Friday, 7 March 2025

संगीत मन को पंख लगाये..


(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. २०२४ सालच्या दिवाळी अंकाचा विषय 'वेदना व्यवस्थापन ' होता. या अनुषंगाने मी लिहिलेला लेख ब्लॉग स्वरूपात प्रकाशित करत आहे ) 



“One good thing about music is,  when it hits you, you feel no pain.” 

असं जमैकाच्या सुप्रसिद्ध गायक आणि गिटारवादक बॉब मार्ले यांनी म्हटलं आहे. आणि हे किती खरं आहे हे आपल्या अनुभवातून आपणही सांगू शकतो. हृदयाला भिडणारं कुठलंही गाणं किंवा संगीत आपल्या मनाचा इतका ताबा घेतं की त्या स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलत असताना आपल्याला  सगळ्या चिंता,काळजी  दु:खं, शारीरिक वा मानसिक वेदना यांचा तात्पुरता का होईना पण विसर पडतो. संगीत हे आपल्याला एका अनोख्या आणि अद्भुत दुनियेत घेऊन जातं. तिथे अशा नकारात्मक विचारांना स्थान नसतं आणि म्हणूनच आयुष्यातल्या अशा मळभ भरल्या रात्री संगीत हे शीतल चंद्रप्रकाशाची ओंजळ घेऊन येतं. 

वेदनेचा सामना करणं हा एक थकवणारा प्रवास आहे. तो कोणाला कधीही करावा लागू नये हेच खरं !  पण अशी वेळ आलीच तर  या खडतर मार्गात आपल्याला दिलासा देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यात संगीताला  एक खास महत्त्व आहे.  मात्र ही वेदनेवरची फुंकर वरवरची आहे असं अजिबात नाही. कारण अभ्यासांती असं सिद्ध झालं आहे की संगीत ऐकल्यामुळे (वा गायल्यामुळे/वादन केल्यामुळे) आपल्या शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात. शास्त्रोक्त भाषेत सांगायचं  झालं तर -
१) संगीत हृदयाची गती कमी करतं, रक्तदाब कमी करतं, ताण निर्माण करणाऱ्या cortisol सारख्या संप्रेरकाचं प्रमाण कमी करतं, तर dopamine सारख्या तणाव हलका करणाऱ्या व आनंद निर्मिती करणाऱ्या  संप्रेरकाचं प्रमाण संगीत ऐकल्याने वाढतं. यामुळे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने संगीत उपयुक्त आहे असं म्हटलं जातं. 
२) याच dopamine चं प्रमाण वाढल्यामुळे नैराश्य आणि चिंता या भावना कमी होण्यास मदत होऊ शकते. नैराश्यासारखी भावना व्यायाम केल्याने जशी कमी होऊ शकते तशाच प्रकारे ती संगीत ऐकूनही कमी होऊ शकते. 
३) वेदना व्यवस्थापनात म्युझिक थेरपीचा हल्ली वापर करण्यात येतो. यामध्ये संगीत या माध्यमाचा वापर करून वेदनेची तीव्रता कमी करणं, वेदनेसारख्या नकारात्मक गोष्टीपासून व्यक्तीचं लक्ष संगीत या सकारात्मक गोष्टीकडे वळवणं, व्यक्तीचा मूड उंचावणं यासारख्या गोष्टी केल्या जातात.

परंतु म्युझिक थेरपीकडे(म्हणजे कुठलीही व्यावसायिक मदत घेण्याअगोदर) जाण्याअगोदर आपण जर स्वतःच संगीत ऐकण्याची (ज्यांना शक्य आहे त्यांनी गायन/वादन शिकण्याची ) आवड जोपासली तर आपला हा वेदनेशी सामना करण्याचा प्रवास थोडातरी सुसह्य आणि सुखकर होईल हे निश्चित! अर्थात काय आणि कुठल्या प्रकारचं संगीत ऐकावं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. कोणी शास्त्रीय संगीत ऐकेल तर कोणी हिंदी सिनेसंगीत, कुणाला मराठी भावगीतं आवडतील तर कोणी पाश्चात्य संगीत ऐकेल. याबाबत 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न:' हे खरंच. पण संगीत ऐकणं हा छंद आपण जाणीवपूर्वक जोपासला तर याचा दीर्घकालीन फायदा नक्कीच आहे. 

आपण भारतीय काही बाबतीत निश्चितच भाग्यवान आहोत. आपल्याला संगीताचे एकाच वेळी कितीतरी प्रवाह ऐकायला मिळत असतात. एकीकडे आपल्याकडे गौरवशाली हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीताची परंपरा आहे तर दुसरीकडे तितकीच समृद्ध अशी लोकसंगीताचीही परंपरा आहे. आपल्याकडे बारसं ते बारावं व्हाया लग्न अशा प्रत्येक प्रसंगासाठी गाणं आहे आणि तसं बघितलं तर संगीत हे आपल्या नसानसात भिनलं आहे. संगीत आपल्या आजूबाजूला आणि आपल्यामध्येच आहे.शिवाय आपल्यावर संगीत ऐकण्याचे संस्कार लहानपणापासून कळत नकळत होतच असतात. रेडिओ, टीव्ही, नाटक-सिनेमे, संगीत समारोह/महोत्सव, गणेशोत्सव पासून ते आता मोबाईल अशा वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या कानांवर संगीत पडतच असते. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कितीतरी दिग्गज आणि उत्तुंग कलाकारांनी एवढं काम करून ठेवलं आहे की त्याला तोड नाही.आपलं संपूर्ण आयुष्य जरी आपण वेचलं तरीही या महासागरातले काही थोडेफार मोतीच आपल्या हाती लागतील. म्हणजेच 'किती घेशील दो कराने' अशीच आपली परिस्थिती आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की  हे सर्व आपल्याला युट्यूब सारख्या ठिकाणीही  सहज उपलब्ध आहे. .

पुढील विवेचनात आपण कोणत्या प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकून आपला मूड सकारात्मक करू शकतो याचा विचार करणार आहोत. शास्त्रीय संगीत असं वाचल्यावर काही वाचकांच्या भुवया उंचावतील. काहींना ते रटाळ वाटेल तर काहींना ते क्लिष्टही वाटू शकेल. काही म्हणतील की आम्हांला त्यातलं काही कळत नाही. पण क्षणभर थांबून थोडा विचार केला तर असं लक्षात येईल की इथे आपल्याला शास्त्रीय संगीताच्या तांत्रिक अंगाची सुरवातीला माहिती नसली तरी काही हरकत नाही. आपल्याला फक्त ते नीट ऐकायचं आहे. आणि आपली कितीतरी भक्ती संगीताची गाणी व हिंदी-मराठी सिनेमांतील गाणी ही शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारित असतात.बऱ्याचदा आपल्याला हे माहितही नसतं. पण तरीही  ती गाणी आपल्याला आवडत  असतात. (उदाहरणार्थ 'सुंदर ते ध्यान' हा सुप्रसिद्ध अभंग यमन रागावर आधारित आहे )तर आपल्याला आता इथे फक्त एक दोन पाऊलं पुढे टाकायची आहेत आणि आपल्या सर्व संगीताची जननी जिला म्हटलं जातं अशा शास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने  विचार करायचा आहे.

 शास्त्रीय संगीतामध्ये जास्त महत्त्व बंदिशीच्या शब्दांना नसून त्या संगीतामधून निर्माण होणाऱ्या भाव व अभिव्यक्तीला  जास्त असतं. इतर सर्व लोकप्रिय संगीताचा एक भाग असा असतो की त्यात शब्द येतात आणि त्या शब्दांमधून एक विशिष्ट प्रसंग वा ठराविक भावना प्रतीत होतात. आपल्याला शब्दांच्या पलीकडे जायचं आहे. शिवाय इतर लोकप्रिय संगीताची कालमर्यादा शास्त्रीय संगीतापेक्षा थोडी कमीच असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ - कुठलेही  सिनेमातले गाणे ३-४ मिनिटांत संपून जाते. पण आपल्याला त्यापेक्षा थोड्या जास्त कालावधीचा विचार इथे करायचा आहे.राग श्रवणातून मनाचं रंजन करून आपल्याला आनंद निर्मिती करायची आहे. आता पुढील भागात मी आपण शास्त्रीय संगीतामधील काय ऐकलं तर वेदना कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होईल याविषयी लिहिणार आहे. 

