Friday, 16 May 2025

आमची पेंच ट्रिप : स्त्रीशक्तीच्या 'मनिषे'चा 'बिंदू'?

(या ब्लॉगचं हे असं विचित्र शीर्षक वाचून काहींच्या भुवया उंचावतील. पण ब्लॉग पूर्ण वाचल्यावर शीर्षकाचा उलगडा निश्चितच होईल असं वाटतं.) 


१ 

कोव्हिडमुळे २०२० साली रद्द करावी लागलेली आमची पेंचची ट्रिप मागे पडली ती पडलीच आणि आम्ही शेवटी २०२५ साली एप्रिल महिन्यात तिथे जाऊन आलो. या मधल्या काळात अभयारण्यात जाऊन (फक्त) वाघ बघण्याबद्दल माझं मत बदललं होतं आणि अलीकडे तर पक्षीनिरीक्षण आणि पक्ष्यांचे फोटो काढायची खूपच आवड निर्माण झाली असल्यामुळे पेंचला गेलो तरी एक वेळ वाघ नाही दिसला तरी चालेल, पण पक्षी दिसले पाहिजेत(आणि त्यांचे फोटोही काढता आले पाहिजेत)  असं मी आमचे ट्रिप आयोजक मंगेशसिंग ठाकूर(Jungle Trackers)  यांना म्हणालो. यावर ते म्हणाले - 'पक्षी तर बघायला मिळतीलच, पण जंगलाची खरी शान वाघच आहे. एवढं लांब येऊन वाघ नाही बघितला तर कसं वाटेल?' त्यामुळे आमच्या ५ सफारींमध्ये सुरवातीला  वाघ बघायचा प्रयत्न करायचा आणि उरलेल्या वेळेत बाकीचं जंगल आणि पक्षी बघायचे असं ढोबळमानाने ठरलं. ऐन एप्रिल महिन्यात विदर्भात आम्ही का गेलो असू असा प्रश्न काहींना पडला असेल तर एप्रिल-मे हे महिने कुठल्याही जंगलात वाघ बघण्याच्या दृष्टीने सर्वात चांगले समजले जातात. उन्हाळ्यामुळे वाघ पाणवठ्याजवळ येण्याची, पाण्याजवळच थांबण्याची शक्यता जास्त असते. तसंच उन्हाळ्यामुळे गवतही वाळ्लेलं असल्याने त्यामधून वाघ दिसण्याची शक्यता असते. आणि जंगलामध्ये सफारी दरम्यान फारसं उकडत नाही असा आमचा या आधीच्या ट्रिपचा अनुभव आहे. शिवाय रिसॉर्ट वर एसी असतोच. त्यामुळे आमच्या सोयीइतकाच वाघ दिसण्याच्या शक्यतेचा विचार करून ट्रीपसाठी आम्ही हा काळ निवडला. 

२ 

२४ एप्रिलला सकाळी ५. १० मिनिटांनी आमचं पुण्याहून  नागपूरचं इंडिगो विमान होतं. कधी एकदा त्या विमानाचं उड्डाण होऊन आपण आधी नागपूर आणि पुढे पेंचला पोचू असं मला झालं होतं. त्यामुळे विमानात हवाईसुंदरींच्या सुरक्षाविषयक सूचना आणि त्यांच्या यंत्रवत कवायतींची औपचारिकता कधी संपते असं वाटत होतं. या कवायती सुरु होण्याआधी विमानाच्या कॉकपिटमधून एका महिलेचा आवाज आला आणि तो ऐकून मी माझ्या सीट मध्ये अक्षरश: सरसावून बसलो. त्या महिलेने हिंदी आणि इंग्रजीतून प्रवाशांशी संवाद साधला. 'सुप्रभात'ने सुरुवात करून ती म्हणाली- "मी कॅप्टन भार्गवी गडकरी आणि आज विमानात माझी  सहकारी (को- पायलट ) दीक्षा सिंग आहे !" तिने विमानातील बाकीच्या क्रू सदस्यांची नावं (हवाईसुंदरी) सांगितली. त्याही अर्थातच महिला होत्या. म्हणजे आमचं आजच विमान हे संपूर्णतः महिला चमू चालवणार होता. माझ्या आजवरच्या विमान प्रवासात हे पहिल्यांदाच झालं असल्यामुळे मला या गोष्टीचं  खूपच अप्रूप आणि कौतुक वाटलं. पुढे कॅप्टन गडकरींनी पुण्याची हवा आणि नागपूरची हवा, दोन्ही ठिकाणचं तापमान वगैरे सांगितलं. आपण साधारण ३७००० फूट उंचावरून प्रवास करणार आहोत हे ही सांगितलं आणि शेवटी आधी ज्या आवाजात बोलत होत्या त्याच आवाजात म्हणाल्या - "आजच्या विमान प्रवासात तुम्हां सर्वांबरोबरच माझी आई आणि बहीण देखील आहेत. त्या नागपूरहून पुढे जंगल सफारीला जाणार आहेत. तुम्हां सगळ्यांचा विमान प्रवास सुखकर होवो आणि माझ्या आई आणि बहिणीला जंगल सफारीत नक्कीच काहीतरी चांगलं बघायला मिळो यासाठी शुभेच्छा!" हे ऐकून तर मला आणखीच आनंद झाला. त्या कॅप्टन गडकरींच्या आईंना किती छान वाटलं असेल की आपण प्रवास करत असताना आपली मुलगीच विमानाचं सारथ्य करत आहे! किती आनंद, अभिमान आणि समाधान वाटलं असेल त्यांना ! खरं तर माझी खूप इच्छा होती की त्या माऊलीला भेटून त्यांचं अभिनंदन करून, त्यांचा आनंद आपणही द्विगुणित करावा. पण एवढ्या मोठ्या विमानात काहीच ओळख नसताना त्यांना नेमकं शोधायचं कसं असा प्रश्न होता. मात्र मी मनोमन त्यांना नमस्कार केला. कॅप्टन  गडकरी म्हणाल्या तसं आमचा विमान प्रवास अतिशय चांगला झाला. टच डाऊनच्या वेळी पोटातलं पाणी देखील हललं नाही. एकंदरीत ट्रिपची सुरुवात चांगली झाली !

३ 

पेंच हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेलं एक मोठं अभयारण्य आहे. (एकूण क्षेत्रफळ ७५८ चौरस किमी ). जंगलाच्या कोअर आणि बफर झोन मध्ये प्रवेश करण्यासाठी वेगवेगळी गेटस आहेत. ( तुरिया, कर्माझारी, जमतारा ही काही मध्यप्रदेश मधील गेटस तर सिल्लारी, खुरसापार, चोरबाहुली ही  काही महाराष्ट्रातील गेटस आहेत) आमच्या २५ एप्रिल च्या दोन्ही सफारी खुरसापार गेटच्या होत्या. आदल्यादिवशी संध्याकाळी आम्ही तुरिया गेटमधून एक सफारी केली होती. २५ तारखेला खुरसापार मधील दोन आणि २६ तारखेला सिल्लारीच्या दोन अशा आमच्या उर्वरित सफारी होत्या. 

सकाळच्या सफारीसाठी आम्ही आमच्या रिसॉर्ट वरून सव्वा पाचलाच निघालो होतो. रिसॉर्ट पासून गेट पर्यंत पोचायला पंधरा वीस मिनिटं लागणार होती शिवाय सफारीसाठी परमिटची औपचारिकता(ओळखपत्र तपासणी वगैरे) करण्यात वेळ मोडू नये आणि आपण लवकरात लवकर जंगलात प्रवेश करावा यासाठी हा खटाटोप ! त्याप्रमाणे आम्हांला लवकरच एक जिप्सी(open gypsy) गाडी देण्यात आली. आमच्या गाडीचा ड्रायव्हर रुपचंद होता. आम्हांला आमचे मोबाईल जंगलात नेता येणार नाहीत असं सांगण्यात आलं होतं. हल्ली मोबाईल गेटवरच जमा केले जातात. प्रत्येक जिप्सीमध्ये ड्रायव्हर बरोबर एक गाईड देखील असतो. आम्ही आमच्या गाईडची वाट बघत थांबलो होतो तर अचानक एक सर्वसाधारण उंचीची, तीस-बत्तीस वयाची, सावळ्या वर्णाची, थोड्याश्या आडव्या बांध्याची, गोल चेहऱ्याची एक महिला आमच्या गाडीत बसली.तिचे डोळे टपोरे आणि चेहरा हसरा होता. "गुड मॉर्निंग ! मी मनिषा ! आजच्या सफारीसाठी मी तुमची गाईड, तुमच्या बरोबर असणार आहे. " तिने स्वतःची ओळख करून दिली. आजवर मी कमीतकमी पाच जंगलं तरी बघितली आहेत. पण आमच्याबरोबर कधीही महिला गाईड नव्हती. हा अनुभव आमच्यासाठी म्हणूनच नवा आणि वेगळा होता. मनिषाने camouflage ड्रेस परिधान केला होता. शिवाय त्याच प्रकारची टोपी घातली होती आणि टोपीच्या आत केस बांधले होते.  बरोबर सकाळी  सहा वाजता जंगलाचं प्रवेशद्वार उघडण्यात आलं आणि आम्ही एका उत्साही वातावरणात सफारीला सुरुवात केली. 

४ 

ऐन उन्हाळा असला तरी हवा प्रसन्न होती. चालत्या जीपमधून प्रवास करत असल्याने छान वारा लागत होता. सकाळच्या वेळी जंगलात एक झाडा-पानांचा मंद वास येत असतो. तसा तो आजही येत होता आणि त्याने मन प्रफुल्लित होत होतं. आमची गाईड मनिषा खुरसापार जंगलाविषयीची माहिती आम्हांला सांगू लागली. इथे साधारण १३ वाघ आहेत...इथली झाडं आम्हांला तिने दाखवली-

Indian Ghost tree (Sterculia urens) 


Crocodile bark tree (Terminalia elliptica ) (मराठी नाव-ऐन ) 

Terminalia bellirica (मराठी नाव- बेहडा) 

Mahua (Madhuca longifolia)(मराठी नाव- मोह ) 


Cleistanthus collinus (मराठी नाव- गराडी ) 
(सर्व फोटो आणि झाडांची शास्त्रीय नावं -इंटरनेटवरून साभार) 


झाडांच्या मराठी नावांबरोबरच ती त्यांचा थोडक्यात उपयोगही सांगत होती. उदाहरणार्थ - गराडी झाडाचं लाकूड मजबूत असतं आणि घरं बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मोहाची फुलं चितळ हरीण खातं आणि त्यामुळे नराच्या शिंगांना मखमली चमक येते आणि त्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. 

आम्ही काल  तुरियाला गेलो होतो हे तिला सांगितलं होतं. त्यामुळे तिने खुरसापार  आणि तुरिया मधील फरक सांगितले. तुरिया मध्ये तृणभक्षी जनावरं(चितळ, सांबर)  संख्येने जास्त आहेत. तुरिया मध्ये गवताळ कुरणं जास्त आहेत आणि नैसर्गिक पाणवठ्याच्या जागा जास्त आहेत. या सगळ्यामुळे वाघ तुरिया मध्ये लवकर सापडू शकतो कारण सगळे प्राणी वाघाच्या हालचाली झाल्या की एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात- धोक्याची सूचनाच जणू! (alarm call) खुरसापार मध्ये हे तृणभक्षी प्राणी विरळ असल्यामुळे या कॉल्स वरून वाघ शोधणं अवघड असतं. हल्ली मोबाईल फोन जंगलात नेण्यावर बंदी असल्यामुळे एखाद्या जिप्सी मधील लोकांना वाघ दिसला तरी ते इतरांना कळवू शकत नाहीत. या सगळ्यामुळे इथे वाघ दिसणं आणि शोधणं किती अवघड आहे याची आम्हांला कल्पना आली. मनिषा आणि ड्रायव्हर रुपचंद दोघेही आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नांची न कंटाळता उत्तरं  देत होते पण दुसरीकडे त्यांचे कान आणि डोळे वाघाचा वेध घेत होते. आणि अचानक त्या दोघांनाही कच्च्या रस्त्यावर वाघाच्या पाऊलखुणा दिसल्या(pug marks) 



(वरील तिन्ही फोटो: स्मृती पुसाळकर )

पायांचे ठसे ताजेच होते. म्हणजे वाघ नक्कीच जवळपास असणार. आणि थोडं पुढे गेल्यावर आम्हांला एक वाघीण दिसली. अगदी मनभरून बघायला मिळाली. वाघ बघितल्यावर आम्हांला जेवढा आनंद  झाला होता तेवढाच मनिषाला देखील झाला. मला तिने विचारलं देखील- फोटो घेता आले ना व्यवस्थित? तिला मी काढलेले फोटो दाखवले तेव्हाही तिचा चेहरा आनंदी झाला होता. वाघ बघितल्यावर तिने आम्हांला बाकीचं जंगल आणि वेगवेगळे पक्षी तेवढ्याच उत्साहाने दाखवलं. गाईड लोकांसाठी प्रशिक्षण आणि परीक्षा दार वर्षी असते असं ती बोलता बोलता म्हणाली. त्यानुसार सगळ्यांना श्रेणी देण्यात येते आणि त्याप्रमाणे त्यांना काम मिळतं असं समजलं. तिचं एकंदरीत काम बघता तिला वरचीच श्रेणी मिळत असावी. 
आमची सफारी यशस्वी झाली आणि गाडी पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर मनिषा पटकन गाडीतून उतरली आणि आम्ही तिला धन्यवाद देण्याऐवजी तीच आम्हांला त्याच हसऱ्या चेहऱ्याने 'थँक यू' म्हणाली आणि गेली सुद्धा ! तिच्याबरोबर आम्हां सगळ्यांचा फोटो काढायचं राहूनच गेलं. आदल्या दिवशीचे गाईड आणि ड्रायव्हर दोघेही टिप मिळावी यासाठी विशिष्टप्रकारे बोलत होते आणि आम्ही टिप देईपर्यंत थोडेसे घुटमळत होते. पण मनिषाने अशी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही हे विशेष! 

'बिंदू' ! खुरसापारला आम्हांला दिसलेली वाघीण ! अतिशय डौलदार  चाल... रुबाबदार राजबिंडं रूप ! आमच्या गाडीच्या ती पुढेच होती त्यामुळे तिचे बरेचसे फोटो पाठमोरे आले.एक दोनदाच तिने वळून बघितलं आणि तो क्षण कॅमेऱ्यात टिपता आला.
 

मात्र तिची चाल डोळेभरून बघणं हा देखील एक विलक्षण अनुभव होता! तिच्या पुढे एक गाडी होती. मध्ये ती आणि तिच्यामागे आम्ही. आमच्यामागे दोन-तीन गाड्या ! एवढ्याच लोकांना ती बघायला मिळाली. बिंदूच्या पुढची गाडी आधी विरुद्ध दिशेला तोंड करून होती. पण बिंदू जशी जशी पुढे चालत होती तसं त्या ड्रायव्हरला काय वाटलं काय माहित! त्याने गाडी रिव्हर्स घेऊन गाडीचं तोंड तिच्याकडे केलं. हे सगळं बिंदू बघत होती. पण तिचं चालणं सुरूच होतं. फक्त पुढच्या गाडीचा ती अंदाज घ्यायची आणि  तिच्या तिच्या त्याच शांत लयीत ती चालत होती. तिच्या चालीत अरेरावी नव्हती, आक्रमकता नव्हती आणि आवेशही नव्हता. होता फक्त ठाम आत्मविश्वास !  या जंगलातील तिच्या स्थानाबद्दल वाटणारा आश्वासक आत्मविश्वास! तिचा रुबाब एवढा की त्यापुढे मनुष्य प्राण्याला देखील माघार घेऊन तिला वाट करून द्यावी लागत होती! गाईड मनिषाने सांगितलं की बिंदूने काही आठवड्यांपूर्वीच तीन पिल्लांना जन्म दिला होता. तिची पिल्लं ठेवून ती सकाळच्या वेळी कदाचित पाणी पिण्यासाठी गेली होती आणि आता ती पिल्लांजवळ परतत होती. मात्र वाटेत थोड्याथोड्या वेळाने थांबून ती झाडांवर मूत्र विसर्जन करून तिच्या इलाख्याची खूण इतर वाघांसाठी मागे ठेवत होती. आमच्याबरोबर...नव्हे, आम्ही बिंदूबरोबर, जवळपास एक किलोमीटर तरी चाललो असू. नंतर ती रस्ता ओलांडून तिच्या पिल्लांच्या दिशेने निघून गेली..आमच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव मागे ठेवून ! 
पेंचच्या ट्रिप मध्ये पुढे संध्याकाळी आम्हांला चार वाघ दिसले.. दुसऱ्या दिवशी दोन बिबटे दिसले. भरपूर पक्षी बघितले. पण 'बिंदू' ला बघणं हा माझ्यादृष्टीने आमच्या ट्रिपचा सर्वोच्च बिंदू होता ! 


 


(दोन्ही व्हिडिओ - स्मृती पुसाळकर)


Thursday, 8 May 2025

पुस्तक परीक्षण : 'निळे आकाश हिरवी धरती' -मिलिंद बोकील

  

आपल्याला मंगोलियाबद्दल खूपच तुटपुंजी माहिती असते. आशिया खंडात चीनजवळचा हा देश आहे, त्यात गोबी नावाचे वाळवंट आहे, मंगोलियाची राजधानी उलानबातर आहे हे आपण भूगोलात शिकलेले असते. दक्षिण पूर्व आशिया, चीन जपान मधील राहणाऱ्या लोकांना मंगोल वंशीय म्हटलं जातं हे आपल्याला माहित असतं. इतिहासाची ज्यांना आवड आहे त्यांना चेंगिझखान आणि त्याच्या लढाया याबद्दल माहिती असते. पण यापलीकडॆ मंगोलिया देश, तिथली संस्कृती याविषयी सर्वसामान्य मराठी वाचकांना फारशी माहिती नसते. आणि म्हणूनच डॉ मिलिंद बोकील यांचं 'निळे आकाश हिरवी धरती' हे त्यांच्या मंगोलिया मध्ये जाऊन, तिथल्या प्रतिकूल हवामान, कठीण भूप्रदेशात राहून  केलेल्या समाजशास्त्रीय संशोधनावर आधारित पुस्तक मराठी वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. 

 या पुस्तकाने डॉ बोकीलांनी  सर्वसामान्य मराठी वाचकाला एक नवा विचार, जगाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली आहे. सहसा आम्ही केवळ आमच्या आजूबाजूचाच विचार करतो, फारतर आमच्या देशाचा. परंतु आपल्याला माहित नसलेल्या प्रदेशातील  लोक तिथल्या वातावरणाशी कसे जुळवून घेतात, तिथल्या परिस्थितीशी कसा सामना करतात आणि  आपलं आयुष्य कसं जगतात याविषयी त्यांची निरीक्षणं, तिथल्या लोकांच्या मुलाखती याद्वारे मांडलं आहे. आपले प्रश्न आणि त्यांचे प्रश्न काही बाबतीत वेगळे आहेत, परंतु जागतिक हवामान बदल आणि त्यामुळे होणारे परिणाम आपण जसे भोगत आहोत तसे त्या देशातील लोकदेखील या समस्येतून जात आहेत. या सगळ्या परिस्थितीकडे अत्यंत तटस्थ/वस्तुनिष्ठपणे बघून त्याचा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष डॉ बोकीलांनी  पुस्तकात मांडले आहेत. पुस्तकात त्यांनी तिथल्या पशुपालक समाजातील १२ कुटुंबांचा अभ्यास केला आहे. पण तरीही हे पुस्तक म्हणजे केवळ या अभ्यासाचे सादरीकरण नाही. 

