Friday 9 October 2015

अमोलने व्हॉटस् अँप बंद केलं त्याची कथा !


(विशेष सूचना - या गोष्टीतील सर्व घटना, प्रसंग आणि व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत. त्यांचे वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)


           
                       १

गाडी चालवत असताना , डोक्यावर हेल्मेट घातलेलं असताना नेमका खिशातला फोन वाजला. त्याला वाटलं की वाजून वाजून तो आपोआप थांबेल. पण तसं काही झालं नाही. म्हणजे आता गाडी बाजूला घेऊन थांबणं आलं ! काहीशा त्राग्यानं तो थांबला. ' नेमक्या यावेळी कोणाकडे आग लागलीये म्हणून  मला फोन केलाय ?' नंबर नेमका अननोन होता. आता आली का पंचाईत ! फोन परत येण्याची वाट बघण्यात वेळ घालवावा की आपणच कॉल करावा? शेवटी त्यानेच कॉल केला. मनात तो काय बोलायचं हे घोकत असताना अचानक पलिकडून बाईचा आवाज आला " हा....य अमोल !! How are you?" आपणच फोन करून विकतचं दुखणं घेतलं की काय असं त्याला वाटलं   "आेळखलंस का मला?" हा पुढचा गुगली कसा खेळायचा हा विचार करायच्या आत तिनेच उत्तर दिलं. "अरे मी आपल्या कॉलेज मधली विनिता... विनिता चतुर्वेदी ....आठवलं का?" अमोलच्या डोक्यात फार काही प्रकाश पडला नाही तरी त्याला हो म्हणणं भाग होतं. "काय रे कुठे असतोस? तुझा पत्ता काय?" कॉलेजचं शिक्षण झाल्यावर 25 वर्षात जी कधी भेटली नाही ती जणू काल परवा भेटल्यासारखं करत होती. आणि कॉलेजमध्येही फार काही संभाषण झाल्याचं त्याला आठवेना. तिला काही असले प्रश्न नव्हते. तिची गाडी सुसाट चालली होती. " बरं. मी आपल्या बॅचचा एक व्हॉटस् अँप  ग्रुप करतेय. तुला त्यात ऍड  करतेय. " हो - नाही म्हणायची कुठलीच सोय न ठेवता तिनं निर्णय घेतला देखील ! "तेवढाच टच राहील. Nostalgia ,You know!!!"
तर अशा रीतीने अमोल 'Young at heart' या ग्रुपचा 21वा मेंबर झाला ...


                                                                            २
तुम्हांला जर असं वाटत असेल की बिचारा अमोल! कसा त्याच्या मनाविरुध्द अडकवला त्या विनिताने! तर तो तुमचा गैरसमज आहे. आता हेच पाहा ना! आपला नंबर हिच्याकडे कसा? हा प्रश्न अमोलला पडलाच नाही ! फोन ठेवल्यावर त्याच्या मनात तिचे शब्द घुमत होते- Nostalgia! त्याचे मन अगदी पिसासारखे हलके होऊन अलगद तरंगू लागले. मनाने तो कॉलेजच्या काळात पोचला देखील ! खरं तर त्यांच्या कॉलेज ग्रुपचा एक वेगळा व्हॉटस्अँप  ग्रुप होताच आणि तिथे फुल्ल टू धमाल चालायची. कधी एकमेकांची चेष्टा मस्करी तर कधी वादही होत. पण तो तुलनेने एक छोटा ग्रुप होता. सगळे एकमेकांना पूर्ण आेळखत होते. अनेक वर्षांचा जवळचा सहवास  होता. मधल्या काळात भेटी कमी झाल्या असल्या तरी मैत्रीचं नातं घट्ट होतं. सगळ्यांचे विचार आणि संस्कार मध्यमवर्गीय होते. नवीन ग्रुप मध्ये  असं असेल किंवा नसेल याचा काहीच अंदाज नव्हता. फारशा ओळखी नसताना सगळे एकत्र आले होते विनितामुळे ! अमोलला हे थ्रीलिंग वाटत होतं. यातून काही नव्या ओळखी, virtual मैत्री होण्याची शक्यता त्याला वाटली आणि नव्या company बरोबर वेगळी धमाल करता येईल असं त्याला वाटलं. शिवाय व्हॉटस् अँप  या माध्यमाबद्दल आपल्याला इतरांपेक्षा जास्त कळतं असा त्याचा एक उगीच समज होता. म्हणजे बरीचशी लोकं एके ठिकाणी मिळालेला माल (मेसेज) दुसरीकडे ताबडतोब पाठवून देतात. काहीवेळा तर न वाचतासुद्धा ! हे अमोलला पटत नसे. मग यात तुमचं काय आहे? तुम्ही काय कुरिअरवाले आहात का? असं त्याला अशा लोकांना विचारावंसं वाटे. नवीन ग्रुप मध्ये अमोलला अनायसे थोडा मोठा ऑडियन्स मिळणार होता. आणि त्याला वाटत होतं की त्या ऑडियन्स समोर सादर करण्यासारखे त्याच्याकडे खूप काही आहे. म्हणजे विनिताने त्याला ग्रुप मध्ये ऍड  केलं हे अगदी त्याच्या दृष्टीने छानच झालं !

                                                                            ३
इकडे अमोलच्या कॉलेजच्या दुसऱ्या ग्रुप वर विनिता आणि तिच्या नव्या ग्रुपचीच  चर्चा सुरू होती. एकूण सगळ्यांचा सूर नकारात्मक होता. ना फारसा परिचय, ना काही ओळख तरीही तिने कसं काय हा ग्रुप चालू केला असं सर्वसाधारण मत होतं. या चर्चेत अमोल फारसा नव्हता हे काही चाणाक्ष जणींच्या लक्षात आलेच. त्यांनी अमोलला टोकल्यावर तो माफकपणे म्हणाला -' बघू तरी काय होतं ते. उगाच आधीपासून कशाला सगळी दारं बंद करता? 'या चर्चेत त्याला विनिताबद्दल आणखी माहिती मिळाली. अमोलचा मित्र अजित याला ती एका हॉटेलमध्ये भेटली. त्यानेच तिला अमोलचा नंबर दिला होता. कॉलेजनंतर विनिता, अजितच्या भाषेत सांगायचं तर सॉफ्टवेअर मध्ये घुसली. आता कुठल्याशा कंपनीत HR मध्ये  मोठ्या पोस्ट वर आहे. लग्न झालं पण फार टिकलं नाही. इथे आई वडिलांबरोबर राहते. मूलबाळ नाही. हे सगळं तिने अजितला हॉटेलच्याबाहेर उभं राहून गप्पा मारता मारता अगदी सहज सांगितलं. कॉलेजच्या काळात कोणाच्या लक्षातही न येणाऱ्या  आणि म्हणूनच फारशी लक्षात न राहणाऱ्या  मुलीच्या आयुष्यात बरंच काही होऊन गेलं  होतं तर ! अमोलची नव्या ग्रुपमध्ये काय होतंय याबद्दलची उत्सुकता म्हणूनच आणखी ताणली गेली.