अर्थात यात सुरवातीलाच सांगतो की इथे माझ्या आवडीचा प्रभाव माझ्या पुढील लिखाणावर आहे आणि तसं ते स्वाभाविकही आहे.  तसंच  लेखाच्या विस्तारभयामुळे संक्षिप्त स्वरूपात लिहिलं आहे. शिवाय मी केवळ एक हौशी संगीत श्रोता आहे. मी काही या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे. त्यामुळे लिखाणात  काही दोष असल्यास ते अनवधानाने आहेत असं समजावं! 

भारतीय शास्त्रीय संगीताला जशी मोठी परंपरा आहे तशीच एक मोठी वैचारिक बैठक देखील आहे. सूत्रबद्ध नियम आहेत. प्रत्येक रागाचं एक स्वरूप आहे- कुठले स्वर त्या रागात आहेत आणि कुठले नाहीत याचे नियम आहेत. कोणता राग दिवसाच्या कोणत्या प्रहरी गायला जावा ज्यामुळे भावनिर्मिती पूर्णपणे व्यक्त होते याचेही काही नियम आहेत. जसं आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतो, ज्याप्रमाणे आपण होमिओपॅथीच्या औषधांच्या देखील वैशिष्ट्यपूर्ण प्रकृती आहेत असं म्हणतो तसंच भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांचे देखील काही स्वभावगुण आहेत. उदाहरणार्थ काही राग आक्रमक स्वभावाचे आहेत (उदा:अडाणा) काही राग वीररसपूर्ण आहेत (उदा- हंसध्वनी) तर काही शांत, धीरगंभीर आहेत (उदा : दरबारी कानडा ) तर काही नटखट,शृंगाररसप्रधान(उदा: मारुबिहाग, खमाज ). म्हणजेच  शास्त्रीय संगीताच्या रागातून विविध भावनांचे प्रकटीकरण होत असते. आपण प्रचलित नवरसांपैकी बीभत्स, रौद्र, भयानक आणि  काही प्रमाणात कारुण्य रस प्रधान राग सोडले तर बाकीचे  रस निर्माण करणारे राग ऐकावेत जे आपल्याला वेदना व्यवस्थापनेच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. ( म्हणजेच शांत, अद्भुत, शृंगार,वीररस, हास्य रस ) 
विषयाच्या सुलभीकरणाच्या दृष्टीने आपण इथे दिवसाचा प्रहर आणि त्या प्रहरात कोणते राग ऐकावेत याचा ढोबळ मानाने विचार करूया. याचं एक कारण असंही आहे की दिवसाच्या प्रहराप्रमाणे आपली भावावस्था देखील बदलत जाते आणि त्याला अनुसरून रसनिर्मिती करणारे राग असतात. 

 १) सकाळचा प्रहर - हा प्रामुख्याने सकाळी ६-९ हा काळ !  सूर्याचा पहिला बारीकसा किरणदेखील  रात्रीचा भयाण अंधकार घालवण्याचं सामर्थ्य घेऊन येतं. कितीही छळणारा अंधार असला तरी तो एका रात्रीचाच पाहुणा आहे. नंतर येणारी सकाळ ही आशा आणि एक आश्वासकता लेऊन येते.सकाळ होणे म्हणजे झाडं वेली फुलारणे, वाऱ्याची शांत शीतल झुळूक वाहणे आणि पक्ष्यांची गाणी गायची लगबग सुरु होणे असा प्रसन्न काळ ! आताचे संदर्भ कदाचित बदलले आहेत पण पूर्वीच्या काळातील सकाळ म्हणजे सडा-संमार्जन, रांगोळी, आन्हिके उरकून देवपूजा अशी मांगल्याची असे. ( याचं एक टिपिकल उदाहरण म्हणजे 'भाभी की चुडियां' सिनेमातलं देसकार रागावर आधारित 'ज्योती कलश छलके' हे गाणं ). सकाळचं हे वातावरण भक्तिरसाला पोषकच !अशा रम्य आठवणी आणि भावना जागवणारे शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे भैरव, ललत, तोडी, रामकली,जोगिया, विभास,भटियार इत्यादी. इथे आपण प्रभा अत्रे यांनी गायलेली  'मन रे तू कर ध्यान' ही भैरव रागातील बंदिश ऐकू शकता जी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल -

तसेच उस्ताद आमिर खान यांनी

गायलेल्या ललत रागातील ही 'जोगिया मोरे घर आये' ही बंदिश -

शहनाई हे आपण मांगल्याचं प्रतीक समजतो. त्यामुळे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या शहनाई वादनात तोडी या सकाळच्या रागाचा इथे आपण आस्वाद घेऊ शकता-

२) दुसरा प्रहर - सकाळी ९ -१२ हा काळ - दुसरा प्रहर म्हणजे उपजीविकेसाठी कार्यप्रवण होण्याचा काळ. या काळातील  शास्त्रीय संगीतातील राग म्हणजे आसावरी, जौनपुरी, दुर्गा,बिलावल इत्यादी . 
इथे पं भीमसेन जोशी यांनी गायलेल्या कोमल रिषभ आसावरी रागातील 'सकल  जगत को'  या बंदिशींची लिंक दिली आहे-

३) तिसरा प्रहर- हा साधारण दुपारी १२-३ चा काळ ! सूर्याची तप्त किरणे अंगांगाची काहिली करणारा काळ. या काळात ऐकण्याजोगे राग म्हणजे गौड सारंग, मुल्तानी, भीमपलास इत्यादी. अशा वेळी मनाला शांत करणारं हे बासरी वादन नक्की ऐका- पं पन्नालाल घोष राग गौड सारंग -

उन्हाळ्याच्या अशाच अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात सगळ्यात जास्त प्रतीक्षा कशाची असेल तर ती पावसाची! उन्हामुळे जमीन तापून हवा गरम होऊन पाऊस पडणार हे निसर्गचक्र अव्याहत सुरूच आहे. या निसर्गचक्राप्रमाणे शास्त्रीय संगीतात ऋतूंप्रमाणे गायचे रागदेखील आहेत. मेघ, मेघ-मल्हार हे त्या पैकीच. खरं तर हे राग रात्री गायले/ऐकले  जावेत असं म्हणतात पण पावसाळी हवेत ते कोणत्याही वेळी ऐकावेत. मल्हारचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. खाली दिलेल्या लिंकमध्ये सुरवातीला पं रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग मियां की मल्हार आहे तर पुढे जयपूर-अत्रौली घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला राग रामदासी मल्हार आपल्याला ऐकता येईल-

४) चौथा प्रहर- हा साधारण दुपारी ३ ते ६ चा काळ.. तापलेल्या उन्हाचा प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि अशावेळी मनाला शांत करणारे राग ऐकावेत. या काळातील राग आहेत-मधुवंती, पटदीप, धानी, शुद्ध सारंग इत्यादी. विदुषी मालिनी राजूरकर यांनी

 गायलेला मधुवंती इथे ऐकता येईल-
तसंच उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतारवादनात राग पटदीप -

५) पाचवा प्रहर - संध्याकाळी ६ ते ९-
हा संधिप्रकाशाचा काळ... दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात शरीर आणि मन दोन्ही थकून गेलेलं आहे आणि आता एक अनामिक हुरहूर आहे.चांगला गेला असो की वाईट,  पण तो दिवस संपल्याची! दिवसभरात आठवण झाली नसली तरी संध्याकाळी हमखास विरह आणि इतर सर्वच वेदना प्रकर्षाने जाणवू लागतात आणि याच वेळी रात्रीची चाहूलही लागते. त्यामुळे या वेळेत एक प्रकारची आर्तता आहे जी शास्त्रीय संगीताच्या काही रागांमध्येही दिसून येते.उदाहरणार्थ -  
 'दूर कुठे राऊळात दरवळतो पूरिया 
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !
असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे 
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे 
झाकळून जाय गाव, ये तमांस पूर या!' हे गाणं पूरिया रागावर आधारित आहे. 
किंवा 
'मावळत्या दिनकरा 
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !' हे गाणं मारवा रागावर आधारित आहे. 
उस्ताद राशीद खान यांचा मारवा इथे ऐकता येईल-
अशी ही भावावस्था पूरिया, मारवा,  खमाज,तिलक  कामोद या सारख्या रांगांमधून व्यक्त होते. मात्र याच वेळेत यमन, कल्याण आणि पहाडी यासारखे आल्हाददायक, प्रसन्न राग देखील गेले/ऐकले जातात. कदाचित हे राग त्या नकारात्मक भावनांवरचे उतारेच असावेत जणू ! तर अशाच पहाडी रागाची धून इथे ऐकता येईल. कलाकार आहेत- पं शिवकुमार शर्मा -


