Tuesday 15 November 2016

'पोस्टमेन इन द माउंटन्स' : मनात वस्तीला आलेला सिनेमा !



'पोस्टमेन इन द माउंटन्स' हा मँडरिन भाषेतला १९९९ सालचा सिनेमा ! म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वीचा ! त्यावर बऱ्याच जणांनी लिहिलंही आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी त्यांच्या 'साप्ताहिक साधना' मधल्या - 'पडद्यावरचे विश्वभान' या सदरात या सिनेमावर सुंदर लेख लिहिला होता. मी मात्र हा सिनेमा नुकताच पाहिला.(आमच्यापर्यंत कुठलीही क्रांती पोचायला तसा उशीरच होतो !) त्यावर आता मी आणखी वेगळं (आणि सिनेमा येऊन इतकी वर्षं झालेली असताना) काय लिहिणार ? पण या सिनेमाने मनात अक्षरश: घर केलं आणि लिहिल्याशिवाय मला राहावलं नाही. म्हणून हे टिपण !

या सिनेमात खून, हाणामाऱ्या, चोरी- डाका, अत्याचार, हेराफेरी, अफरातफरी, कट-कारस्थानं  असलं नाटयमय काहीही नाही. बॉलीवूड सिनेमांत असतात तशी गाणीही नाहीत. आणि तरीही तो एक उत्कृष्ठ सिनेमा आहे. त्याची गोष्टही तशी साधीच. चीन मधल्या एका प्रांतात एका पोस्टमनला पायदुखीमुळे सक्तीची निवृत्ती घ्यावी लागते. त्याच्या जागी त्याचाच मुलगा कामावर रुजू होतो. मुलाला सगळं काम समजावून सांगण्यासाठी वडील शेवटचं म्हणून त्याच्याबरोबर त्या प्रांतात जातात. या तब्बल २२३ किलोमीटरच्या पायपिटीच्या दरम्यान घडणारे प्रसंग आणि त्यातून वडील आणि मुलगा यांचं उलगडत जाणारं नातं हाच या सिनेमाचा गाभा!

हा संपूर्ण प्रवास होतो तो अतिशय हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत! भातशेती,चहाचे मळे, बांबूची वने, डोंगर-दऱ्या, नदीचा शांत प्रवाह अशा कॅनव्हासवर हा नेत्रसुखद सिनेमा घडतो. ही सगळी वाट दूरची आहे, गावागावांमधून जाणारी आहे, पण कष्टाची आहे.  वाट अवघड आहे, काही ठिकाणी तर अतिशय खडतर आहे पण निसर्ग रौद्र नाही. सतत त्या दोघांची साथ करणारा आहे.

सिनेमातले मला आवडलेले प्रसंग-
१) घरातून वडील, पाठीवर टपालाची जड बॅग घेतलेला मुलगा आणि त्यांच्याबरोबर वडिलांच्या नेहमीच बरोबर राहणारा त्यांचा इमानी कुत्रा लाओ असे तिघे निघतात. खरं तर मुलाला वाटत असतं की पाय दुखत असताना वडिलांनी त्याच्याबरोबर येऊ नये. पण वडील त्याला त्याची जबाबदारी समजावून सांगायला येतात. त्यात कुत्रा पण बरोबर असणं मुलाला पटत नाही . पण वडील सांगतात की  ते जिथे जिथे जातात तिथे त्याच्या भुंकण्याने लोकांना वर्दी मिळते की  पोस्टमन आला आहे. काहीशा अनिच्छेने मुलगा लाओला घेऊन जायला तयार होतो. तिघांचा प्रवास सुरू होतो. डोंगराची चढण सुरू होते. पाठीवर जड बॅग असल्यामुळे मुलाला सुरवातीला चढण चढणे अवघड जाते. समोरून येणाऱ्या लोकांना वाट देण्यात तो अडखळतो. वडील त्याला त्याबद्दल समजावून सांगतात- जे त्याला अर्थातच आवडत नाही. पुढे गेल्यावर मुलगा एके ठिकाणी थांबतो. मागून वडील येत आहेत असं त्याला वाटतं. पण बराच वेळ झाला तरी ते येत नाहीत. बॅग तिथेच ठेवून तो त्यांना शोधायला परत फिरतो. थोडा मागे गेल्यावर त्याला ते आणि लाओ दिसतात. पण वडील मात्र त्याला रागावून विचारतात की बॅग कुठे आहे? बॅग सुरक्षित असते पण या प्रसंगातून वडिलांची त्यांच्या कामाबद्दलची निष्ठा दिसून येते. आणखी एका छोट्याशा प्रसंगातूनही ती दिसते. ते तिघे दमून एका झोपडी वजा घरात विश्रांती घेत असतात. वडील पाय दुखतो म्हणून चक्क स्वत:च पायावर हलकेच बुक्का मारत असतात. अचानक जोराचा वारा येतो आणि त्या टपालाच्या बॅगेतली पत्रं वाऱ्याने उडून जाऊ लागतात. हे दिसताच वडील आपल्या पायाच्या दुखण्याचा विचार न करता अक्षरश: धावत जातात आणि ती पत्रं गोळा करतात.

