Tuesday 16 May 2017

चंदा सा शीतल है उनका मन.... भाग १

नुकतंच सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर यांच्या 'कासव' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सिनेमा हे माध्यम वापरून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे बहुमोल कार्य करणाऱ्या या दिग्दर्शक द्वयीचा हा यथोचित सन्मानच केला गेला असं म्हणता येईल. पुरस्कार घोषित झाल्यानंतर विविध वाहिन्यांवर दोघांच्या मुलाखती झाल्या. या निमित्ताने मला २०१४ साली या दोघांच्या भेटीची आठवण झाली. त्याविषयीचा हा ब्लॉग !

अर्थात यासाठी थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे-
१) सुमित्राताई भावे चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वी कर्वे इन्स्टिटयूट मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या.
२) माझी आई- सौ. विजया पुसाळकर.
तिने DSW हा कोर्स पूर्ण केला होता आणि १९७४ मध्ये सुमित्राताई भाव्यांबरोबर 'महिला कैद्यांची आर्थिक-सामाजिक स्थिती' या विषयीचा सर्वेक्षणावर आधारित प्रकल्प तिने केला होता. सुमारे ७-८ महिने हा प्रकल्प चालू होता आणि पुणे, मुंबई, औरंगाबाद इथल्या महिला कैद्यांच्या मुलाखती घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या काळात माझी आई आणि सुमित्राताई भावे यांची चांगली ओळख झाली होती, आई त्यांच्या घरीही २-३ वेळा गेली होती.  या प्रकल्पानंतर मात्र दोघींच्या वेगळ्या वाट झाल्या. आईने दुसरीकडे नोकरी पत्करली आणि कालांतराने सुमित्राताई भावे चित्रपटक्षेत्रात आल्या. साहजिकच दोघींचा संपर्क कमी कमी होत गेला. सुमित्राताई भाव्यांच्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांविषयी आईला नेहमीच कौतुक वाटायचं आणि अशा चित्रपटांना पुरस्कार मिळाल्यावर क्वचित आई त्यांना फोन करायची. फोनवर आईशी त्या अतिशय छान बोलायच्या. त्यांच्या बोलण्यात नेहमीच warmth जाणवायची.
३)  माझ्या आईचा सख्खा लहान भाऊ म्हणजे श्री यशवंत देवस्थळी !
 झी २४ तास या मराठी वाहिनीवर जानेवारी २०१३ साली डॉ उदय निरगुडकर यांच्या 'हार्ट टू हार्ट' या कार्यक्रमात श्री देवस्थळी यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी जर चांगली गोष्ट आणि चांगले दिग्दर्शक असतील तर मराठी चित्रपट निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
४) एप्रिल २०१३ मध्ये एका मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शो मध्ये योगायोगाने माझी आई आणि सुमित्राताई भावे यांची भेट झाली. त्यावेळी आईने माझ्या मामाच्या चांगले कथानक असल्यास मराठी चित्रपट निर्माण करण्याच्या इच्छेबद्दल त्यांना सांगितलं.
५) यानंतर मध्ये बराच काळ गेला. जवळपास एक वर्ष गेलं असेल. एक दिवस अचानक आईला सुमित्राताई भाव्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं की श्री. देवस्थळी यांनी चित्रपट काढला का? त्या पुढे म्हणाल्या की काढला नसल्यास त्यांच्याकडे एक चांगली गोष्ट आहे. तर ती  गोष्ट त्यांना ऐकवता येईल का? त्यासाठी त्यांची भेट घेता येईल का? हा आई आणि माझ्यासाठीही सुखद धक्का होता! सुदैवाने तोपर्यंत माझ्या मामाकडे चित्रपटासाठीचा कुठलाही ठोस प्रस्ताव आलेला नव्हता. मग बरीच फोनाफोनी झाल्यानंतर गोष्ट ऐकण्यासाठी माझ्या मामाच्या मुंबईच्या घरी प्रत्यक्ष भेटण्याचं ठरलं. सुमित्राताई भावे आणि अर्थातच माझे मामा दोघांनीही यासाठी माझ्या आईला आग्रहाने बोलावलं. श्री. सुनील सुकथनकर आणि सुमित्राताई भावे आणि त्यांच्या गाडीतून आई असं जायचं ठरलं.
श्री. सुनील सुकथनकर आणि सुमित्राताई भावे
माझ्या आईला सोबत म्हणून(तिला प्रवासात गाडीतून चढता-उतरताना मदत करण्यासाठी) मी जावं असं मला वाटत होतं. पण तो वार होता सोमवार ! म्हणजे तसा कामाचा दिवस ! काम बुडवून जावं की नाही याबद्दल माझी व्दिधा मनःस्थिती होती. पण म्हटलं तर या दिग्गज लोकांबरोबर प्रवासाचा अपूर्व योग होता.पुन्हा कधी अशी संधी मिळेल न मिळेल. म्हणून शेवटी काम बुडवून मी आईबरोबर प्रवासाला जाण्याचं ठरवलं. सोमवार २३ जून २०१४ रोजी दुपारी १ च्या सुमारास आम्ही त्यांच्या घरापाशी पोचलो. आणि तिथून चालू झाला एक अविस्मरणीय प्रवास!....
                                                                                                                                                      (क्रमश:)

No comments: