Tuesday 29 January 2019

'पर्याय' २०१७: सिनेमा ‘वयात’ येताना...


('पर्याय' या होमिओपॅथी विषयक दिवाळी अंकातील माझा एक लेख)

'राजा हरिश्चंद्रहा दादासाहेब फाळके यांनी केलेला मूकपट 1913 साली आला आणि भारतीय चित्रपट जन्माला आला. त्यानंतर 1931 सालीआलम आराहा चित्रपट आला आणि सिनेमाबोलूलागला. पण सिनेमा वयात केव्हा आला? म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तो प्रगत झाला, कृष्ण-धवलचा रंगीत झाला, सिनेमास्कोप झाला वगैरे हे तर काळानुरूप झालंच.परंतु सिनेमा जे कथानक आपल्यापर्यंत पोचवत असतो त्याचं काय? प्रत्येक वयोगटाचा विचार करून असे किती सिनेमे निर्माण केले गेले? विशेषतः तरुणांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय, त्यांचे प्रश्न, त्यांच्यातले नातेसंबंध-मैत्री, प्रेम इ. त्यांच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्नं हे सगळं केंद्रस्थानी असलेले सिनेमे अलिकडेच बघायला मिळतात. म्हणजे फार तर गेल्या 30-40 वर्षांत! मी हे अर्थातच हिंदी सिनेमाच्या बाबतीत म्हणतोय. पण त्याआधीच्या मोठ्या काळाचं काय? जो काळ हिंदी चित्रपटसृष्टीचं सुवर्णयुग मानला गेला त्याकाळी मात्र तरुण आणि तारुण्य हा विषय अभावानेच दिसायचा. त्याची वेगवेगळी कारणं असावीत असं वाटतं. स्वातंत्र्योत्तर काळ हा तसा भाबडा आशावादाचा काळ होता. आताच्या तुलनेत तर तो काळ अगदी निष्पाप, निरागस म्हटला पाहिजे! तेव्हाचे सिनेमाचे विषय जास्त ध्येयवादी, सामाजिक, कौटुंबिक धाटणीचे होते. मांडणीत साधेपणा होता. त्यामुळे उत्फुल्ल तारुण्याचं कथानक मागेच पडलं असावं.
त्यावेळचे नायक तरी बघा ना कसे होते! त्याकाळच्या टॉप तीनही नायकांच्या (राजकपूर-दिलीपकुमार-देव आनंद) ऐन बहरातले सिनेमे जरी आपण पाहिले तरी त्यापैकी कोणीही कॉलेज-गोइंग तरुण वाटणार नाही. आठवून बघा- राजकपूर... त्याचे सिनेमे... दिलीपकुमार... त्याचे सिनेमे... या तिघांमधला त्यातल्या त्यात चॉकलेट हिरो देव आनंद- त्याचेही 16-24 या वयोगटातल्या नायकाचे  सिनेमे आलेच नाहीत! थोडक्यात हे सगळेच या तरुणपणाच्या भूमिका करण्याच्या वयाचे नव्हतेच! आणि सिनेमे तर त्यांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिले जात. त्यामुळे एक आख्खी पिढी सिनेमाद्वारे तारुण्य-सुलभ स्वप्नरंजन करण्यापासून मुकली. इतरही नट आठवून पाहा. अगदी राजकुमार पासून मनोजकुमार पर्यंत किंवा सुनीलदत्त पासून धर्मेंद्र पर्यंत! सगळेच थोराड दिसायचे. अगदी 1957 सालच्याप्यासासारख्या क्लासिक सिनेमाचं उदाहरण घ्या. त्यातला नायक विजय (गुरुदत्त) आणि नायिका मीना (माला सिन्हा) यांचं प्रेम कसं जुळतं हे फ्लॅशबॅक मधून आपल्याला कळतं. त्यावेळी गुरुदत्त आणि माला सिन्हा दोघेही कॉलेजमध्ये जाणारे दाखवले आहेत. दोघे सायकलवर फिरून गाणं म्हणतात, बॅडमिंटन खेळतात वगैरे. पण दोघेही त्या वयाचे अजिबात दिसत नाहीत. भरीत भर त्यांची वर्गमैत्रीण टुन टुन दाखवली आहे! म्हणजे तर पुढे काही बोलायची सोयच नाही!

तरुणांचा लाडका शम्मीकपूर सिनेमात आला आणि त्याने हिरो या संकल्पनेत खूप बदल घडवून आणले. त्याच्यातल्या प्रचंड एनर्जीमुळे एका जागी खांबासारखे स्थिर उभे राहणारे नायक त्याने हद्दपार केले. त्याच्या अंग घुसळून टाकणाऱ्या नाचण्याच्या स्टाईलने चित्रपटसृष्टी अगदी हलवून टाकली. भाबडेपणा, रडेपणा आणि सच्चेपणा या तीन साच्यांभोवती फिरणाऱ्या नायकांपेक्षा थोडे वेगळे नायक त्याने रंगवले. नायिकेलापटवणंआणि हे करत असताना वेगवेगळ्या ट्रिक्स वापरणं (वेषांतर वगैरे), समाजमान्य चौकटीत राहून तिची छेडखानी करणं, त्याच्यातलं एक शरारती, नटखट मूल हे सगळं त्याकाळच्या लोकांना आवडलं. आणि शम्मीकपूर तरुण आणि तरुणी दोघांच्याही गळ्यातला ताईत बनला.
पण शम्मीकपूर हा त्यावेळचा अपवादच म्हणायचा! बाकी बरेचसे नट आपल्या राजेंद्रकुमारच्या पठडीतले! तरी एका गोष्टीसाठी राजेंद्रकुमारला दाद दिलीच पाहिजे! त्याने एक नाही तर चक्क दोन वेळा कॉलेजकुमारची भूमिका निभावली! एकधूल का फूलसिनेमात तर दुसरीमेरे मेहबूबमध्ये (हो... तोच तो सिनेमा ज्यात नायक-नायिकेने कॉलेजमध्ये एकमेकांना धडकणं, पुस्तकं खाली पडणं आणि त्यातून दोघांनी प्रेमात पडणं वगैरे होतं!)

इतका वेळ आपण फक्त नायकांचा विचार करतोय. नायिकांचं काय? मला वाटतं की त्यावेळी (खरं तर आताही परिस्थिती खूप काही वेगळी नाही) भारतीय समाजावर पुरुषी वर्चस्वाचा, पितृसत्ताक पद्धतीचा तसंच सरंजामशाहीचाही पगडा होता. त्याचंच प्रतिबिंब सिनेमांवरही दिसून येतं. काही सन्माननीय अपवाद सोडल्यास बहुतांशी नायिकांचं (नायकांच्या तुलनेत) सिनेमातलं स्थान तसं डावंच असायचं. नायिकेनं षोडशवर्षीय असावं, आखीव रेखीव असावं, गोरीगोमटी दिसावं, शालीन-सुस्वभावी- संस्कारी असावं, बंडखोर नसावं (आणि हो गृहकृत्यदक्ष मात्र असावं) या मात्र अपेक्षा असायच्याच! या घालून दिलेल्या चौकटीत राहून जे काही करता येईल ते करण्याची मुभा नायिकांना होती. मग यातच तिने अवखळपणा दाखवावा, प्रेमळ रुसवे-फुगवे करावेत, नाच-गाणी करावीत. सगळं करावं, पण चौकट मात्र मोडू नये. कित्येक सिनेमांत अल्लड नायिका दाखवतात. तिचं लहानपण संपून तिने यौवनात पदार्पण केलंय हे तिची मन:स्थिती सांगणाऱ्या गाण्यांवरून आपल्याला कळतं. उदा- 'सपने सुहाने लडकपन के' ('बीस साल बाद'-वहिदा रहमान) किंवा 'भाई बत्तुर' ('पडोसन'-सायराबानू) पण यांच्या स्वप्नातले राजकुमार म्हणजेच नायक कोण? तर विश्वजीत ('बीस साल बाद') आणि सुनील दत्त ('पडोसन')!

हा नायिकांवर भयंकर मोठा (सर्वार्थाने) अन्यायच आहे! म्हणजे आम्ही कसेही दिसणार आणि असणार (म्हणजे अर्थातच नायक), पण तुम्ही (म्हणजे नायिका)  मात्र आम्हांला (म्हणजे पुन्हा नायक!) हव्या तशाच असलं पाहिजे असंच जणू ते सांगू पाहतात!

1970 ते 1980 या दशकात मात्र हळूहळू हे चित्र बदलू लागलं. दशकाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच 1971 साली एक सिनेमा आला-'गुड्डी'!दिग्दर्शक होते हृषीकेश मुखर्जी आणि प्रमुख भूमिका होत्या जया भादुरी, उत्पल दत्त आणि धर्मेंद्र यांच्या! यात कुसुम उर्फ गुड्डी(जया भादुरी)ला तिच्या वयानुरूप सिनेमे बघण्याची खूप आवड असते. पौगंडावस्थेमधल्या गुड्डीचं अभिनेता धर्मेंद्र (’गुड्डीमध्ये धर्मेंद्रने स्वत:चीच भूमिका केली होती) वर क्रश असतो. हे ही तसं या वयाला साजेसंच
https://www.youtube.com/watch?v=nP9AInL_8Q8
पण गुड्डीचं सिनेमा आणि विशेषतः धर्मेंद्रवरचं प्रेम जरा टोकाचंच असतं. अगदी फँटसीच्या पातळीपर्यंत! तिच्या या आभासी जगात ती इतकी मश्गुल असते की प्रत्यक्षात जेव्हा तिला तिच्या वहिनीचा भाऊ नवीन (समित भांजा) लग्नाबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला सांगून टाकते की ती हे लग्न करू शकणार नाही कारण तिचं चक्क धर्मेंद्रवर प्रेम आहे. सिनेमाच्या पुढच्या भागात नवीन आणि त्याचे सायकॉलॉजिस्ट मामा (उत्पल दत्त) गुड्डीला हळूहळू त्या आभासी जगापासून वास्तवाकडे नेतात. ते ही प्रत्यक्ष धर्मेंद्रच्या मदतीने! सिनेमाचं जग आणि प्रत्यक्षातलं जग यातला फरक गुड्डीला छोट्या छोट्या प्रसंगांमधून कळू लागतो. सिनेमाच्या पडद्यामागचं जग हे तसं कंटाळवाणं, सिनेमाचं शूटिंग अतिशय मेहनतीचं, प्रसंगी धाडसाचं असतं. नट-नट्या या प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांसारखेच असतात हे कळल्यावर गुड्डीचं मत बदलतं आणि मग ती नवीनशी लग्न करायला तयार होते. गुड्डी सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे गुड्डीची समजूत घालणं, तिचं मतपरिवर्तन घडवून आणणं हे सगळं मामाजी अतिशय खेळकरपणे, तरीही संवेदनशीलतेने हाताळतात. कुठे धाकदपटशा नाही की जुलूम जबरदस्ती नाही. पौगंडावस्थेत गुड्डीच्या मनात येतात तसे रोमँटिक विचार येऊ शकतात हे स्वीकारून त्यावर तिच्या कलाने घेत ते मार्ग काढतात.

