Friday, 16 May 2025

आमची पेंच ट्रिप : स्त्रीशक्तीच्या 'मनिषे'चा 'बिंदू'?

(या ब्लॉगचं हे असं विचित्र शीर्षक वाचून काहींच्या भुवया उंचावतील. पण ब्लॉग पूर्ण वाचल्यावर शीर्षकाचा उलगडा निश्चितच होईल असं वाटतं.) 


१ 

कोव्हिडमुळे २०२० साली रद्द करावी लागलेली आमची पेंचची ट्रिप मागे पडली ती पडलीच आणि आम्ही शेवटी २०२५ साली एप्रिल महिन्यात तिथे जाऊन आलो. या मधल्या काळात अभयारण्यात जाऊन (फक्त) वाघ बघण्याबद्दल माझं मत बदललं होतं आणि अलीकडे तर पक्षीनिरीक्षण आणि पक्ष्यांचे फोटो काढायची खूपच आवड निर्माण झाली असल्यामुळे पेंचला गेलो तरी एक वेळ वाघ नाही दिसला तरी चालेल, पण पक्षी दिसले पाहिजेत(आणि त्यांचे फोटोही काढता आले पाहिजेत)  असं मी आमचे ट्रिप आयोजक मंगेशसिंग ठाकूर(Jungle Trackers)  यांना म्हणालो. यावर ते म्हणाले - 'पक्षी तर बघायला मिळतीलच, पण जंगलाची खरी शान वाघच आहे. एवढं लांब येऊन वाघ नाही बघितला तर कसं वाटेल?' त्यामुळे आमच्या ५ सफारींमध्ये सुरवातीला  वाघ बघायचा प्रयत्न करायचा आणि उरलेल्या वेळेत बाकीचं जंगल आणि पक्षी बघायचे असं ढोबळमानाने ठरलं. ऐन एप्रिल महिन्यात विदर्भात आम्ही का गेलो असू असा प्रश्न काहींना पडला असेल तर एप्रिल-मे हे महिने कुठल्याही जंगलात वाघ बघण्याच्या दृष्टीने सर्वात चांगले समजले जातात. उन्हाळ्यामुळे वाघ पाणवठ्याजवळ येण्याची, पाण्याजवळच थांबण्याची शक्यता जास्त असते. तसंच उन्हाळ्यामुळे गवतही वाळ्लेलं असल्याने त्यामधून वाघ दिसण्याची शक्यता असते. आणि जंगलामध्ये सफारी दरम्यान फारसं उकडत नाही असा आमचा या आधीच्या ट्रिपचा अनुभव आहे. शिवाय रिसॉर्ट वर एसी असतोच. त्यामुळे आमच्या सोयीइतकाच वाघ दिसण्याच्या शक्यतेचा विचार करून ट्रीपसाठी आम्ही हा काळ निवडला. 

२ 

२४ एप्रिलला सकाळी ५. १० मिनिटांनी आमचं पुण्याहून  नागपूरचं इंडिगो विमान होतं. कधी एकदा त्या विमानाचं उड्डाण होऊन आपण आधी नागपूर आणि पुढे पेंचला पोचू असं मला झालं होतं. त्यामुळे विमानात हवाईसुंदरींच्या सुरक्षाविषयक सूचना आणि त्यांच्या यंत्रवत कवायतींची औपचारिकता कधी संपते असं वाटत होतं. या कवायती सुरु होण्याआधी विमानाच्या कॉकपिटमधून एका महिलेचा आवाज आला आणि तो ऐकून मी माझ्या सीट मध्ये अक्षरश: सरसावून बसलो. त्या महिलेने हिंदी आणि इंग्रजीतून प्रवाशांशी संवाद साधला. 'सुप्रभात'ने सुरुवात करून ती म्हणाली- "मी कॅप्टन भार्गवी गडकरी आणि आज विमानात माझी  सहकारी (को- पायलट ) दीक्षा सिंग आहे !" तिने विमानातील बाकीच्या क्रू सदस्यांची नावं (हवाईसुंदरी) सांगितली. त्याही अर्थातच महिला होत्या. म्हणजे आमचं आजच विमान हे संपूर्णतः महिला चमू चालवणार होता. माझ्या आजवरच्या विमान प्रवासात हे पहिल्यांदाच झालं असल्यामुळे मला या गोष्टीचं  खूपच अप्रूप आणि कौतुक वाटलं. पुढे कॅप्टन गडकरींनी पुण्याची हवा आणि नागपूरची हवा, दोन्ही ठिकाणचं तापमान वगैरे सांगितलं. आपण साधारण ३७००० फूट उंचावरून प्रवास करणार आहोत हे ही सांगितलं आणि शेवटी आधी ज्या आवाजात बोलत होत्या त्याच आवाजात म्हणाल्या - "आजच्या विमान प्रवासात तुम्हां सर्वांबरोबरच माझी आई आणि बहीण देखील आहेत. त्या नागपूरहून पुढे जंगल सफारीला जाणार आहेत. तुम्हां सगळ्यांचा विमान प्रवास सुखकर होवो आणि माझ्या आई आणि बहिणीला जंगल सफारीत नक्कीच काहीतरी चांगलं बघायला मिळो यासाठी शुभेच्छा!" हे ऐकून तर मला आणखीच आनंद झाला. त्या कॅप्टन गडकरींच्या आईंना किती छान वाटलं असेल की आपण प्रवास करत असताना आपली मुलगीच विमानाचं सारथ्य करत आहे! किती आनंद, अभिमान आणि समाधान वाटलं असेल त्यांना ! खरं तर माझी खूप इच्छा होती की त्या माऊलीला भेटून त्यांचं अभिनंदन करून, त्यांचा आनंद आपणही द्विगुणित करावा. पण एवढ्या मोठ्या विमानात काहीच ओळख नसताना त्यांना नेमकं शोधायचं कसं असा प्रश्न होता. मात्र मी मनोमन त्यांना नमस्कार केला. कॅप्टन  गडकरी म्हणाल्या तसं आमचा विमान प्रवास अतिशय चांगला झाला. टच डाऊनच्या वेळी पोटातलं पाणी देखील हललं नाही. एकंदरीत ट्रिपची सुरुवात चांगली झाली !

३ 

पेंच हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेलं एक मोठं अभयारण्य आहे. (एकूण क्षेत्रफळ ७५८ चौरस किमी ). जंगलाच्या कोअर आणि बफर झोन मध्ये प्रवेश करण्यासाठी वेगवेगळी गेटस आहेत. ( तुरिया, कर्माझारी, जमतारा ही काही मध्यप्रदेश मधील गेटस तर सिल्लारी, खुरसापार, चोरबाहुली ही  काही महाराष्ट्रातील गेटस आहेत) आमच्या २५ एप्रिल च्या दोन्ही सफारी खुरसापार गेटच्या होत्या. आदल्यादिवशी संध्याकाळी आम्ही तुरिया गेटमधून एक सफारी केली होती. २५ तारखेला खुरसापार मधील दोन आणि २६ तारखेला सिल्लारीच्या दोन अशा आमच्या उर्वरित सफारी होत्या. 

सकाळच्या सफारीसाठी आम्ही आमच्या रिसॉर्ट वरून सव्वा पाचलाच निघालो होतो. रिसॉर्ट पासून गेट पर्यंत पोचायला पंधरा वीस मिनिटं लागणार होती शिवाय सफारीसाठी परमिटची औपचारिकता(ओळखपत्र तपासणी वगैरे) करण्यात वेळ मोडू नये आणि आपण लवकरात लवकर जंगलात प्रवेश करावा यासाठी हा खटाटोप ! त्याप्रमाणे आम्हांला लवकरच एक जिप्सी(open gypsy) गाडी देण्यात आली. आमच्या गाडीचा ड्रायव्हर रुपचंद होता. आम्हांला आमचे मोबाईल जंगलात नेता येणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं. हल्ली मोबाईल गेटवरच जमा केले जातात. प्रत्येक जिप्सीमध्ये ड्रायव्हर बरोबर एक गाईड देखील असतो. आम्ही आमच्या गाईडची वाट बघत थांबलो होतो तर अचानक एक सर्वसाधारण उंचीची, तीस-बत्तीस वयाची, सावळ्या वर्णाची, थोड्याश्या आडव्या बांध्याची, गोल चेहऱ्याची एक महिला आमच्या गाडीत बसली.तिचे डोळे टपोरे आणि चेहरा हसरा होता. "गुड मॉर्निंग ! मी मनिषा ! आजच्या सफारीसाठी मी तुमची गाईड, तुमच्या बरोबर असणार आहे. " तिने स्वतःची ओळख करून दिली. आजवर मी कमीतकमी पाच जंगलं तरी बघितली आहेत. पण आमच्याबरोबर कधीही महिला गाईड नव्हती. हा अनुभव आमच्यासाठी म्हणूनच नवा आणि वेगळा होता. मनिषाने camouflage ड्रेस परिधान केला होता. शिवाय त्याच प्रकारची टोपी घातली होती आणि टोपीच्या आत केस बांधले होते.  बरोबर सकाळी  सहा वाजता जंगलाचं प्रवेशद्वार उघडण्यात आलं आणि आम्ही एका उत्साही वातावरणात सफारीला सुरुवात केली. 

४ 

ऐन उन्हाळा असला तरी हवा प्रसन्न होती. चालत्या जीपमधून प्रवास करत असल्याने छान वारा लागत होता. सकाळच्या वेळी जंगलात एक झाडा-पानांचा मंद वास येत असतो. तसा तो आजही येत होता आणि त्याने मन प्रफुल्लित होत होतं. आमची गाईड मनिषा खुरसापार जंगलाविषयीची माहिती आम्हांला सांगू लागली. इथे साधारण १३ वाघ आहेत...इथली झाडं आम्हांला तिने दाखवली-

Indian Ghost tree (Sterculia urens) 


Crocodile bark tree (Terminalia elliptica ) (मराठी नाव-ऐन ) 

Terminalia bellirica (मराठी नाव- बेहडा) 

Mahua (Madhuca longifolia)(मराठी नाव- मोह ) 


Cleistanthus collinus (मराठी नाव- गराडी ) 
(सर्व फोटो आणि झाडांची शास्त्रीय नावं -इंटरनेटवरून साभार) 


झाडांच्या मराठी नावांबरोबरच ती त्यांचा थोडक्यात उपयोगही सांगत होती. उदाहरणार्थ - गराडी झाडाचं लाकूड मजबूत असतं आणि घरं बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मोहाची फुलं चितळ हरीण खातं आणि त्यामुळे नराच्या शिंगांना मखमली चमक येते आणि त्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. 

आम्ही काल  तुरियाला गेलो होतो हे तिला सांगितलं होतं. त्यामुळे तिने खुरसापार  आणि तुरिया मधील फरक सांगितले. तुरिया मध्ये तृणभक्षी जनावरं(चितळ, सांबर)  संख्येने जास्त आहेत. तुरिया मध्ये गवताळ कुरणं जास्त आहेत आणि नैसर्गिक पाणवठ्याच्या जागा जास्त आहेत. या सगळ्यामुळे वाघ तुरिया मध्ये लवकर सापडू शकतो कारण सगळे प्राणी वाघाच्या हालचाली झाल्या की एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात- धोक्याची सूचनाच जणू! (alarm call) खुरसापार मध्ये हे तृणभक्षी प्राणी विरळ असल्यामुळे या कॉल्स वरून वाघ शोधणं अवघड असतं. हल्ली मोबाईल फोन जंगलात नेण्यावर बंदी असल्यामुळे एखाद्या जिप्सी मधील लोकांना वाघ दिसला तरी ते इतरांना कळवू शकत नाहीत. या सगळ्यामुळे इथे वाघ दिसणं आणि शोधणं किती अवघड आहे याची आम्हांला कल्पना आली. मनिषा आणि ड्रायव्हर रुपचंद दोघेही आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नांची न कंटाळता उत्तरं  देत होते पण दुसरीकडे त्यांचे कान आणि डोळे वाघाचा वेध घेत होते. आणि अचानक त्या दोघांनाही कच्च्या रस्त्यावर वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या(pug marks) 



(वरील तिन्ही फोटो: स्मृती पुसाळकर )

पायांचे ठसे ताजेच होते. म्हणजे वाघ नक्कीच जवळपास असणार. आणि थोडं पुढे गेल्यावर आम्हांला एक वाघीण दिसली. अगदी मनभरून बघायला मिळाली. वाघ बघितल्यावर आम्हांला जेवढा आनंद  झाला होता तेवढाच मनिषाला देखील झाला. मला तिने विचारलं देखील- फोटो घेता आले ना व्यवस्थित? तिला मी काढलेले फोटो दाखवले तेव्हाही तिचा चेहरा आनंदी झाला होता. वाघ बघितल्यावर तिने आम्हांला बाकीचं जंगल आणि वेगवेगळे पक्षी तेवढ्याच उत्साहाने दाखवलं. गाईड लोकांसाठी प्रशिक्षण आणि परीक्षा दार वर्षी असते असं ती बोलता बोलता म्हणाली. त्यानुसार सगळ्यांना श्रेणी देण्यात येते आणि त्याप्रमाणे त्यांना काम मिळतं असं समजलं. तिचं एकंदरीत काम बघता तिला वरचीच श्रेणी मिळत असावी. 
आमची सफारी यशस्वी झाली आणि गाडी पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर मनिषा पटकन गाडीतून उतरली आणि आम्ही तिला धन्यवाद देण्याऐवजी तीच आम्हांला त्याच हसऱ्या चेहऱ्याने 'थँक यू' म्हणाली आणि गेली सुद्धा ! तिच्याबरोबर आम्हां सगळ्यांचा फोटो काढायचं राहूनच गेलं. आदल्या दिवशीचे गाईड आणि ड्रायव्हर दोघेही टिप मिळावी यासाठी विशिष्टप्रकारे बोलत होते आणि आम्ही टिप देईपर्यंत थोडेसे घुटमळत होते. पण मनिषाने अशी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही हे विशेष! 

'बिंदू' ! खुरसापारला आम्हांला दिसलेली वाघीण ! अतिशय डौलदार  चाल... रुबाबदार राजबिंडं रूप ! आमच्या गाडीच्या ती पुढेच होती त्यामुळे तिचे बरेचसे फोटो पाठमोरे आले.एक दोनदाच तिने वळून बघितलं आणि तो क्षण कॅमेऱ्यात टिपता आला.
 

मात्र तिची चाल डोळेभरून बघणं हा देखील एक विलक्षण अनुभव होता! तिच्या पुढे एक गाडी होती. मध्ये ती आणि तिच्यामागे आम्ही. आमच्यामागे दोन-तीन गाड्या ! एवढ्याच लोकांना ती बघायला मिळाली. बिंदूच्या पुढची गाडी आधी विरुद्ध दिशेला तोंड करून होती. पण बिंदू जशी जशी पुढे चालत होती तसं त्या ड्रायव्हरला काय वाटलं काय माहित! त्याने गाडी रिव्हर्स घेऊन गाडीचं तोंड तिच्याकडे केलं. हे सगळं बिंदू बघत होती. पण तिचं चालणं सुरूच होतं. फक्त पुढच्या गाडीचा ती अंदाज घ्यायची आणि  तिच्या तिच्या त्याच शांत लयीत ती चालत होती. तिच्या चालीत अरेरावी नव्हती, आक्रमकता नव्हती आणि आवेशही नव्हता. होता फक्त ठाम आत्मविश्वास !  या जंगलातील तिच्या स्थानाबद्दल वाटणारा आश्वासक आत्मविश्वास! तिचा रुबाब एवढा की त्यापुढे मनुष्य प्राण्याला देखील माघार घेऊन तिला वाट करून द्यावी लागत होती! गाईड मनिषाने सांगितलं की बिंदूने काही आठवड्यांपूर्वीच तीन पिल्लांना जन्म दिला होता. तिची पिल्लं ठेवून ती सकाळच्या वेळी कदाचित पाणी पिण्यासाठी गेली होती आणि आता ती पिल्लांजवळ परतत होती. मात्र वाटेत थोड्याथोड्या वेळाने थांबून ती झाडांवर मूत्र विसर्जन करून तिच्या इलाख्याची खूण इतर वाघांसाठी मागे ठेवत होती. आमच्याबरोबर...नव्हे, आम्ही बिंदूबरोबर, जवळपास एक किलोमीटर तरी चाललो असू. नंतर ती रस्ता ओलांडून तिच्या पिल्लांच्या दिशेने निघून गेली..आमच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव मागे ठेवून ! 
पेंचच्या ट्रिप मध्ये पुढे संध्याकाळी आम्हांला चार वाघ दिसले.. दुसऱ्या दिवशी दोन बिबटे दिसले. भरपूर पक्षी बघितले. पण 'बिंदू' ला बघणं हा माझ्यादृष्टीने आमच्या ट्रिपचा सर्वोच्च बिंदू होता ! 


 


(दोन्ही व्हिडिओ - स्मृती पुसाळकर)


Thursday, 8 May 2025

पुस्तक परीक्षण : 'निळे आकाश हिरवी धरती' -मिलिंद बोकील

  

आपल्याला मंगोलियाबद्दल खूपच तुटपुंजी माहिती असते. आशिया खंडात चीनजवळचा हा देश आहे, त्यात गोबी नावाचे वाळवंट आहे, मंगोलियाची राजधानी उलानबातर आहे हे आपण भूगोलात शिकलेले असते. दक्षिण पूर्व आशिया, चीन जपान मधील राहणाऱ्या लोकांना मंगोल वंशीय म्हटलं जातं हे आपल्याला माहित असतं. इतिहासाची ज्यांना आवड आहे त्यांना चेंगिझखान आणि त्याच्या लढाया याबद्दल माहिती असते. पण यापलीकडॆ मंगोलिया देश, तिथली संस्कृती याविषयी सर्वसामान्य मराठी वाचकांना फारशी माहिती नसते. आणि म्हणूनच डॉ मिलिंद बोकील यांचं 'निळे आकाश हिरवी धरती' हे त्यांच्या मंगोलिया मध्ये जाऊन, तिथल्या प्रतिकूल हवामान, कठीण भूप्रदेशात राहून  केलेल्या समाजशास्त्रीय संशोधनावर आधारित पुस्तक मराठी वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. 

 या पुस्तकाने डॉ बोकीलांनी  सर्वसामान्य मराठी वाचकाला एक नवा विचार, जगाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे. सहसा आम्ही केवळ आमच्या आजूबाजूचाच विचार करतो, फारतर आमच्या देशाचा. परंतु आपल्याला माहित नसलेल्या प्रदेशातील  लोक तिथल्या वातावरणाशी कसे जुळवून घेतात, तिथल्या परिस्थितीशी कसा सामना करतात आणि  आपलं आयुष्य कसं जगतात याविषयी त्यांची निरीक्षणं, तिथल्या लोकांच्या मुलाखती याद्वारे मांडलं आहे. आपले प्रश्न आणि त्यांचे प्रश्न काही बाबतीत वेगळे आहेत, परंतु जागतिक हवामान बदल आणि त्यामुळे होणारे परिणाम आपण जसे भोगत आहोत तसे त्या देशातील लोकदेखील या समस्येतून जात आहेत. या सगळ्या परिस्थितीकडे अत्यंत तटस्थ/वस्तुनिष्ठपणे बघून त्याचा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष डॉ बोकीलांनी  पुस्तकात मांडले आहेत. पुस्तकात त्यांनी तिथल्या पशुपालक समाजातील १२ कुटुंबांचा अभ्यास केला आहे. पण तरीही हे पुस्तक म्हणजे केवळ या अभ्यासाचे सादरीकरण नाही. 

पुस्तकात  त्यांनी मंगोलियाबद्दल  वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून लिहिले आहे. तिथले हवामान,पर्यावरण  भूगोल हे तर झालंच याशिवाय तिथलं राहणीमान, पोशाख यापासून तिथल्या घरांची रचना(ती कशी बांधली जातात याविषयीदेखील लिहिलं आहे) यावर लिहिलं आहेच शिवाय , तिथलं अन्न आणि ते पदार्थ करण्याची कृती, त्यांची भाषा-संस्कृती, तिथला इतिहास, लोकसंख्याशास्त्र, जीवशास्त्र(वनस्पती आणि प्राणिशास्त्र) आणि अर्थातच या सगळ्याचा समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला विचार हेही यात आहे ! आम्हांला वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात PSM नावाचा विषय होता. तो विषय शिकवणारे आमचे प्राध्यापक आम्हांला त्यांच्या पहिल्याच तासाला म्हणाले होते की PSM म्हणजे anything and everything under the sun ! हे पुस्तक वाचताना मला त्यांच्या या वाक्याची प्रकर्षाने आठवण झाली. एक समाजशास्त्रज्ञाला किती वेगवेगळे विषय कवेत घ्यावे लागतात याची जाणीव झाली. 




 मंगोलियामध्ये समाजशास्त्रीय संशोधन करण्याच्या उद्देशाप्रती लेखक एवढे कटिबद्ध होते  की त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व काही गोष्टी त्यांनी केल्या. मग ते तिथे पोचण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट असोत किंवा तिथल्या खानपानाच्या सवयींशी जुळवून घेणं असो.तिथल्या खाण्याच्या वेगळ्या चावी, त्या पदार्थांचे वास त्या पदार्थांमुळे पोटावर झालेले दुष्परिणाम या सगळ्याची तमा न बाळगता लेखक  सर्व अनुभवांना सामोरे गेले. तिथल्या लोकांच्या पाहुण्यांच्या स्वागत  करायच्या चालीरीती आणि त्याबद्दल त्यांची पाहुण्यांकडून असलेली अपेक्षा याबद्दल देखील त्यांनी कुठलेही आढेवेढे घेतले नाहीत. आपण ज्याला 'When in Rome, do as the Romans do!' असं म्हणतो तसं तिथे राहायचं तर तिथल्या लोकांसारखं वागायचं असं त्यांनी केलं आणि म्हणूनच तिथल्या वास्तव्याच्या काळात ते तिथल्या लोकांशी पूर्णपणे मिळून मिसळून राहू शकले. मुख्य म्हणजे हे सगळेच अनुभव त्यांनी एक लेखक म्हणून असलेली आपली प्रतिमा बाजूला ठेवून प्रांजळपणे पुस्तकात मांडले  आहेत हे विशेष!  

मिलिंद बोकील हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. पण  त्यांचं लिखाण आवडण्यामागे काय कारणं आहेत याबद्दल मी जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की ते नेहमीच लिहिताना त्या त्या व्यक्ती/समूहाची परिस्थिती सविस्तरपणे मांडता आणि या कॅनव्हास वर त्या व्यक्ती/समूहाबद्दल लिहितात.परिस्थिती आणि माणूस असं दोन्हीचं विश्लेषण असल्याने लिखाण परिपूर्ण होतं. एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून आमची कार्यपद्धति  देखील अशीच आहे. कुठल्याही पेशंटच्या स्वभावाचा विचार करताना आम्ही देखील आधी त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेतो आणि मग त्यामध्ये त्या व्यक्तीच्या reactions चा विचार करतो. या पुस्तकात देखील मंगोलिया मधील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तेथील लोकांच्या जीवनमानाविषयी त्यांनी निष्कर्ष नोंदवले आहेत. 
पशुपालन या व्यवसायाविषयी खार तर मला काहीही माहिती नाही. त्या व्यवसायाची पद्धत, त्यातून मिळणारे उत्पन्न आणि बदलत्या परिस्थितीप्रमाणे झालेली स्थित्यंतरे आणि यातील आव्हाने याविषयी मिलिंद बोकीलांनी खूप सविस्तरपणे मांडणी केली आहे. पशुपालक कमी होणे मात्र पशूंची संख्या वाढणे, गवताच्या उपलब्धतेनुसार पूर्वी केलं जायचं ते स्थलांतर आता कमी होणे ( आणि स्थिर राहिल्याने गवताच्या नैसर्गिक प्रतीवर दुष्परिणाम होणे), नव्या पिढीचा पशुपालनाकडे कल न राहता ती राजधानी व मोठ्या शहराकडे वळणे, नवी पिढी आधीपेक्षा जास्त शिक्षित होणे, स्त्री- पुरुष यांच्या नात्यात (आपल्यापेक्षा) जास्त मोकळेपणा असणे, तिथल्या स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे स्त्रीला जास्त मोकळीक मिळणे, तेथील स्त्रियांनी  स्वतंत्र/एकट्या राहून पशुपालनासारखे अवघड कामदेखील करणे, तिथल्या घराघरांमध्ये आधुनिक उपकरणं असणे (फ्रिज, गाड्या, सौर ऊर्जेवर चालणारे दिवे  इ) यासगळ्या विषयी लेखक एका तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेतून नोंद घेतात. 

मिलिंद बोकीलांच्या  सर्वच लिखाणात एक शांतता असते, एक ठहराव असतो. हे पुस्तक देखील त्याला अपवाद नाही. विशेषतः भाग १९ मध्ये बोकीलांनी  तिथल्या निर्जन कुरणांवर पहुडले असताना केलेलं वर्णन हे खूपच तरल, भावस्पर्शी आणि शांतावणारं आहे. अकर्माचा आनंद असं  याला त्यांनी म्हटलं आहे ते योग्यच आहे. याकाळात होणारा आत्मसंवाद हा अतिशय वेगळ्या पातळीवरचा आहे. अशा प्रकारचा एक विलक्षण शांततेचा अनुभव आम्ही आमच्या काश्मीर ट्रीपवेळी पहलगामला गेलेलो असताना घेतला होता. धकाधकीच्या ट्रिपनंतर लिद्दर नदीकाठी असलेल्या एका बागेत आम्ही निवांत बसलो होतो. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. बाकी कुठलाही आवाज नाही, फक्त नदीच्या खळाळत्या पाण्याचा लयबद्ध नाद! काहीही न करता कितीतरी वेळ आम्ही फक्त हा नाद आणि आजूबाजूचं सौंदर्य मनात साठवत होतो. ही शांतता याआधी कधीही अनुभवली नव्हती आणि म्हणूनच माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात हा अनुभव अजूनही तितकाच ताजा आहे.
हा भाग १९  म्हणजे पुस्तकातील सर्वोच्च बिंदू आहे असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. 

पुस्तकातील बोकीलांनी  काढलेले सर्वच फोटो उत्कृष्ट आहेत. विशेषतः वरील भाग १९ मधील कुरणांचा फोटो त्या अथांग प्रदेशाची अनुभूती देतो. बोकील उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि त्यांना  घोडेस्वारी देखील आवडते  असे तुमच्या व्यक्तिमत्वाचे नवे आयाम या पुस्तकाच्या निमित्ताने समजले. मराठी लेखक आणि तेही मिलिंद बोकीलांसारख्या गंभीर विषयांवर लिहिणाऱ्या  लेखकाला अशी आवड असणे हे निश्चितच वेगळं आहे. 
अन्वर हुसेन यांचं मुखपृष्ठ अतिशय समर्पक आहे. 
अशा या वेगळ्या विषयाचे पुस्तक वाचून आपण आपल्यापेक्षा वेगळ्या समाजाबद्दल जाणून घेऊन आपल्या जाणिवांचे क्षितिज विस्तारावे आणि या अनुभवांनी समृद्ध व्हावे असं मला मनापासून वाटतं. 

Monday, 7 April 2025

वेदना व्यवस्थापन : होमिओपॅथिक दृष्टिकोन


 

(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. २०२४ सालच्या दिवाळी अंकाचा विषय 'वेदना व्यवस्थापन ' होता. या अनुषंगाने मी लिहिलेला लेख ब्लॉग स्वरूपात प्रकाशित करत आहे ) 


वेदना व्यवस्थापन या विषयावर या आधीच्या काही लेखांमधून वेदनेचं स्वरूप, तिची व्याप्ती आणि त्यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणत्या प्रकारे उपचार करण्यात येतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या लेखांमधून एक बाब अधोरेखित होते की वेदना कोणत्याही (तात्कालिक वा जुनाट/दीर्घकालीन) आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. 
आता प्रस्तुत लेखात या वेदनेला किंवा त्या वेदनाग्रस्त पेशंटला होमिओपॅथिक डॉक्टर कशाप्रकारे समजून घेतात व त्यासाठी लागणारा होमिओपॅथीचा दृष्टिकोन कसा असणे आवश्यक आहे हे समजून घेऊ. 