पुस्तकात  त्यांनी मंगोलियाबद्दल  वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून लिहिले आहे. तिथले हवामान,पर्यावरण  भूगोल हे तर झालंच याशिवाय तिथलं राहणीमान, पोशाख यापासून तिथल्या घरांची रचना(ती कशी बांधली जातात याविषयीदेखील लिहिलं आहे) यावर लिहिलं आहेच शिवाय , तिथलं अन्न आणि ते पदार्थ करण्याची कृती, त्यांची भाषा-संस्कृती, तिथला इतिहास, लोकसंख्याशास्त्र, जीवशास्त्र(वनस्पती आणि प्राणिशास्त्र) आणि अर्थातच या सगळ्याचा समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला विचार हेही यात आहे ! आम्हांला वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमात PSM नावाचा विषय होता. तो विषय शिकवणारे आमचे प्राध्यापक आम्हांला त्यांच्या पहिल्याच तासाला म्हणाले होते की PSM म्हणजे anything and everything under the sun ! हे पुस्तक वाचताना मला त्यांच्या या वाक्याची प्रकर्षाने आठवण झाली. एक समाजशास्त्रज्ञाला किती वेगवेगळे विषय कवेत घ्यावे लागतात याची जाणीव झाली. 




 मंगोलियामध्ये समाजशास्त्रीय संशोधन करण्याच्या उद्देशाप्रती लेखक एवढे कटिबद्ध होते  की त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व काही गोष्टी त्यांनी केल्या. मग ते तिथे पोचण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट असोत किंवा तिथल्या खानपानाच्या सवयींशी जुळवून घेणं असो.तिथल्या खाण्याच्या वेगळ्या चावी, त्या पदार्थांचे वास त्या पदार्थांमुळे पोटावर झालेले दुष्परिणाम या सगळ्याची तमा न बाळगता लेखक  सर्व अनुभवांना सामोरे गेले. तिथल्या लोकांच्या पाहुण्यांच्या स्वागत  करायच्या चालीरीती आणि त्याबद्दल त्यांची पाहुण्यांकडून असलेली अपेक्षा याबद्दल देखील त्यांनी कुठलेही आढेवेढे घेतले नाहीत. आपण ज्याला 'When in Rome, do as the Romans do!' असं म्हणतो तसं तिथे राहायचं तर तिथल्या लोकांसारखं वागायचं असं त्यांनी केलं आणि म्हणूनच तिथल्या वास्तव्याच्या काळात ते तिथल्या लोकांशी पूर्णपणे मिळून मिसळून राहू शकले. मुख्य म्हणजे हे सगळेच अनुभव त्यांनी एक लेखक म्हणून असलेली आपली प्रतिमा बाजूला ठेवून प्रांजळपणे पुस्तकात मांडले  आहेत हे विशेष!  

