्या देदिप्यमान सांगीतिक कारकिर्दीला  पूर्ण न्याय देतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी  या ब्लॉगच्या निमित्ताने सुलभाताईंना लता मंगेशकरांवर एक पुस्तक लिहावं अशी विनंती करत आहे. 

५ 

ही खात्री असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सुलभाताईंचं 'चंदेरी आठवणी' हे पुस्तक! जानेवारी ते डिसेंबर १९९८ या काळात 'दैनिक सकाळ'च्या कलारंजन पुरवणीमध्ये सुलभाताईंनी याच नावाचं सदर लिहिलं होतं, त्यावर आधारित हे पुस्तक आहे. हिंदी सिने-संगीताच्या जुन्या काळातल्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या गतस्मृतींना उजाळा देणारं हे सदर लोकप्रिय झालं आणि त्यावरील पुस्तक देखील! पण या सदर/पुस्तकामागे सुलभाताईंचे कष्ट लक्षात घेतले तर असं वाटतं की तो संपूर्ण काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक ध्यासच होता ! १९९८ चा काळ म्हणजे-ना मोबाईल ना कम्प्युटर ! पुण्याहून मुलाखती घेण्यासाठी मुंबईला जायचं


 -आणि तेव्हा प्रवासाची साधनंही कमीच होती. या कलाकारांचे नंबर /पत्ते मिळवायचे/शोधायचे...ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता त्यांच्या घरी जाऊन मुलाखती घ्यायच्या... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुलाखती रेकॉर्डही केल्या जात नव्हत्या. त्यामुळे केवळ मेंटल नोट्स वर आधारित मुलाखती लक्षात ठेऊन पुण्याला येऊन त्यावर संस्करण करून ते वेळेत प्रकाशित करायचं... आणि लगेच पुढच्या कलाकाराच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठी नॅशनल फिल्म आर्काइव्जच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करायचा! हे सगळं घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळून! मनात ध्यास असल्याशिवाय हे होणे शक्य नाही! मुलाखत घेतलेल्या कलाकारांची यादी अक्षरश: डोळे दिपवणारी आहे- अभिनेत्री श्यामा पासून संगीतकार ओ पी नय्यर ते गायिका सुमन कल्याणपूर, सुलोचना पासून मजरूह सुलतानपुरी ते शोभना समर्थ यांच्यापर्यंत .... या सर्व लोकांना बोलतं करून त्यांच्याकडून या सुवर्ण काळाची माहिती /आठवणी आपल्यापर्यंत पोचवून सुलभाताईंनी एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण केलं आहे. 

 

एक ऑक्टोबर २०२३ रोजी सुलभाताई वयाची ७४ वर्षे पूर्ण करून पंचाहत्तरीत पदार्पण करत आहेत.विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे एक ऑक्टोबर हा जागतिक संगीत दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. शिवाय याच दिवशी ज्येष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन तसंच गीतकार आणि शायर मजरूह सुलतानपुरी आणि मराठी भावगीतात आपले अढळ स्थान असलेले कवी ग दि माडगूळकर यांचाही जन्म झाला.  सुलभाताईंना  माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार! त्यांचे आयुष्य समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो आणि त्यांच्याकडून या हिंदी-मराठी संगीत क्षेत्रांविषयी असेच मोलाचे कार्य घडो यासाठीही शुभेच्छा! 

Saturday 3 June 2023

'प्रिय भाई...एक कविता हवी आहे'- समृद्ध करणारा एक तरल अनुभव!