सर्वप्रथम आपण होमिओपॅथीच्या काही मूलभूत तत्त्वांचा विचार करू -

१) Individualization : हा होमिओपॅथीचा गाभा आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यक्ती तितक्या प्रकृती हे होमिओपॅथीचं प्रमुख तत्त्व आहे. उदाहरणार्थ- समजा जर १० पेशंटना सायटिकामुळे पाय दुखण्याचा त्रास होत असेल तरी त्या सर्व १० पेशंटना होमिओपॅथीचं एकच एक औषध दिलं जाईल असं नाही. होमिओपॅथिक डॉक्टर सायटिकाचा त्रास असलेल्या त्या १० पेशंटची सविस्तर माहिती घेऊन त्या प्रत्येक पेशंटची व्यक्तीनिष्ठ, वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं विचारात घेतील आणि कदाचित त्या प्रत्येक पेशंटला वेगवेगळं औषध देखील दिलं जाऊ शकेल. कारण होमिओपॅथीनुसार व्यक्तीला आजार होतो, त्या व्यक्तीच्या अवयवाला नाही. म्हणून ती व्यक्ती नेमकी कशी आहे याची व्याख्या करणे आवश्यक असते. 

२) होमिओपॅथीची औषधं लक्षणांप्रमाणे/ लक्षणांवर आधारित असतात. होमिओपॅथिक डॉक्टर पेशंटच्या लक्षणांची एका विशिष्ठ पद्धतीने नोंद करतात. त्या लक्षणांचं पुढे सखोल विश्लेषण करून तौलनिक मूल्यमापन केलं जातं. अशाप्रकारे पेशंटच्या लक्षणांचा एक समूह तयार केला जातो. तर दुसरीकडे होमिओपॅथीच्या औषधांची लक्षणे एका ठराविक पद्धतीने 'मटेरिया मेडिका' या पुस्तकांमध्ये नोंदवली गेली आहेत. निरोगी व्यक्तींमध्ये ही औषधं देऊन त्यांच्यावर झालेले परिणाम आणि त्याद्वारे दिसून आलेली लक्षणे (drug proving) , तसंच वेगवेगळ्या आजारांकरिता वापरून उपयोगिता सिद्ध झालेल्या औषंधाची लक्षणे (clinical trials ) या आणि अशा काही प्रकारे लक्षणांच्या नोंदी केलेल्या आहेत. 
पेशंटच्या लक्षणांमधून तयार केलेला लक्षण समूह आणि मटेरिया मेडिका मधील औषधांपैकी एका औषधाच्या लक्षण समूहाशी मिळताजुळता असतो. जेवढी या दोन्हींमध्ये समानता (Symptom Similarity) जास्त, तेवढे ते औषध अचूक व म्हणूनच परिणामकारक असते कारण  होमिओपॅथीचे आणखी एक मूलभूत तत्त्व म्हणजे - Similia Similibus Curentur किंवा Like Cures Like. 





वेदना हे प्रमुख लक्षण असणारा पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरांकडे आला तर त्या डॉक्टरांचा या वेदनेकडे बघायचा काय दृष्टिकोन असतो हे आता आपण आणखी सविस्तरपणे पाहू. 
 
या प्रक्रियेमध्ये पहिलं पाऊल म्हणजे पेशंटकडून सविस्तर माहिती घेणे! असं म्हणतात की A good  Case taking is half work done ! वेदनेने त्रस्त असलेल्या पेशंटकडून माहिती मिळवणे ही खरं तर एक कलाच आहे! आणि त्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरकडे देखील चिकाटी आणि संयम असणे आवश्यक आहे. पेशंटकडून जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी ती मिळवणं हे पुढील लक्षण-विश्लेषणाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

पेशंटकडून माहिती घेताना -
१) वेदनेचं रोगनिदान (Diagnosis ) करणं आवश्यक आहे- होमिओपॅथीबद्दल एक गैरसमज सर्वश्रुत आहे की होमिओपॅथिक डॉक्टर रोगनिदानाला फारसे महत्त्व देत नाहीत. पण वास्तविक पाहता ते तसं नाही. रोगनिदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यातूनच पेशंटच्या आजारासंबंधी बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. ( त्यामुळे रोगनिदानासाठी आवश्यक अशा चाचण्या करणंही श्रेयस्कर!) मुख्य म्हणजे पेशंटची वेदना होमिओपॅथिक उपचारांच्या कक्षेत आहे किंवा नाही हे रोगनिदानांतून ठरवता येते. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि हाडाचे अक्षरश: तुकडे झाले आहेत आणि त्यामुळे त्याला तीव्र वेदना होत आहेत. अशा पेशंटची वेदना हाडांचे तुकडे ऑपरेशन करून जोडल्याशिवाय कमी होणारच नाही. म्हणजेच इथे शस्त्रक्रिया अनिवार्य ठरते. आणि हे रोगनिदान क्ष किरण तपासणीअंती होऊ शकते. 
रोगनिदान करण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे आजाराच्या नेमक्या कोणत्या स्थितीत पेशंट डॉक्टरकडे आला आहे हे डॉक्टरांना रोगनिदानाने ठरवता येते. वेदनेच्या तक्रारीच्या सुरवातीलाच जर पेशंट डॉक्टरांकडे गेला तर त्यावर होमिओपॅथिक उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र आजार जुनाट झाला असेल वा त्यात शारीरिक गुंतागुंत निर्माण झाली असेल तर होमिओपॅथिक औषधांच्या उपयुक्ततेवर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर त्या वेदनेसाठी पेशंट आणखी कोणते व किती उपचार घेत आहे, त्यात वेदनाशामक औषधांचा भडिमार किती करण्यात आला आहे इत्यादी गोष्टींवर देखील होमिओपॅथिक औषधांची परिणामकारकता अवलंबून असते. मात्र वेदना कितीही जुनाट असली तरी होमिओपॅथिक डॉक्टर त्यावर यशस्वी औषधोपचार करू शकतो.  
वेदना हे लक्षण असलेला पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरकडे उपचारार्थ गेला तर त्या वेदनेचं रोगनिदान करून आजार कुठल्याप्रकरचा आहे हेही लक्षात येतं. हे समजण्यासाठी आपण खालील तक्त्याचा वापर करू- 



काहीवेळा वेदना ही तात्कालिक स्वरूपाची असते- उदाहरणार्थ अर्धशिशी, दातदुखी वगैरे. तर काहीवेळा वेदना ही एखाद्या दीर्घकालीन आजाराचं लक्षण असते. उदाहरणार्थ - संधिवातामुळे (Osteo arthritis) होणारी गुडघेदुखी. तर काही आजार दीर्घकालीन असतात मात्र त्यात अधूनमधून त्रासाची तीव्रता खूप वाढते. उदाहरणार्थ - Rheumatoid arthritis. 
होमिओपॅथिक डॉक्टरने नेमकेपणाने रोगनिदान केले तर पेशंट कुठल्या प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे हे समजते आणि ज्याप्रकारचे आजार आहे त्याप्रमाणे होमिओपॅथिक उपचारपद्धतीत बदल होऊ शकतो. जर तीव्र लक्षणं असलेला तात्कालिक स्वरूपाचा आजार असेल त्या आजाराच्या वेळी असलेल्या लक्षणांचा विचार करून acute medicine दिले जाते. मात्र  दीर्घकालीन वेदना असेल तर त्यासाठी औषध देताना पेशंटची सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर Constitutional medicine देऊन दीर्घकालीन उपाययोजना केली जाते तर Acute Exacerbation of Chronic Disease साठी तीव्र लक्षणं असताना acute medicine आणि त्यानंतर जुनाट वेदनेसाठी  constitutional medicine असे करावे लागते. 
रोगनिदान करण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे असे केल्याने आजाराची सर्वसाधारण लक्षणे, (म्हणजे अशी लक्षणे जी त्या आजाराच्या जवळपास सर्वच पेशंटमध्ये दिसून येतात  व अशा लक्षणांना common symptoms of the Disease असं म्हटलं जातं ) बाजूला काढता येतात. अशा लक्षणांचा होमिओपॅथिक औषध निवडण्यासाठी फारसा उपयोग नसतो वा खूपच मर्यादित उपयोग होतो. ही सर्वसाधारण लक्षणे बाजूला काढल्यानंतर जी लक्षणे राहतात ती त्या पेशंटची व्यक्तिनिष्ठ , वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे ( Individualistic, Characteristic Symptoms of the Person ) असतात आणि हीच होमिओपॅथिक औषधाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. कारण याआधी म्हटल्याप्रमाणे Individualization हा होमिओपॅथीचा गाभा आहे. 