२) सिनेमात वडील आणि मुलाचे नाते उलगडत जाते. काही वेळा फ्लॅशबॅक तंत्राने तर काही वेळा या प्रवासादरम्यान घडणाऱ्या प्रसंगांमधून! वडील सतत घराबाहेर राहिलेले! महिन्यातून फक्त एकदाच घरी येणारे! त्यामुळे मुलगा आणि वडील यांच्यात फारसे काही नाते निर्माण होऊच शकलेले नसते. मुलाच्या मनात कायम त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती! त्यांच्या जायच्या आणि यायच्या वेळी मुलगा आणि आई घराबाहेर उभे राहून त्यांची वाट पाहणार वा त्यांना मूक निरोप देणार! दोघांमध्ये एक प्रकारचे अदृश्य अंतर ! आणि तरीही मुलगा वडिलांचेच काम निवडतो. यात माझ्यामते त्याच्या आईने बजावलेली buffer/catalyst ची भूमिकाही तेव्हढीच महत्त्वाची असणार ! तिने दोघांचे नाते सांधायचा प्रयत्न केला असणार. म्हणूनच मुलाच्या मनात वडिलांविषयी राग नाही. मुलाला आपल्या आईचा एकटेपणा माहीत आहे कारण तो तिच्याजवळच राहिला/वाढला आहे. पण आपले वडील कसे आहेत हे समजण्याएवढा त्यांचा सहवासही त्याला मिळालेला नाही.  हा सध्याचा प्रवास करता करता मात्र आपले वडील कोणत्या खडतर परिस्थितीत कशा प्रकारे काम करत होते हे त्याला उमगू लागते.पोस्टमन म्हणून त्यांनी फक्त टपाल वाटणे एवढेच रूक्ष काम केलेले नसते. तर तो गावोगावच्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालेला असतो. एक अंध आजी त्याच्या येण्याच्या दिवशी घराच्या दारात त्याची वाट बघता असते. कारण तिच्या नातवाचे पत्र हा घेऊन येणार हे तिला माहीत असते. शिवाय पैसेही ! पैसे तर आलेले असतात पण पत्र मात्र नसते. तिला वाईट वाटू नये म्हणून वडील नातवाचे पत्र म्हणून कोरा कागदच वाचतात. मुलाला आधी काही लक्षातच येत नाही. पण थोडंसं वाचल्यावर वडील मुलाला पुढचं वाच असं सांगतात. मुलगा वेळ निभावून नेतो.
३) वडील जिथे जातील तिथल्या लोकांना आता यापुढे त्यांचा मुलगा त्यांचं काम करायला येईल हे सांगतात. तेव्हा गावातल्या लोकांच्या कौतुकमिश्रित नजरा, त्यांचं निरागस हसणं वडिलांनी आजपर्यंत जोडलेल्या संबंधांची पावतीच दर्शवतात.
४) एकमेकांच्या सहवासामुळे दोघांमधले अंतर कमी होऊ लागते. मुलगा सहजपणे वडिलांना 'पा' म्हणून जातो. आपला मुलगा आपल्याला पा म्हणाला याचा वडिलांना विलक्षण आनंद होतो. ते लाओ कुत्र्याला म्हणतात- 'ऐकलंस का लाओ? माझा मुलगा मला 'पा' म्हणाला !'
५) वाटेत एका ठिकाणी नदी लागते. ती चालत ओलांडून पुढे जायचं असतं. पाणी खूप गार असतं. वडिलांचे पाय दुखतील म्हणून तो त्यांना पाण्यात उतरू नका असं सांगतो. आधी बॅग घेऊन मुलगा एक फेरी करतो. आणि परत येऊन वडिलांना चक्क पाठीवर घेतो आणि नदी ओलांडू लागतो. मुलाच्या मनात आनंद दाटलेला असतो कारण त्याच्या गावाकडची माणसं म्हणत -मुलगा मोठा केव्हा होतो? जेव्हा तो आपल्या वडिलांना पाठीवर घेऊन जाऊ शकतो तेव्हा ! म्हणजे आपण आता मोठे झालो याचा आनंद मुलाला होतो. त्याचवेळी वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कदाचित संमिश्र भावनांनी ! मुलगा मोठा झाला याचा आनंद, आपण आता या रस्त्याने परत येणार नाही आणि आपलं आता वय झालं याचं दु:खही !

