Wednesday 12 November 2014

तीन कविता...१


१) भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियम वर एका भपकेबाज सोहळ्यात पदाची शपथ घेतली. त्यानिमित्त ही कविता- 

शपथविधी 

वानखेडे स्टेडियम जवळची 
लगबग पाहून एका सामान्य माणसाने 
तिथल्या वॉचमनला विचारले -
'इथे काय चाललंय हो?''
त्रासिकपणे वॉचमन म्हणाला -
' दिखता नहीं क्या ?'
'नितीन चंद्रकांत देसाईंचा दिसतोय सेट
आहे कसला इव्हेंट?'
झी गौरव ? की म टा सन्मान ?
नॉमिनेशन की मानांकन?
'अरे नया है क्या तू?
जानता नहीं ?
नया सी एम आ रहा है
शपथ ले रहा है'
' अहो पण तिथे शेतकरी
आत्महत्या करताहेत
दलित मारले जाताहेत
आणि इथे....'
'वो रोना धोना छोड रे
अब अच्छे दिन आए रे'
शपथविधीला कुणी धरतोय ठेका
उडवतोय टोप्या उधळतोय पैका
कारण शपथविधीच्या ब्रेक मध्ये
सुरु आहे लावणी
बावन्नखणी अहो बावन्नखणी
कशाचाच कशाला नाही मेळ
आहे फक्त पैशाचाच खेळ! 


( ३१ ऑक्टोबर २०१४ ) 
------------------------------------------------------

२) दिवाळी च्या आधीचे वातावरण टिपणारी ही कविता- 

आली दिवाळी


वर्तमानपत्राचं पहिलं पान बघेपर्यंत
जेव्हा सहा पानांच्या जाहिरातींचा अडथळा पार करावा लागतो
तेव्हा समजावे दिवाळी जवळ आली !
ज्वेलर्स ते बिल्डर्स
मॉल्स वा इलेक्ट्रॉनिक आयटम
ग्राहक राजाला भुलविणार्या
जाहिराती जेव्हा येऊ लागतात
तेव्हा समजावे
दिवाळी जवळ आली !

लोकांच्या नजरेतूनही कळतं
दिवाळी जवळ आली!
पोलिसांची ती 'शोधक 'नजर
पोस्ट मनची आशाळभूत तर
बायकांची शॉपिंग करतानाची भिरभिरती नजर सांगते
दिवाळी जवळ आली!
डॉक्टर कडची कमी होऊन
पिठाची गिरणी पासून ते टेलरपर्यंत
सगळीकडे गर्दी वाढली की समजावे
दिवाळी जवळ आली!
आणि हो!
आमच्यासारख्या कवड्यांच्या
कवितांचे पेव फुटू लागले
तरी समजावे
दिवाळी जवळ आली!

१२ ऑक्टोबर २०१४ ) 


३) आज पहाटे पुण्यात पाउस पडला.. अगदी थोडासाच... योगायोग पहा-इंटरनेट वर मुशाफिरी करताना कवी राजेश्वर यांची अशाच पावसाचे वर्णन करणारी कविता मिळाली. ती देत आहे-
असा कसा रे तू पावसा...
कुठलाही आवाज न करता
दबक्या पावलांनी आलास..
सवतीच्या घरी रात्र काढून
पहाटेच चोरट्यासारख्या परतणाऱ्या
एखाद्या पतीराजाप्रमाणे ?
तुझे हे असे येउन न येणे
चकवून जाणे ..
कोणालाच मान्य नाही.
बघ.. तुझ्याच थेंबांचे अश्रू ढाळून
झाडं मूक निषेध नोंदवतायेत.
(९ मे २०१२)

No comments: