Tuesday 23 January 2024

२२ जानेवारी २०२४ च्या निमित्ताने..

 



२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या दिवसानिमित्त पुण्यात काय वातावरण होतं याची निरीक्षणं या ब्लॉग मधून नोंदवली आहेत...

(डिस्क्लेमर : शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे ही निरीक्षणे नोंदवण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. अनावधानाने कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व ! हा केवळ एक फेसबुकीय दस्तावेजीकरणाचा प्रयत्न आहे)


१) २१ जानेवारीच्या रात्री १२ वाजता मला फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. सुमारे १५-२० मिनिटं फटाक्यांचे आवाज येत होते. यावरून मला वाटलं की २२ जानेवारी जोरात साजरी होणार आणि जागोजागी ट्रॅफिक जॅम होणार, आपण त्यात अडकून पडणार वगैरे... 


२) २२ जानेवारीची सकाळ नेहमीप्रमाणेच होती. फक्त  सगळीकडे उत्साह होता,  लगबग जाणवली. व्हाट्सअँप ग्रुप वर  या दिवसाचं औचित्य साधून कोणी कविता  केली होती तर कोणी रामाचं गाणं म्हणून ते पोस्ट केलं होतं , कोणी रांगोळी काढली त्याचा फोटो पाठवला होता. रामाच्या प्रति असलेला त्यांचा भक्तिभाव त्यातून उत्सफूर्तपणे प्रकट होत होता. 


३) माझं हातावर पोट (!) असल्यामुळे सुट्टी नव्हतीच. ती घ्यायची इच्छाही नव्हती पण वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तर आपण दवाखान्यात पोचूच शकणार नाही असं वाटलं होतं. पण सुदैवाने तसं काहीच झालं नाही. सकाळ- संध्याकाळ माझ्या आणि दुपारी गावातील (पेठेतील) दवाखान्यांत मी व्यवस्थित जाऊ शकलो. नाही म्हणायला वाटेत सकाळी एक शोभायात्रा लागली. पण ती रस्त्याच्या एका बाजूने जात होती. त्यात बँड होता.. पण स्पीकरच्या मोठाल्या भिंती नव्हत्या. बरेच लोक त्यात सहभागी झाले होते. कोणीही नाचत नव्हते. फक्त एकाच माणूस गणपतीत नाचतात तसं (पण माफक) नाचत होता. 


४) दवाखान्यात एका माहेश्वरी समाजाच्या पेशंटने मला (मी सांगितले नसताना देखील ) अयोध्या मंदिराचा फोटो व्हॉट्स ॲप वर पाठवला आणि ते म्हणाले - "कोण म्हणतं की मंदिर अपूर्ण आहे? ते पूर्ण झालं आहे. पहा तुम्हांला फोटोही पाठवला आहे" (खरं तर मी असं काहीच बोललो नव्हतो)पुढे ते म्हणाले - "आज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे - साठ देशांमध्ये लाईव्ह रिले होणार आहे. टीआरपी चे सर्व रेकॉर्ड मोडले जाणार आहेत" 

तर एका पेशंटने सांगितले की त्यांना आदल्या रात्री अयोध्येत बॉम्ब स्फोट झाल्याचे स्वप्न पडले आणि त्यामुळे त्या  दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी घरातल्या लोकांना टीव्ही लावून तिथे कुठे घातपात तर नाही ना झाला याची खात्री करून घ्यायला सांगितलं ! 


५) प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावेळी (मी त्याचं प्रसारण पाहिलं नाही) वेगळं असं काहीच जाणवलं नाही.( म्हणजे फटाके वगैरे) (हे मी माझ्या भागापुरतं सांगू शकतो) 


६) येता जाता रस्त्यावर सगळीकडे भगवा माहोल होता- भगव्या पताका, भगवे झेंडे(सायकल, रिक्षा, दुचाकी, अपवादात्मक चारचाकी गाड्यांवर झेंडे लावले होते) घराघरांवर झेंडे दिसत होते. भगवे आकाशकंदील होते. काही घरांवर विद्युत रोषणाई केली होती. सोसायट्यांमध्येच  हे जास्त  होतं  असं नाही तर झोपडपट्ट्यांमध्येही भगव्या पताका, आकाशकंदील दिसत होते. आम्ही जैन नसलो तरी जैन समाज बहुल सोसायटीत राहतो. आमच्या सोसायटीत देखील (२० बिल्डिंगची सोसायटी ) सगळीकडे भगव्या पताका लावल्या होत्या. दिवाळीत केली होती तशीच विद्युत रोषणाई केली होती. मुख्य म्हणजे जैन मंदिराबाहेर मोठी रांगोळी काढली होती. सोसायटीत सकाळी आणि संध्याकाळी महाआरती होती आणि व्हाट्सअँप ग्रुप सांगण्यात आलं होतं की स्त्रियांनी भगव्या साड्या नेसून यावं तर पुरुषांनी पांढरे कपडे घालावेत. त्याप्रमाणे लोकांनी तसं केलं. 


७) एखादा गुढी पाडव्याचा सण असावा तसा उत्साह लोकांमध्ये होता आणि तसा भारतीय पारंपरिक पेहराव घातलेले  लोक रस्त्यात दिसत होते. भगवे झब्बे, भगव्या टोप्या, काहींचे भगवे स्वेटर, एका चारचाकीच्या पुढच्या आणि मागच्या काचेवर जय श्रीराम असं लिहिलं होतं आणि श्रीरामाचा मोठा फोटो होता. तो गाडी कशी चालवू शकत होता कोणास ठाऊक! 


८) जागोजागी भगव्या  रंगाचे स्टेज उभारण्यात आले होते आणि त्यावर धनुर्धारी श्रीरामाच्या मूर्ती होत्या आणि तो एक प्रकारचा सेल्फी पॉईंट होता. इथे तरुणांची बऱ्यापैकी गर्दी होती. हा सगळा खर्च कोणी केला असा प्रश्न पडला पण अशा ठिकाणी आजी-माजी नगरसेवक, भावी नगरसेवक-आमदार यांचे फोटो दिसले आणि लगेच त्याचे उत्तरही मिळाले. अशा आजी माजी आणि भावी राजकारण्यांकडून प्रसाद वाटप,कार सेवकांचा सत्कार, डीजे, भावगीत गायनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. 


९) कुटुंबवत्सल श्रीरामाऐवजी सगळीकडे धनुर्धारी श्रीराम दिसत होता- जागोजागच्या फ्लेक्स वर देखील! 

फ्लेक्स वरचे मजकूर वाचण्यासारखे होते-

 ' ५०० वर्षांचा वनवास संपला'

' राजतिलक की करो तैयारी 

आ रहे हैं भगवाधारी'

एका फ्लेक्सवर लिहिलेल्या मजकुराचा मला अर्थ कळला नाही -

' अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार ' 


१०) दिवसभर सगळीकडे रामाची गाणी लावली होती. एखाद्याच ठिकाणी सुधीर फडके-ग दि मा यांच्या गीत रामायणातील गाणी होती. बाकी साकळीकडे तीच तीच गाणी होती. मुख्यतः 'रामजीकी निकाली सवारी' हे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत दिग्दर्शनातील 'सरगम'  मधील गाणी होतं. एकूण श्रीरामावरील catchy गाण्यांची कमतरता जाणवली. एक गाणं मी काल पहिल्यांदाच ऐकलं - 

'श्रीराम...जानकी बैठे है मेरे सीने में' हे गाणं १९६८ सालच्या 'मेरे हमदम  मेरे दोस्त'  सिनेमातील (पुन्हा एकदा लक्ष्मीकांत प्यारेलाल !) 'अल्लाह ये अदा कैसी है इन हसीनो में' च्या चालीवर होतं. 