'प्रिय भाई...' बद्दल याआधी मला फारशी काही माहिती नव्हती. त्यामुळे माझी पाटी कोरी होती. म्हणूनच कदाचित मी या अभिवाचनाचं स्वरूप असलेल्या नाटकाचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकलो. 
मला यातलं सगळ्यात काय आवडलं असेल तर सर्व कलाकारांनी केलेली वातावरण निर्मिती! मग ते भित्तीपत्रकाबाबतची संपादक मंडळाची बैठक असो वा पुलं -सुनीताबाईंचं 'मालती माधव' मधील घर! गुरूदेव टागोर यांच्या कवितेचा शोध इतका जिवंत झाला की मला वाटलं की आपणही धनश्रीच्या मागे उभे राहून पुलं आणि सुनीताबाईंची कविता शोधायची लगबग अनुभवतोय! कवितांच्या पुस्तकांनी श्रीमंत असलेल्या या घरात खरं तर मला त्या मदतनीस गोविंदा होऊन राहायलाही आवडले असते! त्यात हे घर म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पुलंचे! या वातावरण निर्मिती मध्ये दिग्दर्शकाचा attention to detail लक्षात येतो जेव्हा पुलंचे आवडते मल्लिकार्जुन मन्सूर यांचा (?भूप ) जयदीप वैद्य ऐकवतात! एक अद्भुत माहोल निर्माण होतो आणि आपणही ती एक कविता शोधता शोधता इतर अनेक कवितांची सौंदर्य लेणी अनुभवत जातो. 
पुलंना केवळ एक विनोदी लेखक म्हणणं हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा खरं तर अपमान करण्यासारखेच आहे! पुलं आणि सुनीताबाईंचं कवितेवरचं प्रेम हाही दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आणि दोघांनाही बांधणारा एक समान धागा! दोघांनीही या कविता प्रेमापोटी कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम केले. दुर्दैवाने मला ते बघायला मिळाले नाहीत. पण आमच्याकडे त्यांच्या अशाच एका कार्यक्रमाची कॅसेट आहे त्याचीही काल आठवण झाली. आणि ही कॅसेट आमच्या आईने आणली होती कारण तिने हा कविता वाचनाचा कार्यक्रम बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम ऐकलं होता. कविता सादर करण्याची दोघांचीही शैली इतकी विलक्षण आहे की त्यातून या कविता आपल्या अगदी  आत पर्यंत पोचतात! पुलं आणि सुनीताबाईंच्या गुणग्राहकतेमुळे महाराष्ट्राला केवळ कुमार गंधर्व - भीमसेन जोशी -वसंतराव देशपांडे - मल्लिकार्जुन मन्सूर - हे गायकच कळले असं नव्हे तर बा भ बोरकर, मर्ढेकर, खानोलकर (आरती प्रभू), संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांसारखे कवी देखील जास्त चांगल्याप्रकारे समजले! पुलं आणि सुनीताबाईंना या कवींच्या कवितांंनी जो आनंद दिला असेल तो त्यांनी अशा कार्यक्रमांद्वारे लोकांपर्यंत त्यांच्या सहजसुंदर अनौपचारिक शैलीत पोचवला हे त्यांचं महाराष्ट्रावरचं ऋणच आहे खरंतर! 
या दोघांचं कवितेवर फक्त प्रेम होतं असं नाही तर त्यांची कवितेच्या प्रति असलेली निष्ठा आणि बांधिलकी देखील त्या दोघांना एक कविता शोधण्यासाठी आणि ती मिळेपर्यंत यात भाग घ्यायला प्रवृत्त करते. आणि म्हणूनच सुनीताबाई जरी त्याबाबतीत थोड्या साशंक होत्या तरी पुलं म्हणतात-पुढील काळात कविता टिकेल!
टागोरांची  ती कविता शोधता शोधता अनेक कवितांशी जोडल्या गेलेल्या आठवणींची, कवींशी जुळलेल्या ऋणानुबंधाची एक लडीच उलगडत जाते आणि आपण प्रेक्षक म्हणून या प्रवासाचा भाग होतो आणि आपल्याला वाटतं की काय समृद्ध आयुष्य जगले हे लोक! 
लेखक(डॉ समीर कुलकर्णी ) -दिग्दर्शक(अमित वझे ) यांची आणखी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे पुलं या सर्व घटनेत असले तरी त्यांची भूमिका कोणीही साकारलेली नाही. शिवाय पुलंनी संगीतबद्ध केलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या गाण्यांची प्रयोग भर असलेली पखरण! यातून पुलंचं लोभस अस्तित्व जाणवत राहतंच ! साधारणपणे ज्यांचं वय ५० किंवा त्यापेक्षा जास्त आहे  त्या  प्रत्येकाच्या मनात पुलंविषयी एक  हळवा कोपरा निश्चितच आहे. महाराष्ट्रातल्या २-३ पिढ्यांना समृद्ध करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर, प्रेम असलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांना नॉस्टॅलजिक वाटलं असणार. आणि म्हणूनच की काय  संपूर्ण सभागृह 'कौसल्येचा राम बाई',  'ही कुणी छेडिली तार' किंवा 'शब्दावाचून कळले सारे' गुणगुणत होते! हा अनुभव देखील रोमांचक!
अंजली मराठे आणि जयदीप वैद्य यांचे गायन अतिशय सुंदर! दोघांचे आवाज स्पष्ट, सुरेल आणि आवाजाची फिरतही छान! निनाद सोलापूरकर यांची केवळ की बोर्डच नव्हे तर गायनातील साथही तोलामोलाची!( हार्मोनियम वादनही कमाल!)
अमित वझे आणि मानसी वझे दोघांचाही वाचिक अभिनय नैसर्गिक आणि सुरेख! 
या प्रयोगाच्या स्टार परफॉर्मर मुक्ता बर्वे आहेत हे नि:संशय! त्या crowd puller आहेत पण तरीही त्यांनी कुठेही भूमिकेचं भान सोडलेले नाही हे विशेष! उलट त्यांनी सुनीताबाईंच्या प्रेमळ, स्नेहार्द्र स्वभावाचं सुरेख दर्शन घडवलं आहे. 'चाफ्याच्या झाडा' ही कविता सुनीताबाईंच्या आवाजात आपण ऐकलेली असते. पण मुक्ता बर्वे त्यापेक्षा थोड्या वेगळ्या शैलीत म्हणतात आणि तीही शैली आपल्याला आवडून जाते!तसंच ती कविता वाचताना केलेल्या डाव्या हाताच्या हालचालीतून देहबोली लक्षात राहण्यासारखी ! 