70च्या दशकात आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक कलाकार अवतीर्ण झाला आणि त्याने तोपर्यंतच्या चित्रपटसृष्टीवर आलेली ग्लानि, सुस्ती मरगळ पूर्णपणे झटकून टाकली.आणि त्याने खऱ्या अर्थाने सिनेमाला वयात आणलं. तो कलाकार म्हणजे ऋषी कपूर! वडील राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्यामेरा नाम जोकरया सिनेमात ऋषी कपूरने बाल कलाकार
(लहानपणीचा राजू) म्हणून काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होतीच. त्यात पौगंडावस्थेमधला राजू त्याच्याहून वयाने मोठ्या असलेल्या  शिक्षिकेच्या (सिमी गरेवाल) प्रेमात पडतो आणि ती शिक्षिका त्याचं प्रेम आणि त्याला समजून घेते असं दाखवलंय. पुढे शिक्षिकेच्या लग्नाला राजू जातो आणि (आपलं प्रेमभंगाचं दुःख विसरून) सगळ्यांना हसवतो. इथेच त्याच्या जोकर बनण्याची सुरुवात होते.
1973 साली राज कपूर यांनीबॉबीसिनेमा दिग्दर्शित केला आणि त्याद्वारे एक adolescent लव्ह स्टोरी सादर केली. हिरो म्हणून ऋषी कपूरचा पहिलाच सिनेमा, डिंपल कपाडिया ही पदार्पण करणारी
अभिनेत्री-असे हे फ्रेश चेहरे, नवं संगीत असं वेगळेपण सिनेमात होतं. पहिल्या भेटीत नजरानजर होणं, त्यानंतरच्या भेटीत प्रेम जमणं, प्रेमात शारीरिक ओढ असणं, घरच्यांचा प्रेमाला विरोध आहे हे कळून देखील प्रेमाच्या उसळत्या भावनांना काबूत ठेवता न येणं, घरच्यांशी संघर्ष करणं, त्यामुळेच परिणामांची तमा न बाळगता दोघांनी घरातून पळून जाणं आणि शेवटी घरच्यांनी या प्रेमाला मान्यता देणं अशाप्रकारे या सिनेमाचा प्रवास होतो. कथानक पौगंडावस्थेमधलं आणि नायक- नायिकाही त्याच वयाचे त्यामुळे प्रेक्षकांनाबॉबीएकदम रिफ्रेशिंग वाटला. दिसायला चिकणा, अभिनयात आणि देहबोलीत विलक्षण नैसर्गिक सहजता असणारा आणि उत्तम नाचू शकणारा असा सर्वगुणसंपन्न नायक ऋषी कपूरच्या रूपाने  बॉबी  दिसला आणि पब्लिकने त्याला डोक्यावर घेतलं. त्याच्या नाचण्याची एक वेगळीच शैली होती. त्यातून हे दिसायचं की तो नाचणं मस्त एन्जॉय करतोय आणिनाचणं हे खूप काही अवघड नाही, तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हांलाही ते जमेलअसंच जणू तो त्याच्या नाचातून सांगू पाहायचा! मुलींना आधीच्या काळातल्या थोराड नायकांच्या मानाने या देखण्या ऋषी कपूरच्या रूपाने स्वप्नातला राजकुमारच मिळाला!
बॉबीच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला एक फॉर्म्युला सापडला. एकबॉबीहिट झाल्यामुळे त्याच पठडीतले अनेक सिनेमे निघाले. ती मालिका तशी अजूनही सुरूच आहे. यातला मुख्य भाग म्हणजे घरच्यांची भिन्न संस्कृती किंवा दोन घराण्यांमधलं वैर असणं. नवोदित चेहरे घेऊन सिनेमे काढण्याचीही  लाट आली (उदा- ’लव्ह स्टोरी’-कुमार गौरव-विजयता पंडित किंवाबेताब’- सनी देओल-अमृता सिंग) श्रीमंत मुलगी (माधुरी दीक्षित) ’गरीबमुलगा (आमीर खान) यांची प्रेम कहाणी- ’दिल’, दोन घराण्यांमध्ये वैर असलेल्या मुलगा आणि मुलगी यांची प्रेमकहाणी- ’कयामत से कयामत तक. भिन्न प्रांतांमधल्या, भिन्न भाषा आणि संस्कृती मधल्या मुलांची प्रेमकथा (’एक दुजे के लिए’ .)  