                                                                              ४
नवीन ग्रुपमध्ये पहिल्यांदाच ऍडमिन या नात्याने विनिताने अमोलला संबोधून, पण सर्वांना उद्देशून सांगून टाकलं की इथे forwards पोस्ट केलेली चालणार नाहीत. बाकी तुम्ही काहीही बोला. हे अमोलला अगदीच आवडण्यासारखं होतं. पण तरीही तिची हे सांगण्याची पध्दत त्याला एखाद्या बॉस सारखी वाटली. त्याने याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं . कारण कॉलेजमध्ये असलेले पण नंतर कधीच न भेटलेले अनेक जण त्याला  इथे असे एकत्र 'भेटायला ' मिळाले. तो आनंद नक्कीच मोठा होता. 25 वर्षांच्या काळाने मात्र खूप काही बदल झाला होता. अविनाशला पूर्ण टक्कल पडले होतं  रमेशचे पोट फारच सुटलं होतं.नव्या ग्रुपवर सगळ्यांच्या ओळख परेडचा कार्यक्रम बराच काळ चालला. 'तू कुठे? हो का? मी इथे! तुला मुलं किती? नवरा/बायको काय करतो/करते.' वगैरे वगैरे .. हे अर्थात अपेक्षितच होतं. यातूनच कळलं की हा ग्रुप भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार पोचला होता. कोणी  दिल्लीत स्थायिक झालं होतं तर कोणी कोलकातामध्ये, कोणी अमेरिकेत होतं तर कोणी केनियामध्ये ! एका profile  वर नुसते नाव होते- अरूंधती मोने. नावावरून अशी कोणी मुलगी आपल्या वर्गात असल्याचं अमोलला काही केल्या आठवेना. 'आपलं आता वय झालं बहुतेक !'  असं तो दुसऱ्या ग्रुप वर म्हणाला देखील. त्याला त्याच्या स्मरणशक्तीचा पराकोटीचा अभिमान होता. पण हे नाव आणि त्या मुलीची प्रतिमा डोळ्यासमोर न येणं हा त्याला त्याचा पराभव वाटत होता. पण या ग्रुप मधल्या नीलिमाने झटक्यात सांगितलं - "अरे अरूंधती म्हणजे लग्नाआधीची देवकी देसाई ! तुम्ही तिला DD म्हणायचात.आठवतंय ना ?"  नीलिमा सहज बोलून गेली पण अमोलचं मात्र - 'कितने भूले हुए जख्मो का पता याद आया' असं  झालं.
DD … लौकिक अर्थानं सुंदर नव्हती. उंच, broad-shouldered, बारीक, सावळी ! पण दिलखुलास हसायची अगदी डोळ्यांतून ! हुशार होती पण attitude नव्हता तिला. मुलांशी मोकळेपणाने बोलायची आणि अमोलला नोट्सही द्यायची. कारण टिवल्याबावल्या करण्यात आणि लेक्चर बुडवण्यात अमोल नेहमी पुढे असायचा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी traditional day ला DD केशरी आणि काळ्या रंगाच्या combination ची नऊ वारी साडी नेसून आली होती. अमोलला पुरता घायाळ  करून सोडलं तिनं. त्याची उलघाल त्याचा मित्र जयदीपला समजली. तो अमोलला म्हणाला- "दोस्त… तुला तिच्याबद्दल जे वाटतंय ते बोलून टाक. मनात ठेऊ नको. काय होईल? फार तर ती नाही म्हणेल." पण अमोलचं काही धाडस झालं नाही. कॉलेज नंतर दोघांचे मार्ग अर्थातच बदलले. आणि आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा…. सगळा इतिहास अमोलच्या डोळ्यासमोरून तरळून गेला.
नव्या ग्रुप वर कोणीतरी नियम काढला. सगळ्यांनी आपापले recent फोटो DP म्हणून ठेवायचे. त्यात त्याला DD चा सध्याचा फोटो बघायला मिळाला. केवढी बदलली होती ती ! अक्षरशः एका बरणीत रूपांतर झालं होतं तिचं! अमोलनं फोटो बघून सुस्कारा सोडला.

                                                                               ५
तसं सगळ्यांचं अगदी छानच चाललं होतं. कोणासमोर स्वतः च्या वाढदिवसाला कुठल्या स्पामध्ये जावं हा गहन प्रश्न होता. कोणीतरी नुकतंच युरोप ट्रिप करुन आलं होतं. मग तिथले फोटो या ग्रुप वर! कोणी दाढीवाल्या श्री श्रीं बरोबरचे फोटो टाके तर कोणी अजून यौवनात मी हे सिद्ध करायला 'वन-पीस' मधले!  कोणी कुठलाही छोटा सत्कार झाला तरी त्याचेही फोटो टाके. अमोलला हे सगळं खरं तर आवडत नसे.मग एक दिवस अचानक DD ने ती काम करत असलेल्या NGO ची माहिती सांगितली. मतीमंद मुलांच्या संस्थेत ती ऑनररी काम करत होती. बहुदा वेळ घालवण्याचा प्रश्न असावा तिला ! या मुलांनी केलेल्या वस्तुंचं  प्रदर्शन होतं. त्याचं सगळ्यांना आग्रहाचं बोलावणं तिनं ग्रुपवर केलं होतं.त्यानंतर काही दिवसांनी तिनं ग्रुपवर सगळ्यांना एका गरीब मतिमंद मुलासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. इथे मात्र अविनाश आणि रमेश DD वर तुटून पडले. त्यांना हे वारंवार NGO बद्दल सांगणं नकोसं झालं होतं की त्यांना आर्थिक मदत द्यायची नव्हती हे कळलं नाही. पण त्यांनी DD ची आधी टिंगल आणि नंतर तिखट टोमणे टाकून हेटाळणीला सुरुवात केली. DD तिला जमेल तसा त्या दोघांचा प्रतिवाद करत होती. पण एका टप्प्यानंतर तिला ते जमेना. मग या चर्चेत अचानक अमोलने उडी घेतली. अविनाश आणि रमेश दोघांना त्याने गप्प केले. DD च्या NGO बद्दल आकडेवारी सकट अक्षरश: पुरावे सादर केले. मतिमंद मुलांच्या गरजा, समाजात त्यांची होणारी उपेक्षा याचे चित्र उभे केले आणि हे काम कसे उपयुक्त आहे हे पटवून दिले.अमोल या चर्चेत आल्यानंतर थोड्या वेळाने विनिताही आली आणि तीही DD च्या बाजूनं बोलू लागली. तिच्या बॉसिंग च्या पद्धती मुळे अविनाश आणि रमेश गारद झाले. पण एकूण  त्याच्या या विशेष अभ्यासाचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं . मग नाइलाजास्तव अमोलला एक 'गुपित' उघड करावे लागले. त्या NGO च्या प्रदर्शनला अमोल जाऊन आला होता. तिथे त्याला DD भेटलीही होती. (अर्थात त्याने हे सांगितलं नाही की त्या प्रदर्शनात काही कारण नसताना त्याने तब्बल ५००० रुपयांच्या वस्तूंची खरेदी केली होती.)


                                                                               ६
या सगळ्या चर्चा लागोपाठ किंवा रोज होत असं नाही. मध्ये मध्ये काही भाकड दिवस येत जेव्हा काहीच घडत नसे. Forwards पाठवायचे नाहीत या नियमावर विनिता इतकी ठाम असे की कोणी चुकून पाठवलंच तर त्याची खरडपट्टी काढायलाही ती कमी करत नसे. या अशा मधल्या, पोकळी असलेल्या दिवसांत अमोल बरोबर काहीतरी  नवे विषय काढून चर्चा घडवायचा. कधी राजकारण,कधी पुस्तक किंवा सिनेमा, कधी गाणी! कधीकधी तो वेगवेगळ्या विषयांवर quiz आयोजित करे. राजकारणावर कमीच कारण या विषयी प्रत्येकाची मतं ठाम होती आणि त्यात आदान प्रदान होण्याची शक्यता खूपच कमी होती. हे असं ग्रुपवर आधी कोणीच केलेलं नव्हतं. या उपक्रमांत म्हणूनच नावीन्य होतं. यातून त्याला वाटे की व्हॉटस् अँप  या माध्यमाच्या विविध शक्यता तो शोधू पाहतोय. सहभाग घेणारे नेहमीचेच 4-5 जण असत. याची त्याला खूप चीड येई. त्याला वाटे की तो एक जोकर आहे आणि बाकी सगळे त्याची मजा घेत आहेत किंवा जे active नव्हते ते त्याला voyeurs वाटत. अर्थात तो तसं react काहीच करत नसे.
पण या ग्रुप मुळे त्याचा बराच वेळ फोनवर जाऊ लागला.ऑफिस मध्ये तो नेहमीच ऑन लाईन असे. कोणीही काहीही ग्रुपवर टाकले तर त्यावर प्रतिक्रिया देणे हे आपले कर्तव्य आहे असेच तो समजे.  Net ऑन ठेवून तो अधेमधे घरची कामं उरके. त्याच्या बायकोचे मेसेज  बघायलाही त्याला वेळ होत नसे. तिनं त्याला अनेक वेळा सांगितलंही की या ग्रुपमुळे  तो वाहवत चाललाय. पण तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशी दोन समांतर आयुष्यं तो एकाच वेळी जगत होता. मग एकीकडे कधी मुलाला शाळेतून आण,कधी दळण टाक इ. कामं करायचा आणि ग्रुपवर मात्र सांगायचा  'back in 15 min... ' त्याच्या चर्चांमुळे ग्रुप मात्र एकदम उसळी घेई. चांगले 500-600 मेसेज एकेका सेशन मध्ये होत. लोकांना या सगळ्याचं काय वाटतं हे त्याला कळत नसे पण... 
