Monday 17 November 2014

' एलिझाबेथ एकादशी' चं पारणं !



काल हा परेश मोकाशी दिग्दर्शित सिनेमा पाहिल्यावर माझी नेहमीप्रमाणे पहिली प्रतिक्रिया सिनिकल होती- छे ! असं कुठे असतं का? एवढं ' फील-गुड' दाखवतात का कधी ? वगैरे वगैरे … पण सिनेमा डोक्यातून जात नव्हता. तो ज्ञाना जसा पंढरपूरच्या छोटया-छोटया गल्ली- बोळातून सिनेमाभर फिरत असतो तसाच मी (मनातल्या मनात) त्याचे बोट धरून फिरलो आणि सिनेमाची एकीकडे उजळणी करता करताच दुसरीकडे या माझ्या  प्रौढत्व आणि सिनिसिझमच्या मुखवट्याआड, आत खोल खोल कुठे तरी कोपरयात दडून बसलेल्या माझ्यातल्या लहान मुलापर्यंत पोचलो. आणि मग मात्र मला सगळं आपसूकच पटू लागलं. तेव्हा माझ्या दृष्टीने या सिनेमाचं यश हे असं दुहेरी आहे- एक तर माझ्या सगळ्याच गोष्टींकडे नकारात्मक बघण्याच्या स्वभावाला थोडावेळ तरी मी बाजूला ठेवू शकलो आणि दुसरं मला माझ्यातलं लहान मूल (सिनेमा संपल्यानंतर का असेना पण ) दिसलं. 

या सिनेमाची गोष्ट सांगून मला वाचणाऱ्यांची सिनेमाबद्दलची गंमत घालवायची नाहीये. पण तरीही काही ठळक मुद्दे सांगावेसे वाटतात-
१) सिनेमात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत काय जर असेल तर ती गोड निरागसता(हे पिवळं पितांबर सारखं होतंय का?) सर्वच मुलांच्या डोळ्यांतून, हसण्यातून, चेहऱ्यावरील हावभावातून, त्यांच्या बोलण्यातून, आणि त्यांच्या कृतीतून एक स्वाभाविक, त्या त्या वयाला साजेशी निरागसता दिसते. आणि या मुलांकडून तशा प्रकारे ती व्यक्त करायला लावण्यात दिग्दर्शकाचे कौशल्य आहे हे निर्विवाद !
२) सिनेमात काही गोष्टी खूप मार्मिकपणे दाखवल्या आहेत. केवळ सगळं गोड आणि सुंदर असं म्हटलं तर ते फार वरवरचं वर्णन होईल. त्यामुळे यातल्या काही facts चा ही उल्लेख करावासा वाटतो- 
अ) तसं बघायला गेलं  गोष्टीत जे काही घडतं ते ज्ञानाच्या आईला ५००० रू देऊन स्वेटरचे (बँकेने जप्त केलेले) मशीन सोडवता येत नाही म्हणून. बघायला गेलं तर ५००० रू ही रक्कम फार काही मोठी नाही असं वाटण्याची शक्यता आहे. हल्लीच्या मुलांना तर असं निश्चितच वाटू शकेल. कारण आपल्या शहरांमधील उच्च -मध्यमवर्गातील मुलांना ही रक्कम किरकोळ वाटू शकते. कपडे खरेदी -हॉटेलिंग -वीक-एंड ट्रिप्स आणि अशा इतर गोष्टींची सवय असणाऱ्या या मुलांना ५००० रू नाहीत म्हणून एखादे घर कोलमडू शकते किंवा या पैशांची जमवाजमव करताना किती अडचणी येऊ शकतात हे जाणवले तरी खूप झाले ! 
आ ) आणि अशी हलाखीची  परिस्थिती जरी असली तरी त्यावर हिमतीने मात करण्यासाठी झटणारी, मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढी तजवीज करणारी, स्वाभिमानी आणि realistic आई दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी काही आया  अतिरंजित दाखवल्या जातात. त्या तुलनेत ही संयत आई (नंदिता धुरी यांचे अप्रतिम काम ) उठून दिसते. 
इ ) या मुलांमधील मैत्रीच्या आड कुठेही जात-पात, धर्म, आर्थिक स्थिती, आई-वडिलांचे व्यवसाय काही काही येत नाही. शाळेतला एक मुलगा 'वाईट वस्तीत राहतो ' म्हणून त्याला इंग्रजीचे पुस्तक द्यायचे नाही असली चलाखी ज्ञाना करत नाही. पुढे याच मुलाच्या खरी जाउन तिथली खाट घेऊन ही मुलं  दुकान थाटतात. वाईट वस्ती म्हणजे काय, त्या मुलाच्या आईचा व्यवसाय काय याबद्दलची त्या मुलांची चर्चा अफलातून ! 
ई ) टीव्ही आणि मोबाईल हे सध्याच्या मुलांचे 'मित्र' इथे जवळ जवळ नाहीतच ! नाही म्हणायला गण्याच्या मोबाईल वर त्याच्या वडिलांच्या नंबरसाठी रेड्याच्या आवाजाचा रिंगटोन धमाल उडवतो !
गण्याची भाषा शिवराळ असण्यामागे त्याच्या वडिलांची तशीच भाषा असते हे कारण आहे हे सोदाहरण पण विनोदी पद्धतीने छान दाखवलं आहे. तसाच 'या वेळची एकादशी खूप चांगली गेली' हे अनपेक्षितपणे एक वेश्या(ज्ञानाच्या मित्राची आई ) ज्ञानाच्या आईला सहजपणे सांगते.  हे वाक्य सिनेमातही इतकं सहज आणि पासिंग reference ने यावं असं आलंय की ते register ही होतं की नाही असं वाटतं. 
उ ) शहरातील आणि या सिनेमातल्या मुलांमधला आणखी एक फरक मला वाटला. तो म्हणजे सिनेमातली ही मुलं ज्ञानाचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न, त्यासाठी उत्तर शोधणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हे सगळं मनापासून, स्वत:ला झोकून देऊन करतात. एवढं सहजपणे मोठ्या शहरातील मुलं करतील असं वाटत नाही. 
ऊ) आणि म्हणूनच मला या सिनेमातले पंढरपूर हे ही एक महत्त्वाचे पात्र वाटते. ही गोष्ट अशा ठिकाणी घडू शकते- जे  अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. जिथे विठोबाचे अस्तित्व भक्तांना पावलोपावली जाणवते. अशा ठिकाणी प्रामाणिकपणा, खरेपणा, सचोटी, दुसऱ्याचा आणि त्याच्या परिस्थितीचा विचार(घरमालकीण यांच्याकडे  ६ महिने भाड्याचं नाव सुद्धा काढत नाही !) करणे हे सगळे होऊ शकते. 
मी काही सिनेमाचं परीक्षण करणारा समीक्षक नाही . त्यामुळे माझं मत कितपत ग्राह्य धरलं जाईल माहित नाही. पण एका निर्मळ, निखळ आनंदाच्या अनुभवासाठी हा सिनेमा जरूर बघावा असं मी नक्की म्हणेन ! 

1 comment:

Sunil said...

��������