मिलिंद बोकील हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. पण  त्यांचं लिखाण आवडण्यामागे काय कारणं आहेत याबद्दल मी जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की ते नेहमीच लिहिताना त्या त्या व्यक्ती/समूहाची परिस्थिती सविस्तरपणे मांडता आणि या कॅनव्हास वर त्या व्यक्ती/समूहाबद्दल लिहितात.परिस्थिती आणि माणूस असं दोन्हीचं विश्लेषण असल्याने लिखाण परिपूर्ण होतं. एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून आमची कार्यपद्धति  देखील अशीच आहे. कुठल्याही पेशंटच्या स्वभावाचा विचार करताना आम्ही देखील आधी त्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेतो आणि मग त्यामध्ये त्या व्यक्तीच्या reactions चा विचार करतो. या पुस्तकात देखील मंगोलिया मधील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तेथील लोकांच्या जीवनमानाविषयी त्यांनी निष्कर्ष नोंदवले आहेत. 
पशुपालन या व्यवसायाविषयी खार तर मला काहीही माहिती नाही. त्या व्यवसायाची पद्धत, त्यातून मिळणारे उत्पन्न आणि बदलत्या परिस्थितीप्रमाणे झालेली स्थित्यंतरे आणि यातील आव्हाने याविषयी मिलिंद बोकीलांनी खूप सविस्तरपणे मांडणी केली आहे. पशुपालक कमी होणे मात्र पशूंची संख्या वाढणे, गवताच्या उपलब्धतेनुसार पूर्वी केलं जायचं ते स्थलांतर आता कमी होणे ( आणि स्थिर राहिल्याने गवताच्या नैसर्गिक प्रतीवर दुष्परिणाम होणे), नव्या पिढीचा पशुपालनाकडे कल न राहता ती राजधानी व मोठ्या शहराकडे वळणे, नवी पिढी आधीपेक्षा जास्त शिक्षित होणे, स्त्री- पुरुष यांच्या नात्यात (आपल्यापेक्षा) जास्त मोकळेपणा असणे, तिथल्या स्वयंपाकाच्या पद्धतीमुळे स्त्रीला जास्त मोकळीक मिळणे, तेथील स्त्रियांनी  स्वतंत्र/एकट्या राहून पशुपालनासारखे अवघड कामदेखील करणे, तिथल्या घराघरांमध्ये आधुनिक उपकरणं असणे (फ्रिज, गाड्या, सौर ऊर्जेवर चालणारे दिवे  इ) यासगळ्या विषयी लेखक एका तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेतून नोंद घेतात. 

मिलिंद बोकीलांच्या  सर्वच लिखाणात एक शांतता असते, एक ठहराव असतो. हे पुस्तक देखील त्याला अपवाद नाही. विशेषतः भाग १९ मध्ये बोकीलांनी  तिथल्या निर्जन कुरणांवर पहुडले असताना केलेलं वर्णन हे खूपच तरल, भावस्पर्शी आणि शांतावणारं आहे. अकर्माचा आनंद असं  याला त्यांनी म्हटलं आहे ते योग्यच आहे. याकाळात होणारा आत्मसंवाद हा अतिशय वेगळ्या पातळीवरचा आहे. अशा प्रकारचा एक विलक्षण शांततेचा अनुभव आम्ही आमच्या काश्मीर ट्रीपवेळी पहलगामला गेलेलो असताना घेतला होता. धकाधकीच्या ट्रिपनंतर लिद्दर नदीकाठी असलेल्या एका बागेत आम्ही निवांत बसलो होतो. कोणीही एकमेकांशी बोलत नव्हतं. बाकी कुठलाही आवाज नाही, फक्त नदीच्या खळाळत्या पाण्याचा लयबद्ध नाद! काहीही न करता कितीतरी वेळ आम्ही फक्त हा नाद आणि आजूबाजूचं सौंदर्य मनात साठवत होतो. ही शांतता याआधी कधीही अनुभवली नव्हती आणि म्हणूनच माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात हा अनुभव अजूनही तितकाच ताजा आहे.
हा भाग १९  म्हणजे पुस्तकातील सर्वोच्च बिंदू आहे असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. 

पुस्तकातील बोकीलांनी  काढलेले सर्वच फोटो उत्कृष्ट आहेत. विशेषतः वरील भाग १९ मधील कुरणांचा फोटो त्या अथांग प्रदेशाची अनुभूती देतो. बोकील उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि त्यांना  घोडेस्वारी देखील आवडते  असे तुमच्या व्यक्तिमत्वाचे नवे आयाम या पुस्तकाच्या निमित्ताने समजले. मराठी लेखक आणि तेही मिलिंद बोकीलांसारख्या गंभीर विषयांवर लिहिणाऱ्या  लेखकाला अशी आवड असणे हे निश्चितच वेगळं आहे. 
अन्वर हुसेन यांचं मुखपृष्ठ अतिशय समर्पक आहे. 
अशा या वेगळ्या विषयाचे पुस्तक वाचून आपण आपल्यापेक्षा वेगळ्या समाजाबद्दल जाणून घेऊन आपल्या जाणिवांचे क्षितिज विस्तारावे आणि या अनुभवांनी समृद्ध व्हावे असं मला मनापासून वाटतं.