बॉबीनंतर ऋषी कपूरचे अनेक सिनेमे आले. कॉलेज जीवनावर आधारित ऋषी कपूर-नीतू सिंग या हिट जोडीचा एक चित्रपट होता-’खेल खेल में’. यात कॉलेज जीवन, हॉस्टेल मधल्या गमती जमती यावर आधारित प्रसंग होतेच, शिवाय मित्रा-मित्रांनी हसत खेळत काढलेली एक खोडी किती महागात
पडते याचं एक रहस्यमय वळणही होतं.
ऋषी कपूरच्याच काळात आणखी एक नट (तोही मराठमोळा!) उदयास आला. त्यानेही बालकलाकार म्हणून आधी नाव मिळवलं आणि मग हिरोच्या भूमिका केल्या. तो नट म्हणजे सचिन पिळगांवकर! लहान चणीचा, निरागस चेहरा लाभलेल्या या नटाने रंजिता या नटीबरोबर एक सिनेमा केला होता- ’अखियों के झरोकोसे’. हा सिनेमा अमेरिकन लेखक एरिक सीगलच्यालव्ह स्टोरीया कादंबरीवर आधारित होता. कॉलेजच्या काळात फुलणाऱ्या रोमान्सने सुरू होणारा हा सिनेमा एक शोकात्म वळण घेतो- नायिकेच्या दुर्धर आजाराचं! सचिनने तरुणपणीच्या आणखीही काही भूमिका साकारल्या. (उदा- ’बालिका बधू’, ’गीत गाता चल’, ’कॉलेज गर्ल.)

1974 साली अजून एक ट्रेंडसेटर सिनेमा आला- ’इम्तिहान’! विनोद खन्ना, तनुजा आणि बिंदू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा इ. एम. ब्राथवेट या इंग्रजी लेखकाच्या ’To Sir With Love’ या कादंबरीवर आधारित होता. अर्थात मूळ कादंबरी खूप सरस होती. हा सिनेमा तसा अतिरंजितच होता. सिनेमाचा गाभा हाच होता की एक आदर्शवादी शिक्षक (विनोद खन्ना) एका कॉलेज मध्ये रूजू झाल्यानंतर बेशिस्त, टवाळखोर आणि टग्या मुलांमध्ये सुधारणा घडवून आणतो. विद्यार्थ्यांशी मैत्रीने वागून, त्यांना बरोबरीची वागणूक देऊन तो हे करतो. अशा शिक्षक-विद्यार्थी यांच्या नातेसंबंधांवर पुढेही काही सिनेमे आले. उदा- 1993 सालचा महेश भट दिग्दर्शितसर’ 2005 सालचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शितब्लॅकनागेश कुकुनूरचाइक्बालआमिर खानचातारें जमीन पर. पण याची सुरुवात मात्रइम्तिहानने झाली असं म्हणता येऊ शकेल.
पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये अनिर्बंध ऊर्जा असते आणि म्हणूनच तिचा वापर खेळामध्ये करता येऊ शकतो. खेळ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हिंदीत काही सिनेमे आले. त्यात 1992 सालचा आमीर खानच्याजो जीता वोही सिकंदरचा उल्लेख करावा लागेल. मन्सूर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे तसे वेगवेगळे पदर आहेत. त्यातला एक धागा आहे एकाच शहरामधल्या कॉलेजांमध्ये आर्थिक स्तरामुळे होणारी विभागणी आणि त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेलं तेढ! दुसरा पदर आहे पौगंडावस्थेमधला
संजू (आमीर खान) आणि त्याचे मित्र थोडेसे बेफिकीर, थोडेसे मस्तीखोर, थोडेसे वाया गेलेले देखील असतात! यातच संजूला वाटणारं देविका (पूजा बेदी) बद्दल आकर्षण आणि त्याच वेळी संजूच्याच मित्रांच्या ग्रुप मधल्या अंजलीला (आयेशा जुल्का) संजूबद्दल वाटणारं प्रेम हा आणखी एक धागाही आहे. संजूच्या वागण्यामुळे आणि खोटेपणामुळे त्याचे वडील त्याच्यावर खूपच नाराज असतात. म्हणून तो घर सोडून जातो. त्याचा मोठा भाऊ रतन (मामीक) मात्र समजूतदार आणि घरची जबाबदारी सांभाळणारा असतो. दोन कॉलेजमध्ये असलेल्या खुन्नसचं एक कारण असतं सायकल रेस जी आधीच्यावेळी रतन हरलेला असतो. नंतर योगायोगाने घडलेल्या प्रसंगांमुळे संजूला आपली चूक उमगते. आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि त्याला एक ध्येय सापडतं- सायकल रेस जिंकण्याचं. जी तो सिनेमाच्या शेवटी अर्थातच जिंकतो.
https://www.youtube.com/watch?v=hXxTe-rYHOY

1990 च्याच दशकात कॉलेज जीवनावर आधारित आणखीही काही सिनेमे आले ज्यात हळूहळू हिंसा केंद्रस्थानी होऊ लागली. याचं मुख्य उदाहरण म्हणजे राम गोपाल  वर्मा यांचाशिवाज्यात कॉलेज जीवनातलं  राजकारण आणि त्यात मिसळणारी माफियागिरी हा विषय होता.