 






या नाटकात एक जिवंत पात्र असावे अशी महत्त्वाची भूमिका मिलिंद मुळीक यांच्या Illustrations ची आहे. केवळ अप्रतिम!


नाटकातील घटना खरोखरच घडली होती आणि ते १९९८ साल होतं . पुलं गेले २००० साली आणि त्याआधी काही काळ तसे आजारीही होते. या संपूर्ण नाट्यानुभवात देखील मृत्यू आणि आजारपण यांची एक कळत नकळत सावली जाणवते. पण अशा काळात देखील रसरशीतपणे कसं जगावं... केवळ आला दिवस ढकलत न राहता प्रत्येक दिवसाचं  आणि जगण्याचं सोनं कसं करावं याचा एक धडाच जणू पुलं आणि सुनीताबाईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे!  
प्रयोगाच्या शेवटाला सुनीताबाई लेखक डॉ समीर कुलकर्णी यांच्याशी फोनवर बोलतानाचा प्रसंग आहे. यात त्या आचार्य विनोबा भावे यांच्या 'गीता प्रवचने' मधील पहिल्या अध्यायाचा संदर्भ देतात. त्यात विनोबांनी कृष्णत्रयी असा उल्लेख केला आहे - जो भगवद गीता सांगतो तो एक कृष्ण...ती गीता जो ऐकतो तोच अर्जुनही कृष्णच ...आणि या देव-भक्तांचे हृद्गत प्रगत करणारे महर्षी व्यासही इतके विरघळून गेले की तेही कृष्णच झाले ! सुनीताबाई हाच संदर्भ कवी आणि कवितांच्या बाबतीत देतात. मला हाच संदर्भ 'प्रिय भाई एक कविता हवी आहे' या प्रयोगाच्या बाबतीतही द्यावासा वाटतो. हा अनुभव प्रत्यक्ष घेऊन तो लिहिणारे-डॉ समीर कुलकर्णी...हे एक कृष्ण... हा अनुभव स्वतः मध्ये पूर्णपणे रुजवून त्याचा प्रयोग सादर करणारे कलाकार.. तेही कृष्णच! आणि तो अनुभव आमच्यापर्यंत तेवढ्याच उत्कटतेने पोचल्यामुळे आम्ही प्रेक्षकदेखील कृष्णच! यामुळे एक अद्भुत  अद्वैत अनुभवायला मिळाले! 