२) पेशंटच्या वेदनेची माहिती घेत असताना होमिओपॅथिक डॉक्टर आपल्या केसपेपर वर पेशंटचे त्याच्या वेदनेबद्दलचे अनुभव एका विशिष्ट पद्धतीने शब्दबद्ध करत असतो. पेशंटचे बोलणे होमिओपॅथीच्या परिभाषेत परिवर्तित करत असतो. पेशंटकडून जास्तीत जास्त माहिती, कमीत कमी वेळात आणि पूर्वग्रहांचा कमीत कमी अडथळा येत, घेण्यासाठी काही नियम आणि कार्यपद्धतींचा वापर करत असतो. 
होमिओपॅथी हे लक्षणांना अनुसरून औषध देण्याचे शास्त्र आहे याचा याआधी उल्लेख केला आहेच. आता आपण हेच लक्षण जास्तीतजास्त परिपूर्ण कसे करता येईल यासाठीची पद्धत बघू. 
पेशंटला असलेल्या  वेदनेचे एक परिपूर्ण चित्र होमिओपॅथिक डॉक्टर कडे असणे आवश्यक आहे. त्यालाच होमिओपॅथी मध्ये पूर्ण लक्षण वा Complete Symptom असे म्हणतात. लक्षणे जेवढी पूर्ण स्वरूपात मिळतील तेवढे औषध निवडणे सोपे जाते. 

पूर्ण लक्षण म्हणजे काय याचा आपण एक उदाहरण घेऊन विचार करू -
१) Location -आजाराचे स्थान/ठिकाण -
यात वेदना कधीपासून आहे?  
वेदना शरीरातील नेमक्या कोणत्या संस्थेत होत आहे? ती वेदना एका ठिकाणाहून सुरु होऊन दुसरीकडे जाते का/(Radiating pain )  कोणत्या एका बाजूला/बाजूचा त्रास होत आहे का? असे प्रश्न पेशंटला विचारले जावेत. 

२) Sensation - (संवेदना ) - जिथे वेदना आहे तिथे नेमक्या काय संवेदना आहेत? तिथे नेमकं काय वाटत आहे - उदाहरणार्थ- ठसठसणे, कळ येणे, रग लागणे, आग होणे, टोचणे, कापल्यासारखे वाटणे, पिळवटून टाकणे इत्यादी. 
तसेच जिथे दुखत आहे त्या जागेला सूज आली आहे का? तिथला रंग बदलला आहे का? तिथले तापमान वाढले आहे की कसे? 

३) Modality (वेदना /आजार वाढवणारे वा कमी करणारे घटक) - यामध्ये Ailments From या घटकाचाही समावेश आहे. म्हणजेच असे एक कारण की ज्यामुळे पुढचा संपूर्ण आजार सुरू झाला. 
त्याचबरोबर वेदना काय केल्याने वाढते व कमी होते? ती ठराविक वेळी वाढते वा कमी होते का? कुठल्या एका स्थितीत (उदाहरणार्थ- पाठीवर सरळ झोपल्याने, खुर्चीत ताठ बसल्याने, मागे झुकल्याने) त्रास वाढतो वा कमी होतो का? हालचाल केल्याने त्रास वाढतो वकी कमी होतो? होमिओपॅथीमध्ये वेदनेचा किती खोलवर जाऊन विचार केला आहे त्याची काही उदाहरणे बघू-
डोकेदुखीचा त्रास जिने उतरताना झाल्यास त्यासाठी Belladonna सारखे औषध आहे, तर जिने चढताना डोके दुखत असेल तर त्यासाठी Belladonna व्यतिरिक्त Bryonia, Silicea यासारखी औषधे आहेत. डोक्यावर टोपी घातल्यामुळे आलेल्या ताणासाठी बरीच औषधे आहेत. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर डोके दुखल्यास काही औषधं आहेत तसंच दुखण्याचा विचार केला तरी डोकं दुखतं यासाठीही औषधं आहेत. 

४) Concomitant Symptoms - ही आजाराव्यतिरिक्त पेशंटला जाणवणारी लक्षणे असतात. या लक्षणांमधून पेशंटची वैशिष्ट्यपूर्ण प्रकृती दिसते आणि म्हणून ही लक्षणे औषध निवडीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. उदाहरणार्थ- पेशंटची शीत/उष्ण प्रकृती, तहान- कमी लागणे वा वाढणे, घाम येणे. झोप न लागणे. काही वेळा पेशंटमध्ये त्रासाबरोबरच काही मानसिक लक्षणेही दिसतात -उदाहरणार्थ चिडचिडेपणा, अस्वस्थता. लहान मुलांमध्ये चिडचिडेपणाबरोबरच आणखी काही लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ बाळ रडत असते आणि त्याला सतत कोणीतरी कडेवर घ्यावे असे वाटत असते. काही बाळे कडेवर घेतल्याशिवाय शांत होत नाहीत. पण काही बाळे कडेवर घेऊन देखील शांत होत नाहीत. तर काही बाळांना झोका द्यावा लागतो तर काहींना खुर्चीत बसवून ती खुर्ची हलवावी लागते. 
या सगळ्यात एक बाब अधोरेखित होते की होमिओपॅथिक डॉक्टर काय किंवा होमिओपॅथिक उपचारांसाठी आलेला पेशंट काय, दोघांचीही निरीक्षणशक्ती चांगली असली पाहिजे हा लेख वाचणारे पेशंट असतील तर  त्यांच्या लक्षात आलं असेल की डॉक्टर त्यांना इतके प्रश्न का विचारतात आणि त्यांच्या हेही लक्षात आलं असेल की त्यांच्या आजारासंबंधीच्या  बारीकसारीक निरीक्षणांचा होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी किती उपयोग होऊ शकतो. 
आता जर एखाद्या पेशंटच्या लक्षणांचं आपण पूर्ण लक्षण वा Complete Symptom मध्ये वर्गीकरण केलं तर त्यानंतरची औषध निवडण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते -





अशा पूर्ण लक्षणांचं तुलनात्मक मूल्यमापन केल्यानंतर खालील लक्षणसमूह तयार करता येतो-
१) शीत प्रकृतीचा पेशंट 
२) जड उचलल्याने त्रास सुरु होणे 
३) प्रचंड अस्वस्थता 
४) Sciatic Nerve - अति तीव्र वेदना - आणि ही वेदना हालचालीने वाढते तर दाबल्याने आणि शेकल्याने कमी होते 
५) डाव्या बाजूचा त्रास / Nerve चा त्रास 

वरील लक्षणसमूहाच्या आधारे Colocynth आणि Rhus tox ही औषधे येतात. आता आपल्याला या दोन औषधांमध्ये तुलना करून पेशंटच्या त्रासाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारं औषध कुठलं आहे हे बघायचं आहे. Rhus tox मधील प्रमुख लक्षण हे आहे की वेदना वा अस्वस्थता ही हालचालीने कमी होते. म्हणून त्या व्यक्तीला सतत हालचाल करत राहावेसे वाटते. आपण आपण विचारात घेतलेल्या उदाहरणातील पेशंटचा त्रास हालचालीने वाढतो. त्यामुळे अशा पेशंटला Rhus tox हे औषध देता येणार नाही. कारण औषधाचं चित्र आणि पेशंटच्या आजाराचं चित्र जुळत नाही. याउलट Colocynth या औषधाशी  आपण तयार केलेल्या लक्षणसमूहाची सगळीच लक्षणं जुळतात. त्यामुळे अशा पेशंटसाठी Colocynth चा विचार केला जाऊ शकतो. 

जुनाट आजार असलेल्या पेशंटची माहिती घेण्यासाठी होमिओपॅथीमध्ये काही वेगळे नियम आहेत. यामध्ये पेशंटच्या आजाराची सविस्तर माहिती घेण्यात येतेच, पण त्याशिवाय पेशंटच्या शारीरिक आणि मानसिक प्रकृतीचा ( Physical and  Mental Disposition ) देखील विचार केला जातो.आजार होण्याआधीची त्या व्यक्तीची मन:स्थिती/स्वभाव कसा होता आणि शारीरिक tendencies काय होत्या याचा विचार केला जातो. यातून एक व्यक्ती म्हणून पेशंट कसा होता हे ठरवले जाते. अशा व्यक्तीच्या या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना Constitutional Symptoms म्हटले जाते. होमिओपॅथीला आपण व्यक्तिनिष्ठ शास्त्र म्हटले आहेच. याचा आणखी एक अर्थ असा आहे की कोणताही आजार आधी त्या व्यक्तीला होतो आणि जर ती व्यक्ती त्या आजाराचा सामना करण्यास असमर्थ ठरली तर मग शरीरातील एखाद्या अवयव/संस्थेमध्ये तो आजार स्थिरावतो. The Individual is sick first and later on his Parts get sick. म्हणूनच अशा व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे शोधून त्यांना अनुसरून औषध दिल्यास ते औषध (Constitutional Medicine ) आजाराच्या मुळाशी जाऊन पेशंटला बरे करण्यास सहाय्य करू शकते. अशा वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असू शकतो. -
१) पेशंटची शीत /उष्ण प्रकृती 
२) पेशंटची खाण्या/पिण्याच्या चवींबाबत आवड/नावड 
३) काही प्रवृत्ती(Tendencies ) उदा- घाम येणे, उन्हाचा त्रास होणे, जखम लवकर बारी न होणे, जखमांचे डाग राहणे इत्यादी 
४) स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी संबंधित लक्षणे 
५) पेशंटच्या आयुष्यात आलेल्या ताण -तणावांच्या  प्रसंगांतून दिसून आलेले टायच्या स्वभावाचे वैशिष्ट्य(Reactions to  stressful circumstances )
६) झोप/स्वप्नं 
जुनाट स्वरूपाच्या आजारासाठी दीर्घकालीन औषधयोजना करावी लागते त्यात औषधाची मात्र (potency) आणि ते कितीवेळा घ्यायचे (repetition) यात कालांतराने बदल करावे लागतात. याच अंकात वरीलप्रमाणे माहिती घेऊन वेदनेचा त्रास असलेल्या आणि होमिओपॅथिक उपचारांनी बऱ्या झालेल्या काही केसेसबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामधून वरील सर्व संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. 