नंतर नंतरच्या काळात कॉलेज जीवन आणि त्यातले विद्यार्थी जरा अशक्य कोटीतले आणि बेगडी  वाटू लागले.शाहरुख खान, काजोल, रानी मुखर्जी यांच्याकुछ कुछ होता हैमध्ये जे कॉलेज दाखवलंय किंवा त्यातले कॉलेज जीवनातले प्रसंग दाखवले आहेत तसं कुठे पाहायला मिळतं?! तीच गत 2000 साली आलेल्या शाहरुख खान-अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्यामोहब्बतेंया सिनेमाची! तीच गोष्ट शाहरुख खानच्याचमैं हूँ नामधली किंवा अलिकडच्या ’Student of the Year’ ची ! यातल्या बऱ्याच सिनेमांत दाखवलेले प्रोफेसर किंवा प्राचार्य तर खालच्या पातळीवरचे दाखवले आहेत. (आठवा- मिस ब्रिगांझा (अर्चना पुरण सिंग, तसेच अनुपम खेर- 'कुछ कुछ होता है', चांदनी (सुश्मिता सेन) किंवा सतीश शाह- ’मैं  हूँ  ना’, ऋषी कपूर-’’Student of the Year’) काही प्राचार्य तर एकाच वेळी कॉमेडी आणि व्हिलन दाखवलेले आहेत (उदा- वीरू सहस्त्रबुद्धे-बमन इराणी- '3 Idiots') तरमोहब्बतेंसारख्या सिनेमात प्राचार्य (नारायण शंकर- अमिताभ बच्चन) जवळ जवळ व्हिलनच आहेत.

अलिकडच्या काळातल्या एका चित्रपटाचा वर वर्णन केलेल्या चित्रपटांपेक्षा थोडासा वेगळा चित्रपट म्हणून उल्लेख करावा लागेल. तो आहेउडानजो 2010 साली प्रदर्शित झाला आणि त्याचे लेखक होते अनुराग कश्यप आणि दिग्दर्शक होते विक्रमादित्य मोटवाने. पौगंडावस्थेसारख्या नाजूक काळात broken family असेल तर त्याचा एखाद्या मुलावर कशाप्रकारे परिणाम होतो हे कथानकउडानमध्ये आहे. वडील (भैरव सिंग-रोनित रॉय) अगदी हिटलरच्या वरताण वागणारे, कडक शिस्तीचे, मारहाण करणारे, मुलाला (रोहित-रजत बरमेचा) त्याच्या मनाप्रमाणे करिअर न करू देणारे, त्याचं लेखक बनण्याचं स्वप्न साकार न करू देणारे, आपल्याच इच्छा लादणारे आणि या सगळ्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या मुलाशी आपले नाते उत्तरोत्तर बिघडवत जाणारे असं वडील- मुलगा यांच्या नात्यातला संघर्षाचं चित्रण सिनेमात आहे. दोघांमध्ये संवादाचा अभावच नाही तर विसंवाद आहे. दोघांचं नातं सांधणारी, दोघांमधलं अंतर कमी करणारी आई इथे नाही. रोहितची आई लहानपणीच गेली आहे. दुसऱ्या नात्यातून भैरवसिंगला अजून एक मुलगा आहे पण त्याचीही आई नाही. (आणि हे असं का हे सिनेमात दाखवलेलंच नाही.) चित्रपटाचा एकंदर कल मुलाकडे झुकलाय असं वाटत राहतं. वडिलांची काही बाजू असू शकते असा काही वावच इथे ठेवण्यात आलेला नाही. एखाद्या व्हिलनसारखी त्यांची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. हे इतर सिनेमांच्या बाबतीत ठीक होतं पण अनुराग कश्यप आणि वेगळी वाट चोखाळणाऱ्या दिग्दर्शकाच्या बाबतीत मात्र हे जरा खटकतंच! 
'उडान' सिनेमाच्या ट्रेलरची लिंक देत आहे-
https://www.youtube.com/watch?v=wEJxe2bE-cE