(मूळ गाणं कोणाला ऐकायचं असल्यास-https://youtu.be/Dlaiz7Zp5cQ?si=89C5VU9ixcVPj8y- )


११) सोशल मीडिया वर खूप जणांनी  व्हाट्सअँप स्टेटस वर श्रीराम आणि अयोध्या मंदिर हा विषय ठेवला होता. कदाचित सेल्फी वाले फोटो ही टाकले असतील. (एरवी मी स्टेटस ठेवतो आणि बघतो. पण २२ जानेवारीला मी फारसे कोणाचे स्टेटस बघितले नाही . माझ्या रोजच्या शिरस्त्याप्रमाणे मी पक्ष्यांचे फोटो स्टेटस वर ठेवले होते) कोणीतरी ट्विटर (आताचं एक्स ) वर लिहिलं होतं - 

२२ तारखेच्या 'द इंडियन एक्सप्रेस' च्या २० पैकी १४ पानांवर श्रीराम हाच विषय होता- त्यात काही संपूर्ण पानं जाहिरातींची, तर काही लेख (ज्यात सरसंघचालक मोहन भागवतांचा लेखही होता) बाकीच्या वर्तमानपत्रांविषयी काय बोलणार !


१२) राममंदिरच्या निमित्ताने सोशल मीडियावरील अनेक मुखवटे गळाले त्यात प्रामुख्याने मला 'एक्स' वरील अमित शांडिल्य यांचा उल्लेख करावासा वाटतो. ते खरं तर चांगलं लिहायचे. पण.. 


१३) तरुणांचा सहभाग याविषयी लिहिलं आहेच. पण विशेष म्हणजे बऱ्याच तरुणांनी भगव्या रंगाच्या 'जय श्रीराम' च्या टोप्या घातल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात टोप्या या आधी मी 'मैं भी अन्ना' च्या बघितल्या होत्या.  त्या  पांढऱ्या रंगाच्या गांधी टोप्या होत्या. तेव्हा अशा टोप्या घालून फिरणे आणि मोर्चात सहभागी होणे यातून आपण भ्रष्टाचाराविरोधात काहीतरी करत आहोत अशी भावना लोकांमध्ये झाली होती. आता गांधी टोप्याही भगव्या झाल्या ! त्या घालून आता लोकांना वाटतंय की राम मंदिराच्या पवित्र कार्यात आपणही सहभागी झालो आहोत. तेव्हाच्या आंदोलनाने एक सरकार उलथवून टाकले. ..आताचे  वातावरण/ मूड  बघून हेच  सरकार पुनः स्थापित होईल असं निदान २२ तारखेला तरी दिसतंय. 


१४) संध्याकाळी लोक फटाके वाजवून आजचा दिवस साजरा करत होते. यात लहान मुलांपासून ते वयस्कर स्त्री- पुरूष उत्साहाने सहभागी झाले होते. व्हाटस् ॲपवर सांगितले होते म्हणून काही घरांबाहेर पणत्या लावलेल्या दिसल्या. उच्चभ्रू लोकांमध्ये उत्साह तर होताच पण आमच्या झाडूवालीचं बोलणं ऐकलं .ती म्हणाली-"आज जादाचं दूध आणलंय. खीर करून खाणार"


१५) २२ तारखेला  प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर मी २३ जानेवारीला हे सगळं लिहीत आहे. काल  मायापुरीतल्या सदराच्या शीर्षकासारखं - 'मगर हम चूप रहेंगे' हे धोरण ठेवलं होतं. सोशल मीडियावर मी कुठंही प्रतिक्रिया दिली नाही.अगदी राहुल सोलापूरकरांची धादांत खोटी पोस्ट फिरत असून देखील त्यावर मी काहीच भाष्य केलं नाही.  लोकांच्या आनंदावर आपण विरजण का घाला ! कारण हा असा मूडच  होता की इथे कुठलाही प्रतिवाद करणं/ विरोधी मुद्दा मांडणं अवघडच नाही, अशक्य होतं. अगदी प्रतिवाद केलाही असता तर माझ्या सारख्याची मतं अल्पमतातच राहिली असती आणि कालचा दिवस असा होता की माझी मतं wouldn't have mattered at all!यावर कोणाला मी पुचाट/पळपुटा / आपल्या मतांवर ठाम न राहणारा वाटू शकतो. पण आता खरं सांगायचं तर एक प्रकारची दमछाक जाणवत आहे. आपण एकटे विरुद्ध सगळे हे आता झेपत नाही.  असा एक बहुसंख्यवाद रुजला आहे की ज्यात अल्पमताची किंमत नगण्य अथवा शून्यच आहे असं दिसतंय . आपण वा आपली मतं irrelevant आहोत असं लक्षात आल्यावर  आपण बोलूच नये आणि जे जे होत आहे ते मूकपणे पाहत राहावे या निष्कर्षावर मी आलो.