याच वेळी भूप रागही गायला जातो. त्या रागावरील किशोरीताई आमोणकर यांचं सुप्रसिद्ध 
'सहेला रे' हे मन प्रफुल्लित करणारं आहे -



६) सहावा प्रहर - रात्री ९ ते १२- हा भोजन आणि त्यानंतर निद्रेचा काळ. या काळात बागेश्री, रागेश्री, जयजयवंती, काफी, बिहाग, मारू बिहाग, नंद  यासारखे प्रसन्न, मनमोहक वा शृंगाररसप्रधान राग गायले जातात. 
कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेला मारू बिहाग इथे ऐकता येईल. 
तसंच पं शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वादनात मारू बिहाग -
तर पं मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला हा दैवी  'नंद'-



७) सातवा प्रहर- रात्री १२- ते ३ . हा शांत झोपण्याचा काळ. म्हणूनच कदाचित या काळात धीर गंभीर प्रकृतीचे राग गेले जात असतील. उदा- दरबारी कानडा, बसंत बहार, मालगुंजी, शिवरंजनी इत्यादी. इथे संगीत मार्तंड पं जसराज 

यांनी गायलेला दरबारी कानडा ऐकता येईल-

८) आठवा प्रहर - पहाटे ३ ते ६ 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष: काल' असं कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटलंय. रात्रीच्या उदरात पुढच्या दिवसाची बीजं पेरलेली आहेत. त्यामुळे हा अंधःकार संपणार आहे आणि परत उद्याची सोनेरी सकाळ उगवणार आहे अशी अशा जागवणारा हा काळ.  या काळातही  पहिल्या प्रहराचे म्हणून उल्लेख केलेले राग गायले जातात (भैरव, ललत, जोगिया इ) 
कोणत्याही मैफिलीचा शेवट भैरवी रागाने केला जातो म्हणून या लेखाच्या शेवटी देखील सर्व रसांचा समावेश असलेली  भैरवी आहे. 
उस्ताद बडे गुलाम अली खान 


-बाजू बंद खुल खुल जाये-

सरतेशेवटी मंगेश पाडगावकरांच्या कवितेमध्ये थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं -
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत/ऐकत 
तुम्हीचं ठरवा! 

काळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
सूर लावून उभं असतं
काळोखात कुढायचं की सुरांसवे गुणगुणायचं 
तुम्हीच ठरवा!

Friday, 6 December 2024

अनौपचारिक गप्पा वीणाताई गवाणकरांशी ....

१ 


लहानपणी संस्कारक्षम वयात, मला माझी मामी-लीना देवस्थळी यांनी -वीणा गवाणकर लिखित 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक भेट दिलं होतं.  डॉ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या एका अमेरिकन कृष्णवर्णीय कृषीतज्ज्ञाची  कहाणी वीणाताईंनी 'एक होता कार्व्हर' मध्ये मांडली आहे. कार्व्हर यांचा जन्म १८६४ सालचा. ते अनाथ होते, त्यामुळे स्वतःचं नाव देखील त्यांना नव्हतं. त्याकाळी कृष्णवर्णीयांना शिक्षणाची सोया नव्हती. अशा परिस्थितीत १८९४ साली त्यांनी बी. एस ही पदवी प्राप्त केली तर १८९६ साली ते एम एस झाले. १८९६ ते १९४३ या काळात अलाबामा टस्कीगी शिक्षणसंस्थेचे शेती विभागात त्यांनी अध्यापन केले. फिरते कृषी महाविद्यालय सुरु केले. गरीब शेतकऱ्यांना कपाशीऐवजी भुईमूग, रताळे अशी पर्यायी पिकं घ्यायला सांगणाऱ्या  कार्व्हर यांनी शेत जमिनीची धूप न होता नैसर्गिकरित्या ती जास्तीत जास्त उत्पादक कशी राहील यावर संशोधन केले. नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषी संस्कृतीचा त्यांनी पुरस्कार केला. गरीब आणि कृष्णवर्णीय लोकांचे जीवनमान सुधारण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही त्यावर सकारात्मक विचार करण्याचा डॉ कार्व्हर  यांचा स्वभाव होता. कमी व अपुऱ्या संसाधनांतून त्यांनी कुठलीही सबब पुढे न करता मार्ग शोधून काढले. म्हणूनच ही कहाणी प्रेरणादायी होती आणि आहेही ! 'एक होता कार्व्हर' पुस्तक  मला त्या वयातही खूप आवडलं होतं. त्यावर मी माझ्या मामीला  पत्र लिहिल्याचेही मला आठवत आहे. 
२ 

२०१२ साली माझे मामा श्री. यशवंत देवस्थळी आणि मामी लीना देवस्थळी यांनी जांभुळपाडा (तालुका सुधागड, जिल्हा रायगड) येथे 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' या नावाने अतिशय सुरेख असा वृद्धाश्रम सुरु केला. या वृद्धाश्रमात विविध कार्यक्रम होत असतात आणि दरवर्षी त्याचा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 'चैतन्य' वर या आधीही मी लिहिलं आहे. त्या ब्लॉग्सची लिंक इथे देत आहे- 


तसंच 'चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास' च्या संकेतस्थळाची ही लिंक आहे-

'चैतन्य'ने २०२४ साली १२ वर्षे पूर्ण केली. म्हटलं तर ही माझ्या मामीच्या ध्येयाने प्रेरित ध्यासाची तपपूर्ती आहे. आणि म्हणूनच या वर्धापनदिनाला वीणाताई गवाणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणे  हे औचित्याचे होते. कारण वीणाताईंनी केवळ 'एक होता कार्व्हर'च नव्हे तर इतरही अनेक प्रेरणादायी चरित्रं लिहिली आहेत आणि प्रत्येक पुस्तक लिहिणे हा देखील एक प्रकारचा ध्यासच आहे असं म्हटलं पाहिजे. 
मुलाखत माझी मामी आणि मी मिळून घेणार असं ठरलं. मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून आम्ही वीणाताईंच्या मुलाखतीचे युट्यूब व्हिडिओ बघितले तसंच त्यांची पुस्तकंही वाचली आणि त्यांच्या प्रदीर्घ लेखन कारकिर्दीने अचंबित व्हायला झालं . कार्व्हर (१९८१ साली प्रकाशित) नंतर वीणाताईंनी -
१) भारतात ग्रामीण आरोग्यसेवेसाठी झटणाऱ्या अमेरिकन डॉ आयडा स्कडर (१९८४)
२) सर्पमित्र आणि अभ्यासक डॉ रेमंड डिटमार्स (१९८७) 
३) पक्षीतज्ज्ञ आणि भारतात पक्षीनिरीक्षणशास्त्राचे आद्य प्रवर्तक डॉ सालिम अली (१९९०) 
४) कृषितज्ज्ञ आणि क्रांतिकारक डॉ पांडुरंग खानखोजे(१९९७) 
५) ऑस्ट्रियन ज्यू महिला भौतिक शास्त्रज्ञ लीझ माईट्नर (२००३) 
६) पाणी पंचायत या संकल्पनेचे प्रवर्तक विलासराव साळुंखे (२००५) 
७) डीएनएच्या शोधात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या रोझलिंड फ्रँकलिन (२००९) 
८) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय डिझाइनर रॉबी डिसिल्वा (२०१६) 
९) इस्त्रायली पंतप्रधान गोल्डा मायर (२०१९) 
१०) वृक्षसंवर्धक डॉ रिचर्ड बेकर (२०२२) 
११) बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ डॉ मारिया मॉंटेसरी (२०२३) 
अशी चरित्रं लिहिली आहेत तसंच २०१३ साली त्यांनी 'इंटिमेट डेथ' या पुस्तकाचा अनुवाद देखील केला आहे. 
चरित्र लेखनाला मराठी साहित्यात एक वेगळा आयाम देणाऱ्या, एवढं विपुल लेखन केलेल्या वीणाताईंची  वेळेच्या मर्यादेत मुलाखत घेणं म्हणजेच त्यांच्या कार्याला यथोचित न्याय देणं खरं तर एक आव्हानच होतं आणि म्हणूनच आम्हांला थोडंसं दडपण आलं होतं.
३ 
मुलाखतीचा हा कार्यक्रम १ डिसेंबर २०२४ रोजी चैतन्य मध्येच पार पडला. मुलाखतीआधी आम्ही वीणाताईंशी थोडी चर्चा केली. कदाचित आम्हांला वाटत असलेल्या दडपणाची त्यांना कल्पना आली असावी. त्या इतक्या सहजपणे आमच्याशी बोलल्या की आमची सगळी धाकधूक पार नाहीशी झाली. त्यांनी आश्वस्त केल्यामुळे मुलाखत ही मुलाखत न राहता त्या अनौपचारिक गप्पा झाल्या आणि त्या छान रंगल्याही ! 

 

 

गप्पांची सुरुवात अर्थातच 'एक होता कार्व्हर' पुस्तकाने झाली. वीणाताईंनी हे पुस्तक ठरवून लिहिलं नाही. त्यांच्या मुलांना ती लहान असताना कार्व्हरची गोष्ट त्या सांगत असत. रोज थोडी थोडी सांगत कारण त्यांचा लहान मुलगा गोष्ट ऐकता ऐकता झोपून जात असे आणि दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट पहिल्यापासून सांगण्याचा आग्रह करत असे. म्हणून त्यांनी या गोष्टीच्या नोंदी केल्या, ज्या त्यांची मोठी मुलगी(तेव्हा ती तिसरी-चौथीत असेल) धाकट्याला वाचून दाखवत असे. नंतर काही कारणाने  या हस्तलिखित नोंदी इतर लोकांनीही वाचल्या आणि त्यापैकी एकांनी त्यांना ही गोष्ट जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे असं सुचवलं. यातून या पुस्तकाचा जन्म झाला. आजवर 'कार्व्हर' च्या तब्बल ४८ आवृत्त्या निघाल्या आहेत आणि जवळपास ३-४ पिढ्यांनी हे पुस्तक वाचलं असावं. आजही लोक वीणाताईंना हे पुस्तक वाचून ते आवडल्याचं आणि ते प्रेरणादायी असल्याचं कळवतात. विशेष म्हणजे अमेरिकेतील हॉवर्ड ब्लॅक युनिव्हर्सिटी मध्ये या पुस्तकाची ख्याती पसरली. तसंच नासा च्या कार्व्हर सेंटर मध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या एका मराठी तरुणाने वीणाताईंचं कार्व्हर पुस्तक वाचलं होतं आणि ते त्याला तिथली कृष्णवर्णीयांची परिस्थती समजून घ्यायला उपयोगी पडलं असं त्याने आवर्जून सांगितलं. 
यानंतर वीणाताई डॉ पांडुरंग खानखोजे या कृषीतज्ज्ञ वरील त्यांच्या 'नाही चिरा..' या पुस्तकाविषयी बोलल्या. योगायोगाची गोष्ट म्हणजे डॉ खानखोजे १९१३ साली डॉ कार्व्हरना भेटले होते. डॉ खानखोजे यांनी गदर चळवळीत भाग घेतला होता. अमेरिकेत शिक्षण घेऊन त्यांनी १९२० ते १९४७ पर्यंत मेक्सिकोत वेगवेगळ्या कृषी सुधारणा केल्या. भारतात मात्र ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत येऊ शकले नाहीत कारण क्रांतिकारक असल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार अटक करू शकली असती. डॉ खानखोजे यांचं इतकं मोठं कार्य असूनदेखील त्यांच्याबद्दल आपल्याकडे कोणालाही फारशी माहितीच नव्हती. त्यामुळे ही माहिती मिळवून त्यांचे अस्सल चरित्र लिहिणं हे अतिशय जिकिरीचं काम होतं. त्याबद्दल वीणाताईंनी केलेलं वर्णन उद्बोधक होतं. डॉ खानखोजे यांचं चरित्र लिहून त्यांनी  एका  महान परंतु उपेक्षित व्यक्तीचं कार्य मराठी वाचकांसमोर ठेवलं आहे. 

वीणाताईंनी चरित्रं लिहिताना अशा व्यक्तींविषयी लिहिलं ज्यांचं कार्य पथदर्शी आहे. सध्याच्या भाषेत ज्यांना- चेंजमेकर्स म्हणता येईल अशांबद्दल त्यांनी लिहिलं आहे.ज्यांच्या कार्याने समस्त मानवजातीच्या उत्थानासाठी उपयोग झाला अशा लोकोत्तर व्यक्तींचं चरित्र वीणाताईंनी लिहिलं.  मग ते 'पाणी ही कोणाची वैयक्तिक संपत्ती नसून त्यावर सर्वांचा सामान हक्क आहे . पाणी ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे' हा विचार घेऊन पाणी पंचायत ही चळवळ उभारणारे विलासराव साळुंखे असोत की आपलं संपूर्ण आयुष्य वृक्ष संगोपन, संवर्धन आणि संवर्धनासाठी खर्च करणारे पर्यावरणवादी डॉ रिचर्ड बेकर असोत. वीणाताईंच्या चरित्रांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चरित्र नायक/नायिकांचं कार्य निर्विवाद आणि नि:संशय आहे. आणि याबाबत वीणाताईंनी खातरजमा केली आहे हे निश्चित ! 
या सर्व चरित्र लेखनातून वीणाताईंनी केवळ त्या त्या व्यक्तीचं कार्यच उभं केलं आहे असं नाही, तर कोणत्या प्रतिकूल  परिस्थितीमध्ये हे कार्य झालं हेही लिहिलं आहे त्यामुळे ते कार्य अधिकच झळाळून उठतं. शिवाय त्यांच्या या सर्व पुस्तकांमधून आपल्याला समाजातील वेगवेगळ्या समस्यांचं आकलन होतं. आणि काही समस्या अशा आहेत ज्यांना स्थळ-काळाचं बंधन असेलच असं नाही. उदाहरणार्थ भौतिकशास्त्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लीझ माईट्नर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाला पंधरा वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं. परंतु केवळ एक स्त्री असल्यामुळे त्यांची अवहेलना झाली. तीच गोष्ट डीएनएचा शोध लावण्यात मोलाचं संशोधन करणाऱ्या रोझलिंड फ्रँकलिन यांचीही! त्यांचं मौलिक संशोधन त्यांच्या नकळत पुरुष सहकाऱ्यांनी वापरून नोबेल पुरस्कार मिळवला देखील. मात्र यांचं श्रेय हिरावलं ! 
वयाची ऐशी वर्षे पूर्ण केल्यानंतर वीणाताईंनी एक मोठं धाडसच केलं ! चंबळ नदीच्या खोऱ्यात २०२३ साली त्या आणि त्यांचे एक सहकारी प्रसाद कुमठेकर फिरले आणि तिथल्या काही मृत नद्या पुन्हा वाहत्या झाल्या हे त्यांनी तिथे प्रत्यक्ष जाऊन बघितलं. डॉ राजेंद्रसिंह राणा यांच्या  तरुण भारत संघ तर्फे राबविण्यात आलेल्या जल बिरादरी उपक्रमाअंतर्गत हे विलक्षण परिवर्तन घडून आलं आहे. या प्रवासादरम्यान त्या कितीतरी लोकंना भेटल्या जे पूर्वी डाकू होते, डकैती , लुटालूट करायचे, खंडणी मागायचे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चरितार्थासाठी दुसरा काही मार्गच नव्हता. पण आता याच लोकांनी बंदुका टाकून हातात नांगर घेतलं आहे. पूर्वी पाण्याअभावी इथल्या लोकांनी पलायन केलं होतं. पण आता नद्या वाहत्या झाल्यावर पुन्हा ते आपल्या गावी परतले आहेत. शेती करू लागले आहेत. वीणाताई अशा लोकांबरोबर राहिल्या, त्यांच्याबरोबर जेवल्या, त्यांच्या कहाण्या समजून घेतल्या. वीणाताईंना नवीन विषयाचं असलेलं कुतूहल आणि तो समजून घेण्याचा आणि त्यासाठी कष्ट घेण्याची याही वयात तयारी बघून सगळेच अक्षरश: भारावून गेले!

वीणाताई त्यांच्या पुस्तक लिहिण्यामागच्या चिकाटी, मेहनत आणि ध्यासाबद्दलही बोलल्या. प्रत्येक पुस्तकाचं हस्तलिखित असतं आणि त्याचं लेखन, पुनर्लेखनही करावं लागतं. अनेक संदर्भ शोधून, तपासून पुस्तकासाठी वापरावे लागतात. लौकिकार्थाने त्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी नाहीत. पण तरीही अनेक वैज्ञानिक संकल्पना त्या समजून घेऊन त्यांचे सोप्या मराठी भाषेत रूपांतर करून त्या वाचकांसमोर मांडतात. पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्या त्या विषयातील तज्ज्ञांना हस्तलिखित प्रत देऊन त्यांच्याकडून त्या सूचना/दुरुस्त्या मागवतात. 
आपल्या दिनचर्येविषयी त्या मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या की त्यांच्या घरातल्या लोकांना सर्व गोष्टी हातात आणून देणं (यालाच त्यांनी Baby sitting हा शब्द वापरला ) त्यांनी खूप लवकर बंद केलं. त्यामुळे घरातल्यांनाही जाणीव झाली की त्यांना लेखन करण्यात व्यत्यय येऊ देता कामा नये. 
उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि इतरही श्रोत्यांना त्यांनी आपल्या वयाच्या ८१ व्या वर्षीही असलेल्या उत्साहाचं आणि ऊर्जेचं रहस्य सांगितलं. त्या म्हणाल्या  की आपण आपले प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. 'अमकीच्या  साडीचा  पोत असाच आहे, तिने आधीचीच साडी पुन्हा नेसली आहे' या आणि अशा गोष्टी बोलण्यामध्ये आपला वेळ घालवू नये. आपण सर्वसाधारणपणे आपल्या मेंदूचा त्याच्या  क्षमतेच्या १३% च वापर करतो. त्यापेक्षा जास्त वापर करून काही सकारात्मक गोष्टी कराव्यात असं त्यांनी सुचवलं. शेवटी त्यांनी हेही सांगितलं की आजही त्या रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि संध्याकाळी अर्धा तास चालण्याचा व्यायाम करतात. 
आमच्या गप्पांचा हा थोडक्यात गोषवारा ! संपूर्ण मुलाखतीविषयी लिहिणं (व्हिडिओ उपलब्ध नसताना ) तसं थोडं अवघडच! 

४ 
आमच्या कार्यक्रमानंतर अपेक्षेप्रमाणे वीणाताईंभोवती अनेक श्रोत्यांचा गराडा पडला. कोणी त्यांची जुनी ओळख काढत होतं, कोणी त्यांना आणखी कोणाशीतरी बोलायला लावत होतं, कोणाला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते, कोणाला त्यांच्याबरोबर सेल्फी हवा होता. तर माझ्यासारख्याला त्यांच्या पुस्तकांवर सह्या हव्या होत्या. खरं तर वीणाताई आदल्यादिवशी वसईहून गोरेगावला एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथून प्रभादेवीला त्या राहिल्या. सकाळी उठून जांभूळपाड्याला आल्या. हा कार्यक्रम झाल्यावर त्या परत वसईला जाणार होत्या. एवढी धावपळ असून देखील त्या प्रत्येकाशी न कंटाळता, हसतमुखाने बोलत होत्या. आस्थेने समोरच्या माणसाच्या बोलण्यात रस घेत होत्या. सेल्फी, फोटो कशालाही त्या नाही म्हणत नव्हत्या. त्यांचा हा उत्साह, वागण्यातली सहजता, साधेपणा  आणि  उबदारपणा विलक्षण लोभस होता. 
 

आमच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग घेणाऱ्या माणसाने कार्यक्रमानंतर वीणाताईंचे  स्वतः च्या मोबाईल वर स्वतंत्रपणे फोटो काढले. त्याला त्या लेखिका म्हणून माहित होत्या ही वीणाताईंच्या लेखनाला मिळालेली एक मोठी पावतीच होती ! 












Thursday, 27 June 2024

आर डी बर्मन : एक चिरतरूण संगीतकार!


१ 

आर डी बर्मन यांच्यावर याआधी मी तीन ब्लॉग लिहिले आहेत. त्यांची लिंक इथे पोस्ट करत आहे. ज्यांनी हे ब्लॉग वाचले नसतील त्यांनी ते जरूर वाचावेत-

1) R D Burman: one song different moods- 

२) आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि मेलडी -

३) आर डी बर्मन, लता मंगेशकर आणि गाण्यातले भाव-

आर डी बद्दल त्याच्या मृत्यूनंतर तीस वर्षे होऊन गेली तरी अजूनही लिहिलं जातं, बोललं जातं, त्याच्या गाण्यांवर आधारित ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम अजूनही हाऊसफुल्ल होतात. त्याचं संगीत रिमिक्स करून आजही ऐकलं जातं...त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत, ब्रम्हानंद सिंग यांनी तर आरडी वर एक डॉक्युमेंटरी देखील काढली आहे. त्याची गाणी त्याच्या जयंती/पुण्यतिथीला एफ एम रेडिओ वर दिवसभर ऐकवली जातात... आरडीचे शेकडो हजारो फॅन त्याचे भक्त आहेत.आरडी जवळजवळ एक कल्ट बनला आहे...आरडीच्या संगीताची, त्याच्या शैलीची चिकित्सा केली, कोणी टीका केली तर त्या व्यक्तीच्या विरोधात भांडणारे अनेक जण मैदानात उतरतील इतकं या कल्टने टोक गाठलं आहे. आणि म्हणूनच कदाचित बाकीच्या संगीतकारांच्या फॅन्सना ही खटकणारी गोष्ट झाली आहे. असं असताना मी पुन्हा आर डी वर का लिहितो आहे? 
माझा पण आरडी एक अत्यंत आवडता संगीतकार आहे पण केवळ तो एकमेव आवडता संगीतकार नाही (माझे आजवरचे  ब्लॉग बघितले तर मी ३ ब्लॉग ओ. पी. नय्यर यांच्यावर लिहिले आहेत, २ मदनमोहन यांच्यावर, प्रत्येकी एक सलील चौधरी आणि रोशन यांच्या वर, एक ब्लॉग पं रविशंकर यांच्या 'अनुराधा'  या चित्रपटाच्या संगीतावर, तर एक-एक ब्लॉग पं ह्रदयनाथ मंगेशकर आणि वसंत प्रभू यांच्यावर लिहिले आहेत) 
आर डीचा प्रभाव, त्याचं गारूड मनावर आहे. त्याचं संगीत हे माझ्या तरुणपणाच्या काळातलं संगीत आहे. त्यामुळे आजही मी ते ऐकल्यावर माझ्या त्या काळाशी जोडला जातो. म्हणून त्याच्यावर पुन्हापुन्हा लिहावंसं वाटतं. 
आर डी काय वा इतर कुठलाही संगीतकार काय..तो आपल्याला का आवडतो याबद्दल सोदाहरण आणि काही तथ्यांच्या आधारे लिहिलं तर ती नुसतीच भक्ती न होता ते बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ लिखाण होऊ शकतं आणि हा  ब्लॉग लिहिण्यामागे माझा हाच हेतू आणि प्रयत्न आहे.

२ 

 
१) तीसरी मंझिल (६)
२) पडोसन (८)
३) अमर प्रेम (६)
४) कटी पतंग (७) 
५) आप की कसम (६)
६) दि ट्रेन (६)
७) कारवाँ (८) 
८) हरे रामा हरे कृष्णा (७)
९) सागर (७) 
१०) मेरे जीवन साथी  (८)
केवळ वानगी दाखल दहाच सिनेमांची यादी(कंसात प्रत्येक सिनेमात किती गाणी आहेत हे दिलं आहे) इथे दिली आहे. यापेक्षा आणखीही कितीतरी सिनेमे असतील- पण वरील सर्व सिनेमांमधील जवळपास सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय आहेत. अशी किमया सातत्याने साधणं ही अवघड गोष्ट आहे. माझ्यामते सी रामचंद्र, एस डी बर्मन, ओ पी नय्यर आणि शंकर जयकिशन यांनाच इतक्या सातत्याने हे जमलं आहे. आर डी चं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच सिनेमांतील लोकप्रिय गाण्यांमध्ये देखील वैविध्य आहे. उदाहरणार्थ 'हम किसीसे कम नहीं'(एकूण गाणी १०)  मध्ये - रोमँटिक गाणी आहेत, एक प्रेमातील विश्वासघातावरचं गाणं आहे (क्या हुआ तेरा वादा ), कॉम्पिटिशनची सलग ४ गाणी आहेत आणि या शिवाय एक कव्वाली देखील आहे. 