सध्याच्या वरवर भव्य दिव्य दिसणाऱ्या परंतु बऱ्याचशा उथळ आणि पोकळ असणाऱ्या सिनेमांच्या तुलनेत पुन्हा एकदा भूतकाळातल्या एका सिनेमाची प्रकर्षाने आठवण होते. हा सिनेमा म्हणजे 1984 सालचा, प्रकाश झा यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा- ’हिप हिप हुर्रे’. सिनेमाची पटकथा गुलझार यांची होती तर राजकिरण, दीप्ती नवल, शफी इनामदार आणि नवोदित निखिल भगत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाची तांत्रिक अंगं कदाचित थोडीशी उणी जाणवतील (कारण सिनेमा तुटपुंज्या बजेटमध्ये केलेला होता) पण सिनेमा जी गोष्ट सांगतो, जो मेसेज देऊ इच्छितो तो मात्र आपल्यापर्यंत परिणामकारकरीत्या पोचतो. ’हिप हिप हुर्रेची गोष्ट रांची या छोट्या शहरात घडते. तिथे एका शाळेत संदीप (राजकिरण) क्रीडा शिक्षक म्हणून रूजू होतो
https://www.youtube.com/watch?v=bksblGRfGo0
संदीप खरं तर कॉम्प्युटर इंजिनियर असतो. पण नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मिळायला वेळ असतो म्हणून मधल्या काळात ही नोकरी पत्करतो. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक-मुख्याध्यापक या सगळ्यांनाच खेळाच्या बाबतीत उदासीनता असते. शाळेने दुसऱ्या प्रतिस्पर्धी शाळेकडून फुटबॉल सामन्यात सपाटून हार पत्करल्यामुळे त्यात आणखी भर पडते. संदीप हळूहळू हे वातावरण बदलतो. ते खेळांसाठी पोषक बनवतो. खेळांत हार जीत
होतच असते, आपली क्षमता आणि कौशल्य पणाला लावणं महत्त्वाचं, खिलाडूपणा महत्त्वाचा हे तो विद्यार्थी आणि शिक्षक यांना पटवून देतो. अर्थात त्याला सगळ्यांकडून सुरुवातीला विरोधच होतो. मुख्य विरोध पौगंडावस्थेमधल्या मुलांच्या एका ग्रुपकडून होतो. त्यांचा प्रमुख असतो रघु (निखिल भगत). रघु बंडखोर मुलगा असतो. त्याला शाळेतलीच एक शिक्षिका अनुराधा (दीप्ती नवल) हिच्याबद्दल आकर्षण असतं. तो तिला शाळेबाहेर भेटण्याचा, तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ग्रुपमधली मुलं शाळेचे तास बुडवून कँटीनमध्ये चकाट्या पिटणं, सिगारेट ओढणं, सिनेमाला जाणं, रस्त्यावरच्या जुगाराच्या अड्ड्यावर पैसे लावून जुगार खेळणं, शिक्षकांना उलट उत्तरं देणं, खेळाच्या तासाला अनुपस्थित राहून खोटं मेडिकल सर्टिफिकेट आणणं हे सगळे उद्योग करत असतात. संदीप या मुलांशी आवश्यक तिथे शिस्तीने, निग्रहाने, आवश्यक तिथे प्रेमाने, आपलेपणाने, समजुतीने, पण नेहमीच संयमाने आणि संवेदनशीलतेने वागतो. यातून तो मुलांबरोबर एक विश्वासाचे नाते निर्माण करतो, त्यांचा आदर्श बनतो. त्यांचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनतो आणि त्यांच्यात बदल घडवून आणतो. या मुलांकडे असलेलं फुटबॉलचं कौशल्यही त्याने हेरलेलं असतं. बदल झाल्यानंतर ही मुलं खेळामध्ये त्यांच्यातली ऊर्जा channelize करतात. बंडखोर रघुसुद्धा अंतर्बाह्य बदलतो. या सगळ्या वाटचालीत त्याला अनुराधाची साथ मिळते. शेवटी संदीपच्या मार्गदर्शनाखाली रघुच्या प्रयत्नामुळे त्यांची शाळा फुटबॉल सामना जिंकते. आणि संदीपला अपॉइंटमेंट लेटर मिळाल्याची खबर मिळते. जड अंत:करणाने संदीप शाळा सोडून जातो. पण त्याने रूजवलेलं क्रीडा संस्कृतीचं बीज फळाला येतं. रघु शिक्षण संपल्यावर त्याच शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून परत येण्याचा निर्धार करतो. अशा रीतीने चित्रपट एका सकारात्मक वळणावर संपतो.
पौगंडावस्थेत जितका भावनांचा कल्लोळ स्वाभाविक, तेवढंच आयुष्याला एक दिशा मिळणंही! अर्थात हा मेसेज देणारे काही मोजकेच चित्रपट हिंदी रजतपटवर आले. मुख्यत्वेकरून, हिंदी चित्रपट हा फँटसीच्या विश्वातच जास्त रमतो. आत्मशोध, ध्येय, जीवनविषयक तत्वज्ञान इ. गोष्टींचे तसे ह्या सोनेरी दुनियेला वावडेच! त्याला थोडेफार आपण प्रेक्षकही कारणीभूत असणार... जे विकलं जातं तेच जोमानं बाजारात येतं.
जर लौकिक अर्थानं सिनेमा म्हणजे खऱ्या आयुष्याचा आपल्यासमोर धरलेला आरसाच असतो हे मान्य केलं तर आज ना उद्या हा रजतपट नक्कीच आणखीन वास्तववादी होईल यात काहीच शंका नाही...
निदान तशी आशा तरी करू या!