Saturday 20 January 2024

आर डी बर्मन, लता आणि गाण्यातले भाव...

१ 

 




  (४ जानेवारी २०२४,संगीतकार आर डी बर्मन यांचा तिसावा स्मृतीदिन ! त्यानिमित्त लिहिलेला हा ब्लॉग !)

 आर डी यांच्यावर ४ जानेवारी २०१९ ला शेवटचं लिहिलं होतं. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी पुन्हा लिहित आहे!  म्हणजे त्यानंतर ब्लॉग लिहिले पण इतर विषयांवर( सायकलिंग, फोटोग्राफी, पुस्तक परीक्षण, वाढदिवस विषयक इ ) पण का कोण जाणे गाणी/संगीत या विषयी लिहिलं गेलं नाही. या मधल्या चार-पाच वर्षांच्या काळात पुलाखालून अर्थातच बरंच पाणी वाहून गेलं आहे.मुख्य म्हणजे आज लता मंगेशकर हयात नाहीत. परंतु त्यांनी करून ठेवलेल्या अफाट सांगीतिक कामाचं थोडंफार अवलोकन करायला देखील, माझ्यासारख्या सर्वसामान्य संगीतप्रेमीला हा जन्म पुरायचा नाही ! हा ब्लॉग म्हणजे त्याच प्रयत्नांचा एक छोटा भाग ! (आर डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्या विषयीचा माझा आधीचा ब्लॉग वाचायचा असल्यास त्याची लिंक इथे देत आहे-  https://rajeshpusalkar.blogspot.com/2019/01/blog-post.html ) 

मागच्या ब्लॉगमध्ये आर डी आणि लता यांच्या गाण्यातील मेलडी हा विषय घेऊन त्यावरील गाण्यांविषयी लिहिलं होतं. यावेळीही मेलडीवर लिहीनच परंतु पुढील गाण्यांतील  मला उमजलेल्या भाव-भावनांविषयी देखील लिहिणार आहे. आर डी बर्मन यांच्या संगीतावर अनेक आक्षेप घेतले जातात. वेगवेगळे रिदम पॅटर्न, वेगवेगळे साउंड्स यांच्या प्रायोगिक वापराच्या नादात त्यांच्या  गाण्यांतील भाव मागे पडतात हा त्या आक्षेपांपैकी एक असावा ! कदाचित या ब्लॉगमधून  त्यावर देखील लिहायचा प्रयत्न करणार आहे. मागील ब्लॉग प्रमाणेच या ब्लॉग मध्ये देखील केवळ सोलो गाण्यांचाच विचार केला आहे . (कदाचित डुएटस साठी एक वेगळा ब्लॉग लिहीन याची ही प्रस्तावना आहे असं वाचकांना वाटू शकेल !  आत्ताच्या घडीला त्याबद्दल सांगता येणार नाही पण आर- डी -लता मंगेशकर डुएटस हा  खरोखरच एका वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे हे नक्की . )

२ 

१) आजा पिया तोहे प्यार दू - बहारों के सपने (१९६७) - 

https://youtu.be/T1FcSe-J2HQ?si=I39eBq6gIHNFgH3B 

या गाण्याच्या सुरुवातीच्या चार ओळी लता मंगेशकरांच्या  मृदू आवाजात, कोणत्याही वाद्यांशिवाय आहेत. गाणं तसं नायकाला address करणारं आहे. म्हणून कदाचित त्यात छोटे छोटे फ्रेजेस आहेत - आजा पिया / तोहे प्यार दू/ गोरी बैय्या/ तोपे वार दू ... यात 'गोरी बैय्या' नंतर किंवा 'किस लिये  तू' नंतरचा सूक्ष्म ठहराव लक्षवेधी आहे. कथानकात नायक राम (राजेश खन्ना ) परिस्थितीशी झुंज देता देता  एका क्षणी पराभूत मनोवस्थेत असताना नायिका /त्याची प्रेमिका गीता (आशा पारेख ) त्याच्यासाठी हे गाणं गात आहे असा प्रसंग असावा. तिला तिच्या प्रेमाविषयी एवढा विश्वास आहे की तिला वाटतंय की  त्या जोरावर रामला त्या परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळेल. संपूर्ण गाण्याच्या शब्दांत  एक सकारात्मकता आहे, आशा आहे आणि एक भावनिक आवाहन आहे. गाण्याचा हा मूड लता मंगेशकर यांनी सुरवातीपासूनच सुरेख पकडला आहे. 'गोरी बैय्या तोपे वार दू' 'थके हुए इन हाथों को दे दे मेरे हाथ में ' यातून शरीर स्पर्शाचेही आवाहन आहे(healing touch या अर्थाने )  पण ते आर्जव आहे आणि त्यात कुठेही आव्हान नाही. हा प्रसंग आणि त्यासाठीचे मजरुहसाहेबांचे शब्द योग्यरीत्या समजून उमजून ही चाल हा समतोल साधते. स्पर्शातून इथे प्रोत्साहन अभिप्रेत आहे - 'अवघड कठीण काळ असला तरीही यावर तू मात करू शकशील' 'तुझा मार्ग खडतर आहे हे मलाही कळतंय पण या मार्गावर तुझ्याबरोबर मीही तुझी साथ सदैव करत आहे..' ही  उमेद जागवणारं प्रोत्साहन ! म्हणूनच  या गाण्यासाठी लता मंगेशकरांची निवड योग्य ठरते. या संपूर्ण गाण्यात गिटार आणि बासरी लता मंगेशकर यांच्या जवळपास बरोबरीने साथ करतात - जणू काही त्या शाश्वत प्रेम आणि विश्वासाचंच प्रतीक असाव्यात ! जोडीला संतूर आणि सॅक्सोफोन देखील समर्थ आणि समर्पक आहेत. पण कुठलेही वाद्य लता मंगेशकर यांच्यावर कुरघोडी करत नाही. म्हणूनच हे  सॉफ्ट आणि रोमँटिक गाणं श्रवणीय वाटतं .  

२) क्या जानू सजन होती है क्या गम की शाम -  बहारों के सपने (१९६७) - 

https://youtu.be/Sd0sHdeVkMA?si=_rzR92Rh4QxZbPti 

'बहारों के सपने' हा एक कृष्ण धवल सिनेमा आहे परंतु या सिनेमातील हे एकमेव गाणं रंगीत आहे कारण हे एक स्वप्नगीत आहे आणि आपली स्वप्नं रंगीबेरंगीच असतात ! पण या गाण्यात आर डी ने एक अभिनव प्रयोग केला आहे. यात मी फार काही नवीन सांगतोय अशातला भाग नाही - यात भारतातला कदाचित पहिला व्हॉइस-ओव्हर- व्हॉइस हा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग तेव्हा नवीन असल्यामुळे लोकांना या गाण्यातला दुसरा आवाजही लता मंगेशकरांचा आहे यावर विश्वास बसायचा नाही. काहींना तर हा आवाज उषा मंगेशकरांचा वाटला होता ! पण हा असा प्रयोग का केला असावा ? खरं तर हिंदी सिनेमांत स्वप्नगीतांची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. (आठवा- 'आवारा' मधील 'घर आया मेरा परदेसी', 'प्यासा' मधील 'हम आपकी आँखों में' 'गुमनाम' मधील 'हम  काले है तो क्या हुआ दिलवाले है' इ) या गाण्यांत नेत्रदीपक आणि भव्यदिव्य सेटस, तो टिपिकल पांढरा धूर वगैरे बघायला मिळतो. आर डी च्या 'क्या जानू सजन' ने  हा ठराविक साचा न स्वीकारता त्यात बदल केला. स्वप्नं म्हणजे कल्पनांची भरारीच असते. जर ती रंगीबेरंगी असू शकतात तर त्यात हे असे overlapping आवाज का असू नयेत? ध्वनी-प्रतिध्वनीचा हा खेळ स्वप्नात जास्त उठून दिसेल या विचाराने हा वेगळा परिणाम गाण्यात वापरण्यात आला असावा. स्वप्नगीत असल्यामुळे गाण्याच्या सुरुवातीला एक गूढरम्य वातावरणनिर्मिती आहे- लता मंगेशकरांचा आलाप आणि त्या जोडीला गिटार आणि व्हायोलिनचा वापर यातून ते साधलं आहे. वरील गाण्याप्रमाणे याही गाण्यात गिटार आणि बासरी यांची सातत्याने साथ आहे शिवाय जोडीला स्ट्रिंग सेक्शन (व्हायोलिन) जबरदस्त आहे. कडव्यातील  पहिली ओळ दोनदा आहे. ती ओळ दुसऱ्यांदा सुरु होण्याअगोदर गिटारचा छोटा तुकडा केवळ अप्रतिम! पहिली ओळ दुसऱ्यांदा म्हणताना   व्हॉइस -ओव्हर- व्हॉइसचा वापर आहे आणि हे दोन्ही कडव्यांच्या वेळी आहे. गाण्याचा मूड जेवढा आर डी -लता यांना  पकडता आला आहे,  तेवढा तो चित्रीकरणात (सुप्रसिद्ध जाल मिस्त्री असूनही !) आणि दिग्दर्शनात(नासीर हुसैन)  यांना  जमला  नाही असं मला वाटतं. 