अमोल हे सगळं enjoy करत होता हे मात्र नक्की !
या चर्चांमध्ये काही ठराविक मेंबर भाग घेत. आणि त्यातल्या काही 'मुली' बरोबर अमोलची वेव्हलेंथ चांगली जुळली. निवेदिता आणि नीलिमा, ज्या दुसऱ्या ग्रुप वरही होत्या, त्याचबरोबर DD,आराधना,शिल्पा आणि अर्थातच विनिता. गुलजार, आर डी, इजाजत, हेमिंग्वे,Jonathan Livingston Seagull, George Orwell, Thomas Friedman अशा सगळ्यांच्या समान आवडी होत्या. विनिता well read होती आणि तिची बऱ्याच गोष्टींवर मतं असायची. तिच्या बोलण्यात conviction असायचं. Divorce हा problem झाला असला तरी करिअर मध्ये settled होती. निदान outwardly तरी. कारण अमोल फारसा कधी कोणाच्या private space मध्ये गेला नाही की त्याने कधी personal chat ही केलं नाही. पण तरीही अमोलला हळूहळू जाणवू लागलं की विनिता त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली आहे.हे फक्त तो वेगवेगळ्या प्रकारे ग्रुपवर चर्चा सुरू ठेवतो याचं approval होतं असं नाही. अमोलला यात आणखी काहीतरी दडलंय असं उगाच वाटत राही. नेमकं काय ते त्याला कळणं अवघड जात होतं. तिच्या या approach बद्दल जाणूनबुजून दुर्लक्ष करायचं असं त्यानं ठरवलं .
तसे  दोन्ही ग्रुप जोरात चालले होते. नव्या ग्रुप बद्दल गॉसिप या ग्रुपवर चाले. पण इकडे काय चालतं याचा थांगपत्ता नवीन ग्रुपला नसे. यथावकाश नव्या ग्रुपचं एक गेट-टुगेदरही झालं. अमोल काही त्याला जाऊ शकला नाही. म्हणजे खूप प्रयत्न केला असता तर त्याला जमलंही असतं कदाचित. पण त्याला या virtual नात्याचा charm वैयक्तिक भेटीमुळे निघून जाईल की काय असं वाटलं. म्हणून त्याने जाणं टाळलंच ! तरीही त्या गेट टुगेदरचे फोटो आले. त्यावर मजेशीर चर्चा, थट्टा मस्करीही झाली.
एकूण असा dream run सुरू असताना एक दिवस अचानक हे घडलं -
'Jaideep....congrats for the wonderful achievement. An exhibition of your paintings in Jehangir Art Gallery! Wow! You certainly deserve it. Extremely  sorry that I couldn't  come due to some family function. But all of you seem to have enjoyed. Missed all the fun.'
या मेसेजमुळे ग्रुपवर वादळ आलं आणि सगळी वाताहत झाली . सगळं बेचिराख झालं. 