३ 

आर डी चं  हिंदी सिनेसंगीत क्षेत्रात स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण  साठच्या दशकात झालं . सुरवातीला आलेल्या  'छोटे नवाब' सारख्या सिनेमातील त्याचं संगीत आणि नंतरचं संगीत यात बराच फरक आहे. आणि हा बदल झाला त्यामागे काही गोष्टी आहेत असं मला वाटतं. -
१) आपलं  वेगळं स्थान निर्माण करायचं तर इतर संगीतकारांसारखंच संगीत देऊन ते होणं शक्य नाही. त्यापेक्षा वेगळा विचार केला पाहिजे हा विचार आर डी ने केला असणार. (एस डी बर्मन यांनीही त्याला हे सांगितलं होतंच )
२) साधारण साठच्या दशकातील उत्तरार्धात जगभरात आणि भारतात संक्रमणाचं  वातावरण होतं.  तरुण पिढीमध्ये एक अस्वस्थता होती. सर्वसाधारणपणे डाव्या चळवळींनी प्रामुख्याने युरोपमध्ये जोर धरला होता. अमेरिकी वर्चस्ववाद, भांडवलशाही, युद्धखोरी या प्रस्थापित व्यवस्थेविरोधात तरुण पिढीने बंड पुकारलं होतं कारण या व्यवस्थेमध्ये त्यांच्या आशा- आकांक्षा- स्वप्नं पूर्ण करणारं काही नव्हतं किंवा जे होतं त्याने त्यांचं समाधान होत नव्हतं. ही बंडखोरी केवळ आंदोलनं, संप इत्यादी मार्गांमधूनच व्यक्त होत नव्हती तर कला क्षेत्रात देखील यामुळे प्रचंड उलथापालथ झाली होती. वेशभूषा , केशभूषा इथपासून ते चित्रकला, संगीत या सर्व क्षेत्रांत या बंडखोरीने आपला ठसा उमटवला होता.  भारताला स्वातंत्र्य मिळून २०-२५ वर्षे झाली होती. सुरवातीचा आशावाद आणि आदर्शवाद (जो सिनेमांमधून ही प्रकट झाला) लोप पावू लागला होता आणि इथेही प्रस्थापित व्यवस्थेला आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. समाजात ज्या गोष्टी घडतात त्यांचं प्रतिबिंब सिनेमांमध्ये दिसतं तसंच आपल्या कडे होऊ लागलं होतं.  जगापेक्षा कदाचित दहा पाच वर्षे उशिरा झालं असेल पण झालं एवढं नक्की!
३)  आपल्याकडेही सिनेमा बदलू लागला होता. प्रस्थापित  राज-दिलीप-देव-शम्मी हे नायक हळूहळू मागे पडायला लागले होते आणि त्यांची जागा राजेश खन्ना -अमिताभ बच्चन - धर्मेंद्र - ऋषी कपूर - रणधीर कपूर या सारख्यांनी घेतली. एक पिढी बदलून तिची जागा सळसळत्या तरूण रक्ताने घेतली.  नायकांची पिढी बदलल्यामुळे सिनेमांच्या कथानकात बदल झाले आणि या कथानकांना अनुसरून सिनेसंगीतात बदल होणं अपरिहार्य होतं. जुनं संगीत म्हणूनच हळूहळू मागे पडू लागलं. 
४) योगायोगाने याच काळात( प्रामुख्याने सत्तरच्या दशकात)  सिनेसंगीताच्या सुवर्ण काळाचे मानकरी असलेले एक एक संगीतकार अस्तंगत होऊ लागले - अनिल विश्वास पासून सी रामचंद्र ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, नौशाद यांच्या सांगीतिक प्रतिभेला ओहोटी लागली. एस डी बर्मन रेलेव्हंट राहिले पण १९७५ साली निर्वतले. मदनमोहन, रोशन यांनी तर अकाली एक्झिट घेतली. सलील चौधरी आणि हेमंतकुमार यांनी हिंदीतील काम कमी केले. 
अशा पार्श्वभूमीवर  आर डी चा उदय झाला आणि तो इथे जम बसवू लागला. त्याच्याकडे एक जमेची बाजू होती ती म्हणजे त्याला कुठल्याही संगीताचं वावडं नव्हतं. पाश्चात्य संगीताचा तो मोठा चाहता होता आणि नवनवीन संगीताच्या तो शोधात राही आणि त्या संगीताला आपल्या सिने संगीतात कसे वापरता येईल याचा विचार करत राही. त्यामुळे वर उल्लेखलेले पाश्चात्य संगीताचे बदलते प्रवाह ( त्यातील द्रुत आणि वैशिष्ट्यपूर्ण लयीसह) त्याला इथे आणता आले. यापूर्वीही संगीतकार पाश्चात्य संगीताने प्रभावित (इन्स्पायर ) झालेले आहेत. कोणीही त्याला अपवाद नाही. आर डी ने हे मोठ्या प्रमाणावर केलं इतकंच. 
याचंच एक उदाहरण - आर डी च्या  'जवानी दिवानी ' मधलं हे गाणं  म्हणजे  पाश्चात्य संगीत(यात स्केल चेन्जही आहे)  आणि तरुण पिढीला आवडेल अशा वेगवान लयीचा अनोखा मिलाफ असलेलं आहे.. 
तरुण पिढीला आवडेल असं संगीत देणारा संगीतकार हे नाव कमावल्यामुळे कदाचित जेव्हा नव्या हिरोचा पदार्पणाचा  सिनेमा यायचा तेव्हा त्याच संगीत आर डी ने द्यावं हीच मागणी असायची. उदाहरणार्थ- कुमार गौरव (लव्ह स्टोरी ) संजय दत्त ( रॉकी ) सनी देओल ( बेताब) आणि याही सिनेमांमधली जवळपास सगळीच गाणी लोकप्रिय झाली. https://youtu.be/9z6EEprP4rA?si=lYLeJVesbCHJZM71 

४ 
आर  डी बर्मन हा रिदम आणि आवाजाचा चाहता होता. वेगवेगळे रिदम आणि अनोखे आवाज त्याने त्याच्या गाण्यात आणि पार्श्वसंगीतात वापरले. ('सत्ते पे सत्ता'  मधला दुसऱ्या अमिताभच्या एंट्रीच्या वेळचा गायिका ऍनेट ने gargling मधून काढलेला  आवाज सुप्रसिद्ध आहे ) पॉलिश पेपर घासून काढलेला ट्रेनचा आवाज ( होगा तुमसे प्यारा कौन-जमाने को दिखाना है ) गडगडाटासाठी मेटल शीटचा वापर ( भीगी भीगी रातो में- अजनबी ) ही उदाहरणं ज्यांनी 'पंचम मॅजिक' या संस्थेने आयोजित केलेले कार्यक्रम बघितले असतील त्यांना नक्कीच माहित असतील.  पाश्चात्य (लॅटिन अमेरिकेतील) एक रिदम पॅटर्न बोसानोवा आर डी बर्मन पहिल्यांदाच हिंदी सिनेमात वापरला- 
रिदमचा  आणखी एक प्रयोग म्हणजे- मादलतरंगचा अप्रतिम वापर-

आर डी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या बाबतीतही वेगळ्या विचारांचा होता आणि त्यातही त्याने प्रयोग केले ( ज्याबद्दल मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये  'क्या जानू  सजन' या गाण्याबद्दल लिहिलं होतं) 

५ 
पण आर डी बर्मन म्हणजे केवळ उडत्या आणि वेगवान ठेक्यांची, पाश्चात्य संगीतावर आधारित गाणी देणारा संगीतकार इतकी त्याची मर्यादित ओळख नाही. वर उल्लेख केलेले सगळे चित्रपट करत असतानाच दुसरीकडे त्याने हृषीकेश मुखर्जींबरोबर -'नमकहराम', 'गोलमाल',' खूबसूरत', 'बेमिसाल', 'जुर्माना', 'रंगबिरंगी', 'किसीसे ना कहना' यासारखे सिनेमे, बासू चॅटर्जी यांच्याबरोबर 'मंझिल', 'शौकीन' यासारखे चित्रपट तर गुलझार यांच्याबरोबर 'परिचय' पासून ते 'लिबास' पर्यंत असे वेगळ्या धाटणीचे सिनेमेही केले. जणू काही ही दोन वेगवेगळी माणसं असावीत अशा प्रकारचं संगीत त्याने अशा सिनेमांमधून दिलं ! अशा सिनेमांमधून त्याच्या सर्जनशीलतेला आव्हान मिळालं आणि त्याने ते पेललंही ! गुलझार आर डी काय किंवा हृषीकेश मुखर्जी आर डी काय- हे स्वतंत्र ब्लॉगचे विषय आहेत. त्यावर लिहीन की नाही माहीत नाही पण या ब्लॉगचा शेवट मात्र माझ्या या आवडत्या गाण्याने करत आहे- 




Thursday, 2 May 2024

हिमाचल डायरी ७- खानपान आणि सुकून !