३) ना कोई उमंग है ना कोई तरंग है - कटी  पतंग (१९७१)-

https://youtu.be/HlB9ogpEk8w?si=vKQem7KEz9EF7aZ1

गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित 'कटी पतंग' या सिनेमात योगायोग आणि चमत्कारिक परिस्थिती यांची अगदी रेलचेल होती. नायिका पूनम/मधू हिला ती विधवा नसताना विचित्र परिस्थितीमुळे विधवा वेशात राहावं लागतं आणि त्यातच नायक कमल (राजेश खन्ना ) तिच्याकडे आकर्षित होतो ('मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिये जाये'... ) तिची सत्य परिस्थिती तिला सांगता येत नाही परंतु नायकाचं तिच्याकडे आकर्षित होणं तिच्या लक्षात आलं आहे (कदाचित तिला ते आवडूही लागलं आहे?) अशा कात्रीत सापडलेल्या प्रसंगी सिनेमात हे गाणं आहे. आनंद बक्षी यांनी तिच्या व्यथेचं वर्णन करणारे यथोचित शब्द लिहिले आहेत. एरवी आपण जे गाणं ऐकतो त्यावरून गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अर्धवट वाटतं. मात्र वर लिंक आहे त्यात सुरवातीचं संपूर्ण संगीत आहे. त्यातील स्ट्रिंग सेक्शन च्या प्रभावी वादनातून जणू पतंग कापला गेल्याचा आणि तो भरकटत गेल्याचा भास होतो. पहिल्या कडव्यातील पहिली ओळ लता मंगेशकरांनी सलग म्हटली आहे- 'आकाश से गिरी मैं एक बार कटके ऐसे'. यातूनही हाच परिस्थितीपुढे आयुष्याचा पतंग भरकटत गेल्याचाच भाव प्रकट होतो. संपूर्ण गाण्यात पॅथॉस भरून राहिला आहे. (म्हणूनच कदाचित नटभैरव या गंभीर प्रकृतीच्या रागाची छाया  या गाण्यावर आहे ) हा पॅथॉस रिदम मधूनही जाणवतो. आपल्याला रेसो रेसो आणि तबल्याबरोबरच बॉन्गो सारख्या वाद्याचा आघातही सतत ऐकू येतो. तबला आणि हा बॉन्गो मिळून तालाचं आवर्तन पूर्ण होतं आणि यातही ठेहराव सातत्याने  असल्यामुळे दुःखाची किनार गहिरी होते. सुरुवातीलाच व्हायोलिनचा तुकडा संपल्यानंतर पियानो आणि गिटारचा एक छोटासाच तुकडा लाजवाब आहे. 'लगके गलेसे अपने बाबूलके मैं ना रोई' या नंतरचा लता मंगेशकरांचा आलाप अंगावर अक्षरश: काटा आणतो. तसंच यानंतरच्या कडव्याआधी व्हायोलिनचा एक सोलो तुकडा आहे तोही वातावरणनिर्मितीसाठी पूरकच आहे. गाण्यातील इंटरल्यूड संगीत खूप मोठं नाही कारण नायिकेला मनात साचलेल्या भावनांचा कल्लोळ व्यक्त करायचा आहे. संपूर्ण गाण्यात बासरी पुन्हा एकदा खूपच परिणामकारक आहे. विशेषतः 'पतझड की मैं हू छाया' किंवा' डोली उठी यु जैसे' या ओळींनंतर अक्षरश: काही सेकंदच बासरी वाजते पण ती खूप काही सांगून जाते. 'कटी पतंग' सिनेमात लता मंगेशकर यांचं हे एकच सोलो गीत आहे. किशोरकुमारच्या या सिनेमातल्या झंझावातापुढे देखील हे गाणं त्याच्या या वैशिष्टयांमुळे झाकोळलं जात नाही. उलट आपलं अढळ स्थान राखून एक संस्मरणीय गाणं ठरतं. 