                                                                                   ७
जयदीप ! एक मनस्वी कलाकार ! अतिशय संकोची आणि मितभाषी ! त्याला जे व्यक्त करायचं असे, ते तो चित्रांच्या माध्यमातून करे. कसलाही बडेजाव नाही, कुठलाही दिखावा नाही ! नेहमीच unassuming असायचा. अमोल आणि जयदीप त्यांच्या शाळेच्या काळापासूनचे मित्र. लोकांना त्यांच्या मैत्रीचं आश्चर्य वाटे इतके वेगळे स्वभाव होते दोघांचे! अमोलच्याच आग्रहामुळे जयदीपने स्मार्ट फोन घेतला आणि काहीसा मनाविरुध्द दोन्ही ग्रुपना जॉईन झाला. इथे फारसा  active नसे. त्याच्याभोवती एक गूढ वलय  असे.शिवाय आणखी एक गोष्ट होती. तो अजूनही अविवाहित होता. हा गुण होता की दोष हे सांगणं तसं अवघडच ! पण इतरांना(विशेषत: मुली/स्त्रिया) त्याच्या बद्दल एक प्रकारचं आकर्षण वाटे. त्याच्याशी मैत्री करावी असं वाटे पण तो त्याच्याच  विश्वात असे. आणि अमोल मात्र मुद्दाम त्याची मैत्री मिरवत असे. मध्ये एकदा  मनात आलं तसा जयदीप अचानक 8-10 दिवस हिमालयात गेला. तिथं  काढलेल्या आणि त्याच्या इतर चित्रांचं प्रदर्शन जहांगीर मध्ये होतं. नेमकं त्यावेळी अमोल जाऊ शकला नाही पण जुन्या ग्रुपचे बाकीचे बरेच मित्र- मैत्रिणी आवर्जून गेले होते. त्याचे फोटो जुन्या ग्रुप वर होते. ते पाहून अमोलने उत्तर दिले. पण काय झालं , कसं झालं याचं उत्तर अजूनही त्याच्याकडे नाही. जे उत्तर जुन्या ग्रुपवर पोस्ट करायला हवे होतं ते नेमकं या नव्या ग्रुपवर गेलं ! आणि हेही त्याच्या लगेच लक्षात आलंच नाही. पण विनिताचं ग्रुप वर बारीक लक्ष कायमच असायचं. तिने जेव्हा अमोलला त्याच्या उत्तराबद्दल विचारले तेव्हा त्याला झालेला गोंधळ लक्षात आला. काही काळ त्याने काहीच कॉमेंट केली नाही. पण विनिता वेगवेगळ्या प्रकारे त्याला विचारत राहिली. शेवटी अमोलला झालेला प्रकार सांगावा लागला. चित्र प्रदर्शन...  ते इतरांचं तिथे जाणं...  ते त्यांचा वेगळा ग्रुप असणं. सगळं काही ! यातल्या नेमक्या कुठल्या गोष्टीचा विनिताला त्रास झाला हे त्याला त्यावेळी  कळलं नाही पण अमोलचं सगळं ऐकून घेतल्यावर थोड्यावेळाने तिने एक त्रोटक कॉमेंट टाकली -
'I am leaving this group. The group which I formed. I sincerely believed that we were all friends. But it seems that was not the case. Thanks all.'

                                                                                   ८
स्वतः च काढलेल्या ग्रुपमधून विनिता अशी तडकाफडकी एक्झिट घेईल हे सगळ्यांना  फारच अनपेक्षित होतं. अमोलला तर जबरदस्त धक्काच बसला. तो एकदम सुन्न झाला. नेमकं काय झालंय आणि त्यावर कसं react करायचं हे त्याला कळेनासं झालं. आपल्यामुळे हे सगळं झालं याचा त्याला guilt आला आणि एवढा चांगला चाललेला ग्रुप आता संपणार की काय या विचारांनी तो अस्वस्थ झाला. पण जुन्या ग्रुपवर एवढी अस्वस्थता नव्हती.  बाकीच्यांच्या दृष्टीने विनिताचा सगळा निव्वळ पोरकटपणा होता आणि त्याकडे दुर्लक्ष करावं असं सर्वसाधारण मत होतं. अमोलने मात्र हा सल्ला ऐकला नाही आणि ग्रुपवर व personal chat मध्ये त्याने विनिताची माफी मागितली. ती आधी काहीच बोलेना. पण एकदा बोलायला लागल्यावर अमोलला तिनं उभा आडवा सोलला.