१ 

आमच्या हिमाचल ट्रीपला आम्ही धरमशाला मध्ये अमितकुमार यांच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो याविषयी हिमाचल डायरी २ मध्ये लिहिले आहेच.  तिथल्या वास्तव्यादरम्यान आम्हांला हिमाचल प्रदेशमधील  काही खास पदार्थ खायला मिळाले. आपण जिथे जातो तिथलं स्थानिक खावं असं मला वाटतं आणि म्हणून मी अमितकुमारांना तसं सांगितलंही होतं. मात्र पहिल्या दिवशी आम्हांला टिपिकल मिक्स कुर्मा, चिकन करी असं जेवण होतं. ते मला म्हणाले की ते दुसऱ्या दिवशी हिमाचली पदार्थ करतील. दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा त्यांनी आणून दिला आणि तिथपासूनच वेगळ्या चवीला सुरुवात झाली. वरवर पाहता आपला नेहमीचाच दुधाचा चहा दिसत होता. पण चव घेतल्याघेतल्या काहीतरी वेगळं जाणवत होतं. मला आधी वाटलं की चहात बडीशेप आहे की काय. पण त्यांना विचारल्यावर आणखी धक्का बसला - ते म्हणाले चहात चक्क ओवा आहे! एवढंच नाही तर त्यांच्याकडे चहा करताना पाणी घातल्यावर त्यात मीठ घालायची पण पद्धत आहे. पण मीठ घालूनही दूध नासत नाही असंही ते म्हणाले. तिथे दोन दिवस वेगळी चव म्हणून मला तरी तो चहा आवडला. पण रोज असा चहा प्यायला आवडेल का माहित नाही. दुसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या जेवणाला आम्हांला अमितकुमारांनी हिमाचल प्रदेशचे चार खास पदार्थ खिलवले. एवढंच नाही तर ते पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईला मुद्दाम बोलावून घेतलं.(त्या आम्ही राहात होतो त्या हॉटेलपासून ११ किमी अंतरावर राहतात.) अमितकुमार जर पस्तीस- चाळिशीचे असतील तर त्यांची आई साठीच्या आगे मागे असाव्यात. हे सगळे पदार्थ त्यांनी एकटीने केले होते. आणि ते करणं नक्कीच मेहनतीचं काम आहे. त्या म्हणाल्या की हिमाचल प्रदेश मधील लग्नांमध्ये हे आणि असे एकूण १२ पदार्थ करतात ज्यांना धाम असं म्हटलं जातं. हे पदार्थ आधुनिक भांड्यांमध्ये न करता पारंपरिक लोखंडी/पितळ्याच्या भांड्यांमध्ये करतात ज्यामुळे पदार्थांना एक वेगळाच स्वाद येतो.

तर आम्ही खाल्लेले हे हिमाचली पदार्थ- 

 

डावीकडून-
तेलिया माह , नंतर साध्या भाताच्या उजवीकडे चना खट्टा आणि त्याच्या खाली रोंगी मद्रा. हे तिन्ही पदार्थ कडधान्यांपासून बनवले आहेत. तेलिया माह (जिला माहनी असंही म्हणतात) ही भाजी काळ्या मसुरापासून, चना खट्टा ही काळ्या हरभऱ्यापासून तर रोंगी मद्रा  चवळीसारख्या कडधान्यापासून बनवतात. तिन्ही पदार्थ मोहरीच्या तेलात केले जातात. हवेचा आणि वातावरणाचा खाण्यापिण्यावर कसा परिणाम होतो याबद्दल अमितकुमारांनी अगदी सहज जाता जाता सांगितलं. ते म्हणाले की इथे भाज्या मिळत नाहीत म्हणून बरेच प्रकार 
कडधान्यांपासून करतात तर तिथल्या हवेत फारसा घाम येत नसल्याने तिथले पदार्थ जास्त मसालेदार असतात. 
आणि चौथा पदार्थ म्हणजे-
 

हा आहे कडा सूजी . आपल्या शिऱ्यासारखाच. पण रवा जास्त खरपूस भाजत असावेत की काय माहित नाही. म्हणून कदाचित त्याचा रंग असा चॉकलेटी होता. असाच कडा प्रशाद आम्हांला गुरुद्वारांमध्ये देखील मिळाला होता. सगळे पदार्थ चविष्ट होते. हिमाचली पदार्थांनी आमच्या ट्रीपची लज्जत नक्कीच वाढवली. माझा करंटेपणा असा की मी पदार्थांचे फोटो काढले पण ज्या माऊलीने हे केले तिचा फोटो काढायचा राहूनच गेला. म्हणजे खरं तर त्यांचा फोटो कसा काढायचा असं मला संकोचल्यासारखंच झालं. 

कसोलला आम्ही व्हेज आणि नॉन व्हेज असं थुक्पा नूडल सूप देखील घेतलं. मला जास्त चिकन सूप आवडलं. यात आल्याचा मुबलक वापर केला होता -म्हणजे पुन्हा थंड हवेसाठी उपयुक्त असा हा पदार्थ आहे. 
 

२ 

हिमाचल विषयी ब्लॉग लिहीन असं वाटलं होतं. दोन चार ब्लॉग लिहीन असं वाटलं होतं पण तब्बल सात ब्लॉग लिहीन असा विचारही मनात आला नव्हता. हिमाचल ट्रीपच्या अनेक फलितांपैकी एक मुख्य फलित हेच म्हणता येईल- या ट्रीपने मला पुन्हा लिहिते केले ! लिखाणाच्या बाबतीत एक प्रकारे मरगळ आली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली. आम्ही खूप प्रवास केला, अमृतसर ते धरमशाला, धरमशाला मधली ठिकाणं, डलहौसी, खज्जियार, परत धरमशाला ते कसोल आणि शेवटी कसोल ते दिल्ली- एवढा प्रवास कार  किंवा बसने केला. चिकार दमणूक झाली. झोप अर्धवट झाली. वेळी अवेळी खाण्यामुळे थोडाफार पोटावर देखील परिणाम झाला. पण तरीही शेवटी कसोलला असताना एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळाली आणि सगळा शीण निघून गेला. आम्ही राहत होतो तिथे बाजूलाच पार्वती नदी वाहत होती....

 

नदीच्या पाण्याची गाज सतत आम्हांला साथ करत होती. या शांततेत हा नाद आणखी गहिरा वाटत होता. शहरातील तऱ्हेतऱ्हेचे आवाज ऐकण्याची सवय झालेल्या कानांना हा नाद ऐकणं ही एक पर्वणीच होती! कसोलच्या एका बागेत वा आमच्या हॉटेल बाहेर कितीतरी वेळ आम्ही काहीही न करता नुसतेच बसून हा आवाज ऐकून कानात साठवून ठेवत होतो. या नादावर इतर कुठलाही आवाज हावी होत नव्हता. त्यामुळे त्याची एक लय तयार झाली होती जी आपोआपच लक्ष वेधून घेत होती. तो नाद...ती लय मनात अजूनही गुंजत राहिली आहे. हा निवांतपणा..ही शांतता अगदी meditative होती... या सहलीत आलेल्या अनुभवांचा कळसाध्याय कसोल मधील या काहीही न करता खूप काही करण्यात होता..
हिमाचल प्रदेशात परत कधी जाईन माहित नाही...गेलो तरी असेच अनुभव येतील का हेही माहित नाही पण मनाच्या एका कोपऱ्यात  हिमाचल प्रदेश साठी राखीव जागा कायमच राहील यात काही शंका नाही.

                                 (समाप्त)






Tuesday, 30 April 2024

हिमाचल डायरी ६- निसर्ग सौंदर्य...