Friday 2 June 2023

सायकलिंग करता करता पक्षीनिरीक्षण ... (भाग ४)

 एखाद्या ठिकाणी जात राहिल्यावर आपल्याला त्या जागेची  सवय होऊन जाते. तशी मला या विठ्ठलवाडी मंदिर परिसराची सवय झाली. एखाद्या रविवारी तिथे सायकलने गेलो नाही तरी टू व्हीलर ने जाऊन  घुबडांचे का असेना फोटो काढावे असं वाटू लागलं. जणू मला त्या जागेची ओढच निर्माण झाली. तिथला अर्ध्या तासाचा वेळ...उन्हात असो वा सावलीत..हवाहवासा वाटू लागला. पक्षी शोधणे, त्यांना बघून फोटो काढणे  हा एक सरावाचा भाग झाला आणि दोन्हीमध्ये गुणात्मक(!) फरक दिसून येऊ लागला...  रोजरोज तीच ती माणसं दिसायची... त्यांचेही तेच ठराविक रुटीन! सगळं कसं अगदी तसाच्या तसं ! थोडंही इकडे तिकडे नाही ! शिवाय मला वेगवेगळे पक्षीही दिसत होते...अगदी महाराष्ट्राचा राज्य पक्षी- हरियाल (Yellow footed green pigeon) ही दिसला. त्यामुळे एकंदरीत सगळं काही सुखाने चाललं होतं..... 

मग एकदम काय झालं काय माहित !  इथले पक्षी अचानक कमी झाले . अवकाळी पावसामुळे नदीचं पाणी वाढून ते प्रवाही झाल्यामुळे की काय माहित नाही! पाण्यात जलपर्णी पण आहेच..त्यामुळे पाण्याची जागा जलपर्णीच्या व्यापली.. कदाचित या दोन्हीमुळे पक्ष्यांचं खाद्य कमी झालं की काय माहित नाही ..पण  पक्षी कमी झाले एवढं खरं. आता Ibises, Gray Heron, Black winged Stilts, Purple Heron, Open Stork, Golden oriole, Pied Bushchat, long tailed Shrike इ पक्षी गायब झाले आहेत. एवढंच काय जवळच्या वडाच्या झाडावर कित्येक दिवस न चुकता दर्शन देणारं पिंगळा ( Spotted Owlet) या पक्ष्याचं कुटुंबही दिसेनासं झालं. पक्ष्यांचं एक वेळ समजू शकतो पण जी नियमितपणे दिसणारी माणसं होती, तीही गायब झाली ! उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना असतात पण या इथल्या लोकांना कसल्या आल्यात सुट्ट्या! पक्षी नाहीत... ती माणसं नाहीत... त्यामुळे एरवी आवडीची जागा सुद्धा उदास, भकास वाटू लागली.. वाटू लागलं -आता इथे येणं आपण थांबवावं का ? पण मन मानायला तयार होईना... 

कारण दुसरीकडे  निसर्गचक्र अव्याहतपणे सुरूच होतं . घारी सारखा मुख्यतः scavenger पक्षी उडता उडता दोन पायात skillfully मासा पकडून झाडावर बसून तो खाताना दिसला .. 
Black Kite




या ओसाड जागेची का असेना पण निष्ठेने कोतवाल पक्षी( Drongo) कोतवाली करताना दिसला ...
Drongo 

आता पूर्ण वाढ झालेला ( mature adult) ढोकरी (Pond Heron) पक्षी  दिसला ... 
Pond Heron

तर दुसरीकडे टिटवीचं (Red Wattled Lapwing) पिल्लू त्याच्या पालकांच्या करड्या पहाऱ्यात 
Red Wattled Lapwing 

हळूहळू पण निश्चितपणे आश्वासक पावलं टाकत होतं ..
Chick of Red wattled Lapwing 


वेगवेगळे पक्षी येतील तेव्हा येतील... ही माणसं पुन्हा भेटतील तेव्हा भेटतील... पण आपण आपलं सातत्य टिकवून राहिलं पाहिजे... अमूकच गोष्टी पाहिजेत हा हट्ट धरून काय उपयोग? त्यामुळे जे समोर आहे त्याच्या सौंदर्याला कमी लेखलं जाण्याची शक्यता आहे... आपली पाटी कोरी ठेवून येणाऱ्या अनुभवांना सामोरं जावं हेच खरं !
                                                                                                                                        (समाप्त) 