वेदनेच्या त्रासाचा आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर, असाध्य आजारांमध्ये जाणवणारी वेदना. अशाप्रकारची वेदना बरी होण्याची(Cure या अर्थाने ) शक्यता कमी असते. मात्र अशा आजारांमध्ये वेदनेची तीव्रता नक्कीच कमी करता येते. कॅन्सर सारख्या  पसरलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटला अशावेळी constitutional medicine देणं कदाचित त्रासदायक ठरू शकतं. म्हणून केवळ वेदनेच्या लक्षणांनुरूप औषध दिले जाते (Superficially acting medicine ). याने वेदना कमी होतात आणि औषधाचा काही त्रास होत नाही. त्यामुळे ही उपचारपद्धती सुसह्य ठरते. अशा होमिओपॅथिक उपचारपद्धतीला Palliation असं म्हणतात. 

आतापर्यंत आपण होमिओपॅथिक डॉक्टर वेदनेचा त्रास असलेल्या पेशंटकडून कशाप्रकारे माहिती घेतात आणि त्या माहितीचे पुढे कशाप्रकारे विश्लेषण केले जाते हे बघितले. सध्याच्या कॉम्प्युटर युगाच्या परिभाषेत बोलायचं झालं तर पेशंटने सांगितलेली सर्व लक्षणे हा एक प्रकारचा डेटा आहे. या माहितीचे होमिओपॅथिक नियम-नियमावली प्रमाणे संकलन, विश्लेषण आणि तुलनात्मक मूल्यमापन केले जाते. म्हणजेच हे डेटा अनॅलिसिस झालं. यातून पेशंटच्या आजाराचे एक लक्षण-रुपी चित्र (Picture of Disease ) तयार केले जाते. 
होमिओपॅथिक औषधांची एकत्रित नोंद असलेल्या मटेरिया मेडिका या पुस्तकात हजारो औषधं आणि त्यांची लक्षणं असतात. हा सुद्धा डेटाच आहे! एवढ्या प्रचंड डेटा मधून पेशंटच्या लक्षणसमूहाशी (लक्षणरुपी चित्राशी) मिळतंजुळतं औषध शोधून काढणं हे एरवी खूप अवघड काम झालं असतं. पण होमिओपॅथीच्या अभ्यासकांनी यावर उपाय म्हणून Repertory हे पुस्तक तयार केलं आहे. यामध्ये औषधं आणि त्यांच्या लक्षांची पुनर्मांडणी केली आहे (Organization and Rearrangement of  data ) मन या विभागापासून ते Generalities अशा विभागापर्यंत शरीरातील सर्व संस्थांची लक्षणं यात आहेत. लक्षणं आणि त्यापुढे औषधं (म्हणजे एक प्रकारे मटेरिया मेडिकाच्या उलट पद्धतीने) अशी ही मांडणी आहे. Repertory मधील या लक्षणांना rubrics असं म्हणतात. पेशंटचं लक्षणरुपी चित्र एका विशिष्ट पद्धतीने मांडून (Repertorial Totality) त्यानुसार Repertory मधून  संदर्भ शोधल्यास हजारो औषधांना चाळणी लागून (Filter )  एकमेकांशी संबंधित औषधांचा एक छोटा समूह आपल्याला मिळतो. प्रामुख्याने Kent, Boenninghausen आणि Boger अशा तीन repertories प्रचलित असून पेशंटच्या लक्षणसमूहांत कोणत्या लक्षणांचे प्राबल्य त्यानुसार कुठली repertory वापरावी हे ठरवले जाते. Repertory चा असा वापर जुनाट आजारांसाठी लागणाऱ्या Constitutional medicine शोधण्यासाठी करू शकतो. तसेच तात्कालिक तीव्र त्रासासाठी देखील repertories मधून संदर्भ घेऊन आपण एका छोट्या औषधसमूहापर्यंत पोचू शकतो. 

आपण उदाहरणासाठी Kent Repertory मधील डोकेदुखी हा विभाग बघू. Head या विभागात Pain या शीर्षकाखाली इथे जवळपास १०० पानांमध्ये डोकेदुखीच्या वेदनेबद्दल सविस्तर आणि प्रदीर्घ वर्णन आहे. यातील छोटे छोटे rubrics बघून लक्षात येतं की वेदनेच्या सूक्ष्मात सूक्ष्म लक्षणांचा किती खोलात जाऊन विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ -
Head Pain, bending head backward while अशा rubric (लक्षणा) साठी सुमारे ३० औषधांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर याच्या उलट- 
Head Pain, bending head backward ameliorates (बरे वाटणे ) या rubric मध्ये १५ औषधं देण्यात आली आहेत. 
खाण्याअगोदर डोकं दुखत असेल तर वेगळी औषधं आहेत, खात असताना डोकं दुखत असेल वेगळी औषधं आहेत तर खाऊन झाल्यानंतर डोकं दुखत असेल तर आणखी वेगळी औषधं आहेत. 
याआधी म्हटल्याप्रमाणे Repertory चा उपयोग हा एखाद्या चाळणीप्रमाणे करून एका छोट्या औषधासमूहापर्यंत आपण येऊ शकतो. त्यापुढे पुन्हा मटेरिया मेडिकाचा वापर करून त्या औषध समूहापैकी एका अचूक औषधाची निवड करण्यात येते. वरील सर्व विवेचनावरून लक्षात येते की होमिओपॅथी हे एक Data Management चं शास्त्र आहे. 

सरतेशेवटी असं म्हणता येईल की होमिओपॅथिक उपचारपद्धती वेदना व्यवस्थापनासाठी एक परिणामकारक उपाययोजना ठरू शकते. होमिओपॅथीमध्ये वेदना व्यवस्थापनेबाबत एक सखोल आणि विशिष्ट विचार आहे. पेशंटच्या वेदनेचा इतक्या बारकाईने विचार फक्त होमिओपॅथीमध्येच केला जातो. वेदनेचे निवारण करणे म्हणजे लगेच त्यावर उपाय शोधणे नव्हे तर आधी ती वेदना समजून घेणे होय. वेदना समजून घ्यायची म्हणजे वेदनाग्रस्त व्यक्तीला समजून घ्यायचं . विविध प्रकारच्या व्यक्तींना समजून त्याआधारे योग्य ती औषधयोजना करणे फक्त होमिओपॅथीमध्ये शक्य आहे. वेदनेवर उपाय करणारी परिणामकारक औषध रूपी आयुधं होमिओपॅथीमध्ये आहेत.  औषधं देण्यासाठी एक ठराविक पद्धत आहे, त्यामागे एक शास्त्रशुद्ध पाया  आहे. त्या औषधांपर्यंत पोचण्यासाठी नेमक्या पायऱ्या आहेत, कार्यपद्धती आहेत. होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाणारी औषधयोजना आहे. या उपचारपद्धतीचा फारसे दुष्परिणामही नाहीत. शिवाय बव्हंशी ती खिशाला परवडणारी आहे. असं असून देखील होमिओपॅथी वेदना व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कुठेच का दिसून येत नाही? Pain management च्या integrated आणि holistic उपचारपद्धतीत होमिओपॅथीला दुय्यम स्थान का दिले जाते? किंबहुना काहीवेळा तर पूर्णपणे दुर्लक्षिले जाते असे का? एकूणच होमिओपॅथीबद्दल असलेली अनास्था हेच या अवहेलना आणि दुजाभावामागचे कारण आहे असं म्हणता येईल का? केवळ अनास्था वा दुजाभावच नव्हे तर मध्यंतरी होमिओपॅथिक औषध म्हणजे निव्वळ प्लॅसिबो आहे असं म्हणून होमिओपॅथीची चक्क खिल्ली उडवली जात होती. अशा सनसनाटी हेडलाईन आणि बातम्यांमुळे अकारण  होमिओपॅथीबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. होमिओपॅथीला प्लॅसिबो म्हणताना प्रचलित उपचारपद्धती मात्र पेशंटवर औषधांचा भडिमार करून 'आजार परवडला पण त्यावरील उपचार नको' या स्थितीत पेशंटला आणून सोडते त्याचे काय? एखादी रेघ  मोठी आहे हे दाखवण्यासाठी  दुसरी रेघ  छोटी करणं कितपत योग्य आहे? जसं प्रचलित उपचारपद्धतीला स्थान आहे तसंच पर्यायी उपचारपद्धती देखील महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी कुठला उपचार घ्यावा हे निर्णयस्वातंत्र्य पेशंटकडे आहेच! फक्त निर्णय घेताना पेशंटने तो साधकबाधक विचार करून घ्यावा ही अपेक्षा! 
 

Friday, 7 March 2025

संगीत मन को पंख लगाये..


(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. २०२४ सालच्या दिवाळी अंकाचा विषय 'वेदना व्यवस्थापन ' होता. या अनुषंगाने मी लिहिलेला लेख ब्लॉग स्वरूपात प्रकाशित करत आहे ) 



“One good thing about music is,  when it hits you, you feel no pain.” 