इतर सगळे सोडून अमोललाच टार्गेट केलं. अमोलला तर सौदी अरेबिया मध्ये कसं गुन्हेगाराला भर चौकात चाबकाने फटकारतात तसं वाटलं. काही दिवसांपूर्वीची विनिता आणि आताची विनिता यात जमीन अस्मानाचा फरक होता. हे असं का व्हावं ? केवळ तिच्या नकळत सगळे भेटले म्हणून? की अमोल आणि इतरांचा वेगळा ग्रुप होता,ज्याबद्दल तिला याआधी काही माहित नव्हतं म्हणून? हे पटण्यासारखं नव्हतं. कारण ती स्वतः इतर अनेक ग्रुप्सवर होती. हे त्याला निवेदिताने सांगितलं होतं.याच्यापेक्षा काही वेगळी कारणं असणार असं अमोलला वाटू लागलं. इथे तिचा भडका कमी व्हायचं नावच घेईना. अमोलला वाटू लागलं की जरी ती त्याला उद्देशून बोलत असली तरी जे काही बोलत होती ते, ती त्याच्या करवी, इतर कोणासाठी तरी सांगत होती .मग अमोलची ट्यूब एकदम पेटली! तिचा सगळा रोख जयदीपवर होता! आणि मग अचानक अमोलला त्याच्या आणि जयदीप मधल्या एका व्हॉटस् अँप  संवादाची आठवण झाली. एकदा जयदीपने रागाचे emoticon वापरून अमोलला विचारलं होतं -'अरे ही विनिता अशीच आहे का? हे सगळं जरा वेगळ्या लेव्हलला जातंय !' अमोलने मात्र जयदीपचं हे बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. तो आपला त्याच्याच विश्वात होता. आता मात्र त्याला विनिताच्या या सगळ्या चिडचिडीची सुसंगतीही लागली. घडलेल्या प्रसंगात  त्याच्याकडून तिला नाकारलेपणाची भावना जाणवली असावी. जयदीप आणि विनिता ! हा एक अव्यक्त कोन ! अमोलच्या हे लक्षातच आलं नव्हतं. विनिताला  राग जयदीपवर काढणे शक्य न झाल्यामुळे ती अमोलचा जमेल तेवढा पाणउतारा करत होती. अमोल आणि विनिताच्या बोलण्याचा सारांश तो नव्या ग्रुपवर टाकत होता. अर्थात ती तिखट धार कमी करून ! पण आश्चर्य म्हणजे एरवी त्याच्या सर्व चर्चांमध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या त्याच्या नव्या मैत्रिणी आता मात्र मूग गिळून गप्प होत्या. एक आराधनाच तेवढी बोलत होती. बाकी कोण काय म्हणतंय याच्याशी अमोलला कर्तव्य नव्हतं. तो वाट बघत होता DD यावर काय बोलते याची ! पण DD ने बराच वेळ काहीच न बोलण्याचे धोरण ठेवलं .आणि नंतर काहीतरी गुळमुळीत बोलली ज्यातून तिनं अप्रत्यक्षपणे अमोलचंच  चुकल्याचं सुचवलं. अमोल एकदम अवाक झाला. गंमत म्हणजे ज्या जयदीपला उद्देशून हे सगळं झालं तो मात्र या चर्चेत कुठेच नव्हता. त्याचा तर फोनही बंद होता. विनिताला खूप जणांनी ग्रुपवर परतण्याची वेगवेगळ्या प्रकारे विनंती केली. पण ती काही  ऐकेचना.
शेवटी यावर काही उपाय नाही म्हणून शांत रहावं असं सगळ्यांनी ठरवलं. वादळानंतरची ती एक अस्वस्थ शांतता होती. ग्रुपवर काहीच हालचाल होत नव्हती. हा ग्रुप आता जवळजवळ नाहीच अशी सगळ्यांना सवय होऊ लागली. अनेक चांगल्या शक्यतांचा असा अचानक अंत झाला.
आणि एक दिवस अनपेक्षितपणे ... जशी ती गायब झाली होती तशीच विनिता ग्रुपवर एकदम प्रकटली! थोडीशी subdued होती पण तरीही जणू काही घडलंच नाही असं बोलू लागली. पण मधल्या घटनेचा खूपच परिणाम झाला होता. कितीही वाटलं तरी सगळं पूर्वीसारखं होणं शक्य नव्हतं. ग्रुपची सगळी जान त्या प्रसंगानंतर निघून गेली.आणि ती ग्रुपवर परतली हे कळल्यावर अचानक अमोलने आपले व्हॉटस् अँप  अकौंटच बंद करून टाकले. 
                                                                     (समाप्त)