सायकलिंग करता करता पक्षीनिरीक्षण ... (भाग ३)

 १ 

आपल्या दिनक्रमाचा एक अविभाज्य भाग असल्यासारखा दररोज उठून मी विठ्ठलवाडी मंदिराजवळील नदीकाठी जाऊ लागलो (अजूनही जात आहे)  घरून निघून साधारण ३०-३५ मिनिटांत ७-८ किलोमीटर सायकल चालवायची... विठ्ठलवाडी देवळाजवळ वडाचं झाड आहे  तिथे रेलिंगला सायकल लावायची आणि अर्धा तास पक्षीनिरीक्षण केल्यावर कितीही काही चांगलं दिसत असलं तरी तिथून काढता पाय घ्यायचा आणि परत साधारण  ८-९ किलोमीटर सायकल चालवून घरी असा  दीड तासाचा माझा रोजचा कार्यक्रम असतो. पक्षीनिरीक्षण करताना अर्थातच फक्त पक्षी बघितले जात नाहीत. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीही टिपल्या जातात. अशाच काही गोष्टींच्या या नोंदी -मला तर या अनुभवांनंतर मनोज बोरगावकर लिखित 'नदीष्ट' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली!

अ ) सकाळच्या वेळी शाळा-कॉलेजमधील बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी घोळक्याने दिसतात. कधी कधी घोळका मुलामुलींचा असतो तर कधी फक्त मुलांचा . जेव्हा फक्त मुलांचा असायचा  तेव्हा ही मुलं स्मशानभूमीच्या खाली आडोसा आहे तिथे जायची आणि सिगारेट ओढायची. दहावी किंवा फारतर अकरावी बारावी च्या वयाची ही मुलं असतात. मुलामुलींच्या घोळक्यात नेहमीचे  हसणं -खिदळणं, पोरीबाळींवर इम्प्रेशन मारणं प्रकार चालतात. मला या कशाबद्दलच काहीच म्हणायचं नाही. फक्त एवढं जाणवलं की हल्लीच्या मुलांची भाषा खूपच बदलली आहे. प्रत्येक वाक्याच्या सुरवातीला आणि अध्येमध्ये शिव्यांची मनमुराद पेरणी आणि यावर मुलींनाही फारसं काही वाटत नाही हे विशेष! 

आ ) एक वयस्कर माणूस ... अर्धांगवायूच्या  झटक्यामुळे डाव्या  हात आणि पायावर परिणाम झालेला... तरीही नित्यनेमाने रोज सकाळी हे गृहस्थ फिरायला येतात. एका हातात काठी असली तरी झाडावरची फुलं वेचतात आणि वादाच्या झाडाखाली असलेल्या शंकराच्या पिंडीवर ती पद्धतशीरपणे वाहतात. स्वतः च्या आजारपणापलीकडे जाऊन त्यांचा उत्साह आणि त्यांचं सातत्य याचं मला फार नवल वाटतं. 

इ) आणखी एक वयस्कर व्यक्ती... काळा सावळा वर्ण... पांढरा सदरा, पांढरा ढगळ पायजमा, पांढरी टोपी ...असा पेहराव ! स्मशानभूमी आणि मंदिर परिसर झाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांबरोबर यांच्या कायम गप्पा ...कधी हे पण तिथला कचरा जाळतात... चेहऱ्यावर कायम गंभीर भाव..  चेहऱ्यावरील सुरकुत्या जणू आयुष्यात खूप काही सोसल्याच्या खुणा असाव्यात ! कोणी बोलायला नसलं तर हे एकटेच नदीकाठी बसतात..विडी  शिलगावतात आणि शून्यात बघत राहतात...बरेच वेळा या नदीच्या पात्रात ते आंघोळही करतात ! आम्ही एकमेकांना रोज बघत असल्यामुळे हळूहळू ते ओळख दाखवू लागले आणि कोणी  माझा अवतार बघून (डोक्यावर हेल्मेट, गळ्यात कॅमेरा इ )  त्यांना माझ्याबद्दल विचारले तर -काही नाही हितं येऊन फोटो काढित्यात.. असं उत्तर द्यायचे. एक दिवस ते नदी पात्रात उतरलेले असताना मला हाक मारून त्यांनी बोलावले आणि काहीतरी दाखवतो असं म्हणाले. मी त्या पात्रात उतरणं शक्यच नव्हतं (याचं मुख्य कारण म्हणजे मला पोहता येत नाही !) मग जितक्या जवळ जात येईल तेवढ्या जवळ गेल्यावर त्यांनी मला हे दाखवलं- 