६) सिनेमात लाओ कुत्रा हे पण एक महत्त्वाचं पात्र आहे. वडील-मुलगा यांच्या संपूर्ण प्रवासात हा एक मूक साथीदार त्यांच्याबरोबर आहे. त्याच्या भुंकण्याने गावाला समजतं की पोस्टमन आला आहे. एका ठिकाणी ते येतात तर एक उंच कडा लागतो. तो चढून गेल्यावरच पुढचं गाव येणार असतं. लाओ भुंकतो आणि अचानक कड्यावरून एक मोठी दोरी खाली फेकली जाते.तिच्या साहाय्याने रॉक  क्लाइंबिंग करून दोघे वर येतात. ती दोरी त्या गावातल्या एका तरुणाने फेकलेली असते. हा जणू त्यांचा नेहमीचा शिरस्ताच असावा !
७) सिनेमाचा शेवट खूपच सुंदर आहे. सगळा प्रवास करून दोघे घरी परत येतात. नंतर पुन्हा जायची वेळ येते तेव्हा मुलगा एकटा बॅग घेऊन निघतो. वडील दारात बसलेले असतात. आधीच्या प्रवासातला अनुभव गाठीला असल्यामुळे मुलगा आत्मविश्वासाने झपझप पावले टाकत चालू लागतो. वडिलांकडे तो मागे वळून बघतही नाही. लाओ गोंधळून जातो. मुलाबरोबर जावं की वडिलांबरोबर थांबावं हे त्याला समजत नाही. तो घुटमळून वडिलांपाशी येतो. वडिलांचं लक्ष मुलाकडे असतं. आपलं काम मुलगा नीट सांभाळेल याची खात्री, मुलाबद्दलचे कौतुक हे भाव तसंच लाओच्या आजपर्यंतच्या साथी  बद्दलची कृतज्ञता ही त्याच्या चेहऱ्यावर दिसते. मुलाबरोबर आपण जाऊ शकणार नाही पण आपला विश्वासू साथीदार त्याची तशीच साथ करेल म्हणून तो लाओला कुरवाळतो आणि मुलगा जातो त्या दिशेने लाओला पाठवतो!

तर असा हा नितांतसुंदर सिनेमा ! या सिनेमात वडिलांची भूमिका केली आहे तेन रुजून यांनी तर मुलाचे काम लिऊ ये ने ! दोघांचीही कामे अतिशय सुरेख आणि नैसर्गिक !
या सिनेमाच्या ट्रेलर ची लिंक इथे देत आहे. A must see movie...
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjEg9SovarQAhUFMY8KHT3KC3MQtwIIKDAC&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DI-5jtrc3vvo&usg=AFQjCNG28hTxxmTb4-j2LhUx6kriJmmG4w&sig2=8bok2cnOTs9Tseil357YJw




5 comments:

Mugdha said...

आधी वाचला होता हा ब्लॉग पण आज पुन्हा वाचताना छान वाटलं... जणू सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले इतकं छान लिहिलं आहे! त्या वेळेला वाचल्यावर राहिला सिनेमा बघायचा... आता नक्की बघेन...

अमर said...

रसाळ लिखाणामुळे पहावासा वाटतोय. नक्की पाहीन

Shreepad SM Gandhi said...

असला नितांतसुंदर सिनेमा आहे हेच ज्ञात नव्हतं...बघायची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे...धन्यवाद

Unknown said...

Film nakki baghen..

Rajesh Pusalkar said...

Thank you Mugdha, Dr. Amar Powar, Shreepad and ?Unknown for reading my blog and posting your comment here. The movie is available on Youtube. But it may not have subtitles. However, for such movies, language is not a barrier at all.