असं जमैकाच्या सुप्रसिद्ध गायक आणि गिटारवादक बॉब मार्ले यांनी म्हटलं आहे. आणि हे किती खरं आहे हे आपल्या अनुभवातून आपणही सांगू शकतो. हृदयाला भिडणारं कुठलंही गाणं किंवा संगीत आपल्या मनाचा इतका ताबा घेतं की त्या स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलत असताना आपल्याला  सगळ्या चिंता,काळजी  दु:खं, शारीरिक वा मानसिक वेदना यांचा तात्पुरता का होईना पण विसर पडतो. संगीत हे आपल्याला एका अनोख्या आणि अद्भुत दुनियेत घेऊन जातं. तिथे अशा नकारात्मक विचारांना स्थान नसतं आणि म्हणूनच आयुष्यातल्या अशा मळभ भरल्या रात्री संगीत हे शीतल चंद्रप्रकाशाची ओंजळ घेऊन येतं. 

वेदनेचा सामना करणं हा एक थकवणारा प्रवास आहे. तो कोणाला कधीही करावा लागू नये हेच खरं !  पण अशी वेळ आलीच तर  या खडतर मार्गात आपल्याला दिलासा देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात संगीताला  एक खास महत्त्व आहे.  मात्र ही वेदनेवरची फुंकर वरवरची आहे असं अजिबात नाही. कारण अभ्यासांती असं सिद्ध झालं आहे की संगीत ऐकल्यामुळे (वा गायल्यामुळे/वादन केल्यामुळे) आपल्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात. शास्त्रोक्त भाषेत सांगायचं  झालं तर -
१) संगीत हृदयाची गती कमी करतं, रक्तदाब कमी करतं, ताण निर्माण करणाऱ्या cortisol सारख्या संप्रेरकाचं प्रमाण कमी करतं, तर dopamine सारख्या तणाव हलका करणाऱ्या व आनंद निर्मिती करणाऱ्या  संप्रेरकाचं प्रमाण संगीत ऐकल्याने वाढतं. यामुळे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने संगीत उपयुक्त आहे असं म्हटलं जातं. 
२) याच dopamine चं प्रमाण वाढल्यामुळे नैराश्य आणि चिंता या भावना कमी होण्यास मदत होऊ शकते. नैराश्यासारखी भावना व्यायाम केल्याने जशी कमी होऊ शकते तशाच प्रकारे ती संगीत ऐकूनही कमी होऊ शकते. 
३) वेदना व्यवस्थापनात म्युझिक थेरपीचा हल्ली वापर करण्यात येतो. यामध्ये संगीत या माध्यमाचा वापर करून वेदनेची तीव्रता कमी करणं, वेदनेसारख्या नकारात्मक गोष्टीपासून व्यक्तीचं लक्ष संगीत या सकारात्मक गोष्टीकडे वळवणं, व्यक्तीचा मूड उंचावणं यासारख्या गोष्टी केल्या जातात.

परंतु म्युझिक थेरपीकडे(म्हणजे कुठलीही व्यावसायिक मदत घेण्याअगोदर) जाण्याअगोदर आपण जर स्वतःच संगीत ऐकण्याची (ज्यांना शक्य आहे त्यांनी गायन/वादन शिकण्याची ) आवड जोपासली तर आपला हा वेदनेशी सामना करण्याचा प्रवास थोडातरी सुसह्य आणि सुखकर होईल हे निश्चित! अर्थात काय आणि कुठल्या प्रकारचं संगीत ऐकावं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. कोणी शास्त्रीय संगीत ऐकेल तर कोणी हिंदी सिनेसंगीत, कुणाला मराठी भावगीतं आवडतील तर कोणी पाश्चात्य संगीत ऐकेल. याबाबत 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न:' हे खरंच. पण संगीत ऐकणं हा छंद आपण जाणीवपूर्वक जोपासला तर याचा दीर्घकालीन फायदा नक्कीच आहे. 

आपण भारतीय काही बाबतीत निश्चितच भाग्यवान आहोत. आपल्याला संगीताचे एकाच वेळी कितीतरी प्रवाह ऐकायला मिळत असतात. एकीकडे आपल्याकडे गौरवशाली हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीताची परंपरा आहे तर दुसरीकडे तितकीच समृद्ध अशी लोकसंगीताचीही परंपरा आहे. आपल्याकडे बारसं ते बारावं व्हाया लग्न अशा प्रत्येक प्रसंगासाठी गाणं आहे आणि तसं बघितलं तर संगीत हे आपल्या नसानसात भिनलं आहे. संगीत आपल्या आजूबाजूला आणि आपल्यामध्येच आहे.शिवाय आपल्यावर संगीत ऐकण्याचे संस्कार लहानपणापासून कळत नकळत होतच असतात. रेडिओ, टीव्ही, नाटक-सिनेमे, संगीत समारोह/महोत्सव, गणेशोत्सव पासून ते आता मोबाईल अशा वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या कानांवर संगीत पडतच असते. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कितीतरी दिग्गज आणि उत्तुंग कलाकारांनी एवढं काम करून ठेवलं आहे की त्याला तोड नाही.आपलं संपूर्ण आयुष्य जरी आपण वेचलं तरीही या महासागरातले काही थोडेफार मोतीच आपल्या हाती लागतील. म्हणजेच 'किती घेशील दो कराने' अशीच आपली परिस्थिती आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की  हे सर्व आपल्याला युट्यूब सारख्या ठिकाणीही  सहज उपलब्ध आहे. .

पुढील विवेचनात आपण कोणत्या प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकून आपला मूड सकारात्मक करू शकतो याचा विचार करणार आहोत. शास्त्रीय संगीत असं वाचल्यावर काही वाचकांच्या भुवया उंचावतील. काहींना ते रटाळ वाटेल तर काहींना ते क्लिष्टही वाटू शकेल. काही म्हणतील की आम्हांला त्यातलं काही कळत नाही. पण क्षणभर थांबून थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की इथे आपल्याला शास्त्रीय संगीताच्या तांत्रिक अंगाची सुरवातीला माहिती नसली तरी काही हरकत नाही. आपल्याला फक्त ते नीट ऐकायचं आहे. आणि आपली कितीतरी भक्ती संगीताची गाणी व हिंदी-मराठी सिनेमांतील गाणी ही शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारित असतात.बऱ्याचदा आपल्याला हे माहितही नसतं. पण तरीही  ती गाणी आपल्याला आवडत  असतात. (उदाहरणार्थ 'सुंदर ते ध्यान' हा सुप्रसिद्ध अभंग यमन रागावर आधारित आहे )तर आपल्याला आता इथे फक्त एक दोन पाऊलं पुढे टाकायची आहेत आणि आपल्या सर्व संगीताची जननी जिला म्हटलं जातं अशा शास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने  विचार करायचा आहे.

 शास्त्रीय संगीतामध्ये जास्त महत्त्व बंदिशीच्या शब्दांना नसून त्या संगीतामधून निर्माण होणाऱ्या भाव व अभिव्यक्तीला  जास्त असतं. इतर सर्व लोकप्रिय संगीताचा एक भाग असा असतो की त्यात शब्द येतात आणि त्या शब्दांमधून एक विशिष्ट प्रसंग वा ठराविक भावना प्रतीत होतात. आपल्याला शब्दांच्या पलीकडे जायचं आहे. शिवाय इतर लोकप्रिय संगीताची कालमर्यादा शास्त्रीय संगीतापेक्षा थोडी कमीच असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ - कुठलेही  सिनेमातले गाणे ३-४ मिनिटांत संपून जाते. पण आपल्याला त्यापेक्षा थोड्या जास्त कालावधीचा विचार इथे करायचा आहे.राग श्रवणातून मनाचं रंजन करून आपल्याला आनंद निर्मिती करायची आहे. आता पुढील भागात मी आपण शास्त्रीय संगीतामधील काय ऐकलं तर वेदना कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होईल याविषयी लिहिणार आहे. 

अर्थात यात सुरवातीलाच सांगतो की इथे माझ्या आवडीचा प्रभाव माझ्या पुढील लिखाणावर आहे आणि तसं ते स्वाभाविकही आहे.  तसंच  लेखाच्या विस्तारभयामुळे संक्षिप्त स्वरूपात लिहिलं आहे. शिवाय मी केवळ एक हौशी संगीत श्रोता आहे. मी काही या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे. त्यामुळे लिखाणात  काही दोष असल्यास ते अनवधानाने आहेत असं समजावं! 

भारतीय शास्त्रीय संगीताला जशी मोठी परंपरा आहे तशीच एक मोठी वैचारिक बैठक देखील आहे. सूत्रबद्ध नियम आहेत. प्रत्येक रागाचं एक स्वरूप आहे- कुठले स्वर त्या रागात आहेत आणि कुठले नाहीत याचे नियम आहेत. कोणता राग दिवसाच्या कोणत्या प्रहरी गायला जावा ज्यामुळे भावनिर्मिती पूर्णपणे व्यक्त होते याचेही काही नियम आहेत. जसं आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतो, ज्याप्रमाणे आपण होमिओपॅथीच्या औषधांच्या देखील वैशिष्ट्यपूर्ण प्रकृती आहेत असं म्हणतो तसंच भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांचे देखील काही स्वभावगुण आहेत. उदाहरणार्थ काही राग आक्रमक स्वभावाचे आहेत (उदा:अडाणा) काही राग वीररसपूर्ण आहेत (उदा- हंसध्वनी) तर काही शांत, धीरगंभीर आहेत (उदा : दरबारी कानडा ) तर काही नटखट,शृंगाररसप्रधान(उदा: मारुबिहाग, खमाज ). म्हणजेच  शास्त्रीय संगीताच्या रागातून विविध भावनांचे प्रकटीकरण होत असते. आपण प्रचलित नवरसांपैकी बीभत्स, रौद्र, भयानक आणि  काही प्रमाणात कारुण्य रस प्रधान राग सोडले तर बाकीचे  रस निर्माण करणारे राग ऐकावेत जे आपल्याला वेदना व्यवस्थापनेच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. ( म्हणजेच शांत, अद्भुत, शृंगार,वीररस, हास्य रस ) 
विषयाच्या सुलभीकरणाच्या दृष्टीने आपण इथे दिवसाचा प्रहर आणि त्या प्रहरात कोणते राग ऐकावेत याचा ढोबळ मानाने विचार करूया. याचं एक कारण असंही आहे की दिवसाच्या प्रहराप्रमाणे आपली भावावस्था देखील बदलत जाते आणि त्याला अनुसरून रसनिर्मिती करणारे राग असतात. 

 १) सकाळचा प्रहर - हा प्रामुख्याने सकाळी ६-९ हा काळ !  सूर्याचा पहिला बारीकसा किरणदेखील  रात्रीचा भयाण अंधकार घालवण्याचं सामर्थ्य घेऊन येतं. कितीही छळणारा अंधार असला तरी तो एका रात्रीचाच पाहुणा आहे. नंतर येणारी सकाळ ही आशा आणि एक आश्वासकता लेऊन येते.सकाळ होणे म्हणजे झाडं वेली फुलारणे, वाऱ्याची शांत शीतल झुळूक वाहणे आणि पक्ष्यांची गाणी गायची लगबग सुरु होणे असा प्रसन्न काळ ! आताचे संदर्भ कदाचित बदलले आहेत पण पूर्वीच्या काळातील सकाळ म्हणजे सडा-संमार्जन, रांगोळी, आन्हिके उरकून देवपूजा अशी मांगल्याची असे. ( याचं एक टिपिकल उदाहरण म्हणजे 'भाभी की चुडियां' सिनेमातलं देसकार रागावर आधारित 'ज्योती कलश छलके' हे गाणं ). सकाळचं हे वातावरण भक्तिरसाला पोषकच !अशा रम्य आठवणी आणि भावना जागवणारे शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे भैरव, ललत, तोडी, रामकली,जोगिया, विभास,भटियार इत्यादी. इथे आपण प्रभा अत्रे यांनी गायलेली  'मन रे तू कर ध्यान' ही भैरव रागातील बंदिश ऐकू शकता जी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल -

तसेच उस्ताद आमिर खान यांनी

गायलेल्या ललत रागातील ही 'जोगिया मोरे घर आये' ही बंदिश -

शहनाई हे आपण मांगल्याचं प्रतीक समजतो. त्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या शहनाई वादनात तोडी या सकाळच्या रागाचा इथे आपण आस्वाद घेऊ शकता-

२) दुसरा प्रहर - सकाळी ९ -१२ हा काळ - दुसरा प्रहर म्हणजे उपजीविकेसाठी कार्यप्रवण होण्याचा काळ. या काळातील  शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे आसावरी, जौनपुरी, दुर्गा,बिलावल इत्यादी . 
इथे पं भीमसेन जोशी यांनी गायलेल्या कोमल रिषभ आसावरी रागातील 'सकल  जगत को'  या बंदिशींची लिंक दिली आहे-

३) तिसरा प्रहर- हा साधारण दुपारी १२-३ चा काळ ! सूर्याची तप्त किरणे अंगांगाची काहिली करणारा काळ. या काळात ऐकण्याजोगे राग म्हणजे गौड सारंग, मुल्तानी, भीमपलास इत्यादी. अशा वेळी मनाला शांत करणारं हे बासरी वादन नक्की ऐका- पं पन्नालाल घोष राग गौड सारंग -

उन्हाळ्याच्या अशाच अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात सगळ्यात जास्त प्रतीक्षा कशाची असेल तर ती पावसाची! उन्हामुळे जमीन तापून हवा गरम होऊन पाऊस पडणार हे निसर्गचक्र अव्याहत सुरूच आहे. या निसर्गचक्राप्रमाणे शास्त्रीय संगीतात ऋतूंप्रमाणे गायचे रागदेखील आहेत. मेघ, मेघ-मल्हार हे त्या पैकीच. खरं तर हे राग रात्री गायले/ऐकले  जावेत असं म्हणतात पण पावसाळी हवेत ते कोणत्याही वेळी ऐकावेत. मल्हारचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. खाली दिलेल्या लिंकमध्ये सुरवातीला पं रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मियां की मल्हार आहे तर पुढे जयपूर-अत्रौली घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला राग रामदासी मल्हार आपल्याला ऐकता येईल-

४) चौथा प्रहर- हा साधारण दुपारी ३ ते ६ चा काळ.. तापलेल्या उन्हाचा प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि अशावेळी मनाला शांत करणारे राग ऐकावेत. या काळातील राग आहेत-मधुवंती, पटदीप, धानी, शुद्ध सारंग इत्यादी. विदुषी मालिनी राजूरकर यांनी

 गायलेला मधुवंती इथे ऐकता येईल-
तसंच उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतारवादनात राग पटदीप -

५) पाचवा प्रहर - संध्याकाळी ६ ते ९-
हा संधिप्रकाशाचा काळ... दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात शरीर आणि मन दोन्ही थकून गेलेलं आहे आणि आता एक अनामिक हुरहूर आहे.चांगला गेला असो की वाईट,  पण तो दिवस संपल्याची! दिवसभरात आठवण झाली नसली तरी संध्याकाळी हमखास विरह आणि इतर सर्वच वेदना प्रकर्षाने जाणवू लागतात आणि याच वेळी रात्रीची चाहूलही लागते. त्यामुळे या वेळेत एक प्रकारची आर्तता आहे जी शास्त्रीय संगीताच्या काही रागांमध्येही दिसून येते.उदाहरणार्थ -  
 'दूर कुठे राऊळात दरवळतो पूरिया 
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !
असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे 
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे 
झाकळून जाय गाव, ये तमांस पूर या!' हे गाणं पूरिया रागावर आधारित आहे. 
किंवा 
'मावळत्या दिनकरा 
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !' हे गाणं मारवा रागावर आधारित आहे. 
उस्ताद राशीद खान यांचा मारवा इथे ऐकता येईल-
अशी ही भावावस्था पूरिया, मारवा,  खमाज,तिलक  कामोद या सारख्या रांगांमधून व्यक्त होते. मात्र याच वेळेत यमन, कल्याण आणि पहाडी यासारखे आल्हाददायक, प्रसन्न राग देखील गेले/ऐकले जातात. कदाचित हे राग त्या नकारात्मक भावनांवरचे उतारेच असावेत जणू ! तर अशाच पहाडी रागाची धून इथे ऐकता येईल. कलाकार आहेत- पं शिवकुमार शर्मा -


याच वेळी भूप रागही गायला जातो. त्या रागावरील किशोरीताई आमोणकर यांचं सुप्रसिद्ध 
'सहेला रे' हे मन प्रफुल्लित करणारं आहे -



६) सहावा प्रहर - रात्री ९ ते १२- हा भोजन आणि त्यानंतर निद्रेचा काळ. या काळात बागेश्री, रागेश्री, जयजयवंती, काफी, बिहाग, मारू बिहाग, नंद  यासारखे प्रसन्न, मनमोहक वा शृंगाररसप्रधान राग गायले जातात. 
कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेला मारू बिहाग इथे ऐकता येईल. 
तसंच पं शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनात मारू बिहाग -
तर पं मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला हा दैवी  'नंद'-



७) सातवा प्रहर- रात्री १२- ते ३ . हा शांत झोपण्याचा काळ. म्हणूनच कदाचित या काळात धीर गंभीर प्रकृतीचे राग गेले जात असतील. उदा- दरबारी कानडा, बसंत बहार, मालगुंजी, शिवरंजनी इत्यादी. इथे संगीत मार्तंड पं जसराज 

यांनी गायलेला दरबारी कानडा ऐकता येईल-

८) आठवा प्रहर - पहाटे ३ ते ६ 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष: काल' असं कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटलंय. रात्रीच्या उदरात पुढच्या दिवसाची बीजं पेरलेली आहेत. त्यामुळे हा अंधःकार संपणार आहे आणि परत उद्याची सोनेरी सकाळ उगवणार आहे अशी अशा जागवणारा हा काळ.  या काळातही  पहिल्या प्रहराचे म्हणून उल्लेख केलेले राग गायले जातात (भैरव, ललत, जोगिया इ) 
कोणत्याही मैफिलीचा शेवट भैरवी रागाने केला जातो म्हणून या लेखाच्या शेवटी देखील सर्व रसांचा समावेश असलेली  भैरवी आहे. 
उस्ताद बडे गुलाम अली खान 


-बाजू बंद खुल खुल जाये-

सरतेशेवटी मंगेश पाडगावकरांच्या कवितेमध्ये थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं -
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत/ऐकत 
तुम्हीचं ठरवा! 

काळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
सूर लावून उभं असतं
काळोखात कुढायचं की सुरांसवे गुणगुणायचं 
तुम्हीच ठरवा!