१  

हिमाचल प्रदेशवर  निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे हे तिथे अगदी पाऊल टाकल्या टाकल्याच लक्षात येतं. आपण उष्ण प्रदेशातून तिथे जातो. आम्ही पुण्यातून गेलो तेव्हा पुण्यात ३८-३९ डिग्री तापमान होतं. अमृतसरला सुद्धा उकाडा होता. मात्र हिमाचल प्रदेशला पोचल्यावर लगेच वातावरणातला फरक जाणवला. आणि समोर जेव्हा बर्फाच्छादित शिखरं बघितली तेव्हा तेव्हा नकळत वा ! असा उद्गार आला. ही हिमशिखरं बघूनच अंगाची झालेली लाही लाही कुठल्याकुठे पळून गेली ! 


 

या धौलाधार  पर्वतरांगा -शिवालिक पर्वतातून निर्माण झालेल्या, कांगडा आणि मंडीच्या उत्तरेला असलेल्या. हिमाचल प्रदेशच्या वायव्य दिशेपासून सुरु होऊन मनालीजवळील पीर पंजाल पर्यंत विस्तार असलेल्या. सर्वसाधारण उंची ३५०० ते ६००० मीटर. याच रंगात मणिमहेश पर्वत देखील आहे-

तर कसोल या पार्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या सुंदर,टुमदार गावातून दिसलेला हिमालयाचा हा नजारा-

 

 


डोळ्यांचं पारणं फिटेल अशी आणि डोळ्यांना सुखावह वाटेल अशी ही निसर्गाची नेपथ्यरचना ! 

२ 

आम्ही एप्रिल महिन्यात हिमाचलला गेलो होतो. त्यामुळे बर्फवृष्टीचा काळ संपला होता . तरी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बर्फ साठलेला आम्हांला दिसला. 
 

आम्हांला बरीच झाडं आणि फुलं बघायला मिळाली. उंचच उंच पाईन, देवदार वृक्ष तर बघितलेच- 
हा फोटो खज्जियारचा आहे.  


याशिवाय इतरही बरीच झाडं दिसली. पण सगळ्यात पहिल्यांदा काय जाणवलं असेल तर आसमंतात दरवळणारा आंब्याच्या मोहोराचा सुगंध!  तिथे आत्ता  मोहोर आहे म्हणजे प्रत्यक्ष फळ येईपर्यंत महिने-दोन महिने नक्कीच लागतील. धरमशाला मधील वॉर मेमोरियल मधल्या बागेतला हा आंब्याच्या झाडाचा फोटो- 
 

आम्हांला हिमाचल प्रदेशाचं राज्य फूल ऱ्होडोडेंड्रॉन सुद्धा दिसलं. झाडांवर लाल लाल फुलांचे गुच्छ लगडलेले बघायला मिळाले. जणू काही झाडं सुद्धा वसंत ऋतूचं तोरण लावून उत्साहात स्वागतच करत आहेत असं ते दृश्य होतं- 




 

हे फूल मी खाल्लं सुद्धा- छान आंबट-गोडसर चव होती. याच ऱ्होडोडेंड्रॉन पासून होमिओपॅथीमध्ये सांधेदुखीसाठी औषध तयार केलं जातं. 
याशिवाय आम्हांला जागोजागी पांढऱ्या फुलांनी बहरलेली झाडं दिसली. लांबूनही ती चित्ताकर्षक दिसत होती. या झाडाला स्थानिक भाषेत कचनार म्हणतात. इंग्रजीत माउंटन एबोनी तर शास्त्रीय नाव- Bauhinia variegata (म्हणजे आपल्याकडे जसं कांचन असतं तसंच. फक्त कांचनची फुलं जांभळ्या रंगाची तर ही पांढरी असतात ) -
 



 
या फुलांचं लोणचं करतात. तसंच यातही औषधी गुणधर्म आहेत. Anti oxidant आणि Anti cancer गुणधर्म आहेत. आमचा ड्राइव्हर तर म्हणाला होता की थायरॉईड च्या आजारांसाठी देखील ही फुलं उपयुक्त आहेत. 
याशिवाय आणखी काही सुंदर फुलं दिसली. त्यांचे फोटो आणि नावं - 

Crofton Weed (Ageratina adenophora) 

Oxalis debilis

Rumex acetosella 

Bradford Pear (Pyrus calleryana)

Indian Nard (Nardostachys jatamansi)

Bergenia ciliata 

also called पाषाणभेद 

Ageratum houstonianum  

३  

हिमाचलला पक्षी निरीक्षणासाठी जायचं असं काही ठरवलं नव्हतं. फक्त २ कॅमेरे नेले होते. सहज पक्षी दिसले तर फोटो काढायचे एवढाच उद्देश आणि पक्ष्यांनी सुद्धा निराश केलं नाही ! बरेच पक्षी दिसले. काहींचे फोटो काढले. काहींचे काढता आले नाहीत. पण त्याचं एवढं दुःख झालं नाही. उलट कोणतीही अपेक्षा नसताना काही सुंदर पक्षी बघायला मिळाले याचाच आनंद जास्त मिळाला. तर तिथे दिसलेल्या काही पक्ष्यांचे हे फोटो -


 
Plumbeous Redstart 

White capped Redstart 





Brown fronted Woodpecker 

Streaked Laughing Thrush 

Himalayan Bulbul 


Yellow billed Blue Magpie 


Verditer Flycatcher 

Gray Wagtail 

Brown Dipper  


 
Brown Dipper juvenile 

 Kalij Pheasant Female 
 
Blue Whistling Thrush 


 
Himalayan Griffon Vulture 


 
Green backed Tit 




४ 

संकीर्ण: 

खरं म्हणजे या गोष्टीला कुठे जागा द्यायची याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. म्हणून तिला संकीर्ण या नावाखाली घातलं आहे. आम्ही धरमशालाहून रात्रीचा प्रवास करून भून्तर या गावी उतरलो. इथून टॅक्सीने कसोलला गेलो. रात्रभर प्रवासाचा तसा शीण होता. पण ड्राइव्हर गप्पीष्ट होता त्यामुळे जरा इकडच्या तिकडच्या गप्पा चालूच होत्या. वाटेत डाव्या बाजूला एक उंच डोंगर दिसला आणि त्यावर वस्तीसुद्धा दिसत होती. पण खरं तर हा डोंगर इतर भागांशी अजिबात संपर्क नसलेला वाटत होता. मी आपलं ड्राइव्हरला सहज विचारलं - इथले लोक जगाशी कसे कनेक्टेड राहतात ? कारण सर्वार्थाने एकदम कट ऑफ असलेला हा भाग दिसतोय. त्यावर त्याने दिलेली माहिती एकदम उद्बोधक होती. तो म्हणाला की हे मलाना नावाचं गाव आहे. इथले लोक स्वतःला भारताचा नागरिक मानतच नाहीत. इथले कायदे कानू वेगळे आहेत. भारतात अफूची शेती करणं बेकायदेशीर आहे पण इथे ती सर्रास केली जाते. इथे कोणी बाहेरचे लोक आले तर त्यांनी कुठल्याही वस्तूला हात लावायची परवानगी नसते.ते कधी शेक हॅंड करत नाहीत आणि म्हणूनच कदाचित कोव्हिड काळात इथे कोणीही कुठलीच लस देखील घेतली नाही. इथल्या लोकांची भाषा सुद्धा वेगळीच आहे आणि ती फक्त त्या गावातील लोकांनाच बोलता येते. मागे आम्ही काश्मीरला गेलो असताना बारामुल्ला जवळ आम्हांला पलहलन गाव लागलं होतं. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या संपूर्ण गावाने एकदाही कुठल्याही मतदानात भाग घेतला नव्हता असं आम्हांला आमच्या ड्राइव्हर ने सांगितलं होतं त्याची या मलानावरून आठवण झाली. एकदा वाटलं की हा ड्राइव्हर कशावरून खरं बोलत असेल? म्हणून विकिपीडिया वर जाऊन बघितलं तर आणखी आश्चर्यकारक माहिती मिळाली. इथले लोक म्हणे अलेक्झांडरच्या सैनिकांचे  वंशज आहेत. त्यांना वाटतं की त्यांचं गाव हे जगातलं  सर्वात जुनं  प्रजासत्ताक आहे. ड्राइव्हर म्हणाला तसे खरोखरच त्यांचे वेगळे कायदेकानू आहेत. मलानाचे फोटो काढता आले नाहीत पण ही माहिती खूपच नवीन आणि वेगळी वाटली. अधिक माहितीसाठी विकिपीडिया ची लिंक -

                                                                                                                                                        (क्रमश:)