River Turtle 
 

... हे चक्क जिवंत होतं.. माझी फोटोग्राफीची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला हे दाखवलं आणि नंतर त्याला पाण्यात सोडलं. दुसऱ्या दिवशी मला मुद्दाम भेटून त्यांनी सांगितलं की त्यांनी महापालिकेला या कासवांबद्दल कळवलं आणि ते लोक येऊन त्याला घेऊन गेले आणि आता ते कात्रजच्या प्राणी संग्रहालयात आहे. कासव पाळणं अथवा पकडून खाणं हा गुन्हा आहे ना ...म्हणून त्यांनी महापालिकेला कळवलं ! मला त्यांच्या या कृतीने खूप बरं वाटलं. यानंतर तर आम्ही नेहमीच एकमेकांना रामराम करू लागलो ... एकदा तर त्यांनी आपणहून मला सांगितलं -पायऱ्यांवरून हळू उतरा...लईच मुरूम हाय ! 

ई ) आणखी एक वृद्ध ...वय ७५ च्या आसपास असावे.. दररोज बजाज M 80 ने येतात. पायऱ्या उतरून शंकराच्या देवळाच्या मागच्या कठड्यावर बसतात आणि प्राणायाम वगैरे करतात...नंतर जोरजोरात टाळ्या वाजवतात. आधीच या परिसरात इतके आवाज- कुठे इथल्या कारखान्यांमधल्या मशीनचे...कुठे बिल्डिंगच्या बांधकामाचे तर कुठे रस्ता रुंदीकरणाचे ! यात भरीतभर यांच्या टाळ्यांचा आवाज ! मी मनोमन वैतागून जायचो... पण अर्थात ही जागा माझी नाहीच...इथे त्यांनाही  येऊन व्यायाम करायचा हक्क आहेच. नंतर नंतर तेही बोलू लागले...कधी मला उशीर झाला तर -आज उशीर झाला असं विचारत.... व्यायाम करून परतताना पायऱ्या चढल्यावर त्यांना अक्षरश: धाप लागायची... मग म्हणायचे- आताशा त्रास  होतो इथे यायचा... वय झालं आता... पण काय करणार ! या जागेसारखी दुसरी शांत जागा कुठे शोधूनही सापडणार नाही! इथलं निसर्गसौंदर्य अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही ! एवढ्या गोंगाटात  आणि नदीपात्राच्या दुर्गंधीयुक्त डबक्यात देखील शांतता आणि निसर्गसौंदर्य ते अनुभवू शकत होते याचं मला खरंच कौतुक वाटलं. कारण या जागेत खरंच काहीतरी आहे जे आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे घेऊन येतं.. 

उ ) हे गृहस्थ  पोशाखात... डाय केलेले केस... नेहमी फुल हाताचा शर्ट.. कडक इस्त्रीची पॅन्ट... पॅन्टच्या बेल्टच्या बकलला मोबाईल फोनची केस... जाड भिंगाचा चष्मा...कायम मंद अत्तराचा वास ही त्यांची ओळखच जणू..  साधारण ५५-६० वय असावं... यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक टायमिंग! दररोज सकाळी एका ठराविक वेळी एक माणूस शंकराचं देऊळ उघडून तिथे फुलं वाहतो... एरवी देवळाला कुलूप असतं. हे गृहस्थ बरोबर देवळाचा दरवाजा उघडताना वरूनच  देवाचं दर्शन घेतात आणि लांबूनच नमस्कार करतात ! हे देखील हळूहळू ओळख देऊ लागले... यांनी मला एकदा एक निरागस प्रश्न विचारला- मी तुम्हाला रोज बघतो...तुम्ही इथे रोज येता ..मी बघतो तुम्हाला... मला एक प्रश्न विचारायचा आहे- तुम्ही एवढे फोटो काढता...पण त्याचं पुढे काय करता? म्हणजे याचा उपयोग काय ? ! आता याला काय उत्तर देणार ?


२ 
पण याच माणसाने मला एकदा विचारलं - तुम्हांला इथे घुबडं आहेत हे माहीत आहे का ? तोपर्यंत मला इथे घुबडं (पिंगळा -Spotted Owlets )आहेत याची कल्पनाच नव्हती.. मग त्यांनी मला वादाच्या झाडाच्या ढोलीत बसलेली घुबडं दाखवली... माझ्यावर या माणसाचे अनंत उपकारच आहेत. कारण हे घुबड (किंबहुना सगळीच घुबडं मला खूप आवडतात ! अतिशय expressive पक्षी आहे हा ! त्यांनी दाखवल्यापासून आता इथे यायला  आणखी आवडू  लागलं.  अक्षरश: शेकडो फोटो काढले आहेत. या गृहस्थाने माझ्यासाठी हा खजिनाच खुला केला ! त्यातलेच हे काही फोटो- 
Spotted Owlet






 

                                                                                                                                   (क्रमश:)

Thursday 1 June 2023

सायकलिंग करता करता पक्षीनिरीक्षण ... (भाग २)

१  


पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सायकलिंग करून पक्ष्यांचे फोटो काढले तरी मला समाधान वाटेना. असं वाटायचं की अशी एखादी जागा असावी जिथे आपल्याला निवांतपणे फोटो काढता येतील..जिथे गर्दी नसेल..आणि दररोज काहीतरी नवीन बघायला मिळेल. आणि सुदैवाने अशी जागा माझ्या शाळकरी मित्र श्रीधर अय्यर याने सुचवली. ती म्हणजे विठ्ठलवाडी , सिंहगड रोड पुणे येथील नदीकाठ ! इथे नदी नाल्याच्या स्वरूपात का असेना, पण वाहत असते! शिवाय नदीच्या पलीकडे  उंच उंच झाडं दोन्ही बाजूंना दगडी कठडे, त्यांच्या मागे गवत वाढलेलं... काही ठिकाणी नाजूक रानफुलं तर काही ठिकाणी कर्दळीची झाडं... घाटावर एक शंकराचं देऊळ...नदीपर्यंत जाण्यासाठी खडया  पायऱ्या उतरून जायचं ..आणि देवळाला लागून असलेल्या दगडी कठड्यावर सावलीत शांतपणे बसायचं आणि निवांत फोटो काढायचे ! ही जागा मला एकदम आवडली ! म्हणजे मी  प्रेमातच पडलो तिच्या ! नंतर माझ्या  लक्षात आलं की तिथेच स्मशानभूमी आहे - इथे अंत्यसंस्कार होतात. देवळाच्या बाहेर दहाव्याचे विधी होतात. नदीकिनारी कितीतरी वेळा लोक अन्न ठेवून कावळ्यांची वाट पाहताना बघितले आहेत. तर कितीतरी लोक इथे अस्थिविसर्जनही करतात. पण मग अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षण करायला जावं का? असा प्रश्न सुदैवाने मला एकदाही पडला नाही. स्मशानभूमी, दहाव्याचे विधी , अस्थी वगैरे या  गोष्टींची ना मला कधी  भीती  वाटली ना याचा अडथळा जाणवला. नदीकाठ मोठा असल्यामुळे अशा प्रसंगी मी या विधींपासून  फोटो काढतो आणि त्यांच्या कार्यात माझ्यामुळे लक्ष विचलित होऊ नये किंवा त्यांच्या या गंभीर प्रसंगांत आपल्यामुळे व्यत्यय येऊ नये एवढी मी काळजी घेतो. पण खरं सांगतो ही जागा एवढी सुरेख आहे आणि इथे मी  जरी थांबलो तरीही दररोज काही ना काही घडताना दिसतं. त्यामुळे आता सगळ्या जागा बाजूला सारून मी दररोज इथेच जात आहे. चुकला पीर मशिदीत तसा मी कायम विठ्ठलवाडीला  नदीकाठी! 