(तळटीप : या लेखात पौगंडावस्थेवरील सर्वच चित्रपटांचा विचार केला आहे असं अजिबात नाही. याशिवाय आणखीही काही सिनेमे नक्कीच असतील. तसंच विस्तारभयापोटी इथे मराठी सिनेमांविषयी लिहिलेलं नाही. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. जाताजाता फक्त काही मराठी सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो- ’शाळा’, ’दहावी फ’, ’फॅन्ड्री’, ’बालक-पालक’ ’कैरी’ ’सैराट.)
(या सर्व सिनेमांमधल्या गाण्यांविषयी किंवा त्यातल्या संगीताविषयी लिहायचं तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यावर पुन्हा कधीतरी !)


2 comments:

Shreepad SM Gandhi said...

बापरे...राजेश, खरंच तू अभ्यासू आहेस...नाहीतर एवढा गोषवारा घेणं सोपं नाहीये. सबंध लेख वाचला. काही गोष्टी नव्याने समजल्या. माझं चित्रपटांबद्दल फारसं वाचन नाहीये काही जुजबी माहिती आहे मात्र. जरी हा लेख संपूर्ण भारतीय सिनेइतिहासाचा उहापोह करत नसला तरी माझ्यासारख्या थोडीशी माहिती असलेल्यांसाठी पुष्कळच प्रकाश टाकणारा आहे हे नि:संशय. उल्लेख
राहून गेल्यामुळे चुटपुट लागलेले काही संदर्भ...
अँग्री यंग मॅन चा प्रवेश, किंबहुना अमिताभ बच्चनचा उल्लेखच नसणं हे suicidal वाटतं (but I fully honour your freedom to neglect that. अंदाज अपना अपना...
Secondly, उत्कृष्ट सशक्त पटकथेचा आधार घेणारी राजकुमार संतोषी फॅक्टरी (घायल, घातक, दामिनी, अंदाज अपना अपना, चायना गेट, खाकी वगैरे)
असो.
पण लेखाचा आवाका खूप अप्रतिम पेलला आहेस. Really hats off.

kdchitnis said...

परमर्श घेताना ट्रेंड सेटर सिनेमे म्हणुन उल्लेख केलेले उर्दु सिनेमे इ माहिती छान दिलिय. काही टप्पे गळलेत तरी संकलन उत्तम आहे.