४) जाने क्या बात है -सनी (१९८४) -

https://www.youtube.com/watch?v=iOkUl3x5ApQ (या लिंक मध्ये पूर्ण गाणं आहे ,तीन कडव्यांसह )

https://www.youtube.com/watch?v=FQYcjNxfsoc (हा या गाण्याचा व्हिडिओ आहे. पण यात दोनच कडवी आहेत ) 

या गाण्याविषयी लिहिण्यापूर्वी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात-

अ) 'सनी' हा १९८४ सालचा सिनेमा आहे. हिंदी सिनेमांत सत्तरच्या दशकात (विशेषतः उत्तरार्धात) कथानकांत खूप बदल झाले आणि त्यामुळे देमार पट/ मारधाड असलेले सिनेमे येऊ लागले आणि त्यांची चलती होऊ लागली. अशा सिनेमांच्या भाऊगर्दीत सिनेमांतील गाणी/ त्यांची सुमधुरता लोप पावू लागली. या पार्श्वभूमीवर 'सनी' या चित्रपटातील गाण्यांकडे बघितलं पाहिजे. मग लक्षात येतं  की यातली गाणी त्यावेळच्या लाऊडनेसच्या तुलनेत एक ठळक अपवाद होती आणि याला कारण म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक राज खोसला होते (ज्यांनी गुरुदत्त/ देव आनंद सारख्यांबरोबर काम केलं होतं) 

आ) या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता मंगेशकरांचं वय ५४-५५ वर्षं असावं! 

कुठल्याही तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलीमधील सहज स्वाभाविक भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. त्यात प्रियकराची असोशी आहे, त्याची वाट बघणं आहे...झोप न येणं आहे आणि प्रेमाच्या नात्याचं लग्नात रूपांतर करायची ओढही! याही गाण्यात एक ठेहराव आहे आणि 'जाने क्या बात है' नंतर एक लक्षात येण्याजोगा पॉज आहे. त्यानंतर थोडं off beat गाणं पुढे जातं. लता मंगेशकरांनी गाण्यात मींडकाम काय सुरेख केलं आहे. असं वाटावं की स्वरांच्या हिंदोळ्यावर एक नवथर तरूणी मस्तपैकी झुलतेय! मला यातच एक अल्लड निरागसताही दिसते. प्रत्यक्ष गाण्यातला ताल आणि इंटरल्यूड मधील ताल यात लयीत फरक आहे जो अर्थातच गाण्याच्या प्रसंगानुरूप आहे. गाण्यात इलेक्ट्रिक गिटारचा वापर छान आहे त्याचबरोबर सतार- सरोद आणि तिसऱ्या कडव्या आधी (पुढे गाण्यात शहनाईचा उल्लेख आहे म्हणून) तार शहनाईचा वापरही आहे.  (या गाण्यातील गिटार संबंधी मला माझा शालेय मित्र आणि संगीत/आर डी प्रेमी श्रीपाद गांधी याची मदत झाली)

या गाण्यांशिवाय आर डी- लता मंगेशकर यांची आणखीही काही सोलो गाणी आहेत (शिवाय डुएटस् आहेतच!) त्यावर पुन्हा कधीतरी लिहीनच!!