२ 

५ डिसेंबर पासून सायकलिंग करता करता केलेल्या पक्षीनिरीक्षणात आजवर खालील पक्षी दिसले आहेत -(यात सायकलिंग वगळता बघितलेल्या पक्ष्यांचा समावेश केलेला नाही )

1) Little Grebe

2) Ruddy Shelduck

3) Domesticated Mallard

4) Spot-billed Duck

5) Coot

6) Woolly necked Stork

7) Open billed Stork

8) Painted Stork

9) Little Egret

10) Cattle Egret

11) Intermediate Egret

12) Pond Heron 

13) Gray Heron

14) Purple Heron

15) Yellow Wagtail

16) Gray Wagtail

17) White Wagtail

18) White browed Wagtail

19) Black winged Stilts

20) Red Wattled Lapwing

21) Spot breasted Fantail

22) White breasted Water hen 

23)  White throated Kingfisher 

24) Common Kingfisher

25) Green Bee Eater

26) Common Sandpiper\

27) Wood sandpiper

28) Green Sandpiper

29) Pied Bushchat

30) Magpie Robin

31) Great Tit

32) Ashy Prinia

33) Red Whiskered Bulbul

34) Red vented Bulbul

35) Gray Hornbill

36) Rose ringed Parakeet

37) Alexandrine Parakeet

38) Drongo

39) Little Cormorant

40) Greater Coucal

41) Glossy Ibis

42) Red naped Ibis

43) White headed Ibis

44) Laughing Dove

45) Yellow footed Green Pigeon (state bird of Maharashtra)

46) Blyth's Reed Warbler

47) Purple Sunbird

48) Tailor Bird

49) Brahminy Starling

50) Golden Oriole

51) Coppersmith Barbet

52) Long tailed Shrike

53) Shikra (याचा फोटो काढता आला नाही) 

54) Pied Kingfisher (फोटो नाही) 

55) Tickel's Blue Flycatcher (फोटो नाही) 

56) Wire tailed Swallow

57) Asian Koel

58) Common Hawk Cuckoo

59) Siberian Stonechat

60) Spotted Owlets 

61) Black Kite 

याशिवाय मुंगूस, खेकडा, कासव यासारखे प्राणीही दिसले. 

३  

खरं तर ज्यांचे फोटो काढता आले त्या सगळ्यांचेच फोटो काढताना मजा आली...मग ते पक्षी मोठे असोत -

                                                  

Open billed Storks


Red naped Ibises 
 
Black headed Ibises 


Painted Stork  
 

Painted Stork 
 

Painted Stork (L) Purple Heron (R) 
 

Gray Heron 
 
Gray Hornbill


Cattle Egret
 
.....की छोटे असोत ! किंबहुना छोटया  पक्ष्यांचे फोटो काढणं माझ्यासाठी तरी आव्हानात्मक होतं -कारण हे पक्षी अतिशय चंचल असतात. ते एका जागी फारच थोडा वेळ बसतात. ती वेळ साधून फोटो काढणं हे ते आव्हान ! पण या छोट्या पक्ष्यांच्या फोटोमुळे फोटोग्राफीतल्या  एका वैशिष्ट्याची सवय झाली ती म्हणजे- Bokeh effect ( background effect)  तर आता अशाच  काही सुंदर आणि नाजूक पक्ष्यांचे हे फोटो - यातही मला Pied Bushchat या  काढताना फारच मजा अली कारण तो एक अतिशय गोड़  पक्षी आहे-
Pied Bushchat
 


Common Kingfisher 
 
Long tailed Shrike

White Wagtail


Yellow eyed Babbler 


Blyth's Reed Warbler 


Coppersmith Barbet 

Ashy Prinia 
 
हे पक्षीनिरीक्षण करत असताना दिसलेली/भेटलेली माणसं आणि त्यामुळे माझ्यापुढे खुला झालेला खजिना याविषयी पुढील ब्लॉग मध्ये ! 
                                                                                                                    (क्रमश:)